Monday, August 21, 2017

आई होते मुलगी माझी....

काही चित्रपट मनात घर करून राहतात, तुम्ही त्यात बुडून जाऊन जगत असता तो चित्रपट. त्यातली पात्र फक्त पात्र राहत नाही, तुम्हीच होऊन जाता. आणि मग कित्येक दिवस उतरत नाही तो सिनेमा तुमच्या मानगुटीवरून. इतका भिनून जातो तो की वागताना बोलताना घुमत असतो डोक्यात. अशीच अॅलीस ठाण मांडून बसली आहे माझ्या डोक्यात. ५० व्या वाढदिवस मुलांसोबत साजरा करणारी, अगदी आपल्यातलीच एक कुणीतरी. भाषाविद्यानाची प्राध्यापक असणारी ही बया अगदी साधं सरळ आयुष्य जगत असते आणि अचानक ती बोलता बोलता शब्द विसरते, मग एकदा रस्ताच विसरते. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता ती जाते डॉक्टरकडे.

काय झालं असू शकेल हिला आपण पण विचार करायला लागतो, आणि मग समोर येऊन उभा राहतो अल्झायमर्स चा काळोखाचा बोगदा. सुरुवातीला नाकारलं तरी आपण हे नाकारू शकत नाही कळल्यावर तिनी स्वीकारलेलं वास्तव. मग सुरु होते तिची स्वतःची एक लढाई . अल्झायमर मुळे आयुष्य थांबत नाही. आपण ते थांबवू शकत नाही हे पटवण्याची धडपड. तिला असलेला आजार हा आनुवंशिक आहे हे कळल्यावर तिच्या तीन मुलांपैकी मोठी मुलगी आणि मुलगा टेस्ट करून घेतात, पण धाकटी मुलगी जी बाकी दोघांपेक्षा वेगळी आहे, बंडखोर आहे ती नाकारते. तिचं म्हणणं, टेस्ट करून काय मिळणार आहे. जेव्हा तिच्या मोठ्या मुलीला शक्यता आहे हा रोग होण्याची तेव्हा हताश झालेली अॅलीस मधली आई जणू ती तिचीच चूक असल्यासारखी माफी मागत राहते. मग हळू हळू ती विसरायला लागते आजूबाजूची माणसं, शब्द. जे तिचे कधी काळी सख्खे सोबती होते. तेच आत तिची साथ सोडत होते. आयुष्यात तिनी स्वतःच स्थान निर्माण केलं होत शब्दांच्या जोरावर पण आता धूसर होत जाते तेच शब्द. एकीकडे हे होत असतानाच तिचा नवरा, मुलं मात्र तिला सांभाळून घेत असतात. तिला एकाच गोष्ट चार चार पाच पाच वेळा सांगत असतात, ते ही न कंटाळता, न वैतागता.

यातला एक प्रसंग कायम माझ्या डोळ्याच्या कडा पाणावतो. अॅलीस तिच्या धाकट्या मुलीच्या लिडीयाच्या खोलीत जाते, आणि तिची खोली आवरता आवरता तिला मुलीची डायरी मिळाली, आणि तिनी ती वाचायला सुरुवात केली, आपण काय करतोय हे कळण्या न कळण्याच्या पलीकडे गेलेली अॅलीस मुलीच्या मनातली खळबळ जाणून घेत होती. त्याच दिवशी ती मुलीला त्या अनुषंगाने काही बोलते, तेव्हा तिची मुलगी चिडून तिला सांगते ती माझी खासगी डायरी आहे, ती तू का वाचलीस? त्यावर भांबावलेली अॅलीस म्हणते मला खरंच माफ कर मला कळत नव्हतं मी काय वाचतीये. मला खरंच कळत नव्हतं मी काय करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी अॅलीस लीडीयाला विचारते तिच्या नाटकाचा प्रयोग कधी आहे मी नक्की येईन. आणि ती तिच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवते. बाकीचे सगळे विरोध करत असतानाही ती म्हणते नाही मी नक्की जाईन.  सगळे निघून गेल्यावर ती म्हणते, लिडीया मी काल काहीतरी केलं ज्यामुळे ती चिडली होतीस इतकंच मला आठवतंय, पण मी काय केलं ते आठवत नाहीये. मला माफ कर, तेव्हा लेक म्हणते माझीच चूक होती, मीच माफी मागते. तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू पुसत ती म्हणते ठीक आहे ग. मला कुठे काय लक्षात राहणार आहे. पण हे बोलतानाही कुठेच अगतिकता तिच्या आवाजात नसते. तिच्यातली आई सतत जागी असते. आणि त्यानंतर लिडियाच्या खोलीत जेव्हा ती परत जाते तेव्हा तिला त्याच डायरीवर no secrets लिहिलेलं दिसतं. लेकीची आई होऊ घातली होती.

