Wednesday, December 28, 2016

दंग(ल) करणारा अनुभव...

सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं कायम म्हणलं, लिहिलं जातं. म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे ते त्यात दिसतंच पण त्याच वेळी जे नजरेआड आहे ते देखील समोर आणतं. कधी कधी आपल्याला जे मान्य करायचं नसतं ते देखील आरशासमोर उभं राहून आपण मान्य करतो.सिनेमा हा स्वप्नी, आभासी जग जगण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. तर कधी सिनेमाच आपल्याला आपल्या आयुष्यात न घेतलेल्या वळणाच्या पुढचं आयुष्य कसं असू शकलं असतं दाखवतो. कधी जुन्या आठवणी ताज्ज्या होतात, कधी काही जखमांवर मलम लावलं जातं.
दंगल सिनेमा बघताना असाच काहीसा अनुभव आला. गाणी आणि ट्रेलर मुळे खूपच उत्सुकता होती. सिनेमा, क्रिकेटवेड्या आपल्या देशात खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण मोडणाऱ्या या सिनेमामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या सिनेमावर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळया माध्यमांवर लिहिलं, पण मला हा पूर्ण सिनेमा पाहताना माझा भाऊ, अहमदनगरमधला सिद्धी बागेतला ज्युदोचा हॉल, धोपावकर सेन्से, आणि खूप काही डोळ्यासमोर तरळत होतं.
एक २० वर्षापूर्वीचा काळ असेल, माझा भाऊ प्रचंड मस्ती खोर, त्याच्या अंगातली रग कमी करण्यासाठी कोणीतरी आई वडिलांना सुचवलं याला ज्युदोच्या क्लास ला घाला. नव्यानं सुरु झाला होता तो. दोन तास पोरगा बाहेर खेळायला जाईल, आपल्याला त्याला बघावं लागणार नाही या सुटकेच्या विचारांनी आई वडिलांनी त्याला वेक दिवशी यंगमेन्स ज्युदो असोशिएशनच्या एका छोट्याशा हॉल मध्ये नेऊन उभं केलं. नव्या पांढऱ्या ड्रेसवर माझा भाऊ खूपच खुश होता. दोन तास तुला इथं खेळायचं आहे , यावर तो अजूनच खुश होता. मग सुरुवातीचा रन अप, एक्सरसाईज सगळं करून मग मॅट वर जाणं ह्याची इतक्या लवकर सवय झाली की एक दिवस सुद्धा सुट्टी आवडायची नाही त्याला. मॅट बघितली की सगळं विसरलं जायचं. स्पर्धांच्या आधी तासनतास केलेली प्रॅक्टिस, वजन कमी जास्त करण्यासाठी घेतलेले कष्ट, आज इतक्या वर्षांनंतरही मला आठवतात. एका वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे आंबे आणले नव्हते, कारण माझ्या भावाला वजन कमी करायचं होतं, मग तो आंबा खाणार नाही तर आम्ही त्याच्या समोर कसे खाऊ? हा त्याग नव्हता, आम्ही तुझ्याबरोबर आहोत ही भावना होती. मग एका स्पर्धेच्या आधी परत वजन तेवढंच ठेवण्यासाठी म्हणून तो भाकरी खायचा तर त्याला सोबत म्हणून आई पण त्याच्याबरोबर भाकरी खायची. मग कधी वजन थोडं कमी भरत म्हणून ऐन वेळी खाल्लेली केळी असोत हा सारा खेळाचाच भाग होता.
७, ८वर्षाचा म्हणून त्याला सरावात काही वेगळी सूट सवलत नव्हती. अनेक वेगवेगळ्या वयाची मुलं क्लास मधे होती. सुट्ट्यांमध्ये दहा दहा तास चालणारा सराव मदत करत होता बक्षिस मिळवायला. शहर पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, त्यानंतर राज्य पातळी मग राष्ट्रीय स्तरावर एकेक नाव गाजत होती. त्यात जेवढा यश ज्युदोकांच होतं, तेवढीच किंवा त्याहून जास्त मेहनत सेन्सेंची होती. नगर सारख्या छोट्या शहरात, जे आजही महानगरपालिका असूनही मोठ्ठ्या खेड्यासारख आहे तिथे २० वर्षांपूर्वी एक आपल्या मातीतला नसलेला खेळ त्यांनी फक्त आणला नाही तर रुजवला, फुलवला. एक दोघांची नावं घेऊन मला उरलेल्यांना विसरायचं नाहीये. शहर, जिल्हा पातळीवर काय हा खेळ खेळणारे कमीच असतात, त्यामुळे बक्षिसं सहज मिळतात, म्हणणाऱ्यांची तोंड बंद झाली जेव्हा राज्य पातळीवर पुण्या-मुंबई, विदर्भ, कोल्हापुरातल्या मुलांना हरवून नगरच्या मुलांनी सुवर्ण पदकांची लय लुट केली. अनेकांना अनेक वर्ष पतियाळाची राष्ट्रीय क्रीडा अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हा सुद्धा राष्ट्रीय पदक विजेत्यांना राज्य सरकार कडून फक्त अभिनंदनाचे शब्द ,वृत्तपत्रात फोटो सह नाव एवढंच झळकायचं. त्याच वेळी इतर राज्यांच्या स्पर्धकांना राज्य सरकार कडून आर्थिक मदत देखील करायचे. नगरचे काही ज्युदोका अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील गेले होते.
माझा भावानी जवळपास त्याची दहा वर्ष या खेळासाठी दिली होती, आणि या दहा वर्षात तो खूप जागा फिरला, खूप नवीन शिकला, आपल्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचं असतं. आणि त्यासाठी सगळं पणाला लावायची तयारी ठेवायची असते. एका राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी भावाला पायाला जखम झाली होती, स्पर्धेला तर तो जाणारच होता, पण आईनी त्याला सांगूनही त्यानी मॅच जिंकण्यासाठी त्या पायाचाच वापर केला. पदक जिंकलं, पण त्यापुढचे दहा दिवस ड्रेसिंग ही करून घेतलं. अशा एक ना अनेक आठवणी आहेत. ज्युदो हा त्याच्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, त्याचं पहिलं प्रेम होतं ते. त्यामुळे अगदी आयर्लंड मध्ये जाऊन सुद्धा त्यानी संधी मिळताच खेळून घेतलं.खेळाची परंपरा नसलेल्या घरातल्या अनेकांना या खेळानी तेव्हा झपाटून टाकलं होतं. तेव्हा त्यात मुलगा, मुलगी असा भेदभाव नव्हता. माझ्या आठवणीतली अनेक घर या खेळानी बांधली गेली होती. अनेक भावा बहिणींच्या जोड्या तेव्हा प्रसिद्ध होत्या. मुलगी म्हणून कमी प्रॅक्टीस असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळेच या खेळानी अनेकांना नोकरी, छोकरी सुद्धा मिळवून दिली. काहींना शिवछत्रपती सुद्धा मिळवून दिला.
कोणताही खेळ हा एकट्याचा नसतो, तो खेळ खेळत असताना एक अख्खं घर त्याच्यामागे उभं असतं. त्या खेळाडूच्या डोळ्यात फुललेलं, फुलवलेलं स्वप्न कधी त्याच्या आई वडिलांचं, मार्गदर्शकाचं असतं, जे नंतर त्याचं होऊन जातं. दुसऱ्या गावात स्पर्धा असताना मुलांना, मुलींना सोबत म्हणून अनेक पालक जायचे, आणि मग त्या स्पर्धेच्या काळात ते सोबतच्या साऱ्याच मुली मुलांचे पालक होऊन जायचे. फक्त आपल्या मुलाचा विचार न करता, त्याच्या सोबत खेळणाऱ्या इतर मुलांची काळजी घेणं, त्याचं तात्पुरतं पालकत्व निभावणं तेव्हा अनेकांकडून अगदी सहज झालं होतं, आणि त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही खेळ सुटला तरी या जुन्या ओळखी, मैत्र, तुटलेले नाहीत. मला आजही आठवतंय आम्ही दिल्ली मध्ये फिरता असताना असाच एक जण अचानक रस्त्यात भेटला आणि माझ्या आईला बघून त्यानी काकू तुम्ही इथं मारलेली उडी त्या तात्पुरत्या पालकत्वातून आलेली होती. आजही आईचे फेसबुकवरचे फोटो पाहून अनेकांच्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

खूप नावं, आठवणी आहेत, लिहिण्यासारखं खूप आहे. पण दंगल बघताना मला आठवली ती खेळाडू तयार होण्यातली मेहनत. एका रात्रीतून हिरो तयार होत नसतात. हिरो तयार होत असताना अनेक जण कारण ठरत असतात. खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, हॉकी यापेक्षाही वेगळे असतात, मुलगा मुलगी असे भेदभाव न करता तयार झालेले अनेक ज्यूदोपटू, जुळलेले मित्र मैत्रिणी, कुटुंब. राष्ट्रीय स्तरापर्यंत जिंकलेली पदकं, सर्टिफिकेट आजही कित्येकांच्या घरात आहेत. ती आहेत तोवर सगळ्यांना आठवण करून देत राहतील त्यांनी जगलेल्या त्या वर्षांची. अशा छोट्या गावांमधल्या अनेक जणांच्या प्रवासाची गोष्ट असू शकते दंगल. दंगल चित्रपटा मधले काही प्रसंग, NSA मधल्या प्रशिक्षकाचं केलेलं चित्रण मला व्यक्तिशः आवडलं नसलं तरी स्वप्नांचा प्रवास हा नेहेमीच सुरेख असतो. आणि जेव्हा तो चाकोरी मोडून मिळवलेल्या यशाचा असतो तेव्हा कुठेतरी डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असतो.  


Monday, December 19, 2016

डार्क चॉकलेट आणि ट्रृटीफ्रुटी केक

त्यांची ती तिसरी चौथीच भेट असावी. पहिल्या भेटीत उत्सुकतेपेक्षा जास्त टेन्शन होतं. म्हणजे फोटो, इमेल्स मधून तरी बरा वाटला, आता प्रत्यक्षात कसा असेल कोणास ठाऊक. त्यात परत त्यांनी विचारलं होतं, घरीच भेटू या का? आणि ती काही बोलायच्या आधीच सांगितलं होतं, म्हणेज सगळेच आधी भेटूया मग वाटलं तर आपण भेटूया. तिला जरा विचित्र वाटलं, कारण काही पुढं घडलं नाही तरी उगाच त्या भागातून जाताना ते घर बघून आठवण येणार. ती माणसं बघून कदाचित आज हे आपले नातेवाईक असू शकले असते असं वाटणार. पण त्याच वेळी आधी घर, घरातले सारे भेटलो, तर खरंच निर्णयापर्यंत यायला मदत होईल असंही वाटलं. किमान बाहेर कोणत्या हॉटेल मधे भेटलो, तिथं कोणी ओळखीचं अचानक भेटलं तर काय सांगायचं हा प्रश्न तरी येणार नाही म्हणून तिला हायसं वाटलं. अशा कोणत्या मुलाच्या घरी जाण्याची  ते ही आई बाबांसोबत ही काही पहिली वेळ नव्हती. पण तरीही दडपण येतच होतं. साडी कि सलवार की सरळ जीन्स. मधला मार्ग म्हणून तिनी कुर्ता आणि लेग इन घातले. तसा फोटो वरून तो खूप शामळू वाटला होता पण फोटो काही सगळंच खरं सांगत नाहीत. फोटो पेक्षा तिला इमेल्स मधला तो जरा जवळचा वाटत होता. एकाच शहरात असलो तरी लगेच भेटण्याऐवजी आपण आधी इमेल्स वर बोलूयात. मग प्रत्यक्ष भेटूयात, दोघांनाही असेच हवं होतं. कधी कधी प्रश्नांची लगेच  दिलेली उत्तर वेळ मारून नेण्यासाठी असतात, त्यात फार विचार नसतो हे तिला तिच्या नोकरीमुळे आणि गेल्या दोन वर्षात १०, १२ मुलांना भेटून मिळालेलं ज्ञान होतं.

