Tuesday, November 15, 2016

तरीही फुलतो आहे.....

काही काही वासाशी, झाडांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. आणि मग त्या आठवणी इतक्या घट्ट होऊन जातात, की ते वास आणि त्या आठवणी एकच होऊन जातात. मग कधी या आठवणी वय विसरायला लावतात तर कधी या आठवणी कातर करून सोडतात. आयुष्य म्हणजे तरी काय असतं, आठवणींची पुरचुंडी तर असते. बऱ्याचशा आठवणी मेंदूत जागृत, निद्रित साठवलेल्या असतात, पण काही आठवणी मात्र मनात खोल रुतून बसलेल्या असतात.

लहानपणी कधी तरी आजीच्या मांडीवर बसून कृष्णाच्या गोष्टी ऐकताना नरकासुराची गोष्ट ऐकली होती. मग नरकासुराला मिळालेलं वरदान, आणि मग त्याचा गैरवापर टाळण्यासाठी मिळालेला शाप. तेव्हा कायम वाटायचं हे राक्षस लोकंच का कायम तपश्चर्या करायचे. मग ही एवढी साधना करून पण यांची वृत्ती का बदलायची नाही? आणि दर दर वेळी हे राक्षसच का वाईट असायचे. कधी तरी एकदा आजीला तसं थेट विचारल्यावर ती म्हणाली, अग या गोष्टी म्हणजे साऱ्या प्रतिकं असतात. आपल्याच आत देव पण असतो आणि राक्षस ही. राक्षसाला देवापेक्षा मोठं व्हायचं असतं म्हणून तो तपश्चर्येच्या मागे लागतो. देवाला अशी कोणाशीही स्पर्धा करायचीच नसते. आणि वाईट गोष्टीना मारणं गरजेचं असतं ना त्यासाठी शाप देतात. मग त्या नरकासुराच्या गोष्टीतली सत्यभामा मस्त हिरोईन सारखी वाटायची. कृष्ण तर पहिल्यापासून हिरो होताच, पण नरकासुराला मारताना त्याला मदत करणारी त्याची बायको मनापासून आवडली होती.

तीच सत्यभामा दुसरऱ्या एका कथेमध्ये नवऱ्यावर हक्क गाजवणारी म्हणून दिसते. मग त्याला दान म्हणून सोडतानाही तिला लक्षात येत नाही आपण काय करतो आहोत. अति प्रेम , आंधळं प्रेम असंच आपल्याकडून काहीही करून घेतं असतं. आपल्याही नकळत आपण वहावत असतो. . पण या सगळ्यापेक्षाही मला आवडते ती पारिजात फुलाची आणि सत्यभामेची कथा. कृष्णाची पट्टराणी खरं तर रुक्मिणी त्यामुळे आपण कायम दुसऱ्या क्रमांकावर या खंतेत सत्यभामा, खरंतर ती सौंदर्यवती, त्यात परत नरकासुर वध केला म्हणून तिला मिळालेलं  अमर सौंदर्याचं वरदान बर माहेरचं घराणं देखील मोठं त्यामुळे त्याचा ताठा वेगळा. मग एकदा फुरंगटून तिनं म्हणे कृष्णाला सांगितलं मला पारिजातकाचं झाड माझ्या अंगणात हवं. पारिजात म्हणजे स्वर्गीय झाड, थेट समुद्रमंथनातून मिळालेलं. बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला काहीही करावं लागतो ह्याचा पहिला धडा गिरवला कृष्णानं. जिथं कृष्ण काही करू शकला नाही तर बाकीच्या सामान्य नवऱ्यांची काय कथा! नवऱ्यानं बायकोचा हट्ट पूर्ण करत झाड लावलं खरं. पण फुलं मात्र पडायला लागली रुक्मिणीच्या अंगणात. ह्यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं.

जेव्हा केव्हा पारिजातकाची फुलं, झाड बघते तेव्ह तेव्हा मला सत्यभामा डोळ्यासमोर येते, आणि नकळत नरकासुराची पण आठवण येते. हे पारिजातकाचं पिटुकल फुल, त्याचा तो केशरी रंगाचा दांडा, कधी पाच, कधी सहा क्वचित कधी आठ पाकळ्या. सूर्यास्तानंतर उमलायला सुरु होणारं आणि सूर्य परत हजेरी द्यायला आल्यावर हळूहळू कोमेजणाऱ्या या फुलाच्या झाडाला  इंग्लिश मध्ये ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे याचं जे शास्त्रीय नाव आहे, निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस त्याचा अर्थ देखील ‘दुःखी झाड ‘ असा होतो. पारिजातकाची एक दंतकथा पण अशी सांगितली जाते की हे झाड एकदा सूर्याच्या प्रेमात पडलं, आणि त्यानी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण सूर्यानी त्याला नकार दिला म्हणून ही फुलं सूर्य असताला गेल्यावर फुलांमधून अश्रू ढाळायला सुरुवात करतात ते थेट सूर्याचं परत दर्शन होईपर्यंत.


