Saturday, December 30, 2017

अन्नपुर्णेश्वरी, वसे घरोघरी!

स्वयंपाक ही सरावाची आणि हौसेची गोष्ट असं तिचं ठाम मत होतं. नाही म्हणलं तरी गेली १५, २० वर्ष ती स्वयंपाकघरात लुडबुड करतच होती. घरात आईला बघून कधी तरी काहीतरी करावस वाटायचं, मग हळू हळू शाळेत मैत्रिणीनी त्यांचे स्वयंपाकघरातले कारनामे सांगायला सुरुवात केल्यावर अरे आपल्याकडे सांगायला काहीच नाही या ओशाळवाण्या भावनेतून ती जरा तोऱ्यातच स्वयंपाकघरात शिरली होती. शाळेत असतानाची ही घटना. आता शाळेतलं फारसं काही आठवत नाही, पण त्या दिवसात स्वयंपाकघरात घालून ठेवलेले घोळ मात्र अगदी आठवतात.
रवा आणि मैदा यात खरेतर जमीन आसमानाचा फरक पण तेव्हा कुठे कळत होते ते म्हणून मैद्याचे चिकट उपीट कचऱ्यात गेलं होतं. एकदा घट्ट कणिक मळण्यासाठी आईने थोडे तेल सांगितल्यावर पाण्याऐवजी तेलातच अति घट्ट कणिक मळली होती. मोहन म्हणजे काय कळल्यावर अर्धा पाऊन तास नुसतीच हसत होती, कारण तोवर तिला मोहन किराणा दुकानातून आणलेलं तेल किंवा तूप म्हणजे मोहन असेच वाटत होतं. शिऱ्याची तर वेगळीच गंमत तिने केली होती. रवा शिजल्यावर घालायची साखर तिने आधीच घातली आणि पाकात शिजलेला रवा ताटलीत घालून भावाला खायला दिला होता. कधीतरी मसाल्याची अदलाबदल होऊन चव चांगली यायची पण कोणता मसाला आपण घातला होता हेच ती विसरून जायची. नवीन पदार्थ जन्माला यायचे आणि तसेच हरवून जायचे.
स्वयंपाकघरातल्या या विश्वात ती खरेच हरवून जायची. काहीतरी नवीन करून बघितलं पाहिजे, कोणाकडे खाल्लेला पदार्थ आवडला तर आवर्जून करून बघितला पाहिजे या ध्यासाने नेहेमी काहीना काही करत राहायची. स्वयंपाक या गोष्टीत किती कल्पकता सर्जकता दडली आहे याचं तिला प्रत्यंतर अनेकदा येऊन गेलं होतं. कोणताही माणूस मनासारखं खायला मिळालं की खुश होऊन जातो. खाद्यपदार्थ हे कोणत्याही भाषा, संस्कृती खूप सहज ओलांडतात. त्यांच्यावर कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. एकाच पद्धतीने केलेल्या पदार्थाची चव माणसागणिक बदलते, साहित्य, कृती तशीच ठेवली तरीही फरक पडतोच, कारण प्रत्येकाची हाताची चव वेगळी असते असं आपण म्हणतो, तिच्या मते ती काही फक्त हाताची चव नसते, तर करणाऱ्याच्या मनातल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात पडत असतं. रागात बनवलेला, आजारी असताना दमलेलं असताना तिचा स्वयंपाक तिलाच वेगळा वाटायचा. आईच्या हातची चव आपल्या हातात काही येणार नाही हे कोणीही सांगायच्या आधीच लक्षात आले होते कारण आजीने केलेली आमटी आणि आईने केलेली आमटी ती एका घासात ओळखायची. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या हाताच्या चवीची नक्कल करण्याऐवजी आपणच आपली चव तयार करावी हे तिने कधीच ठरवलं होतं.