जवळपास दोन महिने एकमेकांना भरपूर इ पत्र लिहून सुरुवातीला घाबरवून, मग कोण किती पाण्यात आहे जोखून आता भेटायचं ठरलं होतं. फोन वरून फक्त आवाज ऐकून काही तरी मत ठरवण्याऐवजी समोरासमोर भेटलेलं बरं म्हणून दोघांनीही ठरवून नंबर एकमेकांना दिला नव्हता. तसं पत्रांवरून तरी तो तिच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा वाटत होता. पण तरी फोटो वरून वाटला तसा बोलण्यात तरी शामळू वाटत नव्हता. त्याची स्वतःची ठाम मत होती. आणि त्यासाठी तो वाद सुद्धा घालायला तयार असायचा, पण त्याच वेळी समोरच्याच बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचा देखील. आणि वाद घालताना समोरचं पूर्ण ऐकूनही घेत होता. मत भेद असले म्हणजे समोरचा टाकाऊ असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं, ते बघून तिला खरंच बरं वाटत होतं. तिला पहिल्यापासून दिसण्यापेक्षा वागणं महत्वाचं वाटायचं. दिसणं आपल्या हातात नसतं, मात्र वागणं आपण ठरवू शकतो. आणि हेच तिच्या आजू बाजूच्या अनेक लोकांना कळत नव्हतं.  दोन वर्षात अनेक नमुने भेटून, पाहून झाल्यावर तिला स्वतःचाच संशय यायला लागला होता. आपण काही भलत्याच अपेक्षा धरून बसलोय की काय?

साधं त्यांच्या घरासारखं घर, नजरेला पडणारी काही पुस्तकं, भरपूर बोलणारी त्याची आई, तिला मनापासून आवडत होतं, फोटोतल्या पेक्षा तो खूपच वेगळा वाटतं होता. नशीब आपण फोटो बघून लगेच नाही म्हणालो नाही, तिनी मनातल्या मनात स्वतःलाच म्हणलं. घरात असलेल्या भार्पूर खिडक्या, खेळणारी हवा बघून मगाशी आलेलं दडपण अगदी पळून गेलं होतं. लग्न फक्त काही मुलाशी होत नसतं, त्याच्या घराशी, त्याच्या घरातल्या लोकांशी सगळ्यांशीच होत असतं, त्या दोघांची ए पत्र तिला पटकन आठवली. तिथं भरपूर बोलणारा इथं मात्र अगदी मुग गिळून गप्प होता, त्यामुळे ती पण शांतच होती. एकूण सगळं चांगल होतं पण परत फक्त त्याच्याशी एकट्याशी बोलावं असं वाटतं असतानाच त्याची आई म्हणाली, तुम्ही दोघं बोला, आयुष्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ममाज बॉय एकदम तिच्याकडे बघत म्हणाला ठीक आहे आम्ही भेटू बाहेर कुठे तरी!

मग दुसरी भेट पण अशीच कुठे तरी झाली, दोघांच्या सोयीनं जागा, वेळ ठरवली.  खरं तर त्याच्या घरीच दोघांचा निर्णय झाला होता , पण तरीही तो निर्णय योग्य  आहे ना याची खात्री म्हणून ही भेट होती. काय खाल्लं यापेक्षा काय बोलतोय हे तेव्हा महत्वाचं वाटत होतं. जमेल ना आयुष्यभर या माणसासोबत राहायला. असा प्रश्न दोघांच्याही मनात डोकावत असताना, समोरच्याची अजून एक नवीन बाजू दिसत होती. आयुष्याचा कंटाळा येऊ द्यायचा नसेल आजूबाजूच्या माणसांचा कंटाळा न येणं जास्त गरजेचं असतं. पक्का निर्णय दोघांनी घरी सांगितलं तेव्हापासून दोन्ही घराचं वातावरणाच बदललं होतं. फोन, तारखा, खरेदी याखेरीज विषयच सुचत नव्हते.

तिसऱ्यांदा भेटले तेव्हा त्यांचे नातं बदललं होतं, संदर्भ बदलले होते, त्यामुळे थोडा अवघडलेपणा आला होता. एक कळत नकळत ताण होता. आता मी काही बोलले तर त्याचा दुसराच अर्थ निघणार नाही ना. याला काही वाटणार नाही ना, पत्र, प्रत्यक्ष भेट, फोन, गप्पा साऱ्याची सांगड लावून एक नातं तयार होत होतं, जशी ती घाबरत होती, त्यापेक्षा जास्त तो घाबरत होता, आजवर मैत्रिणी चिक्कार होत्या, पण अशी खास मैत्रीण कोणीच नव्हती, आई सोडली तर घरात कोणी मुलगी पण नव्हती, त्यामुळे मुलींना नक्की काय हवं असतं त्याला कळतंच नव्हतं. तिनी भेटायला येताना काहीतरी गिफ्ट आणलं होतं ते पाहून त्याच्या पोटात एकदम खड्डा पडला, बाप रे आपण अगदी विसरलोच की असं काही गिफ्ट वगैरे द्यायचं असतं. तिनी अगदी सहज ते त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं मला आवडतं काही क्षण खास करायला, आजच्या भेटीची आठवण म्हणून हे एक छोटंसं गिफ्ट. त्याला आवडेल की नाही म्हणून आतून घाबरत पण वरून अगदी सहज बोलल्याचा आव आणत तिनी instrumental cd चा पॅक त्याच्या हातात ठेवला. हसून काहीतरी बोलून त्यानी वेळ मारून नेली. आणि त्याच्याकडे ती सगळी, गाणी, जवळपास 1 gb चं साऱ्या पध्दतीच संगीत असूनही खोटं हसून अगदी नव्यानं हे बघतोय असा आव आणत खूपच छान आहे, मी गाडीत नक्की लावेन म्हणाला, तेव्हा त्याच्या आवाजत उसनं अवसान होतं. खाऊन पिऊन झाल्यावर त्यानी तिला एकदम एका दुकानात नेऊन तुला काय गिफ्ट हवं ते तूच ठरव सांगितलं, तेव्हा तिचं मन खट्टू झालं, माझं गिफ्ट मीच घ्यायचं?, मग त्यात काय गंमत, ते गिफ्ट नाही खरेदी होऊन जाते, मनाला आवर घालत तिनी एक किमतीच्या टॅग कडे बघत एक कुर्ता घेतला.

चौथ्या वेळी मात्र मित्राच्या सूचनेवरून तो आधीच फुलं आणि चॉकलेट घेऊन आला होता, तर त्या दिवशी तिनी घरून केक करून आणला होता. त्याच्या हातात मिल्क चॉकलेट पाहून पडलेला चेहरा तिनी एका सेकंदात सरळ केला, आणी ट्रृटीफ्रुटी घातलेला केक पाहून त्यानी पण आंबट पडलेला चेहरा गोड केला. पहिल्या घासा नंतर मात्र तिनी त्याला मला मिल्क चॉकलेट आणि त्यानी तिला मला ट्रृटीफ्रुटी घातलेला केक आवडत नाही असं सांगितलं तेव्हा दोघं सुटल्यासारखं  जोर जोरात हसत सुटले आणि हसता हसता एक मेकांचा हात घट्ट दाबला तेव्हाच बहुतेक त्यांच्यातल्या नवरा बायकोच्या’ नात्याची सुरुवात झाली...


आजही तो तिच्या वाटची पण मिल्क चॉकलेट खातो पण आठवणीनं तिला डार्क चॉकलेट आणतो, आणि ती केक करताना त्याच्यासाठी काहीही घालत नाही, आणि बाकीच्या सगळ्यांसाठी म्हणून मग वरून डेकोरेशन करून ट्रृटीफ्रुटी, बदाम, अक्रोड असं काही काही घालते. आपल्याला आवडतं ते न सोडता, आपल्या आवडत्या माणसाला जे आवडतं ते ही करणं म्हणजे पण प्रेमच असतं ना....!  

Sunday, December 11, 2016

गंध सांगतो काही...

सकाळी सकाळी अलार्म वाजायच्या आधी जाग यावी, मस्त एक आलं घातलेला वाफाळता चहा पिऊन मस्त फिरायला जावं. बाहेर धुकं बिकं पडलेलं असावं, फुलांचे वास सगळीकडे घमघमत असावेत. आपल्याच तंद्रीत सुर्यकिरणांबरोबर पावलं टाकत स्वतःशीच संवाद साधत चालत चालत दिवसाची सुरुवात करावी असं तिला नेहेमी वाटायचं. सकाळची वेळ तिला तिची वाटायची, एका बाजूला स्वैपाकाची गडबड, डबे बांधायची धावपळ पण त्यातही वेळ काढून ती स्वतःसाठी अर्धा तास काढून एक प्रभात फेरी मारून यायचीच. ती प्रभात फेरी चुकली की दिवस सुरूच झाला नाही असं तिला वाटायचं. काही वर्षांची सवय झाली होती ती, अशी जुनी सवय आयुष्याचा एक भागच बनून जात असते मग.

तिला कायम वाटायचं सकाळी उठल्या उठल्या एक प्रसन्नता सगळ्या नसानसांतून फिरत असते, रात्रीच्या झोपेमुळे सारे अवयव, अगदी मेंदू देखील कामाला लागलेला असतो, रात्रीत सुचलेले नवे विचार नव्या दिवसाची झक्कास सुरुवात करून देत असतात. मग फिरता फिरता आज काय काय करायचं याची एक यादी ती मनातल्या मनात तयार करायची, काल करायच्या राहिलेल्या कामांची वेगळी यादी मांडायची, मग त्या कामांचा क्रम सारा दिवस ती मनातल्या मनात आखून टाकायची, मग आजू बाजूला चालणाऱ्या लोकांकडे बघायची, ऐकायची, पहायची. ओळखीच्या चेहऱ्यांना हसू दाखवायची, कुठे ओळख शोधायची. मग आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायची, असे छोटे मोठे कित्येक गुंते तिनी या सकाळच्या अर्धा तासात संपवले होते.

आज चालता चालता ती एक दोन मिनिटं थबकली, ३, ४ सेकंद अंगावर येऊन धडकलेल्या त्या वासानी ती एकदम काही वर्ष मागे गेली. त्याच्या परफ्युम चा वास तो. कायम त्याच्या आधी तो वासच तिच्यापर्यंत पोहोचायचा. त्याच्याशी मैत्री व्हायच्या आधीच तिची त्या वासाशी मैत्री झाली होती. तसे अनेक वासाचे परफ्युम, अत्तर याआधी हुंगले होते, पण हा गंध खोल आतवर कुठे तरी उतरला होता. कॉलेज मध्ये असताना, त्याच्याशी घट्ट मैत्री व्हायच्या आधी पण त्याच्या वासाचं अस्तित्व ती शोधून काढायची. जेव्हा पुढं ती वासाच्या नंतर त्याच्याही प्रेमात पडली तेव्हा तिनी त्याला सांगितलं पण होतं, काय सुंदर वास येतो रे तुझा, तुझ्या परफ्युम चा. परदेशातून त्याला कोणीतरी आणून दिलं होतं ते. सोबतची प्रेमाची काही वर्ष गेली, थोडे ते दोघेही बदलत होते, बदलला नव्हता तो त्याचा परफ्युम. त्याच्या कारणानी का होईना पण तीही अत्तर वापरायला शिकली होती. खरं तर त्याला खूप आवड होती वेगवेगळे वास लावून बघायची, पण ती अडून राहिली होती त्याच वासावर, म्हणून त्यानी तिला एक दोनदा अत्तरवाल्या गल्लीतून फिरवून आणलं होतं. तिथल्या त्या वासांच्या घमघमाटात तिला भाजी मंडईत ताज्या भाज्या बघून जशास आनंद होतो तसा आनंद झाला होता.

