Saturday, November 24, 2018

पत्रं...

पत्र मुळात पत्र म्हणजे काय असते? कधी मनात राहिलेलं, कधी सांगता न आलेलं किंवा कधी खूप काही बोलायचं आहे पण बोलायची संधीच न मिळालेलं बोलणं. हो ना.
तुला माहीत आहे मला पत्रं किती आवडतात, लहानपणी तर मी माझी मलाच पत्रं लिहायचे. मग कोणतेही कारण मिळालं तर पत्र लिहायला तयार असायचे. शाळेत पत्र लेखन हा इतरांसाठी कंटाळ्याचा पण माझ्यासाठी आनंदाचा प्रश्न असायचा. पत्र कसे भरवू हा प्रश्न पडायचाच नाही, उलट आता अजून जागा कुठून आणू असा प्रश्न पडायचा. सुट्टीत मामाकडे गेलं की छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मला लिहायच्या असायच्या, आई बाबांना कळवायच्या असायच्या, आणि शाळा असताना मग याच सगळ्या गंमती आजीला कळवायच्या असायच्या. मग ऐकलेली नवीन गोष्ट, नवीन गाणे सांगायचे असायचे, ऐकलेली नवीन म्हण, नवा वाक्प्रचार वापरायचा असायचा. एकदा दोनदा तर मी मला कुठे कुठे भेटलेल्या लोकांचे पत्ते गोळा केले होते आणि त्यांना पत्रं पाठवली होती.
नाशिक मध्ये भेटलेल्या आसामच्या मुलीचे मला इतके अप्रूप वाटले होते कि मी तिचे नाव, पत्ता लिहून घेतला होता, एका इन लँडवर तिला जागोजाग पत्र लिहिले होते, तिला ते पत्र पोहोचलेच नाही की तिने ते वाचून रद्दीत टाकले माहीत नाही, मग एका बस मध्ये भेटलेल्या माणसाला कधी तरी पत्र पाठवली होती, काही वर्षे त्याने पण उत्तरे दिली, परत त्याला भेटलो, पण मग ते सगळे का थांबले माहित नाही. एका शिबिरात भेटलेल्या एका मुलाला पत्र लिहिली होती, त्याने पण दोन चार उत्तरं पाठवली, पण मग थांबलं सगळंच. असे एक ना अनेक किस्से. सुरुवातीला ईमेल करणे म्हणजे पण पत्र लिहिणेच की या आनंदात दोन दोन पाने भरून सॉरी टाईप करून मेल पाठवल्या होत्या. मग हळू हळू टाईप करण्याचा कंटाळा या सबबीखाली मेलचे आकार छोटे होत गेले, आणि आता तर कामाच्या शिवाय कोणाला मेल केली तर ते काय म्हणतील असा पहिला प्रश्न पडतो.
पत्र काय मेल काय तो असतो वाचवून साचवून, ठरवून केलेला संवाद, म्हणजे बोलण्याच्या ओघात विसरले गेलेलं खूप काही लिहिता लिहिता आठवतं, आणि ते लिहून झाल्यावर आठवलं तरी परत त्यात घालून वाढवता येते. संवादाचे मात्र तसे नसते, एकदा का कोणत्या तरी रस्त्याला गाडी लागली की परत ती त्याच रस्त्यावर आणणं महा कठीण काम असते, आणि ती गाडी वळवून आणली तरी ते वळण कधीच परत येत नसते, पत्राचे मात्र तसे नसते. एखादे वळण पुरवून पुरवून तिथेच ठेवते येते, त्याच्या भोवती पिंगा घालून त्याला तिथेच थांबवून ठेवता येते.
काहीजण याला एकतर्फी संवाद म्हणून नाकं मुरडतात, पण संवादात दोन माणसं असली म्हणजे कुठे तो दोघांचा संवाद होत असतो. एक जण बोलत असतो, ते दुसरा ऐकत असतो, कधीतरी त्यावर प्रतिक्रिया देत असतो, म्हणजे एकाचाच मुद्दा पुढे जात असतो ना? मग पत्रातून सुद्धा तर तेच होत असतं ना, वाचणारा वाचत असतो, मध्येच थांबून स्वतःला काही तरी सांगत असतो, मनातल्या मनात काहीतरी जोडत असतो. क्वचित कधीतरी लिहिलेल्या अक्षरांवरून हात फिरवून स्पर्शाची उब जाणवून देतं, तर कधी टाईप केलेल्या शब्दांतून दिलेल्या वेळाचे मोल...
पत्रांमध्ये संवाद साधण्याची शक्ती असते, बिघडलेला, बंद पडलेला संवाद सुरु करण्याची ताकद असते.
पत्र फक्त शब्द नसतात, त्यांनाही भावना असतात,
पत्र एकतर्फी नसतात त्यांना त्यांच्या वाटा माहीत असतात
पत्र शिळी होत नसतात, त्यांना एक्सपायरी डेटच नसते.
कोरड्या पत्रावर भिजलेले स्टँप असतातच.ना
पत्रांना पत्ता असतो, स्वतःची ओळख असते
ते कधीच हरवून जात नाहीत,
हरवले तरी कुठल्या तरी पत्त्यावर जाऊन धडकतातच,
पत्र बोलकी असतात, हसरी असतात,
रडकी असतात पण कधीही एकटी नसतात.
© मानसी होळेहोन्नूर

अमर्त्य

मृत्यू नेमका कधी झाला?
मेंदू ठरवतं आता बास झालं,
नाही कोणतेही निर्णय घ्यायचे
असा शेवटचा निर्णय घेतं तेव्हा?
की जेव्हा हृदय त्याचं काम करायचं थांबवतं तेव्हा?
की जेव्हा डॉक्टर म्हणतात
सॉरी तेव्हा?
की डेथ सर्टिफिकेट बनवलं जातं तेव्हा,
की शरीर शव होऊन जातं तेव्हा?
की बॉडी ला हार घालून शेवटच्या दर्शनासाठी
ठेवलं जातं तेव्हा,
की सरणावर चढवलं जातं तेव्हा,
की आपलं माणूस फोटोत जाऊन बसतो तेव्हा
की आपण त्याच्या नावाने आंघोळ करतो तेव्हा
की आपल्या बोलण्यात त्या माणसाचे संदर्भ
धूसर व्हायला लागतात तेव्हा,
की हळूहळू आपण आपलं आयुष्य
आपल्या माणसाशिवाय जगायला लागतो तेव्हा?
मृत्यू ही थोडीच एका क्षणाची गोष्ट असते,
ती तर निरंतर, निर्वातीत, गोष्ट असते,
ती वेळ काळा च्या चिमुटीत बसवणारे
आपण सगळे मर्त्य असतो,
अमर्त्य असतो तो फक्त मृत्यू
©मानसी होळेहोन्नूर

Saturday, November 10, 2018

गंध


Saturday, October 20, 2018

परफेक्ट चहाची रेसिपी

टीव्ही वर काहीतरी बघत असताना एक चहाची जाहिरात लागली होती. एक शिक्षक त्याच्या विद्यार्थाकडे खूप दिवसांनी सॉरी वर्षांनी जातात. आता तो विद्यार्थी खूप मोठा अधिकारी झाला असतो, म्हणून बिचारा शिक्षक दाबून असतो. विद्यार्थ्याची बायको कामवालीला चहा  करायला सांगते तेवढ्यात हा विद्यार्थी म्हणतो, थांब मीच करतो चहा. हॉस्टेलवर असताना सरांना माझ्या हाताचा चहा आवडायचा. नवऱ्याला अगदी प्रेमाने बघत ती मनात नक्कीच म्हणत असणार, मला नाही आजपर्यंत कधी चहा करून दिला, पण दिग्दर्शकाने तसे काही सांगितले नसल्याने ती फक्त प्रेमाने बघत राहते. मग हा विद्यार्थी त्याच्या सरांना त्याने बनवलेला चहा आणून देतो. पहिल्या घोटानंतर लगेच विचारतो सर कसा झाला. त्यावर ते सर म्हणतात कॉलेजमध्ये जे म्हणायचो तेच म्हणून का? इंजिनिअरींग सोड आणि चहाची टपरी काढ. दर वेळी हि जाहिरात बघताना माझ्या पोटात गोळा येतो. इतक्या वर्षानंतर करूनही याचा चहा तसाच कसा लागतो?
चहा ही अगदी सोपी गोष्ट आहे असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी साष्टांग नमस्कार घालते. म्हणजे एका कपाला अमुक इतके पाणी, तमुक इतकी साखर मग तमुक चहा पावडर असे अगदी कितीही ठरवून घेतलं, तरी माझा सलग दोन दिवसांचा चहा कधी सारखा होत नाही. बरं एकदा तर मी किती वेळ उकळायचा हे सुद्धा लावून बघितलं, तर त्या दिवशीचा चहा अगदीच भुक्कड झाला. मग कधी तरी आलं घालून बघूया, असं म्हणत आलं घालून चहा केला, पहिल्या दिवशी आल्याची चव नव्हती तर दुसऱ्या दिवशी फक्त आल्याची चव होती. तिसऱ्या दिवशी आल्याचा चहा लागत होता पण चहाची चव आवडली नव्हती.
रेड लेबल देखा, गिरनार देखा , ब्रूक ब्रांड देखा, देखा वाघ बकरी भी, पण माझा वाला ब्रँड मात्र मला आजतागायत सापडला नाही. अमुक एकाने रंग छान येतो असे वाटते, तर दुसऱ्याने कडकपणा, तिसऱ्यात घट्टपणा असतो. सगळे कधीच एकातच मिळतच नाही. कधी तरी मसाला घातलेला चहा घेतला, तर त्या मसाल्यामुळे आपण काढा पितोय की काय असेच वाटते. त्यामुळे चांगल्या चहाच्या शोधात मी नेहेमीच वेगवेगळे प्रयोग करून बघते, आणी त्या प्रयोगाच्या नादात आज सापडलेली रेसिपी उद्या विसरून जाते. एकदा कोणीतरी म्हणलं दुधाने खूप फरक पडतो, म्हशीच्या दुधाचा चहा छान घट्ट होतो, त्यावर मी फक्त आता एक म्हैस दारात उभी करायची बाकी आहे असं मनातल्या मनात म्हणत मुंडी हलवली. तरी त्यातल्या त्यात जवळ जाणारा प्रयोग म्हणून मिल्क पावडर घालून चहा करून प्यायले, तर मला घरातल्या घरात विमानात बसल्या सारखं वाटायला लागलं. इतकी जीभेवर विमानातल्या मिल्क पावडरच्या चहाची आठवण घट्ट होती.
नव्याने उठलेल्या चुलीच्या चवीच्या वादळात, चुलीवरचा चहाचा चुलत भाऊ असलेला तंदूर चहादेखील मिळायला लागला आहे. व्होडका घातलेला चहा हे एक अफलातून कॉकटेल शॉट म्हणून प्रसिद्ध आहे. चॉकलेट टी हे मुळातलं डेझर्ट ड्रिंक पण आता व्यवस्थित रुळले आहे. ग्रीन टी तर उंचे लोग उंची पसंद म्हणत आपला रंग टिकवून आहे. चहाचे अनेक प्रकार जन्माला आलेत. असं म्हणतात, बदल हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून तर ही चहाची सारी रूपं मी चाखून, ओरपून पाहिलीत. चहा पावडर, साखर, पाणी, दुध या चार जिन्नसातून रोज होणाऱ्या वेगळ्या चवीच्या चहामुळे मी थ्री हंड्रेड अँड  सिक्स्टी फाईव्ह शेड्स ऑफ टी अशा नावाचे पुस्तक लिहावं की काय अशाच विचारात आहे. मग फोन वर टाईप करण्याच्या नादात जास्त उकळलेला चहा, गॅसवरून उतू गेलेला चहा, भांड्यातलं दुध संपवायचं म्हणून थोडं जास्तच दुध घालून केलेला चहा, सकाहर घालायची विसरलेला चहा, अर्धवट झोपेत चहात मीठ घालून केलेला चहा, खरंतर वर्षाच्या दिवसांपेक्षा खूप जास्त रेसिपी प्रत्येक घरातून नक्कीच मिळू शकतात.
त्याच त्या चवीचा चहा रोज करणाऱ्या अमृत तुल्यचे मूल्य माझ्या मते त्यामुळेच जास्त आहे. शेवटी काय आहे चहाने चार माणसे जोडली जातात, गप्पा खुलतात, कधी वाईट चवीचा विसर पडतो, तर कधी चांगली चव लक्षात राहते. मला तर आजवर एकाच चवीचा चहा करणं कधी जमलं नाही जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच कळवा, अगदी, गॅसची शेगडी कोणती आहे, यापासून, पाणी किती डिग्रीला उकळायचं ते, साखर कितव्या मिनिटाला घालायची आणि गार दुध घालून चहा परत उकळायचा, कि गरम दुध घालून चहा बंद करायचा असे छोट्यातले छोटे बारकावे देखील सांगालच. तोवर मी माझ्या चहाच्या चवीचा नवीन प्रयोग करते. तसा चहा करणं सोपेच आहे, फक्त चवीचे तेवढं आपण बाजूला ठेवूया, हो ना.
मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी : mitrmandal -katta.blogspot.com  

