Monday, July 31, 2017

ब्रुकलीन मधला शहाणा...

एक पन्नाशीतला माणूस गाडी चालवत असतो, सिग्नल ला थांबतो, आणि सिग्नल सुटल्यावर निघतो तर दुसऱ्या बाजूनी एक गाडी येऊन त्याच्यावर आदळते, आधीच गाडीमध्ये वैतागलेला, आता तर त्याचा स्वतःवरचा ताबा सुद्धा सुटतो आणि तो त्या टॅक्सी ड्रायव्हरशी अगदी हमरी तुमरीवर येऊन भांडायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून तो दाखवून देत असतो सगळ्यात जास्त चिडणारा माणूस आहे तो. त्याच दिवशी त्याची हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असते, तिथे जाऊन त्याला कळतं त्याचा नेहेमीचा डॉक्टर नाही तर दुसरीच कोणती तरी बाई आलेली आहे, जरा थांबलेला राग परत त्याला गाठतो, आणि तो त्याच रागाच्या भरात प्रश्नांची फैरी झाडतो त्या डॉक्टरवर. ती डॉक्टर स्वतःच गोळ्या खाऊन स्वतःला शांत करायचा प्रयत्नात असताना त्या चिडणाऱ्या पेशंट कडे डॉक्टर म्हणून बघूच शकत नसते हे आपल्याला कळत असते, पण त्या दोघांनाही ते उमगत नसतं. तो खरतरं गंभीर आजारी आहे, त्याच्या डोक्यातला ट्युमर फुटून रक्तस्त्राव सुरु झालेला आहे, तो कधीही कोसळू शकतो, ती डॉक्टर ही सगळी तांत्रिक माहिती त्याला अगदी निर्विकारपणे देत असते, आणि मृत्यू असा फारसा लांब नाही हे उमगून तो अजूनच वैतागतो, चिडतो, आता तो चिडलेला असतो, स्वतःच्या आयुष्यावर, चाहूल लागलेल्या मृत्यूवर. मृत्यूला आपणा हरवू शकत नाही हे माहीत असतं, त्यामुळे किमान हातात अजून किती वेळ आहे हे कळल तर किमान आपण ते उरलेले महिने, दिवस तास चांगले घालवू उगाच एक भाबडी आशा मनाशी बाळगत तो त्या डॉक्टरला छळत राहतो, विचारत राहतो किती वेळ आहे माझ्याकडे? स्वतःच्या वेळेत अडकलेली ती डॉक्टर एकाच सांगत राहते, किती वेळ ते मी नाही सांगू शकत. शेवटी कंटाळून वैतागून समोर पडलेल्या मासिकावरचा आकडा बघत ती म्हणते ९० मिनिटं राहिलीत, झालं समाधान तुझं.
आकडा कळेपर्यंत धडपडणारा तो माणूस आकडा ऐकल्यावरही क्षणभर लटपटतो, फक्त ९० मिनिटं. आणि मग ठरवतो जवळच्या माणसांना एकदा शेवटचं भेटायचं. आपण ९० मिनिटानंतर या जगात नसू कल्पनाच किती भयंकर असू शकते, किती तरी गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, किती तरी गोष्टी अनुभवायच्या असतात आणि असा ९० मिनटात आपल्याला निरोप घ्यायचा आहे सगळ्यांचा सोपं बिलकुल नसतं. त्याचवेळी आपण काय बोलून गेलो आहोत हे त्या डॉक्टरला तिचे सिनिअर डॉक्टर लक्षात आणून देतात, जर तो माणूस मेला, त्यानी कोणाला या सगळ्याबद्दल सांगितलं तर तिचं लायसन्स जप्त होऊ शकतं याची जाणीव झाल्यावर सुरु होतो एक पकडापकडी चा खेळ. मृत्यू भेटण्याआधी जवळच्या माणसांना गाठण्याची त्या माणसाची धावपळ, आणि मृत्यू त्या माणसाला गाठण्याआधी त्याला पकडून हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्या डॉक्टरची पळापळ.
द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन ची कथा ही. आपलं आयुष्य फक्त आपलं नसतं. आजूबाजूच्या ओळखीच्या अनोळखीच्या लोकांमुळे ते घडत असतं. एक पेशंट, आणि डॉक्टरची ही गोष्ट फक्त तेवढीच नाही. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं, आपण ते कारण समजून घेण्याचा प्रयत्न न करता सरळ हल्ले चढवून, सूचना देऊन, सल्ले सांगून मोकळे होत असतो! दोन वर्षापूर्वी तरुण मुलगा मेल्यामुळे सैरभैर होऊन चिडचिड्या झालेल्या नवऱ्याला बायको समजून घेत नाही, स्वतःच्या मर्जीचं करिअर करू पाहणाऱ्या मुलाला बाप समजून घेत नाही, विवाहित प्रियकर धोका देत आहे हे शिकलेली डॉक्टर तरुणी समजून घेत नाही. जगात प्रत्येकाला चिडायला प्रत्येक सेकंदाला एक कारण मिळत असतं, आणि तो एक चिडका क्षण जन्म देत असतो पुढच्या चिडक्या क्षणांना. छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडत असताना आपण जगणं हरवत चाललोय हे आपल्याला लक्षातच येत नसतं. किंवा लक्षात आलं तरी तोवर वेळ निघून गेलेली असते.
हातात १९ मिनिट राहिलेली असताना भाऊ, बायको, मुलगा या तिघांशी शेवटचा भांडून, मनात असलेलं प्रेम अव्यक्तच ठेवून तो चिडका माणूस आत्महत्या करायला निघतो, त्यावेळी त्याला ती डॉक्टर गाठते, त्याला विनवते किमान माझ्यासाठी तरी आत्महत्या करू नकोस, पण स्वतःच्या आत्मसन्मानाची काळजी करणारा हेन्री आल्टमन पुलावरून खाली उडी मारतो. मे २०१४ मध्ये आलेला हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन मध्ये नायक आत्महत्या करायचा प्रयत्न करतो पण त्याची डॉक्टर त्याला वाचवते, पण खऱ्या आयुष्यात मात्र असं कोणीच वाचवायला आलं नाही रॉबिन विल्यम्सला! आत्महत्या करून त्यानं स्वतःला संपवलं. उत्तमोत्तम चित्रपटात काम करून एकापेक्षा सरस एकेक सरस भूमिका करणारा हा अभिनेता देखील रागाच्या एका सेकंदात, स्वतःवरचा ताबा विसरून शरण गेला रागाला, मृत्यूला. हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या चांगल्या चित्रपटांमध्ये गणला जात नाही, समीक्षकांनी पण याला नाकं मुरडली होती. पण तरीही मला वाटतं, यातले योगायोग नाट्य सोडलं तरीही हा चित्रपट ब्रुकलिन मधल्याच नव्हे तर जगातल्या सामान्य माणसाच आयुष्य दाखवतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून जगण्यातली गंमत विसरलेल्या माणसाला आरसा समोर धरून त्याच्या आयुष्यात काय हरवत चाललंय हे सांगत.

आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाच उत्तर नसतं. आणि कोणत्याही वयोगटासाठी, कोणत्याही स्तरातील, समाजातील माणसांसाठी ते भूषण असू शकत नाही. मृत्यू सगळीकडेच फिरत असतो, त्याला शोधत जाण्यापेक्षा हसणाऱ्या क्षणांना शोधत आयुष्य जगणं जास्त धैर्याच, साहसाचं आणि समाधानकारक असतं. रागावून चिडून आपण मनात असलेलं बोलतच नाही, भावना व्यक्त करतच नाही. ब्रुकलिन मध्ये राहणाऱ्या एका चिडक्या माणसाने सांगेपर्यंत हे मला कळलं नव्हतं असं नव्हतं, पण काही गोष्ट दुसऱ्यांच्या बघूनच आपण लवकर शिकतो हे मात्र मला परत एकदा कळलं.   
मानसी होळेहोन्नुर

https://en.wikipedia.org/wiki/The_Angriest_Man_in_Brooklyn

Monday, July 24, 2017

सृष्टीला पाचवा महिना...

श्रावण महिना अगदी आवडता, म्हणजे बारा महिन्यांची नावं माहित नव्हती तेव्हापासून तो भरपूर फुलं, देवाची पूजा , प्रसाद मिळतो तो महिना आवडायचा. तशी आई रोजच साडी नेसायची, पण तेव्हा मस्त फुलं माळायची, गजरे करायची. मोठ्ठी एकादशी नंतर आईची, आज्जीची गडबड धांदल सुरु व्हायची. फुलवाती कर, वस्त्र माळ कर, सगळी पितळ्याची, तांब्याची भांडी चिंचेनी, लिंबानी घासून चक्क करायची, देवाचं तेल वेगळं ठेवायचं. फुलवाल्या मावशींना आधीपासूनच सांगून ठेवायची, कोणत्या कोणत्या दिवशी गजरे, हार हवेत ते. कालनिर्णय मधले ते अबोली रंगाचे दिवस कधी सुरु होतात याकडे घरातल्या बायकांचेच नव्हे तर पुरुषांचं पण लक्ष असायचं.
दिव्याच्या अमावास्येच्या आदल्या दिवशीच आजी सगळ्या ट्यूब लाईट, दिवे पुसायला लावायची, मग माळ्यावरचे जुने कंदील पण याच सुमाराला दर वर्षी उन्हं खायला बाहेर पडायचे. घरात असतील नसतील तेवढ्या समया, निरांजनी, कंदील सारे न्हाऊन माखून नव्याने चमकायचे. मग दुसऱ्या दिवशी आजी आई मस्त आंघोळ करून पाटावर त्या मांडून ठेवून, रांगोळीनी ते सजवून फुलं वाहून, त्याची पूजा करायच्या, मग दिव्यांचा नैवेद्य झाला का पुरणावरणाचा महिना सुरु झाला अशी वर्दी मेंदू तावड्तोब पोटाला, जिभेला द्यायचा. ते सारे शांत तेवणारे दिवे, त्यावर लावलेल्या वस्त्र माळा, रंगीबेरंगी फुलं पाहून खरंच आपोआप हात जोडले जायचे. आजी नेहेमी म्हणायची हे दिवे आपल्याला प्रकाश दाखवतात, त्यांचे ऋण मान्य करण्यासाठी हा अदिवास दरवर्षी साजरा करायचा. आजच्या जमानातल्या, अमुक डे, तमुक डे च्याच पंथातला हा ही एक डे. पण तो ज्या पद्धतीने साजरा व्हायचा ते पाहून हा दिवस वर्षभर व्हावा असं वाटायचं.
दुसऱ्या दिवसापासून घरात जणू एखादा पाहुणा आला असावा असंच वाटायचं. श्रावणी सोमवारी बेलाची पानं, मंगळवारी घरी, किंवा शेजारी, आजूबाजूला कुठे तरी नक्कीच मंगळागौर असायची, त्यामुळे फुलं, पत्री गोळा करायच्या असायच्या, बुधवार, गुरुवार  जरा निवांत गेले की परत शुक्रवारच्या जीवंतिका पूजा, हळदी कुंकुवाच्या तयारी साठी फुलं आणायची जबाबदारी अंगावर पडायचीचच. घरातली, शेजारची, मागच्या गल्लीतली, रस्त्यावरची फुलं शोधणं, तोडणं हा आमचा तेव्हाचा मुख्य उद्योग होता, आमच्या सुदैवाने १०, १५ पानं भरून गृहपाठ आम्हाला कधीच करावे लागले नाहीत, कधी कधी तर शाळेचा गृहपाठ आम्ही मधल्या सुट्टीत, किंवा एखाद्या रटाळ शिकवणाऱ्या मास्तर मास्तरणीच्या तासालाच करून मोकळे व्हायचो. म्हणजे ही अशी सगळी कामं करायला पूर्ण वेळ देता यायचा.
एखाद्या शेजारच्या काकू खडूस पाने फुलं तोडू द्यायच्या नाहीत, पण मग त्यांच्या बागेतली फुलं तोडण्यातच आम्हाला खरा आनंद मिळायचा. देवासाठी, पूजेसाठी फुलं तोडताना सुद्धा आमचे काही नियम होते, मुक्या कळ्या तोडायच्या नाहीत, (श्यामच्याआईसारखी आमच्या आईची शिकवण ती.) सगळी फुलं आपण नाही तोडायची, घरच्या लोकंसाठी, झाडासाठी काही फुलं ठेवायची, ओकं बोकं झाड आजही मला बघवत नाही. दिवेलागणीनंतर फुलं, कळ्या तोडायच्या नाहीत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही झाडाला, अपाय होईल, फांदी तुटेल असं काहीही करायचं नाही. आजूबाजूच्या सगळ्या जणी मिळून फुलं गोळा करायचो आणि मग सगळी फुलं तोडून झाल्यावर त्याच्या वाटण्या पण मस्त व्हायच्या. देवाला वाहून उरलेल्या फुलांमधून गाजरे ओवणं हे एक आवडीचं काम होतं. मोगरा, जाई, जुई, साईली, शेवंती, तगर, कण्हेरी, गणेशवेल, गोकर्णाची फुलं, जास्वंदी, अबोली, गुलाब, मधुमालती, पारिजात, कित्ती कित्ती रंग, त्यांच्या छटा, वास सगळं कसं एखादं चित्र वाटायचं.
या महिन्यात असा बहरलेला निसर्ग बघून साठवू किती या डोळ्यात व्हायचं. निसर्ग आपल्यापुढं असे दोन्ही हात पसरून उभा असतो आणि आपल्याच ओंजळी कमी पडत असतात त्याला झेलण्यासाठी. त्या सौंदर्यात एक नजाकत असते, एक अवघडलेपण असतं, एक सुप्त चाहूल असते. उन पावसाचा खेळ रंगवणारा हा श्रावण हा एकाच वेळी अल्लड पण असतो आणि पोक्त पण! ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ ही बोरकरांची कविता नंतर जेव्हा केव्हा ऐकली तेव्हा ती अशी कशी रुतली आतमध्ये आणि श्रावण नव्यानं कळला असं वाटलं. पाचवा महिना म्हणजे गर्भानी केलेली हालचाल मातेला कळायला सुरुवात झालेली असते, आईपणाच्या वाटेची हलकीशी चाहूल लागलेली असते, चेहऱ्यावर एक तेज आलेलं असतं, आईपणाचा एक सुप्त आनंद, अहंकाराचा गंध निराळाच असतो. गर्भाशी जुळलेल्या नाळेचा रंग मुखावर उठून दिसत असतो. धरणीची गोष्टही अशीच काहीशी असावी ना? आत रुजलेलं बीज हळू हळू वाढत असतं, अजून एक दोन चार महिन्यात सारी शेतं तरारून निघतील, मोत्याच्या दाण्यांनी शेतं भरून जातील. आणि ही भू माता आपल्याला सुपूर्द करेल तिची बाळं!
श्रावण रंगवला, बालकवींनी पण समजावला बोरकरांनी असं मला दर श्रावणात वाटतं. आणि त्यामुळेच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ओठ गुणगुणत असतात, आणि डोळे पाचव्या महिन्यातल्या तेजानं भारलेल्या गर्भिणीच्या श्रावणमासाची दृष्ट उतरवून टाकत असतात!!!
मानसी होळेहोन्नुर