नोकरी सुरु झाली, भेटी कमी होऊ लागल्या आणि मग न आवडण्याची एकेक कारणं समोर दिसायला लागली. इतकी वर्ष जे चालवून घेत होतो, ते सगळं पुढं रेटायला नको असं वाटायला लागलं. एका छान वळणावर एकमेकांच्या हातात हात घेऊन त्यांनी एकत्र घेतलेल्या शपथा, आणा भाका मोडल्या, आणि दोन वेगळ्या रस्त्यानी चालायचं ठरवलं. एकत्र राहणं जमत नव्हतं, तेव्हा हे असं वेगळ राहून पाहूया म्हणत दोघ वेगळ्या वाटेने गेले. सोप्प काहीच नसत, ना नवीन नातं बांधण ना नातं टिकवणं. आयुष्याचा धडा मिळेपर्यंत पार पुढे चालत आली होती. आता माग वळण शक्य नव्हतं, कोणास ठाऊक पुढं भेटेलही तो म्हणत चालत राहिली, मग कधी तरी त्याच्या दोन चार गोष्टींचे भास घडवणाऱ्या एका मित्रासोबत लग्न करून मोकळी झाली. याला सुरुवातीला अत्तर देऊन तिनी जोखलं, पण तो दुकानात पहिले दिसणारा, परफ्युम घेणाऱ्यातला आहे कळल्यावर त्रागा चिडचिड न करता त्याच्या बदलत्या वासांना आपलंसं केलं.

तसं सगळ चाकोरीतल्या सारखं चाललं होतं. कमीत कमी अपेक्षा ठेवल्या की छोट्या छोट्या गोष्टींमधले आनंद अगदी डोंगराएवढे जाणवतात. वळणावरून पुढच्या रस्त्यावर खूप काही शिकायला मिळालं होतं. त्यामुळे आता कोणतही वळण नको सरळ साधा रस्ता धरत ती चालत होती. सुख, दुःख प्रेम सगळे आपलेच असतात, आपल्याच सोबत असतात, आपण त्यांना पाहू शोधू तसे ते आपल्याला सापडतात, प्रत्येक प्रसंगाचा एक गंध असतो, आठवणी उडून गेल्या तर गंध कायम राहतात. दिवाळीतला, उटण्याचा गंध, आईचा साडीचा गंध, पहाटेचा गंध, तव्यावरच्या पोळीचा गंध, नव्या पुस्तकांचा गंध, ओल्या मातीचा गंध, एक ना अनेक, आठवणी, माणसं सारी उरतात गंधापुरती. अशा माणसांच्या सहवासानी तयार होतो नात्यांचा , घराचा गंध. प्रत्येक घराला वेगळ अस्तित्व देणारा असतो हा गंध.


वळणावरती तिचा हात हातात धरून तो म्हणाला होता, प्रयत्न केला तर कदाचित धगून जाईल सारं काही, पण त्यात निखळ आनंदापेक्षा असेल टिकवून ठेवण्याचं दडपण. त्रास करत, भांडत रोज एकमेकांना सोबत करण्याएवजी ठरवून निरोप घेतला तर आपल्या नात्याचा सुगंध कायम राहील. प्रेम असलं तरी नातं टिकवणं अवघडच! आज इतक्या वर्षांनी परत तोच वास, वळून बघेपर्यंत आठवणी, गंध सारंच दूर गेलं होतं. पायांना जबरदस्ती घरी वळवून आणत तिनी सत्यात आणलं, घरी येऊन तिच्या कपाटातल्या अर्धवट संपलेल्या अत्तराच्या डब्यांचा वास श्वासासरशी आत भरून घेत, त्याच्या परफ्युमचा घट्ट डोक्यात बसलेला वास तिनी तिथंच सोडला, आणि घरात कामाला लागली, नव्या गंधाचा भरत नवा दिवस सुरु करायला.  

Wednesday, December 7, 2016

एक आहे गुड्डी....

एका चित्रपट महोत्सवात खूप दिवसांनी परत गुड्डी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बघूनही हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, चित्रपट बिलकुल शिळा वाटला नाही. जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा मी देखील गुड्डीच्याच वयाची असेन. अगदी साधी सरळ एका चित्रपट वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे गुड्डी. जया भादुरी आजची जया बच्चन हिचा पहिला चित्रपट हा. माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा आणि दिग्दर्शकाचा हृषिकेश मुखर्जींचा हा सिनेमा मला आपल्या सगळ्यांचीच गोष्ट वाटते.

एका छोटाश्या गावातल्या मुलीचा आवडता नायक धर्मेंद्र, त्याचा प्रत्येक चित्रपट तिला पाठ! शाळा बुडवून सिनेमा बघायचं तिला वेड. आयुष्य म्हणजे एक सिनेमा मानून चालणाऱ्या लाखो भारतीयांचं प्रतिक म्हणजे गुड्डी. सिनेमातली वाक्य, प्रसंग, माणसं खरी मानून आपण एक समांतर आयुष्य जगत असतो. सिनेमातल्या, मालिकांमधल्या पात्रांमध्ये आपण शोधात असतो स्वतःलाच. त्यांच्या सारखेच कपडे करून, त्यांची भाषा बोलून, त्यांच्यासारखा विचार करून आपण ते स्वप्नी जग आणि सत्यीत जग एकाच करायचा प्रयत्न करत असतो. शाळा बुडवून सिनेमाचं शुटींग बघायला गेलेल्या गुड्डीला सही देताना with love म्हणून लिहिणाऱ्या धर्मेंद्र च्या प्रेमात पडलेली गुड्डी स्वतःला मीरा आणि धर्मेंद्र ला कृष्ण समजायला लागते. मग तिला पडद्यावरचा धर्मेंद्र खरा खरा तिचा देव वाटायला लागतो, गुंडांशी भांडणारा, पियानो वाजवणारा, कधी डॉक्टर, कधी क्रांतिकारक, कधी कवी, कधी प्रोफेसर जेवढे सिनेमे तेवढी रूपं, एक माणूस जे जे काही स्वप्नात, कल्पनेत करू इच्छितो ते ते हे नायक मोठ्या पडद्यावर अगदी सहज करत असतो. गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात असते, आणि गुड्डीच्या प्रेमात नवीन, तिच्या वहिनीचा भाऊ असतो. गुड्डी चित्रपटांमध्ये इतकी रंगलेली असते की रडताना तिच्यासमोर आदर्श असतो मीनाकुमारीचा, तिला कपडे हवे असतात माला सिन्हा सारखे. भावना प्रगट करताना देखील तिला सिनेमाचा आधार लागायचा.  
जेव्हा नवीनला कळतं की गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात आहे तेव्हा तो खरंच खचतो, पण मग मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले त्याचे मामा त्याल समजावून सांगतात, अरे तिला जे वाटतंय ते प्रेम नाही तर आकर्षण आहे. प्रत्येकाच्या मनात अशी एक छबी रुतून बसते, मग मोठ्या पडद्यावर ते सारं बघून आपण त्या माणसाच्या नव्हे तर प्रतिमेच्या प्रेमात असतो.

गुड्डी ज्याच्या प्रेमात असते त्या धर्मेंद्र च्या मदतीने नवीन चे मामा, गुड्डीला सिनेमाच्या फसव्या जगाचं दर्शन घडवतात. प्रत्यक्ष सिनेमात संवाद लिहिणारा कथा/ संवाद लेखक , ते संवाद कशा प्रकारे बोलायचे हे दाखवणारा दिग्दर्शक, आणि हे सगळं चित्रित करणारा कॅमेरामन हे आणि यांच्या सारखे अनेक जण मेहनत करतात तेव्हा जाऊन एक स्टार जन्माला येत असतो. अगदी साध्या सरळ भाषेत , दृश्यांमध्ये हृषीकेश मुखर्जींनी कित्येकांना त्यांच्या भ्रमातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. जवळपास ४६ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आजही तेवढाच खरा वाटतो, पटतो. ह्या नाटकी दुनियेचा अनुभव घेतल्यावर गुड्डीला साक्षात्कार होतो तिच्या अवती भोवती घुटमळणाऱ्या प्रेमाचा .. आपण स्वप्नांच्या मागे पळता पळता, अप्राप्य गोष्टींचा ध्यास घेता घेता आपल्याला जे सहज शक्य आहे ते सुद्धा मिळवत नाही. गुड्डीला झालेल्या नव्यानं झालेल्या प्रेमाच्या साक्षात्कारावरच हृषिदा हा चित्रपट संपवतात आणि आपण परत येतो वास्तवात.
  
आजही नायक नायिकेच्या पडद्यावरच्या छबीलाच खरं मानणारे अनेक जण आहेत, नायक नायिकेसाठी काहीही करायला तयार असणारे आजही आहेत, फक्त धर्मेंद्रच्या जागी, शाहरुख खान, सलमान खान, ह्रितिक रोशन ,रणबीर कपूर, शहीद कपूर अशी फक्त नावं बदलली आहेत, आजही लोकांना फक्त पडद्यावर चमकणारे तारेच भुरळ घालतात, त्यांना चमकवणाऱ्या हातांचे कष्ट, आणि प्रतिमा आजही दुर्लक्षितच असतात.

जितकं गुड्डी मधलं हम को मन की शक्ती देना डोक्यात गात राहत तशीच सिनेमामधली सिनेमावरची दिग्दर्शकाची टिप्पणी लक्षात राहते. आपण प्रत्येक जण आयुष्यात एक फँटसी शोधत असतो. एकाच जन्मात आपल्याला अनेक जन्म जागून घ्यायचे असतात. जे जे उत्तम उद्दात्त ते ते आपल्याला आपल्याकडे हवंसं असतं. आपल्या सुखाच्या, आनंदाच्या कल्पना आपण दुसऱ्यांकडून प्रेरित होऊन घेत असतो. आपल्या प्रियकरामध्ये आपल्याला आपला आवडतो ‘हिरो’ दिसत असतो, तर आपल्या आवडत्या ‘हिरोईन’ चे भास अनेकांना त्यांच्या प्रेयसी मध्ये होता असतात. नवरा बायको देखील एकमेकांच आयुष्य फिल्मी पद्धतीनं जोडायचा प्रयत्न करत असतात. हे वागणं जगावेगळ बिलकुल नसतं, मुळात हे असतं, आपल्या आयुष्यातले प्रश्न विसरण्याचा, किंवा असुरक्षितता विसरण्याचा सोप्पा मार्ग. सिनेमातलं बघून लग्नामधले विधी जेव्हा बदलायला लागतात, जेव्हा कपड्यांची फॅशन बदलते, फिरायला जाण्याची ठिकाणं बदलतात तेव्हा सिनेमातल्या आपल्या आयुष्यावरच्या प्रभावाची जाणीव होते. सिनेमाला समाजमनाचा आरसा समजलं जातं. पण हा आरसा अगदी गंमतीशीर असतो, म्हणजे ही खरतर काच असते, ज्यामध्ये दोन्ही बाजूचं दिसत असतं.


