Wednesday, June 27, 2018

ती आणि त्या #६


ती 

पायाखालची जमीन हादरणे  म्हणजे काय हे मला आज जाणवले. सकाळी तर सगळे काही नीट होते, आणि आता येताना लक्ष्मी भेटली आणि म्हणाली मी उद्यापासून कामाला  येणार नाही . आता एकदम काय झाले, विचारल्यावर म्हणाली तुमच्या सासुबाईंनाच विचारा. जरा तिची मनधरणी केली, अजून दोनच आठवडे कळ  काढ मग त्या जाणार आहेत परत सांगितले तर ही  मला  म्हणते ताई मग त्यागेल्यावरच मला बोलवा ,त्या असताना मला जमणार नाही . कटकटच जास्त त्यांची. भांड्यात साबणच राहिला, दाराच्या मागची जाळी साफ केली नाहीस, फरशी वरचा  डागच  गेला नाही. एक ना दोन. बरं  हे सगळं  मी ऐकून घेतलं  असते पण आज तर त्यांनी कहरच  केला, मी किती घरी जाते,किती कमावते, मग माझे जेवण नाश्ता बाहेरच होतो, कपडे सुद्धा कामवाल्या बायकाच देतात, मुलांचे कपडे सुद्धा तसेच मिळतात, स्वतःचे घर आहे म्हणजे भाडे सुद्धा नाही मग मला खर्च काय, सगळे तर सेविंग  होत असणार म्हणायला लागल्यावर माझे डोकेच सटकले. ह्यांचा काय संबंध मी कुठे खाते, कोण मला कपडे देते नाःई देत. मी काय खर्च करते काय करत नाही. ताई मला लावालाव्या करायला आवडत नाहीत, पण आता निघालेच आहे तर सांगते, दरवेळी ती म्हातारी माझ्या भुणभुण करते, पण मी आपली कानामागे टाकायचे,जाऊ दे दोन दिवस तर राहतील म्हणून. पण आतापासून नाही म्हणजे नाही. आणि हो तुम्ही नसताना अन्वीला  टायटीव्ही बघू देतात, चॉकलेट देतात, परत फोनवर कोणाकडे तरी तुमच्याच बद्दल बोलत असतात.मी तर म्हणते तुम्ही त्यांना आज रात्रीच त्यांच्या गावाला पाठवून द्या. महा भांडकुदळ, कजाग आहे ती महामाया. गेले कित्येक दिवस मला जी भीती ती शेवटी खरी ठरली. नोकरी करायची, मुलांचा अभयस घ्यायचा, घर, बाजार हाट करायची आणि घरात सुद्धा काम करायचे, तिला आगद गळून गेल्यासारखे झाले. लक्ष्मी कशी आहे, कसे कामा करते सगळे तिला माहीत होते, पण ती कधीही खाडा करत नाही, पैशावर नजर ठेवत नाही, प्रामाणिक आहे एवढ्या दोन गोष्टींवर मी तिला तीन वर्ष टिकवून ठेवली होती, आणि या माझ्या सासूने तिला तीन दिवसात पळवून लावली. त्या येणार दोन दिवस तेव्हा करतील थोडी फार मदत पण मग बाकीचे दिवस कोण करणार आहे सगळे? त्यांच्या पोराने एक दिवस कपडे वाळत घातले तर त्यांच्या आख्या गावात बातमी होते, मग स्वतः इथे राहणार नाहीत, पोराला काम करू देणार नाहीत मग कामवाली ठेवली तर यांना काय प्रॉब्लेम आहे? ती जशी आहे तशी मी सांभाळून घेत होते ना. कळत नाही की कळून मुद्दाम तशा वागतात देवच जाणे. आता मी घरी जाऊन चीड चीड केली तर मला ऐकवतील त्यांचा टेंभा कसे त्यांनी सगळे केले, यावेळी मी म्हणणार आहे, मला नाही बाई जमत, तुम्हीच राहता का इथे आणि करता का सगळी मदत म्हणजे लक्ष्मी नको की दुसरे कोणी नको, राहता का कशाला, रहाच इथे, म्हणजे तुमच्या लेकाला पण रोज जरा बरे आईच्या हातचे जेवण मिळेल.