   

Wednesday, July 19, 2017

आठवणींचा डब्बा गुल....


घरात काम सुरु असताना एका बाजूला रेडीओ लागला पाहिजे ही तिच्या आजीची सवय तिच्या आईने आणि तिच्या आईची सवय तिने उचलली होती. म्हणजे एका बाजूला गाणी, कार्यक्रम सुरु असतातच, त्या ऱ्हीदम मध्ये कामांची पण एक लय जुळली जाते आणि कळत नकळत वेळेचं भान पण राहिलं जातं. म्हणजे दोन गाण्यानंतर कुकर बंद केला तरी चालेल, किंवा हा कार्यक्रम संपेपर्यंत स्वैपाक संपला पाहिजे, मिनिटामिनिटांची गणितं ही त्या रेडीओवर ठरलेली असायची. आणि आज सकाळी जेव्हा ताल मधलं नही सामने ये अलग बात है आणि हात तसेच थांबले.

नुकतेच कुठे मोबाईल फोन आले होते तेव्हा, फेसबुकच्याही आधी जेव्हा सगळ्यांना ऑरकुट चं वेड लागलं होतं तेव्हाची गोष्ट ! कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं बहुतेक, अनेक मैत्रिणींची एकेक, दोन प्रेम प्रकरणं झालेली होती, ती मात्र अजूनही प्रेमव्हर्जीनच होती. तिला भयंकर कॉम्प्लेक्स यायला लागल होता, पण कॉलेज मधली मुलं, मैत्रिणींचे भाऊ कोणीच तिला आवडत नव्हते, आणि कोणालाही ती आवडत नव्हती, कधी अपेक्षा जास्त होत्या, तर कधी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतं. प्रेम करतानाही बिचारीच्या अपेक्षा होत्या. दिसायला तशी बरी होती, स्मार्ट होती, मित्रांची काही कमी नव्हती पण प्रियकर तेवढा अजून भेटला नव्हता. मग अशातच कधी तरी ऑर्कूट आयुष्यात शिरलं. नवीन मित्र नवे ग्रुप असे काय काय माहिती झाले.

फोटो, शिक्षण, प्रोफाईल बघून मित्र शोधत होती, कधी संवाद पुढे जात होते, कधी थांबत होते. त्यातले काही जण मैत्रीच्या रेषेच्या पुढे डोकावू पाहत होते. आणि गंमत म्हणजे हा सगळा न बघतानाचाच मामला होता, त्यातला एक मित्र कुठेतरी कोचीन ला होता. ऑर्कुट वरून इमेल वर संभाषणाची गाडी गेली होती, पण फोन नंबर द्यावा की नाही द्यावा अशा सगळ्या तळ्यात मळ्यात मध्ये शेवटी एकदाचा तिने त्याला  नंबर दिला.  त्या काळात जग अजून स्मार्ट झालं नव्हतं त्यामुळे सगळं काही एसमेएस आणि फोन वरच चालायचं. उगाच लास्ट सीन कधीचा, माझा मेसेज डीलीव्हर झाला तरी अजून वाचला नाही असल्या भंपक गोष्टी अजून जन्माला यायच्या होत्या, थापा मारण्याचं आणि पचण्याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा.

मित्राशी काही कारण काढून बोलूनही झालं होतं, आपण काय करतोय हे समजण्याचं वय, आणि बुद्धी नक्कीच तेव्हा नव्हती. उठलास का, जेवलास का, अभ्यास केलास का, असे काहीही मेसेज पाठवायला वेळही होता, आणि इच्छाही! तसंही मोबाईल कंपन्या तेव्हा ठराविक वेळेला कमी चार्जेस आणि मेसेजस फुकट वाटायच्या तेव्हा. मग अशातच एकदा कधीतरी मला बघून तुला कोणतं गाणं आठवतं असा थेट दगड मारणारा मेसेज तिने त्याला पाठवला आणि उत्तरादाखल त्याने विचारलं ‘चिडणार नाहीस ना गाणं सांगितलं  तर.’
‘तू सांग तर’.
तेव्हा त्याने पाठवलं होते, ‘नही सामने ये अलग बात है.’

तो मेसेज वाचून आयुष्यात पहिल्यांदा ती लाजली, पोटात गुदगुल्या होणं म्हणजे काय हे तिला कळलं. पाच मिनिटं ती फक्त तो मेसेज बघून ते गाणंच गुणगुणत बसली, त्यातली ओळ न ओळ तिला तशीही पाठ होती, पण आता त्याला एक वेगळा अर्थ मिळत होता.