चित्रपट हा एक उत्तम कलाप्रकार मानला जातो. आपण आपली जागाही न सोडता एका वेगळ्या जगात सैर करून येत असतो, माहीत असलेली गोष्ट वेगळ्या पद्धतीनं बघत असतो, अनुभवत असतो. त्यामुळेच ४६ वर्षापूर्वी बनवलेल्या सिनेमा आजही तेवढाच valid ठरतो. माझा ५ वर्षाचा मुलगा जेव्हा मालिकेतलं, जाहिरातीतलं जग खरं मानून मला काही विचारतो , त्या त्या वेळी मला त्याच्यात गुड्डा दिसतो. मी वाट बघतीये त्याच्यासोबत बसून गुड्डी बघायची, कदाचित त्याला दाखवता दाखवता मीच परत काही तरी शोधेन, मला काय हवं आहे याचा परत एकदा मला साक्षात्कार होऊ शकेल. 


Tuesday, November 15, 2016

तरीही फुलतो आहे.....

काही काही वासाशी, झाडांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. आणि मग त्या आठवणी इतक्या घट्ट होऊन जातात, की ते वास आणि त्या आठवणी एकच होऊन जातात. मग कधी या आठवणी वय विसरायला लावतात तर कधी या आठवणी कातर करून सोडतात. आयुष्य म्हणजे तरी काय असतं, आठवणींची पुरचुंडी तर असते. बऱ्याचशा आठवणी मेंदूत जागृत, निद्रित साठवलेल्या असतात, पण काही आठवणी मात्र मनात खोल रुतून बसलेल्या असतात.

लहानपणी कधी तरी आजीच्या मांडीवर बसून कृष्णाच्या गोष्टी ऐकताना नरकासुराची गोष्ट ऐकली होती. मग नरकासुराला मिळालेलं वरदान, आणि मग त्याचा गैरवापर टाळण्यासाठी मिळालेला शाप. तेव्हा कायम वाटायचं हे राक्षस लोकंच का कायम तपश्चर्या करायचे. मग ही एवढी साधना करून पण यांची वृत्ती का बदलायची नाही? आणि दर दर वेळी हे राक्षसच का वाईट असायचे. कधी तरी एकदा आजीला तसं थेट विचारल्यावर ती म्हणाली, अग या गोष्टी म्हणजे साऱ्या प्रतिकं असतात. आपल्याच आत देव पण असतो आणि राक्षस ही. राक्षसाला देवापेक्षा मोठं व्हायचं असतं म्हणून तो तपश्चर्येच्या मागे लागतो. देवाला अशी कोणाशीही स्पर्धा करायचीच नसते. आणि वाईट गोष्टीना मारणं गरजेचं असतं ना त्यासाठी शाप देतात. मग त्या नरकासुराच्या गोष्टीतली सत्यभामा मस्त हिरोईन सारखी वाटायची. कृष्ण तर पहिल्यापासून हिरो होताच, पण नरकासुराला मारताना त्याला मदत करणारी त्याची बायको मनापासून आवडली होती.

तीच सत्यभामा दुसरऱ्या एका कथेमध्ये नवऱ्यावर हक्क गाजवणारी म्हणून दिसते. मग त्याला दान म्हणून सोडतानाही तिला लक्षात येत नाही आपण काय करतो आहोत. अति प्रेम , आंधळं प्रेम असंच आपल्याकडून काहीही करून घेतं असतं. आपल्याही नकळत आपण वहावत असतो. . पण या सगळ्यापेक्षाही मला आवडते ती पारिजात फुलाची आणि सत्यभामेची कथा. कृष्णाची पट्टराणी खरं तर रुक्मिणी त्यामुळे आपण कायम दुसऱ्या क्रमांकावर या खंतेत सत्यभामा, खरंतर ती सौंदर्यवती, त्यात परत नरकासुर वध केला म्हणून तिला मिळालेलं  अमर सौंदर्याचं वरदान बर माहेरचं घराणं देखील मोठं त्यामुळे त्याचा ताठा वेगळा. मग एकदा फुरंगटून तिनं म्हणे कृष्णाला सांगितलं मला पारिजातकाचं झाड माझ्या अंगणात हवं. पारिजात म्हणजे स्वर्गीय झाड, थेट समुद्रमंथनातून मिळालेलं. बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला काहीही करावं लागतो ह्याचा पहिला धडा गिरवला कृष्णानं. जिथं कृष्ण काही करू शकला नाही तर बाकीच्या सामान्य नवऱ्यांची काय कथा! नवऱ्यानं बायकोचा हट्ट पूर्ण करत झाड लावलं खरं. पण फुलं मात्र पडायला लागली रुक्मिणीच्या अंगणात. ह्यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं.

जेव्हा केव्हा पारिजातकाची फुलं, झाड बघते तेव्ह तेव्हा मला सत्यभामा डोळ्यासमोर येते, आणि नकळत नरकासुराची पण आठवण येते. हे पारिजातकाचं पिटुकल फुल, त्याचा तो केशरी रंगाचा दांडा, कधी पाच, कधी सहा क्वचित कधी आठ पाकळ्या. सूर्यास्तानंतर उमलायला सुरु होणारं आणि सूर्य परत हजेरी द्यायला आल्यावर हळूहळू कोमेजणाऱ्या या फुलाच्या झाडाला  इंग्लिश मध्ये ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे याचं जे शास्त्रीय नाव आहे, निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस त्याचा अर्थ देखील ‘दुःखी झाड ‘ असा होतो. पारिजातकाची एक दंतकथा पण अशी सांगितली जाते की हे झाड एकदा सूर्याच्या प्रेमात पडलं, आणि त्यानी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण सूर्यानी त्याला नकार दिला म्हणून ही फुलं सूर्य असताला गेल्यावर फुलांमधून अश्रू ढाळायला सुरुवात करतात ते थेट सूर्याचं परत दर्शन होईपर्यंत.


स्वतंत्र वास असणारी ही पारिजातकाची झाडं खरंच अंगणाची शान असतात. प्राजक्त, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक या नावांनी पण ओळखलं जातं. जमिनीवर पडताक्षणी हिरमुसून जाणारी ही फुलं गोळा करण्यात देखील एक आनंद होता. जेव्हा कधी प्राजक्ता अशी हाक कानावर पडते तेव्हा पारिजातकाचा परिमळ दरवळून जातो, हेच असावं कदाचित आठवण आणि वास एकच होऊन जाणं.  आपले अश्रू ढाळता ढाळता सुवास पसरवणारं दुःख इतक्यांना सुखी करून जातं, की दुःखालाही त्याच्या दुखण्याचा विसर पडावा. आयुष्यात एवढं जमलं तरी पुष्कळच म्हणावं लागेल. ...!  

Thursday, November 10, 2016

घरोघरी साड्यांची म्युझियम

“ अगं मी यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या साड्याच्या निमित्ताने मी एक मस्त गुलाबी रंगाची पैठणी घेतली आणि दिवाळी साठी म्हणून काळी चंद्रकळा. तू काय घेतलेस नवीन?” एक बस मध्ये एक जण दुसरीला विचारत होती.
“हो ग मी पण  नऊ दिवस त्या नवरात्रीच्या रंगांच्या रेशमी साड्याच नेसते, यावेळी पांढरी साडी नेमकी नव्हती बघ, आणि कित्ती दिवसापासुन एक संबळपूर सिल्क घ्यायची होती मग काय एक पांढरी किरमिजी बॉर्डर ची संबळपूर सिल्क घेऊन आले. दिवाळीला बाई आम्ही सोनेच घेतो.” माझा स्टॉप आल्यामुळे मी उतरले आणि माझी पुढची साडी खरेदी, रेशमी साड्यांचे प्रकार, नवरात्रीचे नऊ रंग, सोन्याची खरेदी अशी मिळणारी वेगळी माहिती माझी हुकली.

लग्नामध्ये मिळणाऱ्या ५ मानाच्या साड्या, आहेरात मिळणाऱ्या साड्या यापासून कित्येक जणींच्या साड्यांचा प्रवास सुरु होतो, तसं त्या आधी हौस म्हणून, किंवा जवळच्या कोणत्या तरी लग्नासाठी म्हणून घेतलेल्या साड्या असतात, पण बहुतांश जणींच्या रेशमी साड्यांच्या संग्रहाची सुरुवात मात्र होते ती लग्नापासूनच! सध्याचा जमाना डिझाईनर साड्यांचा असला, तरी पारंपारिक रेशमी, सुती  साड्या आजही त्यांचे महत्व टिकवून आहेत. मग चेन्नईला गेलं की कांची सिल्क किंवा कांजीवरम घेणं हे मरीना बीच बघण्यापेक्षाही महत्वाचं काम असतं. पैठणी अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळत असली तरी येवल्यावरून आणलेल्या पैठणीची बातच न्यारी असते. आपल्याकडे नाही बाई मिळत एवढे रंग आणि प्रकार पैठण्यांचे म्हणत एखादी सहज ३, ४ पैठण्या येवल्यावरून येता जाता घेते.

साडी हा साडी नेसणाऱ्या आणि ना नेसणाऱ्या सगळ्याच जणींचा अगदी खास चर्चेचा विषय असतो, न नेसणाऱ्या  हे एक काहिअतरी अवघड जटील प्रकरण आहे म्हणून बघतात, रोज घालणाऱ्या आमचाच जास्त हक्क याच्यावर बोलण्याचा म्हणून बोलून घेतात, आणि कधी मधी साडी नेसणाऱ्या, मिरवणाऱ्या #100dayssareepact करतात, किंवा परदेशात साडी नेसून लक्ष वेधून घेतात. त्या अमुक अमुक अभिनेत्रींनी परदेशात नेसलेल्या साड्यांचे तर भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असते. साडी नेसल्याचा पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळाला, म्हणजे ख्रिस्त पूर्व २८००-१८०० च्या सुमारास, सुरुवातीस फक्त सुती साड्या होत्या, नंतर रेशमाचा शोध लागल्यावर रेशमी साड्या तयार होऊ लागल्या, गेल्या शतकापासून तर कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या साड्यांची देखील चलती सुरु झाली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आणि क्वचित ठिकाणी श्रीलंकेमध्ये सुद्धा साड्या वापरल्या जातात.

भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतंत्र साडी संस्कृती आहे, म्हणजे फक्त साड्यांचा प्रकार नव्हे तर साडी घालण्याच्या पद्धती देखील, महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराथी, कोंकणी, केरळी, माडीसार( तमिळ अय्यांगरी ९ वारी साडी), निवी (आंध्र प्रदेशातली), कोडगू (कुर्गी पद्धतीची ), आसामी, मणिपुरी, खासी असे अनेक पारंपारिक प्रकार तर आहेतच पण डिझाईनर साड्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदधतीने आजकाल नेसवल्या जातात.  

जसं तामिळनाडू म्हणल्याबरोबर बायकांना कांजीवरम, उत्तरप्रदेश म्हणाल्यावर बनारसी, लखनवी साड्या, आंध्र प्रदेश म्हणल्यावर नारायणपेट, धर्मावरम, मंगलगिरी, उप्पडा, वेंकटगिरी सिल्क, गडवाल, मध्य प्रदेश मधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, राजस्थान गुजराथ मधील बांधणी, गुजराथ मधीलच पटोला, बंगाल मधील सुती साड्या, कांथा सिल्क साड्या, बांगलादेश मधील मलमलच्या साड्या, टसर सिल्क, आसाम मधील मूगा सिल्क,  संबळपूर, बेहरामपूर सिल्क, इक्कत या ओरिसा मधील साड्या, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, आणि इरकल, केरळ मधील पारंपारिक ऑफ व्हाईट, सोनेरी काठाच्या साड्या काश्मीर मधील सिल्क साड्या, पंजाब मधील फुलकारी किंवा हातानी विणकाम केलेल्या साड्या, बघावी तेवढी यादी वाढत जाते. यातल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यावर एखादी साडी घेणं हे भारतीय एकात्मतेसाठी गरजेचंच असतं.

