‘दुसऱ्या वेळी
आई होण्याचा आनंद वेगळाच असतो, अजून एक जीव पोटात वाढवण्याचा आनंद वेगळाच असतो.’
जाहिरातीमधील ती एकदाच आई झालेली प्रसिद्ध अभिनेत्री सांगत होती. पण खरेच जर अस
असेल तर ही बयाच दुसरा चान्स का घेत नाही? रामा रामा हिला काय जातंय सांगायला,
पोरं सांभाळायला बायका असतील. हिनं पोरासाठी एक तरी रात्र जागवली असेल का? आमच्या
मेल्या ३६५*२ रात्री फक्त पोरांच्या रडण्यात, चड्ड्या बदलण्यात, आणि पोरगं उठणार
तर नाही ना या धास्तीत झटपट उरकून टाकण्यातच गेल्या. आता सवय झाली म्हणा किंवा
पोरगं जरा मोठं झालंय त्यामुळे रात्री बर झोपते, पण तरीही मध्ये मध्ये एखादी रात्र
निघतेच, पोरगं जागवतच.
हिला काय जातंय
म्हणायला सेकंड चान्स घ्या म्हणून, सगळी सुखं असून ही एकातच गार!
‘अग पण एकाला
दोन असलेली बरी, एकमेकांच्या नादानी खेळतात, आणि पुढ मागं एकमेकांना साथही देतात.’
-आणि नसलेल्या
संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठली तर?
‘पण मुलांना
सोबत लागते ना? खेळायला कोणीतरी लागतं, किती वेळा मुलं जाणार दुसर्यांच्या घरी खेळायला?’
-वेळ आहे कुठं
आताच्या मुलांकडे, शाळा, बाकीच्या अॅक्टीव्हिटीज. एकवेळ झोपले नाहीत तरी चालेल, पण
मुलांना डान्स, गाणं, स्केटिंग, स्विमिंग, बॅडमिंटन , पेंटिंग, योगा आणि अम आणि तम
आलंच पाहिजे
‘आपल्यासारख्या
सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची संख्या वाढली पाहिजे, ते *** धर्माचे लोक बघा, एकेका
घरात चार चार पाच पाच मुलं जन्माला घालतात, बाईच्या हातात एक, कडेवर एक, आणि पोटात
एक असतं. अशानं आपला, धर्म, जात संकटात येईल.’
-या असल्या झ्याट
समजुतींपायी आम्ही आमची परवड का करायची? धर्म जात टिकतात ते त्यांच्या मूल्यांमुळे,
लोकांमुळे नाही, आमचा नाही बाई विश्वास या असल्या कश्याकश्यावर.
‘म्हातारपणाची
काठी म्हणून अजून एक मूल असू द्यावं, काय सांगावं एकानी नाही बघितलं तर दुसरा
बघेल, किंवा एकावरच का भार टाकायचा? दोघं आलटून पालटून बघतील.’
-झालंच बाजारात
तुरीची गत, आणि कशावरून दोघंही बघणार नाहीत, ती ही एक शक्यता आहेच ना, आम्ही काही पोरांवर
अबलंबून राहणार नाही, आम्ही त्याला वाढवलं म्हणून त्यानं आम्हाला म्हातारपणी
बघायचं असं काही कॉन्ट्रॅक्ट आम्ही जन्माच्यावेळी केल नव्हत.
‘अय्या एकाच
मुलगा, पण घरात मुलगी हवीच, दुसरा चान्स घ्या की घराला कसं घरपण येतं.
-म्हणजे
आपल्याला हवं ते अपत्य ठरवून जन्माला घालता येत? कित्ती छान पण जर चुकून परत
मुलगाच झाला तर? आणि घराला घरपण द्यायला फर्निचर पुरत असं मला वाटत होतं.
‘एकाला दोन
पाहिजेतच, उद्या देव न करो पण जर तुमच्या एकुलत्या एका मुलाला काही झालं तर? दुसरं
मूल तरी सोबत असले ना? त्यासाठीच पूर्वीची लोकं भरपूर मुलं होऊ द्यायची. एक दोन तरी
धडधाकट जगातील म्हणून.
-हम्म्म्म जे
जेव्हा व्हायचं ते तेव्हा होणारच आहे, आणि जर या दुसऱ्या मुलाला जन्म देताना काही
कॉम्पलीकेशन्स होऊन मी मेले तर? दोन्ही
पोरं किंवा एक पोर तर नक्कीच अनाथ होईल ना.
‘पहिल्यावेळी
पहिलेपणाचा आनंद असतो, पण दुसऱ्यावेळी डोळस पालकत्व करता येतं.’
-आणि मग जर
मुलांनी आमच्यावर भेदभाव केल्याचा आरोप केला तर?
या सगळ्यावर कडी
करणारी एक जमात असते, जे शास्त्र, वैद्यक शास्त्राच्याही पल्याड पोहोचलेले असतात.