अॅलीस अल्झायमर्स शी निगडीत एका परिषदेत स्वतःचे अनुभव मांडते, तेव्हाही ती विसरत असते एकेक अनुभव, तिच्या मुलीचा नाटकातला अभिनय बघताना ती विसरून जाते ती तिचीच मुलगी आहे, स्वतःच्या नातीला पहिल्यांदा घेतानासुद्धा ती विसरली असते तिच्या मुलांचं बालपण, एकेक शब्द विसरत असताना ती विसरत असते तिच्या आठवणी, विझून जात असतं तिच्या डोळ्यातलं चैतन्य. जेव्हा कोणी सांभाळायला नसतं तेव्हा तिची तीच हट्टी बंडखोर लेक लिडिया येते तिची काळजी घ्यायला. तिच्या सोबत रहायला. तेव्हा अॅलीस होऊन गेलेली असते एक बाळ. फक्त प्रेम समजू शकणारं, प्रेम करू शकणारं एक लहान मूल. एक निरागस जीव जो पोहोचला असतो सगळ्या भाव भावनांच्यापुढे. आणि तिला समर्थपणे सांभाळत असते तिची लेक!

हा चित्रपट खूप काही शिकवून जातो, एकीकडे हे आई लेकीचं तरल नातं तर दुसरीकडे स्वतःच्या असाध्य रोगाशी लढण्याची दुर्दम्य इच्छा. अॅलीस जेव्हा आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असते तेव्हाच इतरांना आपलं ओझं होऊ नये म्हणून आत्महत्या करण्याचा व्हिडीओ करून ठेव स्वतःसाठीच पण भविष्यासाठी. ही लढाई जिंकू शकत नाही हे माहित असूनही तिची लढण्याची जिद्द कुठतरी आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन घाबरून जातो , निराश होऊन जातो याची जाणीव करून देते. अॅलीस तिच्या भाषणात सांगते, मी हरवतीये रोज काही आठवणी, माझं आयुष्य. माझी एकाच इच्छा आहे भविष्यात माझी मुलं किंवा त्यांची मुलं यांच्यावर येऊ नये ही वेळ. या आजारपणामुळे मी शिकतीये क्षणांमधली मजा लुटायला शेवटी आयुष्य काय क्षणांचेच तर आहे. स्वतःला होणारा त्रास मुलांना होऊ नये म्हणून विचार करणारी ही आई खरंच मनात घर करते.!!!   

मानसी होळेहोन्नुर


Still Alis:  https://en.wikipedia.org/wiki/Still_Alice

Saturday, August 5, 2017

'प्रेमाचा भाऊ'