Tuesday, October 2, 2018

लक्ष्मीची पावले


‘बाबा हो आत्ता तुम्हालाच फोन लावणार होते. तुमचे पार्सल सुखरूप पोहोचलं.’
...
‘ हो हो हर्षल त्यांना घ्यायला गेला होता, घरी सोडून तसाच खालच्या खाली ऑफिसला गेला आहे तो, मी मात्र आज घरूनच काम करेन.’
...
‘ हो हो सांगते त्यांना. त्या आत्ता आंघोळीला गेल्या आहेत. आल्या की मग आम्ही दोघी एकत्रच नाश्ता करू. तेव्हा करतो तुम्हाला फोन.’

हर्षलच्या आईपेक्षा हर्षलच्या बाबांशी बोलणे स्वातीला नेहेमीच आवडायचे. सासूबाई कडक लक्ष्मी म्हणूनच प्रसिद्ध होत्या. जरा जास्तच शिस्तीच्या भोक्त्या होत्या. त्यामुळे आत्ता सुध्दा आईंच्या ऐवजी बाबांनी किंवा त्या दोघांनी एकत्र अयावे हे त्यांनी अप्रत्यक्ष सुचवलं होते, पण त्यांचे काहीतरी काम निघाल म्हणून मग सासूबाई एकट्याच पुढे आल्या आणि चार दिवसानंतर ते येतो म्हणाले. आता चार दिवस यांच्याशी जुळवून घेतलं की झाले. तशी ही दोघींचीही पहिलीच वेळ होती, म्हणजे सासूचे स्वतःच्या घरी स्वागत करायची स्वातीची पहिली आणि सुनेच्या घरी जाऊन राहायची तिच्या सासुचीही पहिलीच वेळ होती.

‘घर छान लावलं आहेस की.’ अगदीच गेल्या गेल्या चुका काढायला नको म्हणून सासुबाईंनी सूनबाईंना बरे वाटेल अशी प्रतिक्रिया दिली.

‘आवडले तुम्हाला, हर्षल म्हणालाच होता आईला नक्की आवडेल. आता जरा नाश्ता करू या मी पण थांबली आहे तुमच्यासाठी.’

‘मग बेंगलोर स्पेशल नाश्ता का आज?’

‘ हो ना इडली आणि सांबार केला आहे, बघा बरं तुमच्यासारखा झाला आहे का?’ स्वाती अंदाज घेत घेत बोलत होती.

‘ इडल्या मस्त लुसलुशीत झाल्या आहेत ग, काय प्रमाण घेतलेस? सांबार मात्र थोडा तिखट आणि वेगळा आहे.’ दोन गृहिणी भेटल्यावर बोलतात तशा त्या सासुसुना बोलत होत्या. लग्नाला जेमतेम चार महिने झाले होते. आणि एक दिवसाआड फोन लग्नाच्या वेळेसचा १० दिवसांचे वास्तव्य मध्ये एक दोन दिवसांची धावती भेट इतकाच काय तो त्यांचा आजवरचा संवाद होता. त्यामुळे दोघीही एकमेकींचा अंदाजच घेत होत्या.

‘नाही पीठ मी विकतच आणते, आई. ग्राइन्डर मध्ये पीठ छान होते असे इथल्या मैत्रिणी म्हणतात, पण तोवर हे पीठ खूप सोयीचे पडते, परत आम्ही दोघेच इथे त्यातही निम्मे दिवस हा तरी बाहेर खातो नाहीतर मी तरी, ऑफिस गेट टुगेदर, पार्टी काही ना काही तरी असतेच. ‘ उगाच आपण आळशी आहोत असा ठपका बसायला नको म्हणून सुनबाई सारवासारवी करत होत्या.

‘हो ग माझ्या लेकाला पहिल्यापासून बाहेर खायला खूप आवडते. तुम्ही दोघेही सकाळीच निघता मग कामवाली बाई कधी येते.’
‘लक्ष्मी ती तर सकाळीच ७ वाजता येते आणि काम संपवून साडे सातला जाते पण. हे एवढुसे घर, त्यात राहतो आम्ही दोघेच, भांडी पण फार नसतात. कपडे मशीनला आम्हीच लावतो, आणि वाळत घालतो.’

‘पण या बायका फार वरवरचे काम करतात बर का, त्यांच्यावर जरा लक्ष द्यावे लागते, सांदीकोपऱ्यातून त्याच्याकडून झाडून घ्यावे लागते. तसे करत असावीस कारण फारशी धूळ नाही दिसली घरात.’ आपण एकदम सासू मोड मध्ये जातोय हे लक्षात घेऊन त्यांनी जरा मग थोडा खालचा सूर लावला.

‘हो शनिवारी किंवा मी जर एखाद दिवशी वर्क फ्रॉम होम करत असेल तर मी करून घेते तिच्याकडून नीट कामा, पण रोज मात्र तिच्या कामाकडे बघायला वेळच नसतो.’  

 ‘आता मी आली आहे तर जरा तिच्याकडून काम करून घेऊ का? येईलच ना ती उद्या?’

स्वाती भयंकर गोंधळली होती, सासूला सांभाळावं की कामवालीला,
‘चालेल पण ती आता थेट सोमवारीच येईल. आणि तशी चांगली आहे लक्ष्मी पण तुम्ही शाळेत मुलं सांभाळायचा तसेच तिलाही सांभाळून घ्या.’

‘वाह बोलायला एकदम हुशार आहेस की, तुझी बाई पळून जाणार नाही एवढी काळजी घेऊन मी, पण उद्या परवा का येणार नाही ती? तिला पण तुमच्यासारखा फाईव्ह डेज वीक असतो का ग?’ सासुबाईंनी एकदम टोमणा मारला.

‘फाईव्ह नाही पण सिक्स डेज बरं का आई, इकडे बरेच जण त्यांच्या कामवाल्या बायकांना रविवारी सुट्टी देतात. आता हे कोणी कधी कसे सुरु केले माहीत नाही, पण आम्ही इथे आलो तेव्हाच लक्ष्मीने हे सांगितले. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला काहीतरीच वाटले, रविवार मस्त सुट्टीचा दिवस आणि त्या दिवशी आम्हीच घरी काम करायचे का, पण मग तिच्या दृष्टीकोनातून विचार केला आणि जाणवले, जशी सुट्टीची आम्हाला गरज आहे तशीच गरज तिलाही असेलच ना. आणि या व्यतिरिक्त तिला सुट्ट्या हव्या असतील तर ती व्यवस्थित आधी सांगते, चार दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेणार असेल तर चक्क बदली कामवाली देऊन जाते. गंमत म्हणजे आई पण जर कोणाकडे रविवारी काही कार्यक्रम असेल तर ही बया स्वतःहून सांगते, या रविवारी मी कामाला येईन पण फक्त तुमच्याकडे. कारण या बिल्डींगमध्येच तिच्याकडे सहा कामे आहेत, आणि पलीकडच्या बिल्डींगमध्ये चार. सकाळी सहा वाजता येते झट झट कामे करून दोन वाजता ही तिच्या घरी. खालच्या मजल्यावरच्या नायर आँन्टीकडे पाच वर्षापासून कामाला आहे ती. त्यांच्या घराची एक किल्ली हिच्याकडे असते, त्या नसल्या तरी ही काम करून जाते. पलीकडच्या बिल्डींगमध्ये एक मराठी फॅमिली आहे त्यांच्याकडे पण ही लक्ष्मी चार वर्षांपासून आहे, पण उगाच माझ्या घरचे तिला सांग, तिच्या घरचे मला सांग नाही हिचे.’