तेवढ्या वेळात त्याचे चार मेसेज आले रागावलीस, प्लीज, सॉरी, सॉरी मला जे वाटलं ते मी सांगितलं.
शेवटी तिने फोनच लावला, आणि त्याला सांगितलं नाही रे रागावले वगैरे नाही पण तरीही आपण अजून भेटलो पण नाही आणि तू हे गाणं सांगितलं म्हणून जरा वेगळ वाटलं. मग ते गाणं, रेहमान यावर पुढची दहा मिनिटं बोलल्यावर तिला लक्षात आला, तिचा टॉक टाईम संपत आला होता, खरंतर अजून खूप बोलायचं होतं, पण तोवर फोन चा बॅलन्स संपला आणि फोन बंद पडला. परत लगेच त्यानी फोन लावला. आणि मग काय गप्पा जणू थांबल्याच नव्हत्या अशा सुरु झाल्या. मग तिनी मिस कॉल द्यायचा आणि त्याने कॉल करायचा असा सिलसिला सुरु झाला. मैत्रीच्या नक्कीच पुढे जात होतं हे नातं. इतके काही बोलून झाली होते की आता भेटणे ही फक्त फॉर्मलिटी वाटायला लागली होती. मग कधीतरी भेटायचं ठरलं. तो काहीतरी कारण काढून तिच्या गावात आला, दोघं भेटले. पण फोनवर जेवढे कम्फर्टेबल होते तेवढे भेटल्यावर नव्हते. काय कुठे चुकत होतं कळत नव्हतं. पण तिला फोन वर तो जेवढा जवळचा वाटला तेवढा प्रत्यक्ष भेटल्यावर नाही वाटला.

आपोआपच मेसेज, फोन कमी झाले. नंतर तर नावं सुद्धा मागे पडली. आयुष्यात प्रेम आलं, नवरा आला, संसार आला. पण त्या गाण्यासोबतची ती आठवण कधी नाही पुसली गेली. प्रेमाचा एक हलका अनुभव येता येता राहून गेलेलं ते गाणं. कुठे असेल तो, कसा असेल? बोलेल का आपल्याशी परत. आपण चुकीचं वागलो, प्रेम नाही पण मैत्री टिकवायला काय हरकत होती, कदाचित त्या मैत्रीतून पुढे घडलं ही असतं काही. १०, १५ वर्षांनी पण आपल्याला त्याची आठवण येते म्हणजे नक्कीच आतवर काहीतरी घुसलेलं होतंच. गाणी काय माणसं काय आत रुतून बसतात. अशी कुठल्या कुठल्या वळणावर भेटलेली माणसंच खरं आयुष्य घडवत राहतात.

मस्त चहाचा कप नवऱ्याच्या हातात देत तिने विचारलं, ‘मला एखादं गाणं डेडीकेट करायचं असेल तर कोणतं करशील?’ 

पृथ्वी गोल आहे तशा आठवणीही गोल असल्या पाहिजेत ना, जुन्या आठवणींवर नव्या गुंफता आल्या कि समजायचं आपल्याला आजही हसून जगता येतंय.

©मानसी होळेहोन्नुर  






Wednesday, July 12, 2017

एका टकल्या मुलाची गोष्ट.... !

चित्रपट आवडण्यासाठी कधीही चित्रपटाची भाषा हा अडसर ठरत नाही. किंबहुना भाषेचा अडथळा दूर सारून जो चित्रपट तुमच्या मनात घर करतो तो नक्कीच चांगला चित्रपट समजला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते, कधी कधी जगाने नावाजलेल्या चित्रपटात दहाव्या मिनिटाला तुम्ही घोरत असू शकता, आणि तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचं नाव ऐकताक्षणी नाक मुरडणारी लोकं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. आणि अशी वेगवेगळी अभिरुची असणारी लोकं आहेत म्हणूनच वेगवेगळे प्रयोग चित्रपट क्षेत्रात होत असतात, आणि निराळ्या प्रकारचे चित्रपट आपल्यासमोर येत असतात. सच्च्या चित्रपट रसिकाला कोणताही वेगळं काही देणारा चित्रपट आवडतो.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बघितलेला नवीन कन्नडा चित्रपट ‘वंदू मोट्टेय कथे’. इंग्लिश मध्ये एगहेड असं नाव असणारा हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे एका टकल्या मुलाची. सौंदर्य हे फक्त बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं हे वाक्य बोलून, लिहून अगदी गुळगुळीत झालंय, पण तरीही ते खरं आहे. भोली सुरत दिल के खोटे म्हणणाऱ्या मास्टर भगवान ला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं पण नायक म्हणून नाही. नायक काय किंवा नायिका हे कायम सुंदर, हुशार तरुण, सडसडीत असलेच हवे.जाडे , टकले लोक हे फक्त हसवण्यासाठीच असतात असा एक गंभीर समज आहे. ७० , ८० च्या दशकात प्रायोगिक सिनेमांनी नायकांना खऱ्या प्रतिमेच्या जवळ न्यायला सुरुवात केली, म्हणजे ते नोकरीला जायचे, ट्रेन नी प्रवास करायचे, आपल्यातले वाटायचे, पण तरीही कोणताही नायक कधीच टकला नसायचा. नायिका देखील बदलत होत्या, पण तरीही जाड नायिका दिसली ती दम लगा के हैशा मध्ये.
या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नावापासूनच ज्याला कायम अंड म्हणून चिडवलं जातंय अशा मुलाची गोष्ट बघायची उत्सुकता होती. हा २८ वर्षाचा मुलगा आहे, जो एका कॉलेज मध्ये कन्नडा शिकवतो. त्याच्या लग्नासाठी हालचाली सुरु आहेत, पण दरवेळी आडवं येतं असतं त्याचं टक्कल. टकला असला तरी त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा आहेत, एखादी सुंदर, देखणी मुलगी त्याला हवी आहे. जेव्हा आई वडिलांकडून होणारे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तो स्वतःच ठरवतो मीच शोधेन मुलगी. या सगळ्याला मस्त जोड दिली आहे कन्नडा चित्रसृष्टीचे सुपरस्टार राजकुमार यांच्या चित्रपटांची, गाण्यांची. अगदी मस्त प्रसंगोपात गाणी येतात.  नायक हा राजकुमार यांचा भक्त आहे , दिवसरात्र त्याच्या डोक्यात राजकुमार यांचही, गाणी, चित्रपट असतात. इन फॅक्ट त्यामुळेच राजकुमार यांचा वावर पूर्ण सिनेमाभर एखादी मार्गदर्शकासारखा आहे. जेव्हा जेव्हा तो एखाद्या द्विधेत सापडतो, राजकुमार त्याच्या मदतीला धावून येतात. राजकुमार आजही इथल्या सिनेरसिकांच्या नसानसात भरून राहिलेले आहेत.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे. मुळात हा चित्रपट राज शेट्टी यानी स्वतःच लिहिला, दिग्दर्शित केला आणि प्रमुख भूमिका देखील केली, हा चित्रपटात मेंगलोर कडची कन्नडा बोलली जाते. पहीलाच प्रयत्न असल्याने आणि मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नसल्याने हा चित्रपट फक्त मेंगलोर आणि जवळपास च्या भागत प्रदर्शित करणार होते, पण हा चित्रपट बेंगलोर मधल्या काही चित्रपटदर्दींनी पाहिला, आणि मग कन्नडा चित्रसृष्टीतल्या यशस्वी दिग्दर्शकानी त्याच्या बॅनर खाली याला फक्त देशात नव्हे तर परदेशातही प्रदर्शित केला.
उगाच काहीतरी संदेश देत आहे असं सांगणाऱ्या किंवा मनोरंजनासाठी म्हणून काहीही दाखवणाऱ्या सिनेमांपेक्षा दोन्हीचा योग्य मिलाफ या सिनेमात साधला आहे, उत्तरार्ध अजून एक दहा मिनिटं कमी केला असता तर सिनेमा अजून नेटका झाला असता, इतकं मात्र खरं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं, तर आपल्या आयुष्यात तरी आपण हिरो असूच शकतो. नायक नायिकांना त्यांच्या टिपिकल सौदर्याच्या परिमाणामधून बाहेर काढून गर्दीचा भाग असलेला एखाद्याची कथा मोठ्या पडद्यावर बघताना आपण जास्त गुंगतो, हे मात्र खरं. चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात त्यामुळेच हृषीकेश मुखर्जींचे सर्वसामान्य नायक असणारे चित्रपट आजही आवडीने बघितले जातात, ‘वंदू मोट्टेय कथे’ नक्कीच अशा सिनेमांची आठवण जागवून जातो एवढं निश्चित !