नुकतीच त्या सगळ्यांना शिंग फुटली होती, म्हणजे घरचे, दाराचे, शिक्षक सगळेच तसे म्हणायचे.आरशात त्यांना कधी ती शिंग दिसली नव्हती, पण काही झालं की सगळे हे वाक्य नक्की म्हणायचे. दहावी पास होऊन अकरावी सुरु झाली होती, रोजच्या युनिफॉर्म मधून सुटका झाली होती. शाळेच्या शिस्तीतून मोकाट सुटलेले वळू आहात अस केमिस्ट्रीचे सर म्हणायचे. तशी तेव्हा शहर गावं देखील अजून जास्त हिरवी होती. फोन हातात नाही तर फक्त घरात असायचे. फोटो काढून घेण्यासाठी सगळे जण स्टुडीओ मध्ये जायचे, नाहीतर रिळाच्या कॅमेरानी ३६ किंवा ३७ फोटो काढून ते नंतर धुवून घेऊन बघायचे. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रूप होतं. त्यामुळे शाळेतून कॉलेज मधे जाणं म्हणजे एक प्रकारे रंगीत कपडे, थोडी फॅशन कार्याला परवानगी, कॅन्टीन मध्ये खाण्याची मुभा, मुलांशी बोललं तर हरकत घेतली जात नव्हती, किमान छोट्या शहरांमध्ये तरी.
या आधी एखाद्या मुलानी मुलीशी बोलणं म्हणजे त्यांचं नक्कीच काहीतरी अफेअर असणार असं वाटायचं.  कॉलेजमध्ये फिजिक्स केमिस्ट्री चे एकत्र प्रॅक्टिकल्स करताना त्यांच्याशी बोलणं व्हायचं पण  तरीही एक अंतर ठेवूनच सगळं काही चालायचं. अकरावी सुरु होऊन जेमतेम काही दिवस झाले असतील नसतील की फ्रेन्डशिप डे का काय तो आला होता. शाळेमध्ये असेपर्यंत हे फॅड फक्त टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्येच असतं असं वाटायचं म्हणजे मैत्री आहेच मग ती काय फक्त अशी बँड देऊन दाखवायची असं वाटायचं मुळात प्रश्न असायचा हे बँड विकत आणायला घरून ऐसे मिळतील का म्हणून , मग लोकर घेऊन त्याचे घरीच बँड तयार करून अकरावीचा प्रश्न तर संपला होता. मुलींच्या शाळेतल्या तिला अजूनही मुलांच्या हातावर राखीच बांधतात एवढाच माहीत होतं. त्यामुळे तिनी वर्गातल्या तमाम मुलींना फ्रेन्डशिप बँड बांधले पण एकाही मुलाकडे साधं वर करून बघितलं नाही. तशी ती जरा आगाव म्हणूनच ओळखली जायची. कधी कोणाला काय बोलेल याचा कोणालाच नेम नव्हता, भीडभाड न बाळगता  तोंडावर बोलून मोकळी होणारी, शाळेत जरा तरी सुत होती, कॉलेज मधून जाऊन अगदी भूत झाली होती. मुलीच काय मुलं पण घाबरायची.
अशातच कधी तरी तिला जाणवलं तो पिंगट डोळ्याचा मुलगा सारख तिच्याकडे बघायचा. म्हणजे तो वर्गातला अगदीच पपलू. आहे काय आणि नाही काय कॅटेगरी मधला. तिच्या अगदी विरुद्ध, पण तरीही त्याला ती आवडायची. किती तरी वेळा रस्त्यात तिला तो दिसायचा. तसा त्रास त्याचा काहीच नव्हता, पण तो तिच्या मागे आहे हे तिला जाणवायचं. तोवर हा असा अनुभव कधीच आला नव्हता, म्हणजे ही बया काहीही करू शकते या भीती पायी एकही मुलगा तिच्या कधी वाटेल गेला नव्हता. आणि हा डायरेक्ट लाईन मारत होता. आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणीनी सांगून झालं होतं त्याला तू आवडतेस ग, तुझी खूप छान चित्रं काढतो तो. मग एका मैत्रिणीकडून त्यानी एक मस्तस ग्रीटिंग तिच्या वाढदिवसाला पाठवलं. ग्रीटिंग पेक्षा त्याची हिंमत तिला आवडली होती. पण  तीही तेवढ्यापुरतीच.