‘स्वाती मी पहिल्यांदाच असे काही ऐकतीये म्हणजे चार वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई घरातच घसरून पडल्या तेव्हापासून आमच्या घरी कामवाली बाई म्हणजे निर्मला आली. त्या आधी आम्ही दोघी मिळूनच सगळे काही करत होतो. त्यामुळे या बायकांचे नखरे, तोरा मी फक्त इतरांच्या बोलण्यातूनच ऐकायचे. निर्मलाच्या पण काही गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाहीत पण आईंना शेवटच्या काळात तिने जेवढे सांभाळले, त्यांचे अगदी हागणेमुतणे काढले आणि तेही तोंडातून चकार शब्द न काढता तेव्हापासून तिच्या न आवडणाऱ्या गोष्टींकडे मी काना डोळा करायला लागले. पण तू म्हणतेस ते ही बरोबर आहे ग. यांना पण वाटत असेलच ना आपण एखाद दिवशी सुट्टी घ्यावी.’
‘आमची लक्ष्मी इतकी छान टापटीप राहते ना आई, तुम्ही बघलाच म्हणा तिला सोमवारी, तोडके मोडके हिंदी बोलते, मला अक्का आणि हर्षलला अण्णा म्हणते. मुलगा पाचवीला आणि मुलगी तिसरीला आहे. हिला तेलगु, कन्नड तर येतेच पण दोन तीन मराठी घरी काम करते त्यामुळे मराठी पण समजते बर का.’

‘ आपण नेहेमी कसा फक्त आपलाच विचार करतो ना, म्हणजे तू आज हे सांगेपर्यंत मला कामवालीला देखील साप्ताहिक सुट्टीची गरज असू शकते याची जाणीवच नव्हती. उलट मी रविवारी निर्मलाकडून जादाची कामे करून घ्यायचे. अर्थात मग माझ्या जुन्या साड्या, ड्रेस, किंवा कधीतरी नाश्ता, काही जास्तीचा घरी आलेला खाऊ, जुना झालेला खाऊ सुद्धा देते. राग येणार नसेल तर एक विचारू का?’
‘विचारी का त्यात काय एवढे?’

‘तुम्ही तिला पगार किती देता ग? तुझ्या सासरेबुवांनी मला अगदी दम देऊन पाठवले होते, त्यांचे घर आहे, त्यांचे खर्च आहेत, तू उगाच तुझ्या खर्चांशी त्याची तुलना करत बसू नकोस, पण तरीही राहवले नाही म्हणून मी विचारतीये.’

 ‘आई बाकीचे किती देतात मी विचारायला गेले नाही, पण आमच्याकडून ही झाडू फरशी आणि भांडी घासायचे दीड हजार घेते. पण नियमितपणे येते, खाली पडलेलं सोन्याचे जरी असले तरी उचलून ठेवते, त्यामुळे मला तरी पटले बाबा तिचे काम. तशा दुसऱ्या पण कामवाल्या आहेत पण तिच्या सारखी दुसरी मिळेल की नाही कोणास ठाऊक. सहज म्हणून सांगते, दोन आठवड्यापूर्वी मला बरे नव्हते, त्यामुळे ही आली त्य दिवशी मी झोपूनच होते, तर हिनेच सकाळी चहा करून दिला आम्हाला दोघांना. खरेतर रांगोळी काढायला मी तिला सांगितले नव्हते पण तरीही रोज नित्य नेमाने तुळशीपुढे रांगोळी काढते. ’ अप्रत्यक्षपणे या बाईला त्रास देऊन पळवून लावू नका असाच सूर होता स्वातीच्या बोलण्याचा.


‘सून बाई आम्ही नाही येणार हा तुमच्या आणि तुमच्या लक्ष्मीच्यामध्ये. तसेही आम्ही चार दिवसांचे पाहुणे आहोत ग, तुमचे घर तुम्हीच सांभाळायचे, उगाच आम्ही येऊन त्याची घडी कशाला विस्काटायची? काळजी करू नकोस.’ सासुबाईंनी सूनबाईंच्या हातावर हात ठेवत एका नव्या नात्याची सुरुवात केली होती. त्यांचा हात हातात घेत स्वाती म्हणाली,

‘हर्षल म्हणालाच होता, आई जराशी कडक, तापट आहे, पण नवीन गोष्टी समजून घेते, आणि एकदा तिला पटलं तर मग उगाच विरोध करत नाही. तरीही तुम्ही येणार म्हणून खूप टेन्शन होते, खोटे कशाला सांगू मी आजची सुट्टीच काढली होती, कारण कामात लक्षच लागले नसते. पण आता खूप मोकळे सुटल्यासारखे वाटत. थँक्स आई आता सुट्टी घेतली असली तरी लॉग इन करून बघते, काही काम असले तर संपवून टाकते.’

‘स्वाती तू जर कामावर येणाऱ्या बाईचादेखील एवढा विचार करत असशील तर घरातल्या माणसांचा नक्कीच विचार करशील. एवढी खात्री मी आता बाळगू शकते. भांड्याला भांडे लागतच, त्याचा आवाज होतोच, पण तो आवाज लांबवर जाऊ न देण्याचे प्रयत्न मात्र दोघीही करूया. आता खूप गोड बोलून तोंड दुखायला लागले बाई, तू जा तुझ्या कामाला, मी हे जसे जमेल तसे आवरते आणि माझे सामान लावून घेते,’

खळखळून हसून स्वातीने आल्यापासून पहिल्यांदा सासूला वाकून नमस्कार केला. तेव्हा तिला ती पावले लक्ष्मीची पावले वाटली.
मानसी होळेहोन्नुर
पूर्वप्रसिद्धी : सनविवी ( ऑगस्ट २०१८)