(मुद्दाम कन्नडा शब्द सगळीकडे वापरला आहे, कारण कन्नडिगा त्यांच्या भाषेला कन्नड नव्हे तर कन्नडा म्हणतात. ज्या पद्धतीने मराठी भाषेत कोल्हापुरी, वैदर्भीय, पश्चिम महाराष्टातली मराठी वेगळी आहे त्याच पद्धतीने कन्नडा मधेय देखील बेंगलोर कन्नडा, मैसूर कन्नडा, मेंगलोर कन्नडा, नॉर्थ कर्नाटका कन्नडा अशा वेगवेगळी बोलीभाषा आहेत. )

मानसी होळेहोन्नुर

https://www.youtube.com/watch?v=UXv-9QdR3s8


Saturday, July 8, 2017

गुरुर्देवो नमः

सक्काळी सक्काळी आईचा, बाबांचा फोन आला की धडकायला होतं,त्यामुळे कितीही घाई गडबडीत असले तरी ती आई वडिलांचा किंवा ज्येष्ठ नातेवाईकांचा फोन चुकवत नाही.
एका हातानी भाजी परतत, दुसऱ्या हातानी कणकेचा डबा काढत, फोन कानापाशी दुमडत तिनी आईला विचारलं,
‘काय गं सगळं नीट आहे ना, आज इतक्या सकाळी फोन केलास.काही महत्वाचं असलं तर आत्ता बोलू, नाहीतर मी तुला थोड्या वेळानी फोन करते ना.’
‘सगळं नीट आहे, तसं काही अर्जंट नाही पण म्हणलं आज आमच्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्यात. म्हणून सकाळी फोन केला. ‘
तिला काहीच कळेना, म्हणजे आई ही पहिली गुरु असते असं शिकलेलो आणि आता तिला फोन केला नाही म्हणून तीच फोन करून त्याची आठवण करून देत होती की काय असं वाटलं एकदम. तसं तिला लक्षात होतं आजच्या गुरुपौर्णिमेच, पण जरा दुपारून आवरून सावरून फोन करणार होती ती.
स्वतःला सावरून ओशाळून ती म्हणाली, ‘ हो हो लक्षात आहे मला आज गुरु पौर्णिमा आहे ते, मी तुला करणारच होते फोन पण अग थोड्या वेळानी, सकाळची वेळ थोडी घाईची असते ना.’ आईनी इतकं काय फोन करून आठवण करून द्यायला हवी होती, थोडा रागच आला होता. तो बहुतेक बोलता बोलता स्वरात आला असावा.
‘अग नाही ग बेटा,तुला आठवण करून देण्यासाठी नाही केला फोन, उलट तुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी केला फोन, म्हणजे तू आमची शिक्षक झाली आहेस ना आता.’
कानाचा फोन सरळ करत, एका हातानी फोन धरत, दुसऱ्या हातानी चहा गाळत तिनी विचारलं,
‘म्हणजे काय मी समजले नाही.’
‘अग राणी, आत हा स्मार्ट फोन, कॉम्पुटर, झालंच तर फेसबुक, आणि हे वेगवेगळे अॅप्स आम्ही वापरू शकतोय ते तुझ्यामुळेच ना. तूच तर शिकवलंस ना आम्हाला, आजही काही अडलं, काही लागलं तर हक्कानी तुला विचारतो, आणि तू पण आम्हाला न थकता ते सांगतेस, समजावतेस. आम्हाला कळेल अशा शब्दांमध्ये सांगतेस. हे सगळं शिकल्यामुळे किती तरी जुन्या मैत्रिणी नव्याने भेटल्या, नव्या मैत्रिणींची ओळख झाली, फोटोंमुळे सगळे जवळ असल्यासारखे वाटतात बघ. जो कोणी आपल्याला आयुष्यात काही तरी शिकवून जातो तो आपला गुरूच झाला ना ग. आपण अनुभवाला गुरु म्हणतो, आई वडिलांना गुरु म्हणतो, मग तू पण गुरूच झालीस ना’
आई काय बोलत होती आणि आपण काय समजून घेत होतो, क्षणभर तिला स्वतःचीच लाज वाटली,
‘आई अग त्यात काय एवढं, मला येत होतं, माहीत आहे ते मी तुला, बाबांना शिकवलं, आता तुम्ही नाही का लहानपणी आम्हाला बोटाला धरून चालायला शिकवण्यापासून ते स्वतःच्या पायवर उभं राहण्यापर्यंत शिकवलं?’
‘ती आमची जबाबदारी होती, पण तू जे करतीयेस ती, काही तुझी जबाबदारी नाही, कर्त्यव्य देखील नाही, पण तरीही तू करतेस ना. चल तुझी ही सकाळची वेळ आहे, पण तरीही तुझ्याशी हे बोलून दिवसाची सुरुवात करावीशी वाटली म्हणून फोन केला, दुपारी मस्त व्हिडीओ कॉल करूयात बघ. आता आता जमायला लागलंय बघ.बरं आज काही तरी गोड करून खा, जवळ असतीस तर मीच करून खायला घातलं असतं बघ.’
‘आई तुला आणि बाबांना पण गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. आम्ही आज जे काही आहोत ते तुमच्यामुळेच, मी करेनच ग गोड काहीतरी, पण तुम्ही पण काहीतरी करा गोड, तुम्ही पण आमचे गुरूच ना. दुपारी बोलूया निवांत.’
तिनी फोन ठेवला आणि विचारात पडली, आई वडिलांना आपण गुरु मानतो, म्हणतो, पण आपली मुलं ही देखील एका प्रकारे आपले शिक्षकच असतात ना, मी आई बाबांना नवीन काही तरी शिकवलं. पण माझी मुलं मला मी कसं वागावं हे रोजच शिकवतात, म्हणजे त्यांनी जसं वागावं असं मला वाटतं, तसं जर मी वागले, तरच मी त्यांना काही सांगू शकते, जर त्यांनी टीव्ही जास्त बघू नये असा माझा आग्रह असेल तर मी आधी माझा टीव्ही टाईम कमी केला पाहिजे. त्यांनी घरात संवाद वाढवला पाहिजे असं जर मला वाटत असेल तर मी देखील माझा मोबाईल सोशल नेटवर्किंग वरचा वेळ कमी करून त्यांना दिला पाहिजे. त्यांनी ओरडू नये असं सांगताना मी देखील माझे ओरडणं कमी केलं पाहिजे, त्यांना चार गोष्टी याव्यात म्हणून झटताना मी पण त्यांच्या बरोबर बसून दोन गोष्टी केल्या पाहिजेत. ते जसं वागवेत असं मला वाटतं तशी मी तरी वागते ना हा विचार करायला मुलांनी मला भाग पाडलं. म्हणजे आई म्हणते तसं जे कोणी आपल्याला काही शिकवतं ते आपले गुरूच ना, एकदम मुलांकडे ती वेगळ्याच दृष्टीने बघायला लागली.