लग्न करून दुसऱ्या घरातली खाद्यसंस्कृती तिची आवड निवड या सगळ्याचा मेळ घालून ती स्वतःची अशी एक चव तयार करू पाहत होती. स्वयंपाकाला असा कितीसा वेळ लागतो म्हणत ओढनीची गाठ घालत, किंवा टी शर्ट च्या बाह्या वर करत ती झटझट सगळं काम आवरून टाकायची. बाकीच्या कामाचा कंटाळा आला तरी स्वयंपाकाचा तिला कधीच कंटाळा यायचा नाही. नंतरचा ओटा आवरून किचन स्वच्छ केल्यावर चला आपण आजचा दिवस सत्कारणी लावला असंच तिला वाटायचं. तिच्या हातचं खाताना कोणी दोन घास जास्त खाल्ले की जणू परीक्षेत ९०% मिळाल्याचा आनंद व्हायचा.( तिच्या वेळी ९०% म्हणजेच खूप होते आताच्या सारखे ९९.९९% खूळ अजून सुरु नव्हतं झालं).
सहज असेच आई वडील राहायला आले दोन दिवस त्या दोघांचे राहणे कधी 4 दिवसांवर जायचं नाही, आणि तिला त्या चार दिवसात त्यांना काय खायला देऊ नि काय नको, असं होऊन जायचं, जणू काही वर्षानुवर्षांचे साचलेलं सारं तिला असं एका झटक्यात देऊन टाकावस वाटायचं. ते आले की जणू रोजच्या स्वयंपाकात एखाद दोन जास्तीच्या पदार्थांची भर हमखास पडायची. यावेळी त्यांना निघतानाही तिने हट्टाने डबा बांधून दिला. पोळी भाजी ,दही भात, दारातल्या अळूच्या पानांच्या वड्या, लोणचं, आणि थोडंसं गोड म्हणून लाडू. सोबत चमचा, हात पुसायला नॅपकिन असे सगळं बांधून तिने आईच्या हातात ठेवलं. रात्री कधीतरी त्यांना फोनवर जेवलात ना, पुरलं ना विचारलं आणि ती परत तिच्या रुटीनला लागली. दुसऱ्या दिवशी वडिलांचा मेसेज आला, ‘ तुझ्या हातात चव आहे अगदी तुझ्या आईसारखी अन्नपूर्णा झाली आहेस. ’ शक्य असतं तर या मेसेजचे मोठे सर्टिफिकेट करून तिने लावलं असतं, इतकी ती खुश झाली होती. आपल्या स्वैपाकाचं कौतुक यापेक्षा ते वडिलांकडून आलेलं कौतुक जास्त मोलाचं होतं. त्यावेळी तिला जेवण गेलंच नाही, त्या मेसेजनेच पोट भरलं होतं. 
तिच्या लग्नात द्यायला म्हणून आईने जेव्हा अन्नपूर्णा विकत घेतली होती तेव्हा तिने आईला, आजीला विचारलं होतं, हि कशासाठी त्यावर आजीने सांगितलं होतं, अन्नपुर्णेश्वरी, वसे घरोघरी! देवघरातल्या त्या पळी घेतलेल्या अन्नपुर्णेची तिने रोज पूजा केली नव्हती, पण घरी आलेल्या कोणालाही उपाशी पाठवलं नव्हतं, अन्नाचा, अन्न तयार करणाऱ्या कृषकाचा नेहेमीच मान ठेवला होता. अन्न वाया घालवले नव्हते, किंवा फेकून दिले नव्हते. अन्न आहे तर आपण आहोत, हि जाणीव कायम मनात जागती ठेवली होती. अन्नपूर्णेची पूजा म्हणजे तरी दुसरे वेगळे काय असते?