भारतामध्ये पर्यटन किंवा गावोगावी लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये गेला बाजार आपल्या शहरांमधल्या दुकानांमध्ये यातल्या बऱ्याचशा प्रकारच्या साड्या मिळतातच, आणि याखेरीज अनेक प्रकारच्या साड्यांनी दुकानं कायम भरलेली असतात, मग कधी रंग आवडला म्हणून, कधी काठ आवडले म्हणून, कधी पदरावरची नक्षी आवडली म्हणून, कधी हा रंगच माझ्याकडे नाही, किंवा ही रंगसंगती नाही. कधी सगळ्या जणी एक सारख्या साड्या घेऊ म्हणून घेतलेली, कधी, ( बऱ्याच वेळा ?) भेट म्हणून आलेल्या साड्या, अशा साऱ्या साड्यांनी कपाट वाहून चाललेलं असतं, तरीही साडीचा मोह हा कधी सुटत नसतो, रस्त्यावर सहज फिरताना, किंवा कोण एकीच्या अंगावरची साडी आवडली म्हणून साडीची खरेदी कधीच थांबत नसते.

साड्या बायकांना एकत्र जोडतात,  त्यांच्यात संभाषणं तयार करवतात, नैसर्गिक औत्सुक्याला खतपाणी घालतात भौगोलिक, भाषिक अंतर मिटवतात, पुरुषांना बायकांचं मन जिंकण्याची सोपी संधी देतात, संस्कृती जपण्याचे, जोपासण्याचे कामा करतात, हस्त शिल्प कारागिरांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात, बायकांचे सौंदर्य खुलवतात. इतकं सगळं करणाऱ्या बहुगुणी साड्या जरा चुकून जास्तच असल्या घरात तर काय झालं, शेवटी मनाजोगती साडी मिळाली तर बाई खुश, बाई खुश तर घर खुश आणि घर खुश तर दुनिया सलामत. सहा वारांमध्ये लपलेली असतात किती तरी गुपितं, वर्षे गेली, साडी विरली तरी तशीच जपलेली त्यामुळेच घरोघरची साड्यांची कपाट फक्त कपाट नसतात ती असतात साड्यांची म्यूझियम.


Monday, November 7, 2016

गोष्ट एका 'केस' ची

मैत्रीण खूप वर्षांनी भेटत होती. फोटो मधून एकमेकींचे दर्शन घडत होतं, पण फोटो मधेय बऱ्याचदा आपण आपल्याला जे आवडतं, जे दाखवायचं असतं तेच दाखवतो. कॉलेज च्या दिवसापासुनची ही मैत्रीण, म्हणजे अगदी एखादा मुलावर टप्पे टाकण्यापासून घरी वेळ मारून नेण्यापर्यंत सारे काही सोबत केलेली. कॉलेज च्या दिवसात असे मित्र मैत्रिणी असतातच ज्यांच्यामुळे आयुष्यात पुढे आठवणीना वेगळा रंग, गंध, स्पर्श असतो. आयुष्य व्यापून उरतात त्या आठवणी. त्यामुळे हे मैत्र उघडं नागडं असतं, तिथं काही लापवाछपवी नसते. प्रत्यक्षात बघितल्यावर मैत्रीण एकदम बोलून गेली
‘अग हे काय? एवढेसे केस?’
माझ्या झड झड झडणाऱ्या केसांकडेच तिचं पहिलं लक्ष गेलं. हाय रे दैवा, इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य शेवटी समोर आलंच होतं. मीच मग पलटवार करत म्हणलं,
‘अग एवढे तरी केस राहिलेत बघ अजून , पूर्ण टकली व्हायला वेळ आहे.’ आणि मग हा हा हा करत वेळ मारून नेली.
वेगवेगळे विषय निघत गेले, गप्पा रंगत गेल्या, पण तिच्या डोक्यातून काही माझे केस जात नव्हते, आणि केसांबद्दल विचार करून करून माझे केस गळून गेले होते. वाढत्या वयाबरोबर माझे केस माझी सोबत सोडत चालले होते. वयाबरोबर पांढरे होत जाणारे केस माहीत होते, पण वयाबरोबर साथ सोडणारे केस मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक वेळी काही तरी नवीन कारण मिळायची केस गळायला, मग त्यावरती नवीन काही तरी उपाय.
शाळेत कॉलेजात असताना आईच्या शाळेच्या धाकानी तरी तेल पाणी व्हायचं, पण मग शाळेतून कॉलेजात गेल्यावर शिंग फुटतात त्यामुळे, केस कापून शिंगाना खास जागा केली, मग एकदा लागलेली कात्री सहज सुटत नाही म्हणत ती कात्री दर सहा महिन्यांनी आगत गेली, कधी कात्री कधी रंग. केस म्हणजे एक प्रयोग शाळा होत होती. मग प्रयोग कमी कमी होत गेले आणि केसांचा आकार, घनता देखील.
मग कामाचा, आयुष्याचा ताण, नानाविध कारणं लागत गेली, गावं बदलली, देश बदलले, खाणं बदललं, साध्या साध्या सवयी बदलत गेल्या आणि केशरचना देखील! मग तेल बदललं, शाम्पू बदलले, कधी कुठल्या पावडरी लावून पाहिल्या, कडीपत्ता, ते मेथ्या, अंड ते दही सारं काही खावून, लावून, वापरून झालं, पण केसांनी मात्र वाढायला पसरायला पूर्णपणे नकार दिला होता. कधी वर बांधून , कधी वेणी मध्ये लपवून त्यांचं अस्तित्व मी लपवू पाहत होते. जेवढे जास्त प्रयत्न तेवढ जास्त दुःख! जाहिरातीना भुलून वापरलेल्या तेल, शाम्पू नी बिलाचा आकडा वाढायचा पण केस मात्र जिथे आहेत तिथे.
लहानपणी आईकडे केस कापू दे, छोटे करायचेत म्हणून हट्ट करावा लागायचा आणि आता केस वाढावेत म्हणून हट्ट धरावा लागतोय. आयुष्य बहुदा हेच असतं, जेव्हा जे असतं, तेव्हा त्याची किंमत कळत नाही, आणि मग जेव्हा ते हातातून (डोक्यावरून) निसटून जायला लागतं तेव्हा मात्र त्याला घट्ट धरून ठेवण्याची खटपट केली जाते. कधी कधी शांतपणे विचार केला तर वाटतं, का करायची ही खटपट, द्यावं सोडून सारं, सुंदर दिसण्याची एक पायरी म्हणजे सुंदर केस, पण मग बिनाकेसांच्या सौंदर्याच्या काय? वर्षानुवर्षे मांडत असलेल्या गृहितकांना, मापकांना कुठेतरी छेद दिलाच पाहिजे ना? सौंदर्याच्या कल्पनाच जर आपण किमान आपल्यापुरत्या तरी बदलल्या तर? काही कारणानी गमावले केस तर? आयुष्य थांबत तर नाही ना तिथं? सौंदर्याच्या कल्पना जेव्हा बदलून जातात तेव्हा बदल असते आपली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर. आणि मग न दिसलेल्या अनेक गोष्टी दिसायला, जाणवायला लागतात.
गळणाऱ्या केसांमुळे मिळालेलं हे शहाणपण जेव्हा मैत्रिणीबरोबर वाटत गेले तेव्हा  ती सहज  बोलून गेली, ‘टकले, बहुदा केस गेल्यामुळे मेंदूला छान ऊन मिळत असावं, त्यामुळे, विचारांचं पीक जरा बरं वाढतंय!’ आणि मला बाल बाल बचावल्याच नवं समाधान मिळालं!



टीप: बिनाकेसांच्या सौंदर्याच्या एका सुंदर जाहिरातीची लिंक सोबत जोडत आहे. जेव्हा जेव्हा ही जाहिरात बघते तेव्हा तेव्हा हे सौंदर्य मला अजूनच भावतं...




Friday, October 28, 2016

दिवा जळो, पीडा टळो...

आजच सगळ्या क्लाएंटला दिवाळीच्या  भेटवस्तू द्यायच्याच होत्या, तर मग ती तिची दिवाळी आनंदात साजरी करू शकणार होती. तिची नुसती धावपळ उडाली होती. कितीही ठरवलं, तरी कुठे तरी दोन पाच मिनिटं निसटतात, आणि मग पुढचा सगळा हिशोब कोलमडायचा. तिनी खरंतर निम्म्याहून जास्त भेटवस्तू द्यायचं काम हाताखालच्या लोकांवर सोडलं होतं, पण अशी काही जण होती ज्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या वस्तू देणं गरजेचं होतं. सकाळी ९ ला जेव्हा ती घरातून बाहेर पडली होती तव्हा तिनी सगळा वेळेचा हिशोब मांडून आपण ६ पर्यंत मोकळे होऊ असा अंदाज केला होता. पण पहिल्याच ठिकाणी तासभर थांबावं लागलं आणी मग तिची आतल्या आत चिडचिड सुरु झाली. आज लवकर जाऊन किमान लाडू तरी करूयात असं अगदी मनापासून ठरवलं होतं. किती दिवसात तिनी स्वतःला आवडत असूनही बेसन लाडू केले नव्हते. स्वैपाकवाल्या काकूच स्वैपाक करायच्या. रविवारी मात्र ती अगदी ठवून एखादा तरी पदार्थ करायचीच.

विकत आणलेल्या फराळ कदाचित घरच्या पेक्षा जास्त चांगला असेल, पण घरी फराळ करताना जो वेळ, प्रयत्न, प्रेम घातलं जातं त्यामुळे त्या फराळाची चव बाहेरच्या अगदी घरच्या सारख्या लागणाऱ्या फराळाला कधीच येत नाही. कितीही कामा असलं, तरी ती दर दिवाळीला लाडू चिवडा तरी घरी करायचीच. वेळ असला तर चकली, करंज्या. तासभर वाट बघता बघता ती दोन चार खाद्य पदार्थांचे ब्लॉग चाळत होते. फेसबुकवरचे फोटो पाहून आपण केलेच पाहिजे मन अजून ठामपणे सांगत होतं. एका ठिकाणहून दुसरीकडे पळत पळत ती तिचं दिवाळीच टारगेट पूर्ण करत होती. जेवण ही असंच एका टॅक्सीमध्ये बसून तिनं संपवलं होतं. तशी तर मुंबई रोजच पळत असते, पण दिवाळीच्या दोन चार दिवस आधी ती उसेन बोल्टच्या वेगानं धावते असं तिला वाटायचं.

दिवाळी एका नाही दोन नाही तब्बल पाच दिवसांचा सण! निवांत साजरे करा तुमच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण. आपण पैसे कमावतो ते जगण्यासाठी, आणि जगतो ते जीवाच्या माणसांसोबत, दिवाळी असते ती याचीच जाणीव करून द्यायला. एकत्र राहणं, मिठाई तयार करणं, खाणं, गप्पा मारणं ही खरी दिवाळी असते. मनाच्या गप्पा रंगल्या की समाधानाचे दिवे आपोआपच लागतात. ह्या भेटवस्तू देणं घेणं एक निमित्त भेटण्याचं, आपले संबंध असेच राहोत, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सांगण्याचं एक निमित्त. दर वर्षी या भेटवस्तू निवडायचं काम तिनी तिच्याकडे ओढून घेतलं होतं. तिला आवडायचं ते. दर वेळी काही तरी वेगळा विचार करून कुठून कुठुन काय काय शोधून काढायची. या वेळी तिनी पूर्वी घरी बनवायचे तसे कापडाचे मोर चिमण्या,वेगवेगळे पक्षी एका आश्रमातून मिळवले होते. हातांमधली कला हृदयाला साद घालायची. जुनं सारं काही फिरून परत येतंच असतं. घरात, दारावर, गाडीत कुठेही टांगता येतील असे ते हँगिंग होते.