त्या

बाई बाई काय आळशी आहे ही आमची सून. घरात वरकामाला बाई, पोरीला शाळेतून आणायला बस. नोकरी करते पण ते ही जवळच्या शाळेतच आहे, खूप काही करीअरिस्ट  आहे असेही नाही, महिन्याला कमावते त्यातले निम्मे कामवाल्या बाईवर उडवत असणार. बर पैसे देते तर मग जरा काम नीट तरी करून घ्यायचे ना? दर वेळी आले की मी बघते ही लक्ष्मी सगळे काम हातचे राखून करते. बर रोज नाश्ता आमच्या घरीच करते, मग पुढच्या घरी जाऊन जेवते, बऱ्याचदा कोणी ना कोणी तरी काहीतरी उरलेले तिला देतातच घरी घेऊन जायला. तिच्या मुलांना जुने कपडे देतात, खेळणी देतात. आमच्या सून बाई तर दरवर्षी तिच्या पोरांना शाळेची पुस्तके घेऊन देतात. आता एवढे करतात तर मग त्या बाईकडून एखादे काम जास्तीचे करून घेतलं तर काय हरकत आहे? तिच्याकडून काम नीट करून घेतलं तर काय बिघडलं. रोज एखाद्या तरी ग्लासात साबण तसाच असतो, मग काय मी सगळे नीट बघून तिच्याकडून परत विसळून घेते. आपण पैसे मोजतो मग काम पण चोख करून घेतले पाहिजे.  या बायकांना अधून मधून ओरडावंच लागते, नाहीतर त्या डोक्यावर चढून बसतात. आता मी आपले सहज चौकशी करण्यासाठी म्हणून लक्ष्मीला विचारले बाई तुला पगार किती, काय काय कमावते, कुठे सेव्हिंग वगैरे आहेत की नाहीत. तर भडकलीच माझ्यावर मग मी काय ऐकून घेईन हो तिला, मी पण म्हणले जा, तुझ्यासारख्या दहा जणी मिळतील.
आता मी नोकरी नव्हती केली पण चार पोरे, सासू सासरे, येणारे जाणारे सांभाळलेच ना. तेव्हा कुठे होते बाई. सासूबाई गेल्यावर सासरे ५ वर्ष गादीवर होते तेव्हा त्यांचे सुद्धा सगळे केले. अगदी शी शू काढण्यापासून सगळे. आणि तरीही माझे घर स्वच्छ लख्ख असायचे. कधी विकतचे काही आणायचो नाही. आणि आता हिला एक पोरगी आणि नोकरी घर अशी सर्कस करता येत नाही. बिच्चारा माझा पोरगा करतो कधी कधी मदत तेव्हा मलाच वाईट वाटते, घरी साधा चहाचा कप उचलायचा नाही आणि आता भांडी काय विसळतो, कपडे काय वाळत घालतो. पुरुषांनी अशी कामे केलेली मला नाही आवडत बाई. हा काय याच्या छोट्या भावाला, वडिलांना पण मी कधी त्यांचे ताट उचलू दिले नाही. मी केले तर मग हिला का जमत नाही?
आता घरी आल्यावर ही आरडओरडा करेलच, तेव्हा मी सरळ म्हणेन, तुमचे घर आहे काय करायचे ते करा, मी जाते बाई माझ्या घरी.   
©मानसी होळेहोन्नुर


Wednesday, June 20, 2018

शेजारच्या काकू


गोष्ट तशी जुनीच, पण काही जुन्या गोष्टी इतक्या आत जाऊन बसलेल्या असतात, की आपण विसरूनच जातो त्यांच्याबद्दल, पण त्या गोष्टी आपल्याला  विसरत नाहीत. मग एकदम कधीतरी काही तरी घडतं आणि त्या गोष्टींची आठवण उफाळून येते. असंच काहीसं झालं परवा, कोणीतरी त्यांच्या बागेतल्या पेरूची आठवण काढली आणि मला आठवलं आमचं शेजारचं घर. एक सोडून पाच पाच पेरूची झाडं, आठ दहा वेगवेगळे गुलाब असलेलं. शेवगा, सीताफळाचं झाडही होतंच, येत जाता लावलेल्या, आपोआप उगवलेली, झेंडू, शेवंती, तगरीची झाडं पण होती. खूप खूप वर्ष झाली, त्यामुळे झाडं सुद्धा धूसर आठवताहेत, पण शेजारच्या काकू मात्र आजही तशाच समोर उभ्या राहतात.

फ्लॅट मधून नुकतेच आम्ही राहायला आलो होतो आमच्या बंगल्यात. जिना नाही, मागे पुढे पळायला मोठ्ठी जागा, कुंडीत नाही तर आपण थेट जमिनीत झाडं लावू शकतो अशा अनेक गोष्टींचा आनंद होता. त्यात हे शेजारचं मस्त झाडांनी डवरलेलं घर बघून तर अजूनच वाटायचं आपला पण असा बगीचा पाहिजे. मग हळू हळू ओळखी होत गेल्या, आणि त्या काकूंना नाव पडलं शेजारच्या काकू. सुरुवातीच्या दिवसात पाण्याची माहिती देणं, आजू बाजूच्या लोकांची ओळख करून देणं, ही सगळी शेजार धर्माची कर्तव्य त्यांनी प्रेमाने पार पाडली होती. मुळात २०, २५ वर्षांपूर्वी त्या भागात जास्त घरही नव्हती आणि माणुसकी सुद्धा आत्ताच्या पेक्षा कैक जास्त प्रमाणात होती. बहुदा घरांची संख्या वाढल्यावर माणुसकी शेजारधर्म कमी होत जातो.