‘तुम्ही ते
चायनीज कॅलेंडर का नाही बघत? त्यात वय घालत की कोणत्या महिन्यात मुलगा, मुलगी होऊ
शकतात हे कळत. म्हणजे कसं तुम्हाला प्लॅन करून कुटुंब चौकोनी करता येतं.’
-अरे वाः हे
म्हणजे शेताले पीक काढण्यासारखच झालं की, आम्ही पहिले मोत्याची शेती करून बघतो,
आणि मग या माणसांच्या शेतीकडे वळतो. चायनीज लोकं हेच वापरून मुलं जन्माला घालतात
का?
‘मग अजून एकांनी
‘योगा’योगाची गोष्ट सांगितली. तुम्ही अमुक स्थितीत करून बघा, नक्की इच्छित फळ
प्राप्ती होईल.’
या अशा सगळ्या
सूचना ऐकून तिला वाटायचं खरंच घेरी येईल आता.
आई, सासू
दोघींनी कधी आडून, कधी प्रत्यक्ष सुचवून झालं होतं, सगळी शक्य तेवढी कारण, समजुती
सांगून झाल्या होत्या.
आपण एक आई वडील,
एक नवरा, त्याचे एकच आई वडील, एक मूल यात
खुश असताना लोकांना काय पडलं आहे माझ्या न जन्मलेल्या मुलाबद्दल, असं तिला
प्रत्येक सल्लाळूना विचारावंसं वाटायचं.
चौकोन कसा सम
असतो, त्रिकोणापेक्षा चौकोन बरा आता तर लोकांनी सुखी संसाराचं गणितही मांडायला
सुरुवात केली होती.
आजी आईपासून
सुरु झालेली ही साखळी एखादा संसर्ग लागावा तशी बायकांमध्ये सहज लागत जाते. पण
त्यातच एखादी ही साखळी तोडणारीही भेटते, कशाला हवं दुसरं मुल, एक झालं बास की. तर
एखादी म्हणते बाई आम्ही पडलो फशी सल्ल्यांना तू
काठावर आहेस तेच बरंय. तेव्हा तिला सांगावस वाटतं, मी काही नाही काठावर या
लोकांनी आभास केलास माझ्या काठावर असण्याचा.
पण मग कधीतरी घरातलं
पात्र बोलायला लागात, त्या अमक्या तमक्याला भाऊ झाला, त्या अलाणी फलाणीला बहिण
झाली, चेहऱ्यावर मग चा प्रश्न ठेवून मी बघते, पण मग तोच बघतो, पण आपल्याला तर बाळ
नकोय ना, मी होतो ना बाळ, मग कशाला हवंय बाळ परत. सुटकेच्या निःश्वासाने मी माझं
लेकरू ते म्हुणुन घट्ट मिठी मारते.
प्रत्येकाला
स्वतःच्या आयुष्याची घडी बसवण्यापेक्षा दुसर्याचे आयुष्य मार्गी लावण्यात खासा रस
असतो. शाळेत जा, शिका, नोकरी करा, लग्न करा, मूल काढा, एक पुरेसं नाही दोन काढा,
जणू काही आखलेला अल्गोरिदम. पण हा अल्गोरिदम नाकारता नाकारता जेव्हा ती प्रतिबिंब
होऊन आरशात उमटते आणि विचारते पण तुला खरच
हा मातृत्वाचा आनंद परत नको आहे? ते टवारलेल पोट, ती जुळलेली नाळ, स्वतःविषयी
जास्तच वाटणारी आस्था, आपल्यातून प्रगटणारी आपलीच मूर्ती स्तन लुचणारे पिटुकले ओठ,
तो नव्हाळ्या देहाचा स्पर्श खरंच हवा आहे ना तुला?
तो जगस्त्रीचा
संसर्ग देहाला लागतोय की काय अशी शंका येताच मनातली स्त्री सांगते हा अनुभव काय
फक्त देहातूनच घ्यायचा असतो का? आणि अनुभव घेण्यासाठी जबाबदारीही घ्यावी लागते
त्याचे काय? हे पलायन नाही हा तर सुटकेचा मार्ग आहे.
त्याच वेळी अजून
एक कुठली तरी विचार करत असते, पण गर्भाशयातून एक असो, दोन असो अनेक असो, मूल काढण म्हणजेच स्त्री जन्माची इतिकर्तव्यता
असते का? हा जिचा तिचा प्रश्न असायला हवा ना? हा तिचा प्रश्न तिच्यापर्यतच असला तर
कधी आरशातली स्वप्नाळू प्रतिमा जिंकते तर कधी आरशाबाहेरची व्यवहारी, कठोर जिंकते
पण अनेकदा तिचा प्रश्न तिच्यापर्यंत येईपर्यंत मधल्या अनेक सल्ल्यांनी त्याचे
उत्तर दिलेलं असतं आणि जीव जन्माला आलेला असतो. हारलेल्या स्वप्नाळू जमतात अशा
यशस्वी जीवांच्या स्वागताला आणि सरकवू पाहतात पुढे त्यांची अपूर्ण स्वप्ने, पसरवत
राहतात सल्ले वाट पाहत राहतात कुठेतरी त्यांना वाट सापडल्याची आणि शोधात राहतात आरसे
तिला तिच्या नैसर्गिक प्रेरणा दाखवणारे.... !!!!!!!!!!!!!!!!