शेवटची भेट आटोपता आटोपता सात वाजून गेले होते, परत लोकल, बस पकडणं तिच्या अगदी जीवावर आलं होतं. तसे घर जास्त लांबही नव्हतं. एक्सप्रेस वे नि गेलं तर जेमतेम ३०, ३५ मिनिटात घरी पोहोचली असती, म्हणून तिनी सरळ उबर बोलावली. दोन मिनिटात ड्रायव्हर आला देखील. गाडीत बसल्यावर एक दोन चार मिनिटं बोलून ती नेहेमी ड्रायव्हर चा अंदाज घ्यायची. हा पठ्ठ्या विदर्भातला एका छोट्या गावातला होता. गावाकडं तशी फारशी शेती नव्हतीच. बापानी आत्महत्यांचं पीक यायच्या कैक वर्ष आधीच आत्महत्या केली होती. एक छोटी बहिण आणि आई गावाकडे होते. तू दिवाळीला गेला नाहीस घरी. तिनी सहज विचारलं. जरा भरल्या डोळ्यानीच त्यांनी सांगितलं बहिणीचं लग्न आहे, पुढच्या महिन्यात, तेव्हा पैसे लागतील आणि रजा सुद्धा म्हणून आत्ता नाही गेलो. त्याच्या आवाजात विषादही होता, आनंदही होता. पुढंच संभाषण तो बोलत होता आणि ती ऐकत होते. तिला माहित असलेलं पण तिनी कधी न पाहिलेलं जग तो तिला दाखवू पाहत होता.


उतरताना एक जादाचं असलेलं मोराचं हँगिंग आणि तिला मिळालेला मिठाईचा एक बॉक्स तिनी जेव्हा त्याच्या हातात ठेवला तेव्हा त्यानी मनापासून धन्यवाद देऊन घ्यायला नकार दिला, पण मग जेव्हा ही एका बहिणीकडून दिवाळीची भेट म्हणल्यावर त्याला तिचा आग्रह मोडवेना, तिथं भर रस्त्यात त्यानी भरल्या डोळ्यांनी मला वाकून नमस्कार केला तेव्हा उगाचच आपण दुसरे कोणी तरी आहोत असं तिला वाटलं. दिवाळी चा दिवा अजून घरी लावला नसला तरी तिच्या आतला दिवा आपोआप लागला होता. ही दिवाळी नक्कीच आठवणीतली दिवाळी ठरणार होती. 

Thursday, October 27, 2016

दिन दिन दिवाळी....

त्यांच्या भावकीतलं कोणीतरी गेलं म्हणून त्यांच्या घरी यंदा दिवाळी नव्हती एवढंच त्याला कळल होतं. तसंही दिवाळीला बापाकड पैसा असला, तो प्यायला नसला , त्याचा मूड बरा असला तर नवा कपडा यायचा, नाहीतर मामा शहरातल्यांचे कपडे आणायचे तेच त्याचे नवीन कपडे. आई चिवडा, लाडू क्वचित शंकरपाळे करायची, पण गावभर उंडारायला मिळायचं, कोणाच्याही घरी गेलं तर काही तरी खायला नक्की मिळायचं त्यामुळं त्याला दिवाळी आवडायची. त्यात किल्ला करण्यात त्याचा कोणी हात धरायचं नाही. प्रत्येकाला वेगळ काही तरी तो करून द्यायचा त्यामुळे त्याला खास भाव होता. मग त्या बदल्यात कधी दोन चार टिकल्यांची बंडल, नाग गोळ्याचं पाकीट, फराळाचा जादा खाऊ असं काही काही तो वसूल करायचा. बघून बघून आकाश कंदील पण करायला शिकला होता, यावर्षी त्यांच्या घरावर तो स्वतःच केलेला आकाशकंदील लावणार होता, पण सगळंच फिस्कटल होतं.

गणपतीत त्याला १३ पूर्ण झाली होती. मामाकडे शहरात जायची त्याला खूप इच्छा होती. मामा दर वेळी त्याच्या सोसायटीच्या गंमती सांगायचा, तिथल्या मुलांबद्दल सांगायचा तेव्हा त्याला कित्येकदा वाटायचं, मामा ढील सोडतोय. पण मग मामा जुने कपडे, पुस्तक आणायचं तेव्हा त्याचा विश्वास बसायचा. त्याला ते जगच वेगळ वाटायचं. या सुट्टीत तरी मामाकडे जायचंच त्यानी मनाशी खुणगाठ बांधली होती. आणि आत्ता दिवाळीच्या निमित्ताने ती संधी पण चालून आली होती.
शहरात पैसे कमवायला गेलेला त्याचा मामा मुंबईमध्ये  एका सोसायटीमध्ये कामाला होता. एक छोटीशी खोली पण दिली होती त्या लोकांनी त्याला राहायला. गावात छोटी मोठी कामं करून साचवलेल्या पैशातून या सुट्टीत मुंबईला जायचंच त्यानी पक्क केलं होतं, त्यामुळे सण नाही हे त्याच्या पथ्यावर पडलं होतं. आईचा प्रश्न नव्हता, बापाला कसं पटवायचं हा खरा प्रश्न होता. नशेत असलेल्या बापाचे पाय दाबून त्यानी हळूच प्रश्न सोडून दिला होता, बाप आपण कशाला हो म्हणतोय हे कळण्याच्या धुंदीतच नव्हता. सकाळी त्यानी बापाला आठवण करून दिली त्याच्या शब्दाची तेव्हा चक्क तो शुद्धीत असूनही हो म्हणाला तेव्हा त्याच्या त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

जेव्हा त्यानी मुंबईचे मोठे रस्ते, लोकच लोकं पाहिली तेव्हा त्याला अगदी सशासारख वाटलं. तो भांबावलेल्या नजरेनीच सगळं पाहत होता. आपण इथं हरवलो तर त्यांनी मामाचा हात अजून घट्ट पकडून ठेवला. मामाच्या कामाच्या ठिकाणी तर त्या मोठ्या इमारती , मोठ्या गाड्या पाहून त्याला आपण दुसऱ्याच कुठल्या जगात आलो की काय असे भास होत होते.  सगळ्यांच्या घराची रोषणाई, झगमगणारे दिवे, आकाशकंदील त्याला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. रात्री जेव्हा सारे जण फटाके उडवायला खाली आले तेव्हा तर त्याला वाटलं सगळ्या गावातले फटाके इथे आलेत की काय.

फटाक्यांचे इतके प्रकार त्यानी कधीच पाहिले नव्हते. दिवाळीला शकून म्हणून फटके उडवायचे, शहरातलं पाहून पाहून भुईनळी, भुईचक्र, बाण असे काय काय मिळायचं. पण इथं तर बघावा तो प्रत्येक फटका त्याला नवीन वाटत होता. त्याला हे सारं कधी घरी जाऊन सांगेन सगळ्या मित्रांना सांगेन असं झालं होतं. ती फटाक्यांची रोषणाई बघत बघत तो कधी पुढे गेला होता त्यालाच कळलं नव्हतं. मामानी फटके लांबून बघ सांगितलं होतं, पण संमोहित झाल्यासारखा तो वर बघत समोर बघत फटाके उडवतात त्या जागेपाशी जाऊन पोहोचला होता. खरं तर ती जागा मोठ्या माणसांची, त्यांच्यासारख्या नोकर माणसांची नाही, मामानी सांगितलं होतं, पण ते फटाक्यांच्या आवाजात कुठेच विरून गेलं होतं. त्याला तिथल्या काही फटाक्यांना हात लावायचा मोह होत होता. मामानी फटाके आणून देईन सांगितलं होतं पण मनाला धीर कुठे असतो, आकाशात जाऊन वेगवेगळ्या रंगाची उधळण करणारा बाण असतो तरी कसा बघावा म्हणून त्यानी बिचकत बिचकत तिथल्या एका लांब नळीच्या बाणाला हात लावला.

‘कोण रे तू?’ कोणीतरी हटकलेच.
‘मी ..’ त्याची बोलतीच बंद होत होती. खरं बोलावं की खोटं बोलावं संभ्रम सुटता सुटत नव्हता. तो मान खाली घालून मामाचा धावा करत होता.
धावा ऐकल्यासारखं मामा तिथं पळत आला.
‘ माफ करा हा माझा भाचा आजच गावावरून आलाय. त्यांनी कधी हे असे मोठे फटाके पाहिले नाहीत म्हणून चुकून हात लावला असेल.’
‘लेका अरे आणतो म्हणालो होतो ना मी, आधी त्यांना सॉरी म्हण. परत असं नाही ना करणार?‘
तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो सॉरी म्हणाला आणि मान खाली घालून तिथेच उभा राहिला.
‘बाबा माझे हे रॉकेट मी याला देऊ, आम्हाला शाळेत सांगितलंय, you should spread happiness by giving. मी खुप फटाके उडवलेत, यानी अजून काहीच उडवले नाहीत ना.’


ते वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पसरला होता. जेव्हा त्यानी पहिल्यांदा त्या नवीन दोस्ताच्या मदतीने पहिल्यांदा तो मोठ्ठा बाण आकाशात सोडला तेव्हा त्याला सगळं आकाश त्याच्या आनंदात न्हाहून निघाल्यासारखं वाटतं होतं. त्या नवीन दोस्तानी आणि यानी मिळून अजून काही फटाके उडवले आणि दिवाळीचे दिवे एकमेकांच्या हृदयात लावले होते.       

Sunday, October 23, 2016

पणतीचं वलय

माईंनी मुलांना त्यांच्या खोलीत बोलावलं तेव्हा सारेच जरा गोंधळले होते. आता काय सांगायचं असेल माईला? आपलं कोणाचं काही चुकलं तर नाही ना? सगळेच जण दोन चार दिवसात आपण कोणाला काही बोललो नाही ना आठवत होते. नाना अचानक गेले म्हणून सगळेच धावत घरी आले होते. असे खूप वर्षांनी तिन्ही भाऊ आणि बहिण घरी जमले होते. चालते बोलते नाना गेले याचे दुःख तर होतेच पण स्वाभिमानी नानांना जर दुसऱ्या कोणाकडून सेवा करून घ्यावी लागली असती तर मारान यातनांपेक्षा जड गेले असतं, त्यामुळे आलं ते मरण चांगलंच आलं असं सगळ्यांना वाटत होतं. माई पण शांत स्थिर होत्या. नानांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी करायचे नव्हते. त्यामुळे एक दोन दिवसात सगळेच आपापल्या घरी जायचं ठरवत होते. अशात माईंनी कशाला बोलावलं असेल, सगळ्यानांच प्रश्न पडला होता.

तिघा भावांपैकी एक जण माई नानांबरोबर राहायचा तर दुसरा त्याच गावाच्या दुसऱ्या बाजूला राहायचा. धाकटा असूनही सर्वात श्रीमंत असलेला भाऊ जरा लांबच होता, फारसा यायचा नाही, बहिण जवळच्या गावात दिलेली होती. माईच्या एका फोन सरशी सारे बायको मुलांसह आले होते. नाना माई मध्ये नाना कायम कर्मवादी होते. देव धर्म या निव्वळ संकल्पना आहेत म्हणायचे. त्या उलट माई कायम देव सण वारात बुडलेली.  नाना रागीट तापट तर माई एकदम शांत. नाना बोलघेवडे तर माई जरा घुमीच. दोघे दोन वेगळ्या पध्दतीचे होते, पण तरीही त्यांचे वाद मुलांनी कधी पाहिले नव्हते. नानांची इच्छा म्हणून माईंनी मंगळसूत्र देखील उतरवलं नव्हतं.
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की मी असं तुम्हाला माझ्या खोलीत का बोलावलं म्हणून ना. माईनी बोलायला सुरुवात केली.