Friday, September 28, 2018

चिमुटभर

‘आह काय मस्त वातावरण आहे ना, चल ना मस्त भटकायला जाऊ.?’ अंगावरचे पांघरूण बाजूला सुद्धा न करता अमेय ओरडला, त्याला नॉर्मल माणसांसारखे हळू बोलताच येत नाही म्हणून प्रियंका आधी कुरकुरायची आता कितीही सांगितलं तरी हा काही बदलणार नाही कळल्यावर तिने ते ही बोलणे सोडून दिले. हातातला चहाचा मग त्याचा हाताला हळूच लावत ती म्हणाली, ‘आधी त्या मलमली दुलईतून उठून दाखव आणि मग बघ स्वप्न बाहेर फिरायला जायची.’
‘कशी बायको आहेस, नवरा एवढा फिरायला घेऊन जातो म्हणतोय आणि तू त्याला पाठींबा द्यायचा सोडून असे टोमणे काय मारतेस.’
‘बायकोला काम आहे त्याच दिवशी बर तुला बाहेर फिरायचा मूड येतो रे.’
मगातला चहा संपवत तिने  टेबलवरचा लॅपटॉप उचलला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली.
‘काय हे बायको , खरेच काम आहे तुला आज? चल ना जरा भटकून येऊ मस्त बाहेरच खाऊ आणि मग दुपारी झोपायला मस्त परत घरी येऊ. संध्याकाळी कर की तुझे काय काम आहे ते.’
त्याच्याकडे वळून पण न बघता ती म्हणाली,
‘पूर्ण टीम ऑफिस मध्ये आहे, मला किमान घरून काम करायची तरी परवानगी मिळाली आहे. संध्याकाळच्या आत सगळं काम संपवून पाठवायचं आहे क्लाएंटकडे. ऑन साईटची टीम सुद्धा काम करतीये. त्यामुळे आत्ता नाही पण जर आमचे काम नीट पार पडलं तर आपण संध्याकाळी जाऊ या फिरायला चालेल’
तोंड पाडून पूर्ण जागा होत एकदम उठून बसत तो म्हणाला,
‘ मागचा पूर्ण विकेंड मी काम करत होतो त्याचा वचपा काढतीयेस का?’  
हातातल टायपिंग थांबवत ती एकदम म्हणाली,
‘ बरा आहेस ना, सकाळी सकाळी हे काय सुरु केलेस? काम असे काय ठरवून विकेंडपर्यंत लांबवता येते का? आणि तुझ्यापेक्षाही जास्त भटकायची हौस मला आहे हे सोयीस्कर विसरलास वाटतं. ‘
आता ही चिडली कि चहा पण देणार नाही आधीच मूड खराब झालेला म्हणून जरा बॅंकफूट वर जात तो म्हणाला,
‘तसे नाही ग पियू, पण मस्त पावसाळी हवा, जुळून आलेला शनिवार म्हणून जरा वाटल आणि मी बोललो. जाऊ देत ते सगळं मला किमान तुझ्या हातचा चहा तरी दे ना म्हणजे दिवस कसा मस्त सुरु होईल. आणि नाश्त्याचे काय करायचे?’
 ‘वाटलंच चहासाठी तरी मला मस्का लावशीलच. मावशी येतील १५ मिनिटात त्यांना सांग काय हवंय ते. आणि ९ ते ११ मी कॉल वर असेन तेव्हा बेडरूम बंद करून बसेन प्लीज मध्येच येऊन खुडखुड करू नकोस.’
 चहा येईपर्यंत काहीच तक्रार करायची नाही चहा आला की पुढचे पुढे बघू म्हणत तो उठून बाल्कनीकडे गेला, बेडरूमच्या बाल्कनीपेक्षा हॉलच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा जास्त चांगला होता, मस्त पैकी पेपर हातात घेऊन तो चहाची वाट बघत अपार्टमेंटच्या आसपासची हिरवळ बघत होता. पाऊस पडून गेलेला होता, काही चुकार मुलं शाळा सुटली तरी शाळेपाशी रेंगाळतात तसे काही काळे ढग अजूनही आकाशात रेंगाळत होते, सूर्य देखील आळसावलेला होता, ढगांच्या दुलईतून मधेच डोकावत होता, मधेच गुडूप होत होता.  एक सुखद गारवा हवेत होता. प्रेम वगैरे होण्यासाठी, प्रकट करण्यासाठी हीच ती योग्य वेळ, हाच तो योग्य दिवस हे सगळं वाटणे एकीकडे आणि पैसा हवा म्हणून नोकरी आणि त्या नोकरीसाठी स्वतःला गहाण ठेवणं ही अपरिहार्यता दुसरीकडे. मागच्या शनिवारी तो काम करत होता, आणि आज ती काम करतीये.
‘घे तुझा चहा, आणि मी पळते माझ्या कामाला. नऊ वाजतच आलेत. मावशी येतील काय हवं ते करून घे. आणि प्लीज मला पण नाश्ता रूममध्येच आणून देशील.
‘चहाचा पहिला घोट घेऊन तरतरी आल्यामुळे, तिच्यापुढे झुकत तो म्हणाला,’ जो हुकुम मेरे आपा’
आता काय बाकीचा दिवस असाच इथे बसून टाईमपास करत घालवावा, आठवड्याचे साचलेले फोन करून घ्यावेत, जमला तर एखादा पिक्चर बघून घ्यावा असा सगळ्या विचारात असतानाच एकदम मावशींचा फोन आला.
मावशींचा फोन फक्त एकाच कारणासाठी येतो, मी येत नाही सांगायला. तेच याहीवेळी झाली. महिनाअखेर होती, आणी या महिन्यातली सुट्टी घेतली नव्हती म्हणून त्या येत नव्हत्या, हे ही त्यांनीच सांगीतले वर परत आज काय ताई असतीलच घरी मग त्या बघून घेतील हे ही आगावपणे ऐकवले.
आता खरा प्रश्न होता, पियु कामात होती, मावशींच्या भरवश्यावर होती. मग आता नाश्ता जेवण बाहेरून आणणे नाहीतर मी करणे एवढे दोनच पर्याय होते. दुसरा पर्याय इतका भयंकर आणि कल्पनेच्या पलीकडचा होता की त्यावर त्याने लगेच फुली काट मारली. पण आता बाहेर जायचे म्हणजे कपडे बदलायचे, मग बेडरूम मध्ये जावं लागेल, ऑर्डर केली तरी तिला लगेच काळे. हे सगळं करताना मावशी आल्या नाहीत हे ही पियुला कळेल मग तिची अजून चिडचिड होईल. नकोच त्यापेक्षा आपणच काहीतरी करून बघू या का? त्याच्या डोक्यात उगाच किडा वळवळायला लागला. करून तर बघुयात आजवर न केलेली गोष्ट करून बघण्यात पण एक थ्रिल असतेच ना. गाडी बुंगाट वेगात पळवताना जेवढा आनंद मिळतो तसाच काहीसा वेगळा आनंद पण स्वैपाक करताना मिळू शकेल असं उगकॅह त्याचे एक मन त्याला पटवत होते, तर दुसर मन अरे आजवर केले नाहीस ते कशासाठी करून बघायचं, सरळ विकत आन, ऑर्डर कर आणि मस्त लोळत एखादा पिक्चर बघ, एकदा करशील आणि फसशील.
पोट, मेंदू, आणि पाकीट यांच्या मारामारीत सरतेशेवटी पोट जिंकल आणि तेही मेंदूला सोबत घेऊन, पाकीट वाचल. मस्त पोहे करून तर बघुयात म्हणून त्याने लगेच फोनवर तुनळी उघडली आणि कांदेपोहे सर्च करायला सुरुवात केली. घराबाहेर तो कधीही राहिला नव्हता, आणि जेव्हा राहिला तेव्हा सोबतच्या लोकांना स्वैपाका करता यायचा, हा आपली भांडी घासायचे काम तेवढे करायचा. तसे किचन फार ओळखीचे नव्हते, पण शोधलं तरीही सापडणार नाही इतकेही अनोळखी नव्हत. आज लग्नानंतर तब्बल वर्षभराने का होईना पण बायकोला काहीतरी हाताने बनवून खायला घालूयात. बाकीच्याना करताना खूप वेळा पाहिले होते, आपण आज स्वतःही करून बघूया म्हणत अमेय चक्क किचन मध्ये घुसला. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते म्हणून त्याने सरळ कांद्याऐवजी बटाटा पोहे करायचे ठरवले. बायकोने सगळ्या डब्यांवर नावे लिहून ठेवली होती त्यामुळे पोहे सापडायला काही वेळ लागला नाही. मध्येच आईला फोन करत शंका निरसन करून घेतले होते. आईला शंका आली पण त्याने काहीतरी बोलून वेळ मारून नेली.
मसाल्याचा डबा, मिरच्या, दाणे सगळे जवळ ठेवत त्याने तूनळी बघत बघत पोहे फोडणीला घातले. अरे हे वाटते तेवढे काही अवघड काम नाही असे म्हणत त्याने तो व्हिडीओ संपायच्या आधीच बंद केला. मग एका प्लेट मध्ये मस्त पोहे काढून ठेवत, त्यावर कोथिंबीर, आणि किसलेले खोबरे , ते ही बायकोने एका डब्यात ठेवले होते ते भुरभुरत त्याने झोकात रुममध्ये एन्ट्री घेतली. फोनवरचा माईक बंद करत ती म्हणाली ‘वाः पोहे. मस्तच. पण मावशींच्या नेहेमीच्या पोह्यांसारखे नाही दिसत आहेत, काही तरी वेगळे केलंय बहुतेक. तू आलाच आहेस तर तुला सांगते बग सुटलाय, त्यामुळे अजून अर्ध्या पाऊन तासात मी मोकळी होऊ शकेन. सकाळी बाहेर जायचे काय म्हणत होतास ते तर अजूनही मूड असला तर जाऊयात.’
स्वतः केलेल्या पोह्यामुळे तो आधीच खुश होता, त्यात बायको बाहेर यायला हो म्हणाली म्हणून अजूनच खुश होता. हसत हसत रूममधून बाहेर पडला.
पोह्याची सजवलेली प्लेट घेतली, आणि परत बाल्कनीत जाऊन बसला.
पहिल्याच घासाबरोबर लक्षात आले मीठच घातल नाही, छ्या एक घास खाऊन मग तिला द्यायला हवे होते. आता परत मीठ घेऊन जावे तर तिचे निम्मे  खाऊन पण  झाले असेल.
मग त्याने पण तसेच बिन मिठाचे पोहे खायला सुरुवात केली तेव्हा आठवले सुरुवातीचे दिवस, तिच्या घरची स्वैपाकाची पध्दत आणि त्याला आवडणारा स्वैपाक खूप फरक होता, त्यावेळी तो भरपूर भडकायचा पण तिने हळूहळू त्याला हवा तसा स्वैपाक शिकून घेतला, रांधायला लागली, तिला तसा स्वैपाक आवडतो की नाही हे पण त्याने कधी विचारले नव्हते, दोघांसाठी काही ते दोन वेगळ्या गोष्टी करणार नव्हती, क्वचित कधी केलेच तर तो लगेच नाक उडवून नापसंती दाखवायचा.  छोट्या गोष्टी तिने कधी मोठ्या होऊ दिल्या नव्हत्या. उद्यापासून कशाला आता ती आली की लगेच या कधीच न उमगलेल्या गोष्टी आपण बोलूया त्याची माफी मागुया  असे त्याने ठरवलं तेवढ्यात तिचा मेसेज आला.
‘स्वतःची ओळख चिमुटभर विसरून नात्यात विरघळल की नातं जास्त बहरतं, तसेच मिठाचे असते, चिमुटभर का होईना पण लागतेच. पहिलाच प्रयत्न झकास होता.’
या मेसेजवर रिप्लाय देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतच मोबदला आणि बोनस द्यावा म्हणून तो आता आतुरतेने तिची वाट पाहत होता, अळणी झालेलं दोघांचेही  तोंड त्याला आता गोड करायचे होते.
मानसी होळेहोन्नूर 
पूर्व प्रसिद्धी :(सनविवि स्त्री सूक्त)जुलै २०१८

मनसूत्र

‘अग वैदेहीच ना तू? केवढी बदलली आहेस तू, ओळखलं का मला?’

वैदेहीच्या पाठीवर हात टाकत अजून एक पन्नाशीच्या आसपासची काकू, मामी कोणीतरी एकदम तिच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली.

‘अम्म तू कोल्हापूरची मामी ना.’

आईकडचे निम्म्याहून जास्त नातेवाईक कोल्हापूरला असल्यामुळे तिने एक खडा मारून पाहिला.

खुर्ची जवळ ओढत ती चुलत, मामे कोणती तरी मामी खुशीत येऊन म्हणाली,

‘अग्गो बाई, विसरली नाहीस की तू आम्हाला. आग मी प्रमोद मामांची बायको, प्रमिला मामी, तुला माझ्या हातचं लोणचं आवडायचं म्हणून कशी दर सुट्टीत आमच्याचकडे यायचीस आठवतंय ना? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे मला माहितीच होतं, तू खूप मोठी होणार. टीव्हीवर तुझा कार्यक्रम लागला कि आम्ही सगळ्यांना सांगतो, ही आमची भाची बरं का. अग मागच्या महिन्यात माधुरी आली होती ना तुझ्या शो मध्ये, मी वन्सना सांगितलं होतं, की वैदेहीला सांगा माधुरीची सही घेऊन ठेवायला. तुझ्या मामाला तिचं फार कौतुक बाई, ते म्हणतात मी अगदी माधुरीसारखीच दिसते, हो की नाही ग.’

आता वैदेहीची ट्यूब पेटली होती, ही मामी बोलायला लागली की थांबायचीच नाही म्हणून तिचं नाव त्यांनी राजधानी एक्सप्रेस ठेवलं होतं. आता आज हिचा पिच्छा कसा सोडवायचा हेच तिला कळत नव्हतं.

‘अग मी एकटीच काय बोलत बसलीये, बरं ते सगळं जाऊ देत, तुझ्यासाठी की नाही माझ्याकडे एक छान स्थळ आहे, माझ्या मावसबहिणीच्या दिराचा मुलगा, तो पण मुंबईतच असतो, तुझ्यासारखाच पत्रकार आहे, कुठल्याशा टी व्ही मध्ये कामाला आहे.  दिसायला तर तुझ्यापेक्षाही उजवा आहे. त्याला पगार पण चांगला भरभक्कम आहे.’

‘प्रमिला वहिनी, तुझी गाडी जरा थांबवशील का? वैदेहीसाठी स्थळ पाठवून उपयोग नाही, मागच्याच आठवड्यात तर लग्न झालं तिचं, मी प्रमोद दादाला कळवलं होतं, त्याने सांगितलं नाही का तुला.’

फॅब इंडियाच्या साध्याशा कुर्त्यामध्ये वरती गुजराथी पद्धतीचे वर्क केलेल जॅकेट  घातलेल्या, कानात लोंबते कानातले, केसांचा बॉबकट, हातात फिट बीट, गळ्यात एक चेन अशा अवतारात बसलेल्या वैदेही कडे बघत मामी जरा गोंधळातच पडली. नववधूची, किंवा नवविवाहितेची कोणतीच खुण तिच्या अंगावर दिसत नव्हती.