मग खास मुलांना आवडतो तसा शिरा करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून तिनी तुपावर मस्त शिरा भाजायला घेतला. आधी शिष्य म्हणून आणि नंतर गुरु म्हणून दोन वाट्या शिरा फस्त करताना सुंदर असलेलं हे आयुष्य अजूनच सुंदर वाटायला लागलं होतं.  

मानसी होळेहोन्नुर

Tuesday, July 4, 2017

रुक्मिणीचा पांडुरंग

‘आये जायलाच हवं काय तुला?’
सामान भरत असलेल्या रुक्मिणी बाईंना पोरगा विचारत होता.
‘आरं बाबा इतकी वर्स जातीये, यावर्षी न्हाई जाऊन कसं होईल.’
‘दे रं सोडून, म्हातारीनं ऐकलंय व्हय कुणाचं की आज तुज ऐकेल.’
‘जसं काय तुम्ही लैच ऐकत्यात ना सगळ्यांच,’ फुत्कारून म्हातारी बोलली.
‘अग आये असं न्हाई, डाक्तरांनी साखरेची बिमारी सांगितली ना तुला मंग कसं जमवशील तू, रस्त्यात काई झालं तर?’
‘असं कसं काई होऊ दील माजा इठू? आन ह्ये बग, समद्या गोळ्या सोबत घेतल्यात. अन ह्यो फोन बी सोबत घेऊन जातीये, वाटलं काई तर फोन करून सांगेन की.’
‘जाऊ द्यात की त्यास्नी, वर्सातून एकदा तर एवडा हट्ट करून जात्यात की आत्याबाई.’ सून बाई आतून बोलल्या.
‘आज गंगा उलटी कशी वाहायला लागली रे निवृत्ती?’ सासऱ्यानी चावी फिरवायचा प्रयत्न केला.
‘माझी सून हाये ती चुकून बोलली येकाद एळेला तर तुमचं काय जातय? आनी घेऊ द्या की तिला बी घराची जिम्मदारी, वर्सभर तर मंग असतेच की मी.’
‘ बुढ्ढे आता उमर झाली तुझी, तुज्या काळजीपोटीच बोलतोय ना आम्ही.’ शेवटच अस्त्र वापरलं तिच्या नवऱ्यानी
‘आली म्हन माजी काळजी, इतकी काळजी असती तर शेतात नीट लक्ष दिलं असतं, असेल माजा हरी तर देईल खाटल्यावरी करत बसला नसतासा. ती तंबाकू आदी सोडली असती बगा, एक वरस नीट पाहिलं जरा घरात चार पैसे आले की सुटलेच तुमी, गावात लष्कराच्या भाकऱ्या भाजायला.’ गाडी कोणत्या वळणावरून जाणार हे कळलं म्हणून ती गाडी थांबवण्यासाठी एकदम पोरगा बोलला,
‘आये फोनचा चार्जर घेतला न्हव.’
गाडीला एकदम ब्रेक लागल्यामुळे जरा सेकंद लागला त्यांना प्रश्न समजायला, आणि मग हे ही कळल यकदम यांनी हा प्रश्न का विचारला,
‘तू बी त्यांचाच ल्योक ना, बसावा गप मला म्हातारीला, त्यो इठू सोडला तर कोणी न्हाई बागा मला. माहेरचा गोतावळा कधीच संपला, भाऊ हितं वळख दाखवत न्हाई आय बाप तर कदीच गेले, ही वारीची लोकंच ती माझी, आणि त्यो काळूराम माजी आय न बाप, आन तुम्ही म्हणतात त्याला बी भेटाया जाऊ नको. तुझी उमर हाये त्याच्या आदीपासून जायचे बग मी, तू झाल त्यावर्सी काय खंड पडला तो. माजी सासू बगून घायची, मंग अडल्या नडल्याला कोन तरी यायचं आता सून बगते, पन माजी वारी काई चुकत न्हाई. जित्ती हाये तोवर माजी वारी काई चुक्नार न्हाई.’
शेवटी स्वतःचच म्हणणं खरं करत म्हातारी गेली वारीला.
अधून मधून फोन करत ख्याली खुशाली कळवत राहिली.
आणि मग आषाढी एकादशीच्या सकाळी नेहेमीप्रमाणे घरी आली.
‘काय ग म्हातारे यावर्षी बी न्हाई घेतलंस दर्सन?’
‘न्हाई तिथे काय अन हितं काय पांडुरंगच तर हाये ना. मग तिथं दर्शन घेतलं काय अन इत दर्शन घेतलं काय. माज्या इठ्ठलाला कळतं की.’
‘अग हे बरय तुजं इतकी वर्स झाली वारीला जातेस, मोप पंढरपूरपर्यंत चालत जातेस आणी मंग दर्शन न घेताच परत फिरतेस, तुजं मला काई कळतच न्हाई बघ. ‘
‘मी जाते ते माझ्या लोकांना सोबत करायला, लई बायका असत्यात हो, काय काय त्यांचे प्रश्न असत्यात, सगळ्या मोकळ्या होतात बगा तिथ येऊन, मला बी जरा मोकळं वाटतं, घराला इसरून सोतासाटी जगाया मिळत बगा, नवरा न्हाई, घराची काळजी न्हाई, सैपाकाची काळजी न्हाई आपण निस्त चालायचं, फुगड्या घालायचं, इठ्ठलाच नाव घ्यायचं, गाणी म्हनायची, म्हायेरम्हायेर ते अजून एगळ काय असतं. आन लग्नानंतर तुमीच माजी लक्ष्मीची रुक्मिणी केली न्हावं, मग ती एक पंढरपूरची रुक्मिणी तिच्या इठ्ठलापासी नसते, म्हनून तर ही रुक्मिणी तिच्या इठ्ठलाच्या सेजारी बसून फराळ करायला पार पंढरपुराहून येते बगा.’
आणि मग पांडुरंग त्याच्या रुक्मिणी कडे बघतच राहिला, हातची तुळसीमाळ ओढत पांडुरंग पांडुरंग म्हणायच्या ऐवजी रुक्मिणी रुक्मिणी म्हणायला लागला, आणि ती तुळसीला पाणी घालत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणत राहिली.
    