आमच्या दोघांपैकी कोणी तरी आधी जाणार हे नक्कीच होते. माझी खूप इच्छा होती सवाष्ण जाण्याची पण नानांची कर्मश्रद्धा माझ्या श्रद्धेपेक्षा वरचढ ठरली. जशी जन्म ही नैसर्गिक गोष्ट आहे तशीच मृत्यू देखील. मी काय नाना काय आम्ही अगदी समृद्ध आयुष्य जगलो. समाधानी आहोत आम्ही. आमची मुलं व्यवस्थित धडधाकट आहेत. आई वडील म्हणून पार पाडायच्या कोणत्याही कर्तव्यात आम्ही कमी पडलो नाही असं आम्हाला तरी वाटतं. त्यांची इच्छा म्हणून आपण कोणतेही विधी केले नाहीत. आणि दुखवटा पण नाही पाळणार. मुलांनो खरंच आत्ताही आणि मी गेल्यावरही दुःख करू नका. आमची कोणतीही आशा अपेक्षा तुमच्याकडून आयुष्याकडून उरलेली नाही. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी सण साजरा करा. केवळ हाच नाही तर इतर सारे सण समारंभ देखील साजरे करा.

‘माई अग पण लोकं काय म्हणतील, अजून पंधरा दिवस पण झाले नाहीत आणि आम्ही सण साजरा कसा करायचा ‘ भीत भीत लेक म्हणाली.

‘ तुझ्या प्रेमविवाहाच्या वेळी जर नाना असंच वाक्य बोलले असते तर तुझं लग्न झालं असतं का? हे बघा मुलांनो काही रूढी परंपरा चालत आल्या म्हणून आंधळ्या सारख्या पाळू नका. नाना ८० वर्ष जगले, आता ते गेले तर तर आपण वर्षभर शोक म्हणून सण करायचे नाहीत, अमकं करायचं नाही वगैरे मलाही पटत नाही. जर नानांची तुम्हाला आठवणच ठेवायची असेल तर त्यांना आवडायच्या त्या गोष्टी करा, त्यांच्या नावानी गरजूंना मदत करा. आठवण ही सहज आली पाहिजे, त्यागातून, काही गोष्टी सोडण्यातून आली तर तो जबरदस्तीचा राम राम असतो. दिवाळीचा सण हा तर खरा अंधारातून रस्ता काढण्याचा. आपल्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचा उत्सव! आपल्या घरात मुलबाळ आहेत, त्यांना नाराज ठेवून नानांची आठवण काढलेली नानांनाही चालणार नाही आणि मलाही. आयुष्याचा जोडीदार गमावल्याच दुःख मलाही आहे, पण ते दुःख सतत उगाळल्याने कमी होणार नाही. शरीराने गेले तरी नाना आपल्यातच आहेत, त्यांच्या आठवणी, विचार शिकवण आपल्या सोबत कायम असणार आहेत.’


माई बोलत होती, अगदी मनापासून बोलत होती. आणि मुलांना तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात नानांचा आभास होत होता. तिच्या चेहऱ्यावर दिवाळीतल्या पणतीचे तेज पसरलं होतं. 

Thursday, October 20, 2016

निखळ आनंदाचा मंत्र

दसरा आणि दिवाळी मधल्या पंधरा दिवसांची मजाच वेगळी असते. एकीकडे नवरात्र, दसऱ्यातून मोकळं होता होता वेध लागत असतात, फटाके, आकाशकंदील, पणत्या, किल्ला, फराळ, नवीन कपड्यांचे. पूर्वी फराळाचे सगळं दिवाळी सोडून क्वचितच वर्षाकाठी केलं जायचं, त्यामुळे दिवाळीला ते करण्यातलं आणी खाण्यातलं नावीन्य टिकून राहिलेलं असायचं. आता वर्षभर दिवाळी असल्यामुळे नवीन कपडे आणि लाडू, चिवडा, चकली, अनारसं चं फारसं कौतुक उरतच नाही. नशिबानं रोजच आकाशकंदील लावत नाही किंवा पणत्या लावत नाहीत म्हणून त्याचं तर ओत्सुक्य अजून टिकून आहे. किल्ला देखील अनेक प्रशिक्षित बालसंगोपनतज्ञांच्या मुलांनी मातीत, पाण्यात खेळल्यामुळे त्यांची मानसिक जडण घडण नीट होण्यास मदत होते  असं ठासून सांगितल्यामुळ परत ‘डिमांड’ मध्ये आले. तरीही माती कुठून मिळणार, सगळं घाण होईल त्यापेक्षा आपण विकत किल्ला आणूया म्हणणारे ही असतातच.

दिवाळी साठी घर साफसूफ करताना अगदी माळे सुद्धा आवरायला काढले. या माळ्यांमध्ये एक जादूची पोतडी असते. अनेक आठवणी, अडगळी, मोसमी सामान शेजारी शेजारी दाटीवाटीन गुण्यागोविंदान राहत असतं. कधी खोक्यात कधी गाठोड्यात असलेल्या या सामानात अनेक तुटक्या, फाटक्या वस्तू असतात. खरंतर आठवणी पुसता येत नाहीत, विसरता येत नाहीत पण आपल्याला उगाच वाटत असतं या गोष्टींशी निगडीत आठवणी विरून जातील, हरवून जातील जर आपण हे टाकून दिलं तर... मग जुनी सांगाडा उरलेली बाहुली, कुठल्यातरी मैत्र दिनाला मिळालेली छोटेशी पोर्सेलीनची भेट वस्तू,  कुठल्यातरी प्रदर्शनातून आणलेल्या काही शोभेच्या वस्तू, जुनी हस्तलिखित, आजीच्या, आजोबांच्या जपून जपून ठेवलेल्या गोष्टी, जुन्या पाईपचा एक तुकडा, कुठला तरी बॉक्सचा उरलेला थर्माकोलचा तुकडा, एक्स्ट्रा म्हणून वर ठेवलेली बादली, फिरायला गेल्यावर तिकडून कोणी तरी आणून दिलेले शंख, आणि असंच काय काय, अजून जपून ठेवलेली शाळेतली कंपासपेटी, भेट म्हणून मिळालेल्या देवी देवतांच्या मुर्त्या, कशाकशावर फ्री म्हणून मिळालेल्या टिनपाट गोष्टी सारी अडगळ दर वर्षी उघडली जाते, प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवला जातो, काही आठवणींचा उजाळा केला जातो, आणि मग नावापुरत्या दोन चार गोष्टी बाहेर काढून टाकून, झाडू फिरवून घेऊन , आवश्यक तिथं पुसून घेऊन उठत असताना, लेक आला. त्याच्या दृष्टीने हा सारा खजिनाच होता. आजवर त्याला या साऱ्या पसाऱ्या पासून लांब ठेवलं होतं. पण आज त्यांनी घुसखोरी करून प्रवेश मिळवला होता. आणि हा हल्ला परतवण अवघडच नव्हे तर अशक्य होतं. त्याच्या छोट्या डोळ्यात मला जणू विश्वाचं दार उघडल्याचा आनंद दिसत होता. तिथला रिकामं खोकं, पाण्याचा पाईपचा तुकडा, मुर्त्या, काही डबे, काठी, थर्माकोल जुने तुटके आकाशकंदीलकाय काय तरी त्यांनी उचललं त्यानी आणि मी नको नको म्हणत असताना खेळायला घेतलं. खरं तर तो कचराच पण मला टाकवत नव्हता आणि ठेववत ही नव्हतं. पण मुलानी तो प्रश्न काही सेकंदात सोडवला होता. मुलांसाठी आयुष्य किती साधं सरळ असतं. त्यांना कधीच कुठे कचरा दिसत नाही. जे काही मिळेल त्यातून ते नवा खेळ मांडतात. महाग मोलाची खेळणी त्यांना जेवढी प्रिय असतात तेवढीच ही टाकाऊ खेळणी.

थोड्यावेळानी मुलांनी त्या कचऱ्यातून वसवलेलं एक गाव बघून वाटलं. आपल्या मनातल्या कचऱ्यातून, द्वेषातून, रागातून आपण असंच काही का नाही करू शकत? किती गोष्टी धरून ठेवतो. मनाचा माळा भरून वाहत असतो, आपण उगाचच अपमानाचे, भांडणाचे क्षण मनात धरून ठेवून बसलेलो असतो. कधी तरी ते साफ करावे लागतात, नाहीतर जाळी जळमट साचून, धूळ बसून मनाचा पोट माळा भरून रहाटू, तिथे मग चांगल्या आठवणी, भारलेले क्षण, कौतुकाची फुलं काही काही ठेवायला जागाच शिल्लक राहत नसते. मग या दिवाळीला हा मनाचा माळा साफ करायला सुरुवात करूया? कदाचित ही अशी साफसफाई केल्यावर मिळणारा दिवाळीचा आनंद हा निखळ आनंद असू शकेल.  