‘वन्स सकाळी सकाळी चेष्टा करायला दुसरी कोणी मिळाली नाही का? वैदेहीचे लग्न झालं आणि तुम्ही आम्हाला बोलावलं पण नाही, एक वेळ ते सोडा, पण अहो मंगळसूत्र पण नाही की हिच्या गळ्यात.’

‘मामी अग आई खोटं कशाला सांगेल, खरेच मी आणि अभिने मागच्या आठवड्यात हे काम संपवलं. कोर्टात जाऊन दोन सह्या ठोकल्या, आणि जोरात हुर्रे ओरडलो, हाय काय अन नाय काय?’

जरा खुर्ची जवळ ओढून घेत मामी म्हणाली, ‘का ग आपल्या जातीचा, धर्माचा नाही का? की परिस्थिती चांगली नाही, काही प्रॉब्लेम नव्हता ना, बघ ही अनु तुझीच सख्खी मामे बहिण, कसे छान सगळे करून घेत आहे, मेंदीला मी नव्हते आले, पण तो पण कार्यक्रम मस्त झाला म्हणे, काल तर सगळे जन काय नाचले, आता पण तिचा लेहेंगा म्हणे ५० हजाराचा आहे, मुलाकडचे पण भारी हौशी आहेत , त्यांनी सगळ्यांनी ठरवून पैठण्या नेसल्या, फिरायला सुध्दा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. सोनं तर कित्ती घातलंय अंगावर, मंगळसूत्रच म्हणे ६ तोळ्याचे आहे. पोरीने नशीब काढलं बाई.’

हे सगळं ऐकून आपल्या पोरीची प्रतिक्रिया काय होणार हे आईला पक्के माहित होते, त्यामुळे तिने पट्कन,

‘अग वैदू अभि बोलावत होता तुला, जा बघ त्याला काय हवंय, आणि त्याची सगळ्यांशी ओळख करून दे ना.’

आईने तिला अक्षरशः पिटाळलं. आता वहिनीला काय सांगायचे हे मनात ठरवत असतानाच अजून दोन बहिणी आल्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, काही अडचण होती का, हे असं लग्न का केलं, आणि केलं ते केलं, किमान मंगळसूत्र, जोडवी महिनाभर तरी घालायला हवी होती नवरीने.

वैदेहीच्या आईला घरातला सगळा गोंधळ आठवला, लग्नच करणार नाही वरून रजिस्टर्ड लग्न करण्यापर्यंत तिची मजल गेली होती, त्यामुळे आई बाबा तर खुश होते, आणि राहता राहिला प्रश्न मांगल्याची लेणी घालायचा, तर तो अभिने सोडवला होता. ‘काकू, लग्न आम्ही एकमेकांसाठी करत आहोत, जगाला दाखवण्यासाठी नाही. त्यामुळे तिने मंगळसूत्र घालावं, नाही घालावं , हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. तिने कपडे काय घालावेत, नाव काय लावावं हा निर्णय तिचा तिने घ्यायचा आहे. लग्न मुळात करतात, आयुष्याची सोबत मिळवण्यासाठी.   

लग्न मुळात करतात, आयुष्याची सोबत मिळवण्यासाठी.   एकट्याने आयुष्य सोपं नाही,शरीराच्या देखील काही गरजा असतात, लग्न मुळात करायचं असतं शरीराच्या गरजा भागवण्यासाठी, वंश वृद्धीसाठी, आता आम्हाला आज राहता येतंय, पण अजून 15,20 वर्षानंतर काय? वंश वृद्धी करायची की नाही हा भविष्यातला प्रश्न आहे, आत्ता तरी आम्हाला दोघांना एकत्र आयुष्याची मजा लुटावीशी वाटत आहे, मग त्यासाठी मंत्र, पूजा, होम , मंगळसूत्र या सगळ्याची खरेच गरज  वाटत नाही. सप्तपदी, वचने या म्हणलं तर फॉर्मालिटीज,तुमचा विश्वास असो नसो बाकीच्या लोकांना हे सगळं करून छान वाटतं, नात्याला नवा अर्थ दिल्याचं समाधान मिळतं तर मिळू देत, आम्हा दोघांना नाही वाटत गरज या कशाचीही तर मग आम्ही कशासाठी हे सगळं करायचं?

जे वैदेही ओरडून सांगायची तेच अभि शांत समजावून सांगायचा.

या लग्नाला येण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती, पण लोकांना टाळणं म्हणजे नवीन प्रश्नांना जन्म घालणं होतं, आपल्याला जे आवडत नाही ते इतरांना सुद्धा आवडू नये असा अट्टाहास करणं देखील हे देखील चूकच. आपण नकोच जायला या लग्नाला ,सगळे जण विचारतील, वैदेही नकोच म्हणत होती या लग्नाला यायला, पण अभिने तिला सांगितलं तू आली नाहीस तरी मी जाणार आहे.

'वैदेही ताई ये ना अनूला मंगळसुत्र घालणार आहे तिचा नवरा. ' एक कोणती तरी करवली येऊन सांगत होती.

'वै चल ना, बघू तरी ते काय सांगतात.' अभिला उत्सुकता होती ते गुरुजी विवाहाचा अर्थ काय सांगतात याचा.



मंगळसूत्राची पूजा करत, त्याला हळद कुंकू लावून गुरुजी म्हणाले, ‘ मांगल्यम तंतूनानेन मम जीवना हेतूना, कंठे बधनामी सुभगे त्वं जीवा शरदः शतम्.’ मग त्यांनी अनुच्या नवऱ्याला मंगळसूत्राचं ताट हातात धरायला सांगून, श्लोकाचा अर्थ सांगायला सुरुवात केली,

‘पूर्वापारपासून विवाह सोहळे होतच आलेले आहेत, दोन वेगळ्या घरातले स्त्री पुरुष एकत्र येऊन नवीन संसार मांडतात, यापुढंच त्यांचे आयुष्य सोबत असेल, पण या आधी त्यांनी जे काही पुण्य मिळवलं असेल त्याचे काय? आता तुमची पत्नी माहेरून अन्नपूर्णा घेऊन येते, ते तिच्या हातात अन्नपूर्णा वसेल असा अर्थ दाखवण्यासाठी, बायको चांगलं चुगल खायला घालेल, पण त्यासाठी ती सुद्धा व्यवस्थित सुदृढ राहिली पाहिजे, खूप वर्ष जगली पाहिजे, आजवर जे काही ज्ञान मिळवलं आहे, साधनेचं पुण्य मिळवलं आहे ते सुध्दा मग तिच्याबरोबर वाटून घेतलं पाहिजे ना, म्हणून हे मंगल बंधन, हे सोन्यात, हिऱ्यात आपण अडकवतो, मूळ श्लोकात केवळ धागा अभिप्रेत आहे. आजवर मला जे काही ज्ञान प्राप्ती झाली आहे, ती मला तुझ्याबरोबर वाटून घ्यायची आहे, तुला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून मी हा धागा तुझ्या गळ्यात बांधतो. असा मंगळसूत्राचा साधा सरळ अर्थ अभिप्रेत आहे. कुठेही हे पतीच्या जिवंत असण्याचे लक्षण वगैरे म्हणलेले नाही. आज पासून मी जे काही करेन त्यात तुझा ही समान वाटा असेल, मी तुला माझ्या  बरोबरीने वागवेन हे सगळं सूचित करण्यासाठी म्हणून हे मंगलमय सूत्र. आता पाच बायकांनी याची पूजा करा मग नवरदेव तुम्ही हे पत्नीच्या गळ्यात घाला. ‘

‘वै बघ अजूनही विचार कर, हवंय का? एक दागिना समजून घाल.’

उगाच तिला पीडत अभि म्हणाला.

ती काही बोलणार तेवढ्यात अनुची वैदुडी अशी खणखणीत हाक आली, अख्खा हॉल तिच्याकडे बघत होता.

‘अग लग्नाच्या दिवशी तरी जरा हळू बोल, ‘

‘ऐक ना, तू पण याची पूजा कर ना, तुझ्या सारखा चाकोरीबाहेरचा विचार मला नाही करता येत, पण तुझा हात लागला तर कदाचित काही वेगळा विचार करण्याची हिम्मत जमवू शकेन. गुरुजी ही माझी बहिण, मागच्याच आठवड्यात लग्न झालंय तिचं, ती पण पूजा करेल याची.’ आजू बाजूच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी झेलत, वैदेही म्हणाली, ‘ अनु हे माझं काम नाही ग, वर्षानुवर्षे संसार टिकवलेले अनेक जण आहेत इथे, त्यांच्या अनुभवी हाताने अजून बळ येईल तुझ्या या मंगळसूत्रात.जे मी घालत नाही, ज्यावर माझा विश्वास नाही ते मी दुसऱ्या कोणाला घालायला कसं देऊ.पण बघ तू हा विचार बोलून दाखवायची तरी हिम्मत दाखवलीस ना, अशीच पुढे कोणत्याही  नात्यात जे काही चूक बरोबर आहे ते स्पष्टपणे मांडण्याची तयारी ठेव. नाती फुलतात सच्चाईवर हे नक्की लक्षात ठेव.’

 आजुबाजुच्या बायका बरं झालं हिने पूजा नाही केली म्हणत मनोमन खुश होत होत्या, आणि आपण अभिसारखं शांतपणे समोरच्याला आपलं म्हणणं सांगू शकतो या अनुभवाने वैदेही खुश होती.

गळ्यातली चेन हातात धरत ती अभिला म्हणाली,’ अभ्या गळा ओकाबोका चांगला वाटत नाही म्हणून मी ही चेन वापरायला सुरुवात केली, मग तू अंगठी दिलीस ती यातच पेंडट म्हणून वापरायला सुरुवात केली, काळे मणी घातलेला नेकलेस हाच काय तो इतर हार आणि मंगळसुत्राताला फरक किमान मी असे मानते, आपल्याकडे बाईचे लग्न झाले की नाही हे बघण्याचे सोप्पा मार्ग म्हणजे तिच्या गळ्याकडे बघा, पण मग पुरूषांच काय रे? तू बांधून घेशील गळ्यात काही?’

‘तुझ्यासारखी धोंड गळ्यात बांधून घेतली आता अजून काही बांधून घ्यायला जागा नाही किमान या जन्मात तरी.’

गर्दीत देखील त्या दोघांनी त्यांचे बेट तयार केलं होतं आणि ते त्यावर जगत होते.

त्या दोघांच्या त्या केमिस्ट्री कडे बघत अनु गळ्यात मंगळसूत्र घालून घेत होती, आणि आपल्या दोघांमध्येही असेच नातं फुलू देत असं नवऱ्याला डोळ्याने सुचवत होती.   


मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी :सनविवि (स्त्री सूक्त)

Wednesday, August 8, 2018

ती आणि त्या ९





ती
सासू ही नेहेमी अशीच का असते? सारख्या सूचना दिल्या नाही तर आपले सासूपद काढून घेतील की काय अशी भीती असते का तिला? लग्नाआधीच आम्ही ठरवले होते वेगळे राहिलेलेच बरे. म्हणजे तेव्हा त्या ही तसेच म्हणत होत्या. मला तर एकत्र राहणे नकोच होते. कारण अनिकेतचा छोटा भाऊ तेव्हा अजून शिकतच होता. आम्ही घर बघतानासुध्दा त्यांचाच शब्द शेवटचा ठरला. पहिल्या मजल्यावरचे घर हे त्यांच्यासाठी योग्य आहे पण आम्ही दोन जिने चढू उतरू शकतो, त्यामुळे मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरचे घर हवे होते. आता जेव्हा मुलांचे बॉल गॅलरीमध्ये येतात, कोणाकोणाच्या मांजरी बिनधास्त आमच्या घरात घुसतात तेव्हा अनिकेतला पटतंय वरच्या मजल्यावरचे घर बरोबर होते.
घर लावतानाची देखील तीच गोष्ट. प्रत्येक वेळी त्यांच्या दृष्टीनेच, त्यांच्या आवडीनिवडी मधूनच गोष्टी येत होत्या, लागत होत्या. एका वेळी मी उपहासाने म्हणलदेखील अरे वाह आई तुम्हाला अजून एक घर लावायची संधी मिळाली, मला कधी माझे घर लावायला मिळेल काय माहीत. तर त्यावर अनिकेतनेच माझा हात दाबला आणि विषय बदलला. त्याचे म्हणणे तिला आता जे करायचे आहे ते करू देत नंतर तू तुला हवे तसे लावून घे. पण हे त्यांना का कोणी सांगायचे नाही.
आता आजचीच गोष्ट उद्या माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. तेव्हा मी ठरवेन ना काय करायचे आहे ते. पण नाही यांनी मला फोन करून सांगीतले उद्या तुम्ही इकडे या नाहीतर तू फक्त पोळ्या कर चिकन रस्सा मी बाबांबरोबर पाठवते नाहीतर तुम्ही इकडेच या. मला त्यांच्या एवढे सगळे चांगले करता येत नसेल पण म्हणून मी कधीच काही करायचे नाही का? मी आमच्या दोघांसाठी काही ठरवले असू शकते हे यांच्या लक्षातच येत नाही, की लक्षात येऊनही मुद्दाम करतात. लग्न झाल्यावरही मुलाचा हात न सोडण्याची ही कुठली तऱ्हा देव जाणे. मुलाला अजूनही बाळच समजतात पण आता हे बाळ ३० वर्षांचे झाले आहे हे बहुतेक विसरतात. आता उद्या मी मस्त इंचीलाडा, ग्वाकामोली, घरीच करणार होते. पण बहुतेक सगळे कॅन्सल करून त्या घरी तिखट जाळ रस्सा खावून घरी येऊन जेलुसील घ्यावे लागेल किंवा इथेच आम्ही दोघेही चिकन खातानाचे फोटो पाठवावे लागतील. त्यापेक्षा मी स्पष्टच सांगेन त्यांना अनिच्या मित्रांनी पार्टी ठेवली आहे त्यामुळे चिकन विकेंडला खायला येतो आम्ही. कुठलेतरी जुने फोटो टाकेन फॅमिलीग्रुपवर त्यांच्या समाधानासाठी. पण नवऱ्याचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस मी मला हवा तसाच करेन.  

त्या

मुलगी असती तर जास्त बरे झाले असते. मुलगा म्हणजे काही सांगताही येत नाही आणि सोडताही येत नाही. त्यातही त्याचे लग्न करून दिल्यावर तर अजून जास्त अवघड होऊन बसते सगळे. अनिकेत लग्न ठरल्यावरच म्हणायला लागला आई हे घर छोटे पडेल, आम्हाला प्रायव्हसी नाही मिळणार म्हणून आम्ही वेगळे राहतो.  मी पण फारसा काही विरोध केला नाही, उगाच कशाला पहिल्यापासूनच वाईट बना. तरीही तो म्हणाला एकदा का अमित बाहेर गेला शिकायला मग आम्ही पण येऊ या घरात परत. पण एकदा घरातून बाहेर गेल्यावर हे लोक का येतील परत घरी? त्यांना त्यांची सवय झाली की आमची सवय कशी लागेल.
आता आम्हाला अनुभव आहे म्हणून मी यांना घर शोधायला घर लावायला मदत करायला गेले तर आमच्या सुनबाई आम्हालाच म्हणाल्या,’ आमचे घर आम्हालाही लावू द्या. सगळे काम तुम्हीच केले तर आम्ही काय करू?’ त्या दिवसानंतर जावंसंच नाही वाटले त्यांच्या घरी. आमचे लग्न झाले तेव्हा सासू सासरे गावाकडे होते, पण दर आठवड्याला कोणी न एकोणी पै पाहुणा घरी यायचाच. मला इच्छा असूनही त्यामुळे नोकरी करताच आली नाही. त्यामुळे घर कुटुंब माझे विश्व झाले. कोणाला काय आवडते, ते तसे खायला घालणे ही आवड कमी छंद जास्त झाला.
उद्या अनीचा वाढदिवस. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला पहिल्यांदा त्याला चिकन चाखावले होते, तेव्हापासून ती जणू प्रथाच झाली होती त्याच्या दर वाढदिवसाला मी  चिकन करायचे. तसे इकडे चिकन करण्यासाठी काही कारण लागायचे नाही. पण का कोणास ठाऊक त्याच्या वाढदिवसासाठी केलेले चिकन जास्त चविष्ट बनायचे. मी सुनेला फोन करून सांगितले, बाबांना पाठवते तिकडे किनव तुम्ही लोकं या इकडे पण फोनवरचा तिचा नूर काही मला बरोबर नाही वाटला.
आता रोजच यांचे हे असतातच ना, मग वाढदिवस आमच्याबरोबर साजरा केला तर काय बिघडेल? लग्न करून दिले म्हणजे मुलाला तिच्याकडे सोडून दिले असे होत नाही, आई आहे काळजी, प्रेम वाटणारच!  त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली म्हणून काय मी माझा हक्क अधिकार पूर्ण सोडून द्यायचा? लेकाला त्याच्या आवडीचे करून देण्यात जो आनंद असतो तो हिला मूल झाल्यावरच कळेल. हिने काहीही ठरवू दे माझा अनिच तिला म्हणेल आपण आज आईकडे जाऊ आईने मस्त चिकन केलेलं असेल.
© मानसी होळेहोन्नुर    

Sunday, August 5, 2018

इस मैं हैं मां के हाथ का स्वाद ...

ही आपली साधी वांगं बटाटा कांद्याची भाजी. आज भाजी  जास्त झाली आहे असे वाटतानाच सगळ्यांनी मिळून चाटून पुसून संपवली. काय असे विशेष यात असेही वाटेल. पण या नेहेमीच्या वाटणाऱ्या भाजीला खास बनवलं ते यातल्या 'आईच्या  मसाल्याने'. 

वांगी, बटाटे कांदे सारख्याच आकाराचे कापून घ्यायचे. फोडणीमध्ये मोहरी तडतडली की कडीपत्ता, थोडासा हिंग, हळद घालायची आणि मग कांदा परतून घ्यायचा. मग त्यातच वांगं बटाट्याच्या फोडी घालायच्या, थोडेसे पाणी घालायचे. भाजी शिजत आली की त्यातच मीठ, तिखट, दाण्याचा कूट, चवीप्रमाणे गूळ, कोथिंबीर घालायची. मग सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ खास आईच्या घरचा मसाला घालायचा. असा काही सुगंध घरभर पसरतो की माहेरीच गेल्यासारखं वाटते. किती वास आठवणींबरोबर जोडले गेलेले असतात ना. 
 

आईच्या हाताच्या मसाल्याची चव आपल्या हाताला येत नाही त्यामुळे त्या भानगडीतही न पडता मी केवळ दर भेटीच्या आधी ताजा मसाला करून तो माझ्यासाठी आणणाऱ्या आईची वाट बघत असते. वास आणि काही पदार्थांशी आपल्या आठवणी इतक्या घट्ट जोडल्या गेलेल्या असतात की त्या दोन गोष्टी एकत्र होऊन जातात. त्यामुळेच की काय मग त्या पदार्थांची गोडी जास्त वाढत असते. 

प्रत्येक घराची ओळख असते तिथले जेवण आणि ते जेवण वेगळे ठरवत असते त्या घरातल्या स्वैपाकाची पद्धत, त्या घरातले मसाले. मसाल्याच्या शोधात अनेक देशांचा शोध लागला, आता मात्र हेच मसाले हे अंतरे कमी करायला, आपल्या माणसांना जोडायला उपयोगी पडताहेत. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर नक्की लिहून कळवा. 