लिहिलेलं तिनं
परत वाचलं, त्यात काही नवीन नव्हत, म्हणजे स्वतः लिहिलेलं ते परत एकदा वाचायची. पण
ते आवडेल याची खात्री नसायची म्हणून कधी कधी वाचण टाळायची, पण आज परत वाचल्यावरही
तिला वाटलं, हे मुद्दे झाले, बाकीचे कुठे आहे? मग तिनं ती फाईल अर्धवट म्हणून नाव
घालून ठेवली.
रात्री
झोपेमध्ये अचानक तिला काहीतरी आठवलं, काय आठवलं ते आठवण्यासाठी ती उठून बसली, आणि
चालत चालत आरशासमोर जाऊन बसली, खरतर तिला जायचं होतं लॅपटॉपसमोर. पण आत्ता तिला
एकदम मनात काय चाललाय बघण्यापेक्षा चेहऱ्यावर काय दिसतं ते बघावसं वाटलं. अर्धवट
झोपेतून उठल्यावर आपण अशा दिसतो तर, आपल्या रोजच्या चेहर्यापेक्षा यावर एक वेगळा
भाव दिसतो, प्रेम, राग, मोह, हेवा, आनंद, किळस यापेक्षाही वेगळंच काहीतरी, अभावीन
भाव, कित्येकवेळा त्याने हा भाव बघितला असणार, तिला गादीवर घोरत झोपलेल्या त्याचा
हेवा वाटला, अशा अर्धवट झोपेत कित्येक वेळा त्यानं करून घेतलं पण सांगितलं नाही
आपल्या चेहऱ्यावरच्या त्या भावाबद्दल, तिच्या चेहऱ्यावर एकदम हेवा दाटून आला, पण
तो वर बघतो तरी कुठे, गळ्याच्या खालीच तर त्याची नजर घसरत असते, एकदम उपहासाचे
हास्य जिवणीवर पसरलं, तिला एकदम कुतूहल वाटलं हा कसा दिसत असेल अशा अर्धवट झोपेत?
ती लगबगीनं त्याला बघायला गेली, त्या वेळी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर बेफिकिरीचा
पुरुषी भाव होता, म्हणजे पुरुषी बेफिकीरीत एक मग्रुरीचा आवेश, आग्रह असतो, तर
बायकी बेफिकीरीत जिंकल्याचा, आवेश, सिद्ध केल्याचा भाव असतो. मग ती त्या दोघांच्या
बाळाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहायला गेली. तिथे तिला दिसला जग समजून घेण्याचा भाव,
त्यात प्रेम होतं, हेवा, मत्सर, राग आनंद सगळच होतं. मग ती परत मनाच्या आरशात
डोकावण्यासाठी लॅपटॉपसमोर बसली. बघू काय लिहायचंय असं स्वतःलाच विचारायला लागली,
मग तिनी न ठरवूनही अर्धवट ची फाईल उघडली, आणि विचार करत बसली, कोण असेल ही, हिला
खरंच हवं असेल का दुसरं मूल? आणि मूल देणाऱ्या तिच्या नवऱ्याला काय वाटत असेल? एक
मूल देऊन वंशसातत्य केल्याचा समाधान त्या
दोघांना असेल तर मग खरेच कशाला हवं असेल दुसरं मूल. दमून गेलीही असू शकेल त्या
एकाच मूलात. पण जर ती समाजाचा विचार करणारी भित्री सशीण असेल तर मग घालेल अजून एक
जीव जन्माला, असे पहिल्यांदाच होत होतं की तिला लिहिताना असे प्रश्नांचे अडथळे
समोर येत होते. छे आपण नेहमीसारखं तो ती आणि त्यांच्या आयुष्यातला तिसरा यांच्या
गोड गुलाबी कथा, नाहीतर सासू आणि सून यांचे दळण दळाव, या असल्या भुक्कड, प्रश्न
पाडणाऱ्या कथांच्या गावाला जाउच नये असे ठरवत तिनं एक नवीनच फाईल उघडली आणि
लिहायला सुरुवात केली,
किती छान असतं,
चौकोनी कुटुंब असणं, तिच्या मांडीतल्या चिमुकलीचा हात हातात घेऊन झोपलेल्या तिच्या
मोठ्या मुलाकडे बघून तिला अगदी कृतकृत्य वाटत होतं....
आणि मग सराईतपणे
तिची गोष्ट झरझर फाईल मध्ये उतरत होती, तिच्या चेहऱ्यावरचा अभावीत भाव गळून पडून
तिथ वात्स्यलाचा समुद्र जमला होता, त्याच समुद्रात थोडा वेळ तरी बाकीचे सगळे भाव बेटासारखे
तरंगणार होते!!!!!!