Tuesday, January 19, 2010

पुस्तकाचा कोपरा - इव्हच्या लेकींसाठी!



स्त्रीवादी लिखाण असा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा बहुतांश वेळा ते स्त्रीमुक्तीवर स्त्रियांना काय वाटते याच ढंगाचे असते. पण ‘व्हॉट वुमेन रिअली वाँट्स?’ हा प्रश्न फक्त चित्रपट, लोककथांमध्ये चर्चिला जातो. खरं तर स्त्री-पुरुष ही निसर्गचक्राची दोन आरी. पण तरीही पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला कायमच दुय्यमस्थान मिळत आलं. मग या दुय्यम स्थानाचा इतिहास धुंडाळताना लक्षात येतं, भाषा वेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले, जाती वेगळ्या असल्या इतकंच काय धर्मही वेगळे असले तरी हे स्त्रियांचे दुय्यम स्थान मात्र सगळीकडे आणि सगळ्या काळात सारखं आहे ही खात्री डॉ. मंगला आठलेकरांचे ‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ हे पुस्तक वाचताना परत पटते.

जगातले चार महत्त्वाचे धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म. या धर्माच्या आचरणग्रंथातील स्त्रीचे स्थान किंवा स्त्रीआचरणाचे नियम या सर्वामध्ये एक मोठी गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे ‘स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करा, तिला दूर ठेवा. मोक्ष मिळवण्यासाठी तिला दूर ठेवणं आवश्यक आणि त्यामुळेच विविध मार्गानी तिची करता येईल तितकी नालस्ती सर्व धर्मानी केली. एकही धर्म याला थोडासुद्धा अपवाद नाही. या सर्व धर्मातील स्त्रीदृष्टीकोनांवर लिहिण्याआधी डॉ. आठलेकरांनी अमाप ग्रंथ वाचले असणार. कारण त्याचे प्रत्यंतर संदर्भग्रंथात येतं, तैत्तिरिय संहिता, भारतीय संस्कृती कोष, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती, स्कंदपुराण महाभारत आदीपर्व, अंगुत्तरनिकाय, संयुक्तिनिकाय, पाली भाषेतील बौद्ध संत साहित्य, द इसेन्स ऑफ बुद्धिझम, भगवान बुद्ध जीवन और दर्शन, नवा करार, जुना करार, Women, church, church and state- Matida Gage, The religion of women- Anhistorical study, कुराण, इस्लामचे अंतरंग, निर्वाचित कलाम, Women in Islam इत्यादी अनेक ग्रंथाचा संदर्भ घेऊन त्या त्या धर्मासंदर्भातले लिखाण केलेले आहे. केवळ टीकेसाठी टीका करण्याच्या हेतूपेक्षाही स्त्रीस्थानाचा परामर्श घेण्यासाठी या पुस्तकाचा ध्यास आहे हे संदर्भसूची पाहूनच जिज्ञासूंच्या लक्षात येईल. या धर्मामधील रूढी, परंपरा, इतिहास यांवर भाष्य करता करताच लेखिकेचे काही प्रश्न निरुत्तर करून जातात. त्या म्हणतात सर्व पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना सर्व स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्माकडून घडलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे महापुरुष माणुसकीच्या तत्त्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करत राहिले? स्वत:ला ‘करुणामयी’ कसं म्हणवून घेत राहिले?

महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, महर्षी वि. रा. शिंदे, र. धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्यादेखील साहित्याचा अभ्यास करून योग्य तिथे त्यांच्या मताबद्दल कठोरपणे लिहून जातात. आज सहज वाटणारे स्त्री-शिक्षण किती कष्टाने मिळाले किंवा बालविवाह, बालविधवा या सगळ्या वणव्यातून स्त्रियांच्या कित्येक पिढय़ा शतकानुशतके, युगानुयुगे भाजून निघत होत्या. ‘स्त्री’ला मान देण्यासाठी तिला माता किंवा भगिनी होण्याचं बंधन महापुरुषांकडून घातलं जात होतं. ‘स्त्रीला ठरवू द्यात तिला काय हवंय’ किंवा ‘स्त्रियांनी संततीनियमनाची साधने वापरली पाहिजेत, त्यांना समागमाचा अधिकार मिळायला हवा’ असे म्हणणारे आगरकर, र. धों. कर्वे त्यांच्या जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूंनतरही दुर्लक्षित, एकाकी पडले.

पुस्तक वाचताना एकच गोष्ट वारंवार मनात येत होती. गार्गी, मैत्रेयीचे दाखले देत आपल्या संस्कृतीने ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हते’ म्हणणाऱ्या मनूचीही भलावण केली. काळ बदलला आणि आपण कनिष्ठ आहोत हा भाव स्त्रियांसकट जगभरातल्या सर्वच लोकांमध्ये असा खोलवर भिनला, भिनवला गेला की, स्त्रीसुद्धा ‘पुरुषाशिवाय जगणं कठीण, तोच आपला आधार आहे’ हे घोकत राहिली, काळ बदलला काही संवेदनशील पुरुषांनी आणि बंडखोर स्त्रियांनी या वर्षांनुवर्षे खितपत पडलेल्या अस्पृश्य, गरीब, बिचाऱ्या ‘इव्ह’च्या लेकींसाठी स्वातंत्र्याची दारं हळूहळू खुली केली, आता किमान त्या दुसऱ्यांकडे पाहू शकतात. हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र प्रकर्षांने वाटलं, पुरुषांनी सामान्य असो वा महान कायम, स्त्रीला काय हवं ते स्वत:च ठरवले, स्त्रीसुधारणा पुरुषी नजरेने केल्या. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी बरे असं म्हणत स्त्रीवर्गही खुश झाला. पण स्त्रिया कधी स्वत:कडे स्त्री म्हणून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघतील? हा विचार प्रकर्षांने पृष्ठभागावर आणण्याचे काम हे पुस्तक करते!

Sunday, January 17, 2010

कविता - अठवणींच कपाट

असते एक भलेमोठे कपाट,
त्यात लपवलेल्या असतात गोष्टी सतराशे साठ,
जाणते अजाणतेपणी कोम्बलेल्या असतात गोष्टी भा‍रंभार ,
कधी जमून जातात त्यावरच धूळीचे थर न थर,
पण कपाट मोकळे करणे मात्र जमतच नाही,
कधीतरि वाटते आणि सुरवातहि होते साफ़सफ़ाईला
पण काळचे एकेक थर मोकळे करतान आठवतात आठ्वणीसुद्धा नको वाटणारे क्षण
आणि मग गच्च आपटून ‍बन्द करुन टाकतो आपणच कपाट,
त्या आवाजालाच म्हणतात हुन्दका..

तर कधी असेहि होते
आपण टाकतच राहतो टाकतच राहतो कपाटात ,
आणि त्यातल्या आठवणी ओ‍सन्डून वाहयला लागतात,
त्या‍नाच म्हणतात अश्रु......