Monday, October 17, 2016

चौथा कोन

‘दुसऱ्या वेळी आई होण्याचा आनंद वेगळाच असतो, अजून एक जीव पोटात वाढवण्याचा आनंद वेगळाच असतो.’ जाहिरातीमधील ती एकदाच आई झालेली प्रसिद्ध अभिनेत्री सांगत होती. पण खरेच जर अस असेल तर ही बयाच दुसरा चान्स का घेत नाही? रामा रामा हिला काय जातंय सांगायला, पोरं सांभाळायला बायका असतील. हिनं पोरासाठी एक तरी रात्र जागवली असेल का? आमच्या मेल्या ३६५*२ रात्री फक्त पोरांच्या रडण्यात, चड्ड्या बदलण्यात, आणि पोरगं उठणार तर नाही ना या धास्तीत झटपट उरकून टाकण्यातच गेल्या. आता सवय झाली म्हणा किंवा पोरगं जरा मोठं झालंय त्यामुळे रात्री बर झोपते, पण तरीही मध्ये मध्ये एखादी रात्र निघतेच, पोरगं जागवतच.
हिला काय जातंय म्हणायला सेकंड चान्स घ्या म्हणून, सगळी सुखं असून ही एकातच गार!
‘अग पण एकाला दोन असलेली बरी, एकमेकांच्या नादानी खेळतात, आणि पुढ मागं एकमेकांना साथही देतात.’
-आणि नसलेल्या संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठली तर?
‘पण मुलांना सोबत लागते ना? खेळायला कोणीतरी लागतं, किती वेळा मुलं जाणार दुसर्यांच्या घरी  खेळायला?’
-वेळ आहे कुठं आताच्या मुलांकडे, शाळा, बाकीच्या अॅक्टीव्हिटीज. एकवेळ झोपले नाहीत तरी चालेल, पण मुलांना डान्स, गाणं, स्केटिंग, स्विमिंग, बॅडमिंटन , पेंटिंग, योगा आणि अम आणि तम आलंच पाहिजे
‘आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची संख्या वाढली पाहिजे, ते *** धर्माचे लोक बघा, एकेका घरात चार चार पाच पाच मुलं जन्माला घालतात, बाईच्या हातात एक, कडेवर एक, आणि पोटात एक असतं. अशानं आपला, धर्म, जात संकटात येईल.’
-या असल्या झ्याट समजुतींपायी आम्ही आमची परवड का करायची? धर्म जात टिकतात ते त्यांच्या मूल्यांमुळे, लोकांमुळे नाही, आमचा नाही बाई विश्वास या असल्या कश्याकश्यावर.
‘म्हातारपणाची काठी म्हणून अजून एक मूल असू द्यावं, काय सांगावं एकानी नाही बघितलं तर दुसरा बघेल, किंवा एकावरच का भार टाकायचा? दोघं आलटून पालटून बघतील.’
-झालंच बाजारात तुरीची गत, आणि कशावरून दोघंही बघणार नाहीत, ती ही एक शक्यता आहेच ना, आम्ही काही पोरांवर अबलंबून राहणार नाही, आम्ही त्याला वाढवलं म्हणून त्यानं आम्हाला म्हातारपणी बघायचं असं काही कॉन्ट्रॅक्ट आम्ही जन्माच्यावेळी केल नव्हत.
‘अय्या एकाच मुलगा, पण घरात मुलगी हवीच, दुसरा चान्स घ्या की घराला कसं घरपण येतं.
-म्हणजे आपल्याला हवं ते अपत्य ठरवून जन्माला घालता येत? कित्ती छान पण जर चुकून परत मुलगाच झाला तर? आणि घराला घरपण द्यायला फर्निचर पुरत असं मला वाटत होतं.
‘एकाला दोन पाहिजेतच, उद्या देव न करो पण जर तुमच्या एकुलत्या एका मुलाला काही झालं तर? दुसरं मूल तरी सोबत असले ना? त्यासाठीच पूर्वीची लोकं भरपूर मुलं होऊ द्यायची. एक दोन तरी धडधाकट जगातील म्हणून.
-हम्म्म्म जे जेव्हा व्हायचं ते तेव्हा होणारच आहे, आणि जर या दुसऱ्या मुलाला जन्म देताना काही कॉम्पलीकेशन्स होऊन  मी मेले तर? दोन्ही पोरं किंवा एक पोर तर नक्कीच अनाथ होईल ना.
‘पहिल्यावेळी पहिलेपणाचा आनंद असतो, पण दुसऱ्यावेळी डोळस पालकत्व करता येतं.’
-आणि मग जर मुलांनी आमच्यावर भेदभाव केल्याचा आरोप केला तर?
या सगळ्यावर कडी करणारी एक जमात असते, जे शास्त्र, वैद्यक शास्त्राच्याही पल्याड पोहोचलेले असतात.
तुम्ही ते चायनीज कॅलेंडर का नाही बघत? त्यात वय घालत की कोणत्या महिन्यात मुलगा, मुलगी होऊ शकतात हे कळत. म्हणजे कसं तुम्हाला प्लॅन करून कुटुंब चौकोनी करता येतं.’
-अरे वाः हे म्हणजे शेताले पीक काढण्यासारखच झालं की, आम्ही पहिले मोत्याची शेती करून बघतो, आणि मग या माणसांच्या शेतीकडे वळतो. चायनीज लोकं हेच वापरून मुलं जन्माला घालतात का?
‘मग अजून एकांनी ‘योगा’योगाची गोष्ट सांगितली. तुम्ही अमुक स्थितीत करून बघा, नक्की इच्छित फळ प्राप्ती होईल.’
या अशा सगळ्या सूचना ऐकून तिला वाटायचं खरंच घेरी येईल आता.
आई, सासू दोघींनी कधी आडून, कधी प्रत्यक्ष सुचवून झालं होतं, सगळी शक्य तेवढी कारण, समजुती सांगून झाल्या होत्या.
आपण एक आई वडील, एक नवरा, त्याचे एकच  आई वडील, एक मूल यात खुश असताना लोकांना काय पडलं आहे माझ्या न जन्मलेल्या मुलाबद्दल, असं तिला प्रत्येक सल्लाळूना विचारावंसं वाटायचं.
चौकोन कसा सम असतो, त्रिकोणापेक्षा चौकोन बरा आता तर लोकांनी सुखी संसाराचं गणितही मांडायला सुरुवात केली होती.

आजी आईपासून सुरु झालेली ही साखळी एखादा संसर्ग लागावा तशी बायकांमध्ये सहज लागत जाते. पण त्यातच एखादी ही साखळी तोडणारीही भेटते, कशाला हवं दुसरं मुल, एक झालं बास की. तर एखादी म्हणते बाई आम्ही पडलो फशी सल्ल्यांना तू  काठावर आहेस तेच बरंय. तेव्हा तिला सांगावस वाटतं, मी काही नाही काठावर या लोकांनी आभास केलास माझ्या काठावर असण्याचा.
पण मग कधीतरी घरातलं पात्र बोलायला लागात, त्या अमक्या तमक्याला भाऊ झाला, त्या अलाणी फलाणीला बहिण झाली, चेहऱ्यावर मग चा प्रश्न ठेवून मी बघते, पण मग तोच बघतो, पण आपल्याला तर बाळ नकोय ना, मी होतो ना बाळ, मग कशाला हवंय बाळ परत. सुटकेच्या निःश्वासाने मी माझं लेकरू ते म्हुणुन घट्ट मिठी मारते.

प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याची घडी बसवण्यापेक्षा दुसर्याचे आयुष्य मार्गी लावण्यात खासा रस असतो. शाळेत जा, शिका, नोकरी करा, लग्न करा, मूल काढा, एक पुरेसं नाही दोन काढा, जणू काही आखलेला अल्गोरिदम. पण हा अल्गोरिदम नाकारता नाकारता जेव्हा ती प्रतिबिंब होऊन आरशात उमटते आणि  विचारते पण तुला खरच हा मातृत्वाचा आनंद परत नको आहे? ते टवारलेल पोट, ती जुळलेली नाळ, स्वतःविषयी जास्तच वाटणारी आस्था, आपल्यातून प्रगटणारी आपलीच मूर्ती स्तन लुचणारे पिटुकले ओठ, तो नव्हाळ्या देहाचा स्पर्श खरंच हवा आहे ना तुला?
तो जगस्त्रीचा संसर्ग देहाला लागतोय की काय अशी शंका येताच मनातली स्त्री सांगते हा अनुभव काय फक्त देहातूनच घ्यायचा असतो का? आणि अनुभव घेण्यासाठी जबाबदारीही घ्यावी लागते त्याचे काय? हे पलायन नाही हा तर सुटकेचा मार्ग आहे.

त्याच वेळी अजून एक कुठली तरी विचार करत असते, पण गर्भाशयातून एक असो, दोन असो अनेक असो,  मूल काढण म्हणजेच स्त्री जन्माची इतिकर्तव्यता असते का? हा जिचा तिचा प्रश्न असायला हवा ना? हा तिचा प्रश्न तिच्यापर्यतच असला तर कधी आरशातली स्वप्नाळू प्रतिमा जिंकते तर कधी आरशाबाहेरची व्यवहारी, कठोर जिंकते पण अनेकदा तिचा प्रश्न तिच्यापर्यंत येईपर्यंत मधल्या अनेक सल्ल्यांनी त्याचे उत्तर दिलेलं असतं आणि जीव जन्माला आलेला असतो. हारलेल्या स्वप्नाळू जमतात अशा यशस्वी जीवांच्या स्वागताला आणि सरकवू पाहतात पुढे त्यांची अपूर्ण स्वप्ने, पसरवत राहतात सल्ले वाट पाहत राहतात कुठेतरी त्यांना वाट सापडल्याची आणि शोधात राहतात आरसे तिला तिच्या नैसर्गिक प्रेरणा दाखवणारे.... !!!!!!!!!!!!!!!!

लिहिलेलं तिनं परत वाचलं, त्यात काही नवीन नव्हत, म्हणजे स्वतः लिहिलेलं ते परत एकदा वाचायची. पण ते आवडेल याची खात्री नसायची म्हणून कधी कधी वाचण टाळायची, पण आज परत वाचल्यावरही तिला वाटलं, हे मुद्दे झाले, बाकीचे कुठे आहे? मग तिनं ती फाईल अर्धवट म्हणून नाव घालून ठेवली.

रात्री झोपेमध्ये अचानक तिला काहीतरी आठवलं, काय आठवलं ते आठवण्यासाठी ती उठून बसली, आणि चालत चालत आरशासमोर जाऊन बसली, खरतर तिला जायचं होतं लॅपटॉपसमोर. पण आत्ता तिला एकदम मनात काय चाललाय बघण्यापेक्षा चेहऱ्यावर काय दिसतं ते बघावसं वाटलं. अर्धवट झोपेतून उठल्यावर आपण अशा दिसतो तर, आपल्या रोजच्या चेहर्यापेक्षा यावर एक वेगळा भाव दिसतो, प्रेम, राग, मोह, हेवा, आनंद, किळस यापेक्षाही वेगळंच काहीतरी, अभावीन भाव, कित्येकवेळा त्याने हा भाव बघितला असणार, तिला गादीवर घोरत झोपलेल्या त्याचा हेवा वाटला, अशा अर्धवट झोपेत कित्येक वेळा त्यानं करून घेतलं पण सांगितलं नाही आपल्या चेहऱ्यावरच्या त्या भावाबद्दल, तिच्या चेहऱ्यावर एकदम हेवा दाटून आला, पण तो वर बघतो तरी कुठे, गळ्याच्या खालीच तर त्याची नजर घसरत असते, एकदम उपहासाचे हास्य जिवणीवर पसरलं, तिला एकदम कुतूहल वाटलं हा कसा दिसत असेल अशा अर्धवट झोपेत? ती लगबगीनं त्याला बघायला गेली, त्या वेळी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर बेफिकिरीचा पुरुषी भाव होता, म्हणजे पुरुषी बेफिकीरीत एक मग्रुरीचा आवेश, आग्रह असतो, तर बायकी बेफिकीरीत जिंकल्याचा, आवेश, सिद्ध केल्याचा भाव असतो. मग ती त्या दोघांच्या बाळाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहायला गेली. तिथे तिला दिसला जग समजून घेण्याचा भाव, त्यात प्रेम होतं, हेवा, मत्सर, राग आनंद सगळच होतं. मग ती परत मनाच्या आरशात डोकावण्यासाठी लॅपटॉपसमोर बसली. बघू काय लिहायचंय असं स्वतःलाच विचारायला लागली, मग तिनी न ठरवूनही अर्धवट ची फाईल उघडली, आणि विचार करत बसली, कोण असेल ही, हिला खरंच हवं असेल का दुसरं मूल? आणि मूल देणाऱ्या तिच्या नवऱ्याला काय वाटत असेल? एक मूल देऊन वंशसातत्य केल्याचा  समाधान त्या दोघांना असेल तर मग खरेच कशाला हवं असेल दुसरं मूल. दमून गेलीही असू शकेल त्या एकाच मूलात. पण जर ती समाजाचा विचार करणारी भित्री सशीण असेल तर मग घालेल अजून एक जीव जन्माला, असे पहिल्यांदाच होत होतं की तिला लिहिताना असे प्रश्नांचे अडथळे समोर येत होते. छे आपण नेहमीसारखं तो ती आणि त्यांच्या आयुष्यातला तिसरा यांच्या गोड गुलाबी कथा, नाहीतर सासू आणि सून यांचे दळण दळाव, या असल्या भुक्कड, प्रश्न पाडणाऱ्या कथांच्या गावाला जाउच नये असे ठरवत तिनं एक नवीनच फाईल उघडली आणि लिहायला सुरुवात केली,

किती छान असतं, चौकोनी कुटुंब असणं, तिच्या मांडीतल्या चिमुकलीचा हात हातात घेऊन झोपलेल्या तिच्या मोठ्या मुलाकडे बघून तिला अगदी कृतकृत्य वाटत होतं....
आणि मग सराईतपणे तिची गोष्ट झरझर फाईल मध्ये उतरत होती, तिच्या चेहऱ्यावरचा अभावीत भाव गळून पडून तिथ वात्स्यलाचा समुद्र जमला होता, त्याच समुद्रात थोडा वेळ तरी बाकीचे सगळे भाव बेटासारखे तरंगणार होते!!!!!!