तसा तो अगदी निरुपद्रवी जीव होता. म्हणजे उगाच समोर घराच्या आसपास घिरट्या घालायचा नाही की फोन करायचा नाही, पण वर्गात एकटक तिच्याकडे बघत बसायचा. एकदा कि दोनदा त्याच्या काही मित्रांनी तिला वहिनी म्हणून चिडवलं त्यावर तिनी त्यांना थांबवून पार त्यांची आई बहिण काढली बिचारे पुढचा एक आठवडा कॉलेज मध्ये आलेच नव्हते. त्याच्यासारखेच त्याचे मित्र पण अगदी पाप्याचं पितर होते, त्याच्या पिंगट डोळ्यात तिला भित्रा ससा दिसायचा. नेहेमी निळ्या किंवा आकाशी रंगाचे शर्ट, टी शर्ट घालायचा, म्हणून हिनीच त्याला नाव पण ठेवलं होतं निळूभाऊ. मग वर्गात जेव्हा फिशपॉड पडायला सुरुवात झाली तेव्हा मात्र ती वैतागली. कशात नाही काही आणि उगाचच तमाशा. त्यावर्षी त्यानी पण बेट लावली होती तिला फ्रेन्डशिप मागूनच दाखवेन.मुळात फ्रेन्डशिप अशी मागून मिळत नसते पण उगाच स्वतःच पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून अशी जबरदस्ती मागून घेतलेली मैत्री म्हणजे प्रेमप्रकरणाची पहिली सुरुवात समजली जायची. तिला पण कुणकुण लागलीच होती या सगळ्याची.

मग काय ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी ती मुद्दाम कुठेही बाहेर पडली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या दारातच तिला तो आणि त्याचे मित्र दिसले.  
‘कॅन्टीन मध्ये येशील का जरा बोलायचं आहे.’ अगदी हळू आवाजात त्यानी विचारलं. ती मानेनीच हो म्हणली. कॅन्टीन मध्ये गेल्याबरोबर त्यानी खिशातला फ्रेन्डशिप बँड बाहेर काढला आणि तिला म्हणाला मला फ्रेन्डशिप देशील. 
तिनी खिशातली राखी बाहेर काढली आणि,’ म्हणाली माझा भाऊ होशील?’
प्रसंग मोठा बाका होता, पण एकदम कुठून त्याला सुचलं कोणास ठाऊक,
‘तू राखी म्हणून बांध मी फ्रेन्डशिप बँड समजून बांधून घेईन.’
‘अरे दोन वेगळी नाती आहेत ती.’
‘प्रेम तर आहेच ना दोन्ही नात्यांमध्ये.’
कपाळावर हात मारत ती राखीची पक्की गाठ बांधली, आणि म्हणाली, ‘मैत्री, प्रेम असं काही सांगून होत नसतं, कर म्हणून करून घेता येत नसतं. ते आतून जुळून यावं लागतं. मैत्रीचे बंध आपोपाप जुळले जात असतात. पौगंडावस्थेत आकर्षण जास्त असतं, त्यात प्रेम, मैत्री शोधायची नसते. खर प्रेम मैत्री असेल तर ते आपोआप समोर येते. त्याला कोणत्याही दिवसाची, प्रसंगाची गरज नसते. भावाची मात्र नेहेमीच गरज पडू शकते मुलींना. तू माझा प्रेमाचा भाऊ बर का, तुझ्याच भाषेत सांगायचं झाल तर’
बिचारा खाली मान घालून निघून गेला होता.  नंतर फारसं काही त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं तिनी.
आज तिची मुलगी म्हणत होती, ‘ममा मी त्या समोरच्या ध्रुवला फ्रेंडशिप बँड ऐवजी राखी बांधणार आहे, तो सारखा मला त्याची  बेस्ट फ्रेंड म्हणतो, पण मला नाही आवडत तो.’
आपले जिन्स अशी सहजासहजी आपली साथ सोडत नाही हेच खरं.
लेकीच्या निमित्ताने तिला परत आठवला तिचा तो ‘प्रेमाचा भाऊ!’

मानसी होळेहोन्नुर