Wednesday, December 27, 2017

हाथसे छुके इसे रिश्तोंका इल्जाम तो दो...

मुळात माणसाला खुश राहण्यासाठी काय हवे असते? या वीस अक्षरांचे कोडं ज्याला उलगडलं त्याला कदाचित आयुष्य जास्त कळले असं म्हणता येईल. माणसात राहून एकटी राहणारी माणसे आहेत तशीच एकटेपणात सहवास शोधणारी माणसे आहेत, खाण्यात आनंद शोधणारी माणसे आहेत तिथेच खिलवण्यात आनंद मानणारी लोकं आहेत, पैशात आनंद मोजणाऱ्या माणसांबरोबरच देण्यात आनंद मानणारी माणसे आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येकाचे आनंद मानण्याचे, शोधण्याचे रस्ते वेगळे आहेत. पण प्रत्येकाचा प्रयत्न आयुष्यात जास्तीत जास्त आनंद सुख मिळवण्याचा असतो एवढे मात्र खरे.
जगात तसे दोनच प्रकार, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. दोघंही मुळातूनच वेगळे. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या, मार्ग वेगळे. आता या दोन प्रकारांचे लाखो उपप्रकार येतात, आणि मग जग रंगीबेरंगी होऊन जाते. अशाच रंगीबेरंगी जगातले ते दोघं, स्त्री पुरुषांनी एकत्र राहणे ही खरं तर निसर्गाची गरज, मग त्याला लग्नाचं नाव देऊन ती गरज भागवली जाते. एकत्र राहणारे सगळेच एकसारखे नसतात, स्वतःला थोडंफार बदलवून, थोडाफार जुळवून घेऊन गाड ढकलत असतात.
रोजचं सगळ काम सुरूच असतं. बाई माणसाला सुट्टी अशी कधी नसते. सुट्टी असली तर जादाची कामं निघतातच. घरचे दारचे सगळे खुश झाले की तिचाही जीव सुखावतो. काड्या काड्या जमवून बांधलेलं घरट भरलं की तिला समाधान वाटत असतं. अशी समाधानी सुखी बाई ती पण काय बिनसलं होतं तिचं कोणास ठाऊक. 
आजूबाजूला माणसं असताना, सुखाची हक्काची, एका हाकेला धावून येणारे सखे सोबती असताना, जीवाला जीव देणारा सहचर असतानाही, बयाबाईला काहीच नको वाटत होतं. आपलं कोणी नाही, आपण कोणाचे नाही असे जाणवत राहत होतं. हसण्यात जीव नव्हता  आणि रडण्यात रस नव्हता एखाद्या मोठ्या सहज वाहणाऱ्या नदीसमोर अचानक चिंचोळे वळण यावे आणि तिने स्वतःला आक्रसून घ्यावे असे काहीसे झालं होते, मुळात वाहत्या नदीला बंध घातला तर ती काही क्षण वाहणं विसरून जाते आणि नंतर नव्या जोमाने पुढे जाते. नदी स्वतःचा मार्ग शोधते पण माणसांचे काय? तिला कळतंच नव्हतं कशी फोडायची ही कोंडी. आतल्या आत घुसमटणाऱ्या तिला एखाद्या अंधाऱ्या गुहेत हरवून जाऊन,’कोई नही है फिर भी है मुझको ना जाने किसका इंतेजार’ असं उगाच म्हणावस वाटत होतं.
रात्री गादीवर पडल्या पडल्या झोप लागणाऱ्या नशीबवान लोकांपैकी ती होती. पण छे त्यादिवशी झोपही जणू तिच्यापासून लांब लांब पळत होती. मग उगाच नदी, हरवणारे रस्ते, मध्येच रस्ता बंद करणारी गुहा असे काय काय डोळ्यासमोर तरळत होते. जंगलात आपण हरवून गेलोय, बर्फाच्या खाली अडकलोय, खोल दरीत लोंबकळत आहोत उगाच भास आभास लपाछपीचा खेळ खेळत बसले होते. डोळे बंद असूनही झोप नव्हती, आणि शरीर थकले असूनही विश्रांती घेत नव्हते, मनाचे खेळ सुरूच होते.
अचानक गार झुळूक यावी असं वाटलं, गुहेत प्रकाशाची तिरीप दिसली, जंगलात ओळखीची खून सापडली असं काय काय वाटायला लागलं, हात जरा लामाब सरकवला तर तो तिच्या शेजारीच तिच्या केसातून हात फिरवत होता. त्याचा स्पर्श जसजसा खाली झिरपत होता, तसतसा तिचा मार्ग मोकळा होत होता, नदीला परत वाहायचा मार्ग मिळाला होता, थांबलेला रस्ता सुरु झाला होता, हरवलेला प्रकाश परत समोर येऊन उभा राहिला होता.
त्याच्या स्पर्शात ती विरघळून जात होती, जगण्याला नव्याने भेटत होती. स्पर्शाची ताकद नव्याने अनुभवत होती. साधी सहज गोष्ट आयुष्य किती सोप्प करू शकते, त्याचा हात अजूनच स्वतःपाशी लपेटून घेऊन, दुसऱ्या हाताने स्वतःलाच थोपटवून घेऊन ती स्पर्शाच्या दुलईत कधी झोपून गेली तिला कळलंच नाही. त्याक्षणी स्पर्शसुख हीच तिची ख़ुशी होती.वीस अक्षरांचं कोडं तिच्यासाठी तरी सुटलं होतं.  
मानसी होळेहोन्नुर