Wednesday, July 25, 2018

ती आणि त्या ८

ती
माणसाचा स्वभाव नक्की केव्हा कळतो? त्याच्यासोबत जास्तीत जास्त राहिल्याने की  अजून कशाने? मी माझ्या आई वडिलांना ओळखते असे ठाम विधान करूच शकत नाही , आज चाळीस वर्षानंतर ही आई बाबांच्या कोणत्याही निर्णयाची किंवा प्रतिक्रियेची खात्री मला देता येत नाही. हे तसे तर प्रत्येकाच्या बाबतीतच होते, पण सासूच्या बाबतीत जरा जास्तच होते. मी वेगळ्या भाषेतली, वेगळ्या संस्कारातली. त्यामुळे मम्मी म्हणणे हेच पहिले मोट्ठे काम होते. येत जाता वाकणे सतत तोंडावर हसू ठेवणे  बापरे लिस्ट अजून वाढतच जाईल. अमितला पक्का आमच्या सारखा स्वैपाक आवडतो, पण मम्मी आलाय म्हणजे मला रोज कांदा  लसूण  टोमॅटो चे अग्निहोत्र सुरूच ठेवावे लागते. तसे ते दोघे लांब असतात,. आमच्याकडे काही मागत नाहीत. उलट दर वेळी आम्हालाच खूप काही देतात. आयुषी  झाल्यावर तर तिला आणि मला प्रेम , गिफ्टच्या  पावसात बुडवायचे तेवढे बाकी ठेवले होते. अमितच्या आजोबांना बहीण होती आणि  त्यानंतर आयुषीच त्यांच्या घरातली पुढची मुलगी. खरंतर मला मुलगी झाल्यावर माझ्या आई सकट  सगळ्यांनी मला घाबरवून सोडले होते. या लोकांना मुलगाच हवा असतो. बघ आता काय काय बोलतील ते. पण छे  उलटंच  झाले. मला भेटायला आल्यावर मम्मीनी  पहिल्यांदा छातीशी धरले, आणि  म्हणाले, 'बेटी बोल तुझे क्या चाहिये? दुनिया की  सबसे बडी  ख़ुशी नातीन  दी  हैं  तुमने हमें . मला रडायलाच येत होते. तस त्यांनी मला सासू म्हणून त्रास वगैरे दिला नव्हता कधी पण एक अंतर असायचे काहीही करताना. मुलाची पसंती, त्याचा आनंद त्यांनी महत्वाचा मानला  होता. लग्नात मीच खूप अटी  घातल्या होत्या, त्या सुद्धा त्यांनी हो नाही  करत मान्य  केल्या  होत्या.  तक्रारीचे  वादांचे  प्रसंग आई मुलींमध्येही येत असतात मग सासू सूना कशा काय अपवाद राहतील त्याला. पण एकुणात आमचे चांगले चालले होते हे खरे. मम्मी मला दर  वेळी येताना कपडे आणतात त्यांची चॉईस  मला नाही  आवडत. खूप भडक,चकचकीत असते. मी नाही  घालत कधी असले कपडे.  आता दहा बारा वर्षांनंतर  तरी त्यांना समजावे मी कसे कपडे घालते. दर वेळी त्यांनी आणलेले कपडे मी एकदा त्यांच्यासमोर घालते, आणि मग ते कपाटात जाऊन लपून बसतात किंवा आमच्या कामवाल्या ताईकडे. दर वेळी त्यांना हे सांगावे असे वाटते पण मग त्यांचे प्रेम,काहीतरी आणायची इच्छा  बघितली की  वाटते जाऊ देत राहू देत. या वेळी  त्यांनी आयुषी साठी आणलेला लेहेंगा बघून मात्र ती किंचाळलीच . तिच्या  समाधानासाठी म्हणून सुद्धा कधी घालणार नाही असे म्हणाली त्यामुळे मी त्यांना तसे हळूच सांगितले तर भडकल्याचं एकदम, मग मी पण कसे त्यांनी दिलेले कपडे घालत नाही  आणि  मुलीला पण  मीच फूस लावली असे काय काय बोलत राहिल्या. इतक्या वर्षांचे साचलेले एकदम बाहेर येत राहिले. मला रागही येत होता, हसूही  येत होते, पण प्रयत्न पूर्वक शांत राहिले. त्या जे काही बोलल्या त्यातले निम्मे आरॊप होते, आणि ते ही  खोटे होते. मग मी कशाला वाईट वाटून घेऊ. त्यांचा राग शांत झाला तर मी जाऊन बोलेन, एखादा प्रयत्न करेन. अमित यात कुठेच नसतो, त्याचे म्हणणे होते मम्मीइथे राहत नाही  तर तिच्या समाधानासाठी  एकदा घालायचा तिच्यासमोर आणि मग नंतर तू त्याचे काहीही कर तिला काय कळणार  आहे , आज तेच बुमरँग सारखे आले. आणि नेमके आजच आमच्या कामवालीला मम्मीनेच चार वर्षांपूर्वी दिलेला ड्रेस घालून यायची काही गरज होती काआईशी भांडण झाले तर तिच्या आवडीचे काही तरी आणून ते मिटवता येते. बहुतेक आज मला मम्मीसाठी गाजर हलवा करून त्यांचा रुसवा काढावा लागणार.


त्या

खरेतर अमितच्या लग्नाच्या माझ्या खूप अपेक्षा होत्या. मोठा मुलगा, घरातले पहिले लग्न पण या पोराने स्वतःच पोरगी पसंत केली. आमच्या सिमी दीदींच्या महेशने थेट लग्न झाल्यावरच घरी सांगीतले होते, त्यापेक्षा अमितने किमान आम्हाला आधीच सांगीतले आणि आमची अब्रू राखली. तशी पोरगी ठीक ठाकच होती. आमच्यापेक्षा जरा खालचे होते, पण पोराच्या आनंदापुढे सगळे काही माफ केलं. लग्नासुध्दा पोराला, सुनेला हवे तसेच केले, पण हे सगळे करताना आपण हे सगळे पोरासाठी करतोय हे माहित असल्यामुळे मी खूषच होते. तशी ही बहु चांगलीच आहे. घर नोकरी बघते. आमच्या घरचे रितीरिवाज पण लवकरच शिकली. मिक्स झाली आमच्यामध्ये. त्यामुळेच अनीशच्या लग्नात तर कोणाला वाटलेही नाही ही बाहेरची, दुसऱ्या समाजातली आहे म्हणून. आयुषीच्या जन्मानंतर तर मीच जास्त खुश झाले होते. मला मुलगी हवी होती म्हणून मी तीन मुले होऊ दिली, पण मुलगी काही झाली नाही ठीक आहे आपण सुनेलाच मुलगी समजायचे ठरवले होते. या छोट्या परीला काय करू आणि काय नको असे मला झाले होते, आणि तसेच मला आजही वाटते.

मला मुलगी नव्हती म्हणून मी माझी सगळी हौस मौज या सुनांवर करायची ठरवली. म्हणून दर वेळी येताना मी हिच्यासाठी कपडे, आणि काय काय घेऊन यायचे. ही माझ्यासमोर घालून पण दाखवायची पण नंतर ते परत कधीच घातलेली दिसायची नाही. आज तर हद्द झाली मी आयुषीसाठी लेहेंगा आणला होता, तर आयुषीच्या ऐवजी हीच आली सांगायला की तिला असा भडक, गॉडी ड्रेस आवडत नाही म्हणून सांगायला. आणि आजच मला यांच्या कामवालीच्या अंगावर मीच दिलेला एक सूट दिसला आणि माझे डोकेच फिरले. आवडत नाही तर ते आधीच सांगायचे होते, आणि आता मुलीला सुध्दा पट्टी पढवत आहे. मी आणत असलेले महागमोलाचे कपडे असे कामवाल्या बाईला द्यायला नक्कीच नाहीत. कितीही प्रेम करा सून बाहेरची ती बाहेरचीच असते. मी इतका जीव लावला तर तिला येऊन सांगता आले नाही का कधी की मम्मीजी मुझे ये पसंद नही है. सुनेची आई होणे अशक्यच असावे,
मानसी होळेहोन्नुर
  

Wednesday, July 18, 2018

नहप्र, सप्र, अप्र

सार्वजनिक ठिकाणी बसून आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करणे ही म्हणलं तर एक कला आहे, म्हणले तर मनोरंजनाची संधी आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेणाऱ्यांमध्ये ओळखपत्र, तिकीटाची प्रिंट हातात घेऊन रांगेच्या पुढे पुढे वेगाने सरकू पाहणारे लोक हे साधारण उशिरा तरी आलेले असतात की नवहवाईप्रवासी तरी असतात. वेब चेक इन करून येणारे हे सराईत प्रवासी असतात. तर हे विमान माझ्यासाठी थांबेलच, मग मी दारे बंद करायच्या अर्धा मिनिट आधी जाऊन पोहोचलो तरी चालेल अशा आविर्भावात असणारे लोक हे अट्टल प्रवासी असतात.
नहप्र हे विमानतळावर त्यांच्या तिकीटावर लिहिलंय त्यापेक्षा अर्धा एक तास आधीच येतात. आपले सगळे सामान वजनमापात आहे ना हे दोन दोनदा बघतात. यांच्याकडे तिकिटाच्या दोन प्रती असतात. एक हरवली तर दुसरी असावी म्हणून. मी विमानाने प्रवास करतोय याचा एक जाज्वल्य अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर असतो. काऊटरवर ते साधारणपणे जरा विंडो सीट वगैरे मागतात. निर्धारित वेळेच्या तास दीड तास आधीच ते त्यांच्या गेटवर जाऊन बसतात. मग तिथेच असलेले एखादे वर्तमानपत्र किवा त्यांनी आणलेलं पुस्तक वाचायला घेत ते दर पाच मिनिटांनी आजूबाजूला नजर टाकत असतात. मध्येच एखादा फेरफटका विमानतळावरच्या दुकानामध्ये मारतात पण तिथल्या किंमती पाहून नकोच म्हणत परत त्यांच्या गेटवर येऊन बसतात. यांना शक्यतो नवीन लोकांशी बोलण्यात रस असतो. नवीन ओळखी काढायच्या असतात, त्यामुळे कोणाच्याही हातातले बोर्डिंग कार्डवरचा सीट नंबर शोधायच्या ते कायम प्रयत्नात असतात. जर हे नहप्र सहकुटुंब प्रवास करत असतील तर मात्र हे विमानतळ माझे घर या आवेशांत त्यांचे वागणे बोलणे चालले असते. विमानात गेल्यावरही आपण पैसे भरून तिकीट घेतले आहे त्यामुळे हे आपले खासगी विमान आहे अशी यांची उगाचच समजूत असते.
सप्र हे आठवड्यातले जास्त तास विमान प्रवासात किंवा विमानतळावर घालवत असल्याकारणामुळे त्यांना विमानतळांची माहिती तिथल्या कर्मचाऱ्याएवढीच असते. सिक्युरिटीचेक मध्ये तेच त्या कर्मचाऱ्याला बघून हसून विचारतात काल वेगळी ड्युटी होती का? त्यांचे हॉटेल्स, खाण्याचे/ पिण्याचे पदार्थ ठरलेले असतात, त्यामुळे अनेकदा त्यांना बघूनच तिथली लोकं बिल टाईप करायला घेतात. हे लोक कधीही चार्जिंग पॉईंट शोधत नाही कारण यांच्याकडे त्यांची पॉवर बँक नेहेमीच असते. विमानतळावर सुध्दा ते त्यांचे लॅपटॉप उघडून काम करत असतात. किंवा फोनवर कोणाशी तरी गंभीर चर्चा करत असतात. विमान किती मिनिट आधी उडते, आपण किती मिनिट आधी काउंटरवर असले पाहिजे याची त्यांची गणिते पक्की असतात, त्यामुळे त्यांचे विमान कधी चुकत नाही आणि वेळही वाया जात नाही. यांच्याकडे लाउंज अक्सेस असल्यामुळे हे शक्यतोवर बाहेरच्या जनतेत मिसळत नाहीत.
अप्र ही जमात पूर्णपणे वेगळीच असते, यात तुमचा अनुभव किती आहे यापेक्षा तुम्ही तुमचा अनुभव किती भासवू शकता हे दाखवणे जास्त महत्वाचे असते. म्हणजे  आपली बॅग २० किलोची आहे हे माहीत असले तरी काउंटरवर जाऊन वजन बघताना अरे यात हे ५ किलोचे सामान कोणी घातले असा भाव आणणे, जड सामानाचे पैसे देण्यास घासाघीस करणे. दोन चार एक्स्ट्राचे टॅग उचलणे. बोर्डिंग पास घेऊन जोवर आपल्या नावाची घोषणा होत नाही तोवर तिथल्याच एखाद्या दुकानात निवांत फिरणे असे अनेक प्रकार करतात. आपल्याला विमान प्रवासाचा अनुभव आहे आणि आपण कसे अनेक विमानतळावरची कॉफी प्यायलो आहोत हे त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत असते. त्यातही जर त्यांना एखादा बकरा मिळाला हे ऐकायला तर मग त्यांचा उत्साह कॉफीच्या फेसासारखं बाहेर सांडत असतो. आजवर त्यांची काही विमाने सायलेंट विमानतळावर चुकली असतात, आणि त्याबाबत त्यांनी फेबुवर, ट्विटर वर लिहलंही असते पण तरीही या प्रवासातही विमानात चढणाऱ्या शेवटच्या प्रवाशांपैकी ते एक असतात.
तसे बघायला गेले तर विमानतळ म्हणजे मेल्टिंग पॉट असतात, त्यांना काही स्वतःची ओळख संस्कृती नसते, त्यांना ओळख मिळत असते ती तिथे येणाऱ्या विमानांमुळे आणि प्रवाशांमुळे, अनेक नानाविध प्रकारचे लोक येतात जातात, विमानतळावर घटना घडतात, बिघडतात, ओळखी नव्याने होतात, नाती जुळतात, तुटतात, प्रवाशी कोणत्याही प्रकारचे असले तरी प्रवास महत्वाचा असतो. प्रवासाचे ठिकाण कधीच कायमस्वरूपी नसते, कारण आलेला प्रत्येकजण जाणार असतो, पण आपण तो येणे  आणि जाणे या मधला प्रवास कसा करतो यावर सगळा आनंद ठरलेला असतो. नहप्र, सप्र, अप्र हे तुमच्या आमच्यातच असतात. त्या सगळ्यांना माहीत असते, हा प्रवास आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने तो प्रवास केला पाहिजे, जर सगळ्यांनी एक सारखाच प्रवास केला तर माणसे आणि रोबोट यात काय फरक राहील.
मानसी होळेहोन्नूर 