स्वतंत्र वास असणारी ही पारिजातकाची झाडं खरंच अंगणाची शान असतात. प्राजक्त, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक या नावांनी पण ओळखलं जातं. जमिनीवर पडताक्षणी हिरमुसून जाणारी ही फुलं गोळा करण्यात देखील एक आनंद होता. जेव्हा कधी प्राजक्ता अशी हाक कानावर पडते तेव्हा पारिजातकाचा परिमळ दरवळून जातो, हेच असावं कदाचित आठवण आणि वास एकच होऊन जाणं.  आपले अश्रू ढाळता ढाळता सुवास पसरवणारं दुःख इतक्यांना सुखी करून जातं, की दुःखालाही त्याच्या दुखण्याचा विसर पडावा. आयुष्यात एवढं जमलं तरी पुष्कळच म्हणावं लागेल. ...!  

Thursday, November 10, 2016

घरोघरी साड्यांची म्युझियम

“ अगं मी यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या साड्याच्या निमित्ताने मी एक मस्त गुलाबी रंगाची पैठणी घेतली आणि दिवाळी साठी म्हणून काळी चंद्रकळा. तू काय घेतलेस नवीन?” एक बस मध्ये एक जण दुसरीला विचारत होती.
“हो ग मी पण  नऊ दिवस त्या नवरात्रीच्या रंगांच्या रेशमी साड्याच नेसते, यावेळी पांढरी साडी नेमकी नव्हती बघ, आणि कित्ती दिवसापासुन एक संबळपूर सिल्क घ्यायची होती मग काय एक पांढरी किरमिजी बॉर्डर ची संबळपूर सिल्क घेऊन आले. दिवाळीला बाई आम्ही सोनेच घेतो.” माझा स्टॉप आल्यामुळे मी उतरले आणि माझी पुढची साडी खरेदी, रेशमी साड्यांचे प्रकार, नवरात्रीचे नऊ रंग, सोन्याची खरेदी अशी मिळणारी वेगळी माहिती माझी हुकली.

लग्नामध्ये मिळणाऱ्या ५ मानाच्या साड्या, आहेरात मिळणाऱ्या साड्या यापासून कित्येक जणींच्या साड्यांचा प्रवास सुरु होतो, तसं त्या आधी हौस म्हणून, किंवा जवळच्या कोणत्या तरी लग्नासाठी म्हणून घेतलेल्या साड्या असतात, पण बहुतांश जणींच्या रेशमी साड्यांच्या संग्रहाची सुरुवात मात्र होते ती लग्नापासूनच! सध्याचा जमाना डिझाईनर साड्यांचा असला, तरी पारंपारिक रेशमी, सुती  साड्या आजही त्यांचे महत्व टिकवून आहेत. मग चेन्नईला गेलं की कांची सिल्क किंवा कांजीवरम घेणं हे मरीना बीच बघण्यापेक्षाही महत्वाचं काम असतं. पैठणी अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळत असली तरी येवल्यावरून आणलेल्या पैठणीची बातच न्यारी असते. आपल्याकडे नाही बाई मिळत एवढे रंग आणि प्रकार पैठण्यांचे म्हणत एखादी सहज ३, ४ पैठण्या येवल्यावरून येता जाता घेते.

साडी हा साडी नेसणाऱ्या आणि ना नेसणाऱ्या सगळ्याच जणींचा अगदी खास चर्चेचा विषय असतो, न नेसणाऱ्या  हे एक काहिअतरी अवघड जटील प्रकरण आहे म्हणून बघतात, रोज घालणाऱ्या आमचाच जास्त हक्क याच्यावर बोलण्याचा म्हणून बोलून घेतात, आणि कधी मधी साडी नेसणाऱ्या, मिरवणाऱ्या #100dayssareepact करतात, किंवा परदेशात साडी नेसून लक्ष वेधून घेतात. त्या अमुक अमुक अभिनेत्रींनी परदेशात नेसलेल्या साड्यांचे तर भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असते. साडी नेसल्याचा पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळाला, म्हणजे ख्रिस्त पूर्व २८००-१८०० च्या सुमारास, सुरुवातीस फक्त सुती साड्या होत्या, नंतर रेशमाचा शोध लागल्यावर रेशमी साड्या तयार होऊ लागल्या, गेल्या शतकापासून तर कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या साड्यांची देखील चलती सुरु झाली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आणि क्वचित ठिकाणी श्रीलंकेमध्ये सुद्धा साड्या वापरल्या जातात.

भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतंत्र साडी संस्कृती आहे, म्हणजे फक्त साड्यांचा प्रकार नव्हे तर साडी घालण्याच्या पद्धती देखील, महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराथी, कोंकणी, केरळी, माडीसार( तमिळ अय्यांगरी ९ वारी साडी), निवी (आंध्र प्रदेशातली), कोडगू (कुर्गी पद्धतीची ), आसामी, मणिपुरी, खासी असे अनेक पारंपारिक प्रकार तर आहेतच पण डिझाईनर साड्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदधतीने आजकाल नेसवल्या जातात.  

जसं तामिळनाडू म्हणल्याबरोबर बायकांना कांजीवरम, उत्तरप्रदेश म्हणाल्यावर बनारसी, लखनवी साड्या, आंध्र प्रदेश म्हणल्यावर नारायणपेट, धर्मावरम, मंगलगिरी, उप्पडा, वेंकटगिरी सिल्क, गडवाल, मध्य प्रदेश मधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, राजस्थान गुजराथ मधील बांधणी, गुजराथ मधीलच पटोला, बंगाल मधील सुती साड्या, कांथा सिल्क साड्या, बांगलादेश मधील मलमलच्या साड्या, टसर सिल्क, आसाम मधील मूगा सिल्क,  संबळपूर, बेहरामपूर सिल्क, इक्कत या ओरिसा मधील साड्या, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, आणि इरकल, केरळ मधील पारंपारिक ऑफ व्हाईट, सोनेरी काठाच्या साड्या काश्मीर मधील सिल्क साड्या, पंजाब मधील फुलकारी किंवा हातानी विणकाम केलेल्या साड्या, बघावी तेवढी यादी वाढत जाते. यातल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यावर एखादी साडी घेणं हे भारतीय एकात्मतेसाठी गरजेचंच असतं.

भारतामध्ये पर्यटन किंवा गावोगावी लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये गेला बाजार आपल्या शहरांमधल्या दुकानांमध्ये यातल्या बऱ्याचशा प्रकारच्या साड्या मिळतातच, आणि याखेरीज अनेक प्रकारच्या साड्यांनी दुकानं कायम भरलेली असतात, मग कधी रंग आवडला म्हणून, कधी काठ आवडले म्हणून, कधी पदरावरची नक्षी आवडली म्हणून, कधी हा रंगच माझ्याकडे नाही, किंवा ही रंगसंगती नाही. कधी सगळ्या जणी एक सारख्या साड्या घेऊ म्हणून घेतलेली, कधी, ( बऱ्याच वेळा ?) भेट म्हणून आलेल्या साड्या, अशा साऱ्या साड्यांनी कपाट वाहून चाललेलं असतं, तरीही साडीचा मोह हा कधी सुटत नसतो, रस्त्यावर सहज फिरताना, किंवा कोण एकीच्या अंगावरची साडी आवडली म्हणून साडीची खरेदी कधीच थांबत नसते.

साड्या बायकांना एकत्र जोडतात,  त्यांच्यात संभाषणं तयार करवतात, नैसर्गिक औत्सुक्याला खतपाणी घालतात भौगोलिक, भाषिक अंतर मिटवतात, पुरुषांना बायकांचं मन जिंकण्याची सोपी संधी देतात, संस्कृती जपण्याचे, जोपासण्याचे कामा करतात, हस्त शिल्प कारागिरांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात, बायकांचे सौंदर्य खुलवतात. इतकं सगळं करणाऱ्या बहुगुणी साड्या जरा चुकून जास्तच असल्या घरात तर काय झालं, शेवटी मनाजोगती साडी मिळाली तर बाई खुश, बाई खुश तर घर खुश आणि घर खुश तर दुनिया सलामत. सहा वारांमध्ये लपलेली असतात किती तरी गुपितं, वर्षे गेली, साडी विरली तरी तशीच जपलेली त्यामुळेच घरोघरची साड्यांची कपाट फक्त कपाट नसतात ती असतात साड्यांची म्यूझियम.