   


Monday, July 3, 2017

कार्स ३ रेसिंगच्या पुढची गोष्ट

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, तो काळ गेला की आपण परत आणू शकत नाही, पण तो काळ वेगवेगळ्या मार्गानी परत अनुभवू मात्र शकतो. कोणाही प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्ती साठी निवृत्ती हा एक नाजूक प्रश्न असतो. त्यांनी आजवर जे करून यश मिळवलं ते करण्यासाठी वय साथ देत नसतं आणि ते कायमचं सोडण्यासाठी मन तयार नसतं. याखेरीज इतरांच्या, चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं असते ते वेगळचं. सन्मानाने निवृत्त व्हायचं की आपल्या खालावत जाणाऱ्या कामगिरीवर लोकांनी सतत बोट ठेवत आपल्याला प्रवृत्त करेपर्यंत सोडायचं नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो. one has to take that call. अगदी हाच विषय आहे डिस्नेच्या नव्या कार्स ३ या चित्रपटात.
अॅनिमेशन चित्रपट हे काही फक्त मुलांना समोर ठेवून तयार केलेलं नसतात, जसं अॅलीस इन वंडरलंड हे काही लहानांचे पुस्तक नाही, अगदी तसंच! वेगळा विचार, वेगळा दृष्टीकोन हा अशा चित्रपटांमधून इतका सहज दाखवला जातो की आपल्याही नकळत आपण त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो. मग कुंग फु पांडा सिरीज मधल्या चित्रपटांमधून दत्तक मुलांबद्दल केलेली भाष्ये असोत किंवा डीस्पेकेबल मी या त्रयी मधून वाईट माणसांमधला चांगुलपणा शोधण्याचा केलेला प्रयत्न असो, फ्रोजन मधून आपल्या शक्ती, सामर्थ्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे जास्त गरजेचे असते, दैवदत्त देणगी मिळालेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेणं आपल्याच हातात असतं. कोणतीही गोष्ट फक्त शाप किंवा फक्त वरदान असू शकत नाही, ती शाप ठरवायची की वरदान हे आपल्या हातात असतं, तशीच गोष्ट इनसाईड आउट ची, पौगंडावस्थेत मुलांचे प्रश्न एकदम अवघड का होतात, याचं सोप्पं उदाहरण आहे ते. आपल्या आठवणी हेच आपलं आयुष्य असतं, त्यामुळे चांगल्या वाईट आठवणी जपणं, त्यातून शिकणं हे गरजेचं असतं.
कार्स च्या आधीच्या दोन भागांमधून अशीच एका कार च गोष्ट सांगितली होती, रेसिंग कारच्या दुनियेतली, स्वतःला मोठा खेळाडू समजणारा लाईटिंग मॅक्वीन चुकून एका गावात येतो, तिथे त्याच्याकडून एक चूक होते, त्याची शिक्षा म्हणून त्याला तिथे काही दिवस राहून रस्ता तयार करावा लागतो, त्या गावात राहता राहता त्याची तिथल्या लोकांशी ओळख होते, तिथे असणारी एक कार ही नामांकित स्पर्धा जिंकलेली पण आता विस्मृतीच्या गर्तेत गेलेली असते, हे कळल्यावर कार्स चित्रपटाच्या नायकाचा लाईटिंग मॅक्वीन चा दृष्टीकोनच बदलून जातो. स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठी नसते, आणि येनकेनप्रकारेण जिंकणाऱ्या पेक्षा इतर स्पर्धकांना मान देऊन, खिलाडूवृत्ती दाखवत हरणारा स्पर्धक जास्त मनावर राज्य करतो हे सांगत पहिला चित्रपट संपला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी दुसरा भाग आला, ह्या भागात लाईटिंग मॅक्वीन ला अमेरिके बाहेर नेऊन डिस्नेनी जपान, इटली, युके मधल्या प्रेक्षकांनासुद्धा आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता, या भागात हेर गिरी, बरोबरच खेळांच्या स्पर्धांच्या आडून चालणारं राजकारण यावर संयत भाष्य केलं होतं. जाता जाता खेळाडू जिंकतो तेव्हा ते त्याचं एकट्याचं यश नसतं तर त्याच्या बरोबर असणारे मार्गदर्शक, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे,डॉक्टर, मित्र, अशा सगळ्यांचेच यश असतात, खेळणाऱ्याचा जेवढा स्वतःवर विश्वास असतो तेवढाच या सपोर्ट सिस्टीम वर देखील विश्वास असावा लागतो हा मोलाचा सल्ला या भागातून दिला होता. त्यामुळेच आता तिसऱ्या भागात अजून काय नवीन सांगतील याची खूप उत्सुकता होती.
मुळात या चित्रपट सीरीज चे भाग ५, ६ वर्षांनंतर येतात कारण त्यात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर सुद्धा मेहनत घेऊन काम केलं जातं, अॅनिमेशन तर आहे, मुलांच्या साठी तर आहे अशा सबबी देण्याऐवजी अजून जास्त चांगलं कसं देता येईल हा विचार असतो. या भागात इतकी वर्ष स्पर्धा जिंकणारा लाईटिंग मॅक्वीन स्पर्धा जिंकता जिंकता हारतो. त्याला हरवणारा नवीन खेळाडू हा नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याला सारून पुढे जातो. अनुभव आणि तंत्रज्ञान यामध्ये तंत्रज्ञान जिंकतं, पण त्याचा अर्थ अनुभव कमी असतो असं नाही. नवीन खेळाडूला मात देण्याच्या नादात लाईटिंग मॅक्वीन स्वतःलाच इजा करून घेतो, मग त्यानंतर तो स्वतःलाच उभारी देऊन परत स्पर्धेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतो, मग त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यायची तो ठरवतो, पण त्याच्या उतावळेपणा मुळे तो नवीन मशीन तोडून टाकतो. या सगळ्यामुळे त्याला आर्थिक सहाय्य करणारा कंपनीचा प्रमुख त्याला सांगतो, तुझे दिवस संपले, आता तू खेळाच्या मैदानावर जाण्याऐवजी जाहिरातीच्या व्यासपीठावर जा. आता तू काही खेळू शकणार नाहीस, आता तुझ्या नावावर जाहिरातीतून पैसे कमावण्याचे