Wednesday, July 11, 2018

ती आणि त्या ७


ती
अजून लग्न झाले नाही तर हा हाल आहे, लग्न झाल्यावर काय होईल कोणास ठाऊक. तरी बरे संकेत बाहेर असतो, म्हणजे रोज तोंडाला तोंड लागणार नाही. आता माझे लग्न आहे, तेव्हा मी मला काय आवडेल ते घ्यायला हवे की यांना आवडते ते? साड्या प्रकरण मला फारसे आवडतनाही आणि झेपतही नाही. आता झेपत नाही म्हणून आवडत नाही की मुळातच आवडत नाही मला माहित नाही. मुळात खरेदीला मला फक्त संकेत हवा होता, पण या त्याला घट्ट चिटकून आल्याच. उगाच खोटे खोटे हसत मी अरे वाः बरे झाले तुम्ही पण आलात म्हणले पण मनात मात्र तुम्ही कशाला असेच होते.
आता आल्या तर आल्या, स्वतःची, स्वतःच्या बहिणीची साडी निवडून शांत बसावे ना, पण नाही सतत मी माझे. यांच्या लग्नाची गोष्ट मी गेल्या चार महिन्यात पाच वेळा ऐकली आहे. त्यांच्या लग्नातून झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे संकेत. तसा त्याचा लहान भाऊ बरा आहे बाबा पण ठीक आहेत पण ही बाई माझ्या अगदी डोक्यात जाते. कधी कधी वाटते  कशाला हो म्हणाले या मुलाला. लग्न ठरल्यापासून जवळपास रोज फोन. बरे आता २ मिनिटांपेक्षा जास्त काय बोलणार मी, कशी आहे, काय खाल्ले यापेक्षा तिसरे वाक्य काय बोलायचे या बाईशी कळत नाही मला, पण ही मला तिच्या आयुष्याची कथा सांगणार, लेकाला काय आवडते, नवऱ्याला काय आवडते ते सांगणार, मग आमच्या घरात कसं हे मुळीच चालत नाही आवरा... कधी कधी तर घरी असताना फोन आला की मी सरळ आईकडेच देऊन टाकते, तिचा आणि माझा आवाज सारखाच आहे, मग नंतर आई आई बनून पण त्यांच्याशी गप्पा मारते. मला गप्पा मारायला आवडत नाही असे नाही, पण कोणाशी काय बोलावे हे माझ्या भावी सासू बाईंना कळत नाही त्याचा जास्त त्रास होतो.
आता मला आवडलेली साडी २५००० ची होती, बरं ही साडी आमच्याच कडची होती, तरी त्यांचे लगेच सुरु झाले, अग तू काही फार साड्या नेसत नाही मग कशाला इतकी महाग मोलाची साडी घेतेस, जरा कमीचीच घे की, पैशावरून बोलणे झाले की, रंगावर . तू गोरी तुला गडद रंग छान दिसेल, हा फारच हिरवट आहे, हे कॉम्बिनेशन संकेतला आवडत नाही, हो ना रे? बिचारे लेकरू सँडविच होऊन बसले होते. मग शेवटी मी त्याला मेसेज केला, आणि त्याच्या तोंडून मला आवडलेली साडी छान आहे हे वदवून घेतले तेव्हा सासुबाईंचा चेहरा पाहणे लायक होता, न राहवून त्य बोलून पण गेल्या, तूच म्हणतोस ना लाल रंग तुला आवडत नाही, त्याने काहीतरी कारण देऊन बोळवण केली.
आता माझे लग्न आहे, माझी आवड हौस मौज मला महत्वाची वाटणारच ना, एकदाच होणारी ही गोष्ट केले थोडे फार पैसे खर्च तर काय बिघडते. यांच्या आवडीच्या साड्या मी माझ्या लग्नासाठी का घेऊ? माझ्या लग्नासाठी अर्थात मी माझ्या आवडीच्याच साड्या घेणार, भले त्या मी नंतर घालेन की नाही, तो वेगळा प्रश्न असेल.


त्या
संकेत चे लग्न ठरले आणि  मलाच टेन्शन आले. तसे ते दोघेही बाहेरच राहतील, वर्ष दोन वर्षांनी काही दिवसांसाठी येतील पण तरीही घरात एक नवीन माणूस येणार म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलणारच ना.
मी घरातली मोठी सून त्यामुळे माझ्या सासुबाईंनी मला अक्षरशः प्रत्येक गोष्टीला तयार केली होती. लग्नानंतर साधा वरण भाताचा स्वैपाक यायचा मला, पण आता मात्र चारीठाव स्वैपाक करून वाढते. मला आपली लेकीची हौस होती, पण दोन्ही पोरगेच झाले, तेव्हाच ठरवले सुनेला अगदी मुलीसारखे वागवायचे. त्यामुळे संकेतचे लग्न ठरवताना पण मी मला आवडलेल्या मुलीच फक्त संकेत पर्यंत पोहोचवत होते, त्यातल्या त्यात ही स्नेहा मला हसरी छान वाटली होती, दोघांची पसंती झाली आणि मलाच जास्त आनंद झाला.
मग काय लग्नाच्या आधीच मी तिला जरा जरा आमच्या सगळ्यांच्या बद्दल माहिती दिली, म्हणजे नंतर तिला काही जड जायला नको. आमच्या घरातल्या लोकांच्या सवयी तिला माहिती असल्या तर तिला ही लोकं आपलीशी करायला मदत होईल म्हणून. ही बोलते फोनवर पण का कोणास ठाऊक बाई माझ्यासारखी मोकळी होऊन बोलत नाही. आमच्या सासूबाईंपुढे बोलायची आमची टाप नव्हती आता मीच स्वतःहून हिच्याशी बोलतीये तरी ही मोकळी होत नाही. या पोरींचा प्रॉब्लेम काय आहे कळत नाही.
आता साडी खरेदीची गोष्ट, संकेतला बोलावले तिने, त्याला काय कळते त्यातले, म्हणून मग मीच म्हणाले मी पण येते तुझ्याबरोबर. तर मला बघून एकदम म्हणाली, ‘तुम्ही पण’. सरप्राईझ ग, तसेही या ठोम्ब्याला काही कळत नाही साड्यामधले म्हणून मीच आले. आमच्या  नेहेमीच्या दुकानात जाऊ म्हणले तर तिने आधीच दुकान ठरवले होते, त्या दुकानातल्या साड्या जरा महाग होत्या, सांगीतले मी तिला तर लगेच चेहरा पाडून म्हणाली, लग्न एकदाच होते हो, झाला थोडा खर्च तर चालेल ना. आता ही फारशी काय साड्याच नेसत नाही मग कशाला घ्यायच्या महागमोलाच्या साड्या, पण नाही हौसेला मोल नाही म्हणतात तेच खरे, रंग तर काय उचलत होती, एक पण साडी आम्हाला दोघींना आवडत नव्हती, मला आवडली तर हिला नाही, आणि तिला आवडली तर मला नाही. शेवटी एका साडीवर संकेत म्हणाला, मस्त आहे घेऊन टाक. आणि मी माझ्या पोराकडे बघत राहिले, लाल रंग कधीच न आवडणारा माझा लेक, बायकोला चक्क लाल रंगाची हिरव्या काठाची साडी मस्त दिसेल तुला म्हणत होता.
लग्नानंतर मुले बदलतात बघितले होते, पण हा तर लग्नाआधीच बदलला होता. बरे आहे हे दोघे लग्नानंतर बाहेर असतील म्हणजे मला हे असे धक्के रोज रोज बसणार नाहीत, अधून मधून बसतील.
मानसी होळेहोन्नुर