Monday, November 7, 2016

गोष्ट एका 'केस' ची

मैत्रीण खूप वर्षांनी भेटत होती. फोटो मधून एकमेकींचे दर्शन घडत होतं, पण फोटो मधेय बऱ्याचदा आपण आपल्याला जे आवडतं, जे दाखवायचं असतं तेच दाखवतो. कॉलेज च्या दिवसापासुनची ही मैत्रीण, म्हणजे अगदी एखादा मुलावर टप्पे टाकण्यापासून घरी वेळ मारून नेण्यापर्यंत सारे काही सोबत केलेली. कॉलेज च्या दिवसात असे मित्र मैत्रिणी असतातच ज्यांच्यामुळे आयुष्यात पुढे आठवणीना वेगळा रंग, गंध, स्पर्श असतो. आयुष्य व्यापून उरतात त्या आठवणी. त्यामुळे हे मैत्र उघडं नागडं असतं, तिथं काही लापवाछपवी नसते. प्रत्यक्षात बघितल्यावर मैत्रीण एकदम बोलून गेली
‘अग हे काय? एवढेसे केस?’
माझ्या झड झड झडणाऱ्या केसांकडेच तिचं पहिलं लक्ष गेलं. हाय रे दैवा, इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य शेवटी समोर आलंच होतं. मीच मग पलटवार करत म्हणलं,
‘अग एवढे तरी केस राहिलेत बघ अजून , पूर्ण टकली व्हायला वेळ आहे.’ आणि मग हा हा हा करत वेळ मारून नेली.
वेगवेगळे विषय निघत गेले, गप्पा रंगत गेल्या, पण तिच्या डोक्यातून काही माझे केस जात नव्हते, आणि केसांबद्दल विचार करून करून माझे केस गळून गेले होते. वाढत्या वयाबरोबर माझे केस माझी सोबत सोडत चालले होते. वयाबरोबर पांढरे होत जाणारे केस माहीत होते, पण वयाबरोबर साथ सोडणारे केस मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक वेळी काही तरी नवीन कारण मिळायची केस गळायला, मग त्यावरती नवीन काही तरी उपाय.
शाळेत कॉलेजात असताना आईच्या शाळेच्या धाकानी तरी तेल पाणी व्हायचं, पण मग शाळेतून कॉलेजात गेल्यावर शिंग फुटतात त्यामुळे, केस कापून शिंगाना खास जागा केली, मग एकदा लागलेली कात्री सहज सुटत नाही म्हणत ती कात्री दर सहा महिन्यांनी आगत गेली, कधी कात्री कधी रंग. केस म्हणजे एक प्रयोग शाळा होत होती. मग प्रयोग कमी कमी होत गेले आणि केसांचा आकार, घनता देखील.
मग कामाचा, आयुष्याचा ताण, नानाविध कारणं लागत गेली, गावं बदलली, देश बदलले, खाणं बदललं, साध्या साध्या सवयी बदलत गेल्या आणि केशरचना देखील! मग तेल बदललं, शाम्पू बदलले, कधी कुठल्या पावडरी लावून पाहिल्या, कडीपत्ता, ते मेथ्या, अंड ते दही सारं काही खावून, लावून, वापरून झालं, पण केसांनी मात्र वाढायला पसरायला पूर्णपणे नकार दिला होता. कधी वर बांधून , कधी वेणी मध्ये लपवून त्यांचं अस्तित्व मी लपवू पाहत होते. जेवढे जास्त प्रयत्न तेवढ जास्त दुःख! जाहिरातीना भुलून वापरलेल्या तेल, शाम्पू नी बिलाचा आकडा वाढायचा पण केस मात्र जिथे आहेत तिथे.
लहानपणी आईकडे केस कापू दे, छोटे करायचेत म्हणून हट्ट करावा लागायचा आणि आता केस वाढावेत म्हणून हट्ट धरावा लागतोय. आयुष्य बहुदा हेच असतं, जेव्हा जे असतं, तेव्हा त्याची किंमत कळत नाही, आणि मग जेव्हा ते हातातून (डोक्यावरून) निसटून जायला लागतं तेव्हा मात्र त्याला घट्ट धरून ठेवण्याची खटपट केली जाते. कधी कधी शांतपणे विचार केला तर वाटतं, का करायची ही खटपट, द्यावं सोडून सारं, सुंदर दिसण्याची एक पायरी म्हणजे सुंदर केस, पण मग बिनाकेसांच्या सौंदर्याच्या काय? वर्षानुवर्षे मांडत असलेल्या गृहितकांना, मापकांना कुठेतरी छेद दिलाच पाहिजे ना? सौंदर्याच्या कल्पनाच जर आपण किमान आपल्यापुरत्या तरी बदलल्या तर? काही कारणानी गमावले केस तर? आयुष्य थांबत तर नाही ना तिथं? सौंदर्याच्या कल्पना जेव्हा बदलून जातात तेव्हा बदल असते आपली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर. आणि मग न दिसलेल्या अनेक गोष्टी दिसायला, जाणवायला लागतात.
गळणाऱ्या केसांमुळे मिळालेलं हे शहाणपण जेव्हा मैत्रिणीबरोबर वाटत गेले तेव्हा  ती सहज  बोलून गेली, ‘टकले, बहुदा केस गेल्यामुळे मेंदूला छान ऊन मिळत असावं, त्यामुळे, विचारांचं पीक जरा बरं वाढतंय!’ आणि मला बाल बाल बचावल्याच नवं समाधान मिळालं!



टीप: बिनाकेसांच्या सौंदर्याच्या एका सुंदर जाहिरातीची लिंक सोबत जोडत आहे. जेव्हा जेव्हा ही जाहिरात बघते तेव्हा तेव्हा हे सौंदर्य मला अजूनच भावतं...