आज इतक्या वर्षानंतरही मला काकूंचं नाव आठवत नाही पण चेहरा असा समोर उभा राहतो. कपाळावर असलेलं गोंदण, हातात २, ४ काचेच्या बांगड्या, सिंथेटिकच्या साडीचा एक कमरेला खोचलेला. अर्धवट कुरळ्या केसांचा मागे बांधलेला बुचडा. सतत कामात, कुठेतरी जायच्या घाईत असणाऱ्या काकूंच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालेलं मी कधी पाहिलं नाही, म्हणजे ते घर सोडून जाताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न हसू तसचं होतं. आपल्या मुलांचं जन्म बालपण जिथे पाहिलं ते घर सोडताना सुद्धा त्या तेवढ्याच तटस्थ होत्या. संसाराला हातभार म्हणून त्या घरगुती शिकवण्या घ्यायच्या. पण त्यात पैसे कमवण्यापेक्षा, वेळेचा उपयोग करून घेणं,  अडल्या नडल्याला मदत करणं हा हेतू जास्त होता. दर वर्षी वारीला जाणाऱ्या लोकांना फळं , फराळाचं द्यायला काकू नेहेमी पुढं असायच्या.

मला त्यांच्या घरच्या भाज्या आवडायच्या म्हणून खास काही केलं की एक वाटी हमखास आमच्या कडे यायची. कधी तरी सणासुदीला, दारावरच्या जाईचा गजरा गुंफून द्यायच्या. कधी खूप गुलाबाची फुलं आली म्हणून आणून द्यायच्या. पेरू तर न मागता मिळायचेच. हा सगळा व्यापार चालायचा आमच्या तारेच्या कुंपणामधून. आम्ही आमचं घर त्यांच्या भरवशावर सोडून किती तरी वेळा बाहेरगावी जायचो. मी लक्ष देईन तुमच्याकडे तुमच्या घराकडे म्हणणारी माणसं दुर्मिळ झालीत एवढं मात्र खरं.

आज इतक्या वर्षानंतरही खूप काही बदलूनही काकू, त्यांचं घर, ती बाग डोळ्यासमोरून जात नाही. आता तिथे आलेले नवे शेजारी, त्यांचा सुरेख बंगला , शेजारपण सगळं चांगलं असूनसुद्धा जुन्या आठवणी पुसल्या जात नाहीत एवढ मात्र खरं. काकूंच्या करण्यात, देण्यात घेण्यात कोणताच कधी स्वार्थ नव्हता. सहजभाव होता. आता जेव्हा प्रत्येकाचं जगणं वागणं घड्याळ हेतूशी जुळलेलं असतं तेव्हा हे असे निर्भेळ क्षण देणारे लोकं आठवण करून देत रहातात आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांची. शेवटी काय या क्षणांनीच आयुष्य सुंदर होत असतं ना ?
 © मानसी होळेहोन्नुर

Tuesday, June 12, 2018

ती आणि त्या ५



ती

कोणताही सण  आला की  मला आनंद व्हायच्या ऐवजी टेन्शनच  येते. माझी उगाच चिडचिड व्हायला सुरु होते. नवरोबा तर काय मोठं  झालेलं बाळ आहे. रोज रोज नाही ना राहावे लागत मग एखादा दिवस कर कि सहन आईला हे त्याचे नेहेमीचे वाक्यतो दर वेळी न चुकता माझ्या तोंडावर मारतो. त्यामागे तुझ्यासाठी , तुझ्यामुळे आपण वेगळे राहतो ना मग एवढं ऍडजस्ट  केलं तर काय फरक पडेल असे न बोललेलं वाक्य देखील असत. लग्नानंतर वर्ष दोन वर्षातच मला लक्षात आलं  मी नाही  जुळवून घेऊ शकत यांच्यासोबत, नशिबाने नोकरी पण मिळाली आणि आम्हाला दोघांना घरापासून ऑफिस लांब पडायला लागले त्यात परत अभि लहान होता, मग आम्ही सरळ ऑफिसजवळ घर घ्यायचा निर्णय घेतला, गुंतवणूकही  झाली आणि आमची आम्हाला प्रायव्हसी पण मिळाली. येण्याजाण्यातला वेळ वाचायला लागला. तसेही ते  घर आम्हाला लहान पडायला लागले होते, म्हणजे घरात सामान जास्त आणि हलायला जागा कमी, त्यामुळे काहीही नवीन आणताना शंभरवेळा विचार करावा लागायचा. नशिबाने नवऱ्यालाही  ते जाणवले, तसेही त्याच सुमाराला त्याची बहीण पण वेगळी राहायला लागली होती, त्यामुळे सासूबाई फारसे काही बोलू शकल्या नाही, पण आम्ही घर घेतल्यापासून तिथे राहायला जाईपर्यंत रोज एकदा तरी पाणी डोळ्यात आणायच्याच. त्याच वेळी बोली झाली होती  सणाला मात्र आपल्या याच घरी यायचं. 