दिवस आता आहेत. मनातून कुठे तरी दुखावलेला पण तरीही जगज्जेता असलेला लाईटिंग मॅक्वीन म्हणतो, मला फक्त एक शेवटची संधी हवी आहे, जर मी ती स्पर्धा जिंकली तर मी ठरवेन कधी रिटायर व्हायचं, आणि जर ती संधी मी हरलो, तर तुम्ही म्हणाल तसं मी करेन, हे आव्हान त्यानी स्वतःलाच दिलं होतं. या सगळ्यामध्ये त्याच्या सोबत असते त्याची ट्रेनर जी आहे नव्या दमाची, जिला फक्त बंदिस्त खोल्यांमध्ये घाम गाळून प्रॅक्टिस करायची माहीत आहे,  तिला सांभाळून स्वतःला हवा तसा सराव करून घेणं त्याला जमत नसतं. त्यात त्याचा गुरु ज्याच्या मदतीने त्याने आधीच्या काही स्पर्धा जिंकल्या होत्या, त्याने जिंकलेली एक वेगळ्या धर्तीची स्पर्धा खेळायला लाईटिंग मॅक्वीन जातो, अर्थात तिथे त्याची ट्रेनर क्रूझ देखील असतेच, तिला सांभाळून घेता घेता तो मागे पडतो आणि मग अशी वेळ येते की तीच पुढे जाऊन स्पर्धा जिंकते. यामुळे दुखावलेला लाईटिंग मॅक्वीन तिला बोलतो, आणि मग ती तिचं मन मोकळं करते, मला खरंतर आयुष्यात हेच करायचं होतं. रेसिंग स्पर्धेत भाग घेणं हेच माझं स्वप्न होतं, पण माझा माझ्यावर विश्वास नव्हता आणि त्यामुळे मी कधी भागच घेऊ शकले नाही.
स्वतःवरचा विश्वास गमावत चाललेला लाईटिंग मॅक्वीन जेव्हा जिवलग मित्राला मीटर ला फोन लावतो तेव्हा तो सांगतो, तुला डॉक नी शिकवलं, तो आता नाही, पण त्याचा गुरु तर आहे ना. आणि मग तो निघतो त्याच्या गुरूला घडवणाऱ्या गुरूच्या शोधात, आणि एका क्षणी क्रुझ ची माफी मागून तिलाही सोबत घेतो.
अनुभव हा नेहेमीच काही ना काही शिकवून जात असतो, आपण जेव्हा जिंकतो तेव्हा फक्त आपणच जगज्जेते आहोत असा अभिनिवेश ठेवला तर आपण त्याक्षणीच स्वतःच्या विस्मृतीच्या वाटेकडे वाटचाल करत असतो, पण त्याचवेळी जर आपल्या पूर्वसुरींचा आदर ठेवला तर एक खेळाडू म्हणून आपण मोठे होत असतो, याची जाणीव असल्यामुळे मॅक्वीन जेव्हा तिथे जुन्या दिग्गज लोकांना भेटतो तेव्हा तो त्यांना त्याला शिकवायची विनंती करतो. मग नवीन तंत्रज्ञानाला हरवण्यासाठी त्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान हवं नाहीतर अनुभवाच्या जोरावर मिळणारं शहाणपण चलाखी हवी. त्यामुळे तो हे अनवट शहाणपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि अर्थात त्याचा फायदा क्रुझ ला देखील होत असतो, जी त्याच्यासोबत सावलीसारखी असते. एका क्षणी मॅक्वीन म्हणतो, परत रेस न करायला मिळण्यासारखं दुःख नाही, त्यावर त्याचा नवा गुरु स्मोकी म्हणतो, हे काही अंतिम सत्य नाही, आपल्यासारखा किंवा आपल्यापेक्षा चांगला विद्यार्थी घडवणं हे ही तेवढंच सुखकारक असतं.
शेवटची स्पर्धा सुरु होते, ज्याच्या जिंकण्याची शक्यता ९६ % आहे असा स्पर्धक स्पर्धेत असताना देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅक्वीन स्पर्धेत उतरतो, पहिल्या दहापर्यंत पोहोचतो. आणि तेव्हाच क्रुझ जी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिथेच थांबलेली असते, तिला तिचा बॉस सांगतो, तू इथे काय करतेस, हे काही बायकांचं काम नाही, जा निघून तुझ्या ट्रेनिंग च्या कामाला. हिरमुसलेली ती निघते, पण हे सारे शब्द गाडी चालवत असलेल्या मॅक्वीनच्या कानावर पडतात, आणि त्याच क्षणी त्याला स्मोकी नी सांगितलेलं आठवतं, आणि जाणवतं हाच क्षण आहे ती संधी मिळवण्याचा, आणि तो क्रुझ ला बोलावून घेतो आणि सांगतो, माझ्याऐवजी आता तू पळणार आहेस या स्पर्धेत, मानसिकरीत्या तयार नसलेल्या क्रुझ ला तो कसा तयार करतो, एका क्षणात स्पर्धकाच्या भूमिकेतून मार्गदर्शकाच्या भूमिकेत कसा जातो हे सगळं मुळातून पाहण्यासारखं आहे. चित्रपटाचा शेवट हा अर्थात अपेक्षित वाटेनी जातो, पण तरीही अजूनही खेळाच्या मैदानावर असलेल्या स्त्री पुरुष भेदभावावर काहीच न बोलता खूप काही बोलून जातो.
आजही अनेक गोष्टींवर पुरुष, स्त्री अशी लेबलं चिकटवलेली आहेत, ती कधी तरी कोणी तरी काढावीच लागतात. खेळ हा फक्त  शारीरिकदृष्ट्या खेळायचा नसतो तर तो मानसिकदृष्ट्या खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे, अगदी हेच चक दे मधून कबीर खान सांगतो किंवा दंगल मधून महावीर सिंग फोगट सांगतो. कोणत्याही खेळाचा सराव हा ठराविक पद्धतीनेच केला पाहिजे असं नसतं, तर तुमच्याकडे असणाऱ्या साधनसुविधांचा वापर करून, कल्पकतेनी तुम्ही नवीन गोष्टी आत्मसात करून त्या कशा अमलात आणता हे जास्त महत्वाचं असतं. शिखरावरून कधी ना कधी खाली यावंच लागतं मग ते  कधी उतरायचं हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही शिखरावरून उतरलात तरी तुम्ही शिखरावरच असता. डिस्ने अनेक वेळा या कठीण गोष्टी अशा सोप्प्या करून सांगतं. त्यामुळेच कार्स हा फक्त गाड्यांचा सिनेमा उरत नाही, त्यातल्या भाव भावना, नाते संबंध, सहज जाता येत केलेली भाष्य यामुळे तो आजचा सिनेमा ठरतो. आज मुलांना तो कार्स च्या रेसिंग साठी आवडेल, पण वय वाढता वाढता त्यातली गंमत, नव्याने काळात जाईल आणि मग जगण्यातली गंमत देखील कळायला लागेल.

संदर्भ :https://en.wikipedia.org/wiki/Cars_(film)
        https://en.wikipedia.org/wiki/Cars_2