 दर वेळी सण  आला की  आम्ही निघालो हेड क्वार्टरला. गेल्या १५ वर्षात त्यात काही बदल झाला नाहीपण आता अभि पण मोठा झालाय त्याला त्याचे क्लासेस, मित्र असतात तो कुरकुरतो यायला. मलाही तिथे काही करायचे म्हणले की ऊर धपापतो आणि केलं नाही तर नवऱ्याची बोचरी नजर डाचते. त्यांच्या घरात त्यांच्या पद्धतीने करताना थोडे पुढे मागे झाले की इतकं ऐकावं लागत की त्यापेक्षा ते करणेच नको वाटते. यावेळी मात्र मी धीर धरून म्हणणार आहे आता आता तुमच्याने होत नाही आपण काही सण आमच्याकडे करत जाऊयात.


त्या

मी मुद्दाम सून जरा आमच्यापेक्षा खालच्या परिस्थितीतली करून घेतली होती, म्हणजे कसे तिला शिस्तीत ठेवता आले असते, पण ही थोडी नाही चांगलीच हुशार निघाली. नोकरी करायची त्यामुळे की काय पण न बोलून शहाणी होती. दोन वर्ष काय ती राहिली सोबत आणि नंतर पोराचे, नोकरीचे कारण काढून वेगळे झाले. माझा पोरगा बिचारा तिच्या या असल्या कारणांपुढे काहीच बोलू शकला नाही. दिसायला सुंदर असली म्हणून काय झाले, घराचे काम मी होते म्हणून नीट व्हायचे नाहीतर हिला कुठे जमते काही. हिचा स्वैपाक म्हणजे वरण केलं पातळ झाले, पोळ्या केल्या करपून गेल्या. आता थोडे फार करते नीट पण वाया फार घालवते. काटकसर अशी माहितीच नाही, तरी बर माहेरी तेच करावे लागायचे.

प्रत्येक वेळी माझ्या लेकीची बरोबरी करायला जाते ही. तिने काही केलं त्याचे मी कौतुक करून काही बोलले की झालेच या बाईसाहेब तसेच काहीतरी करून दाखवणार. माझ्या लेकीला बिचारीला सासू सासरे, दीर जाऊ सगळ्यांचे करावे लागायचे म्हणून ती वेगळी झाली, लगेच चार महिन्यात ही पण पडली की बाहेर. तरी बर मी हिंडती फिरती आहे म्हणून पूर्वी ही कामे करायचे आणि आताही करते. त्यामुळेच वेगळे होताना पण मी माझी लेकाला सांगितले काहीही झाले तरी सण सगळे आपल्या याच घरी करायचे. म्हणजे तरी ते इकडे येत जात राहतील आणि माझ्या मुलाला नातवाला किमान सणाच्या दिवशी तरी चांगले खायला मिळेल.

पण आता नातवाला काय पढवून ठेवलंय माहित नाही, इकडे यायलाच तयार नसतो, आला तरी निघायची घाई करतो. आता या वेळी मी निक्षून सांगणार आहे आम्ही असे पर्यंत तरी करा की सण इकडेच मी गेल्यावर करायचेच आहे सगळे सण , कुळधर्म तुमच्याच घरी. माझा लेक समजून घेईल आणि पोरालाही समजावेल. त्या निमित्ताने हे घर भरून जाते, आम्हाला जगल्यासारख वाटत. या घरात जरा तरी गप्पा गाणी होतात, नाहीतर या घरात फक्त टीव्ही बोलतो. दोघांच्यासाठी पथ्याचे करताना जिभेचे चोचले पुरवणारे काही करायला इच्छाच होत नाही. तसे आजू बाजूचे येऊन जाऊन असतात, लेक येते पण मुलाचे त्याच्या मुलाचे लाड पुरवणे ह्यात वेगळेच सुख असते. ते सुख माझ्या सुनेला बहुतेक तिची सून आल्यावरच कळेल.
©मानसी होळेहोन्नुर