Wednesday, December 7, 2016

एक आहे गुड्डी....

एका चित्रपट महोत्सवात खूप दिवसांनी परत गुड्डी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बघूनही हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, चित्रपट बिलकुल शिळा वाटला नाही. जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा मी देखील गुड्डीच्याच वयाची असेन. अगदी साधी सरळ एका चित्रपट वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे गुड्डी. जया भादुरी आजची जया बच्चन हिचा पहिला चित्रपट हा. माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा आणि दिग्दर्शकाचा हृषिकेश मुखर्जींचा हा सिनेमा मला आपल्या सगळ्यांचीच गोष्ट वाटते.

एका छोटाश्या गावातल्या मुलीचा आवडता नायक धर्मेंद्र, त्याचा प्रत्येक चित्रपट तिला पाठ! शाळा बुडवून सिनेमा बघायचं तिला वेड. आयुष्य म्हणजे एक सिनेमा मानून चालणाऱ्या लाखो भारतीयांचं प्रतिक म्हणजे गुड्डी. सिनेमातली वाक्य, प्रसंग, माणसं खरी मानून आपण एक समांतर आयुष्य जगत असतो. सिनेमातल्या, मालिकांमधल्या पात्रांमध्ये आपण शोधात असतो स्वतःलाच. त्यांच्या सारखेच कपडे करून, त्यांची भाषा बोलून, त्यांच्यासारखा विचार करून आपण ते स्वप्नी जग आणि सत्यीत जग एकाच करायचा प्रयत्न करत असतो. शाळा बुडवून सिनेमाचं शुटींग बघायला गेलेल्या गुड्डीला सही देताना with love म्हणून लिहिणाऱ्या धर्मेंद्र च्या प्रेमात पडलेली गुड्डी स्वतःला मीरा आणि धर्मेंद्र ला कृष्ण समजायला लागते. मग तिला पडद्यावरचा धर्मेंद्र खरा खरा तिचा देव वाटायला लागतो, गुंडांशी भांडणारा, पियानो वाजवणारा, कधी डॉक्टर, कधी क्रांतिकारक, कधी कवी, कधी प्रोफेसर जेवढे सिनेमे तेवढी रूपं, एक माणूस जे जे काही स्वप्नात, कल्पनेत करू इच्छितो ते ते हे नायक मोठ्या पडद्यावर अगदी सहज करत असतो. गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात असते, आणि गुड्डीच्या प्रेमात नवीन, तिच्या वहिनीचा भाऊ असतो. गुड्डी चित्रपटांमध्ये इतकी रंगलेली असते की रडताना तिच्यासमोर आदर्श असतो मीनाकुमारीचा, तिला कपडे हवे असतात माला सिन्हा सारखे. भावना प्रगट करताना देखील तिला सिनेमाचा आधार लागायचा.  
जेव्हा नवीनला कळतं की गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात आहे तेव्हा तो खरंच खचतो, पण मग मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले त्याचे मामा त्याल समजावून सांगतात, अरे तिला जे वाटतंय ते प्रेम नाही तर आकर्षण आहे. प्रत्येकाच्या मनात अशी एक छबी रुतून बसते, मग मोठ्या पडद्यावर ते सारं बघून आपण त्या माणसाच्या नव्हे तर प्रतिमेच्या प्रेमात असतो.

गुड्डी ज्याच्या प्रेमात असते त्या धर्मेंद्र च्या मदतीने नवीन चे मामा, गुड्डीला सिनेमाच्या फसव्या जगाचं दर्शन घडवतात. प्रत्यक्ष सिनेमात संवाद लिहिणारा कथा/ संवाद लेखक , ते संवाद कशा प्रकारे बोलायचे हे दाखवणारा दिग्दर्शक, आणि हे सगळं चित्रित करणारा कॅमेरामन हे आणि यांच्या सारखे अनेक जण मेहनत करतात तेव्हा जाऊन एक स्टार जन्माला येत असतो. अगदी साध्या सरळ भाषेत , दृश्यांमध्ये हृषीकेश मुखर्जींनी कित्येकांना त्यांच्या भ्रमातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. जवळपास ४६ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आजही तेवढाच खरा वाटतो, पटतो. ह्या नाटकी दुनियेचा अनुभव घेतल्यावर गुड्डीला साक्षात्कार होतो तिच्या अवती भोवती घुटमळणाऱ्या प्रेमाचा .. आपण स्वप्नांच्या मागे पळता पळता, अप्राप्य गोष्टींचा ध्यास घेता घेता आपल्याला जे सहज शक्य आहे ते सुद्धा मिळवत नाही. गुड्डीला झालेल्या नव्यानं झालेल्या प्रेमाच्या साक्षात्कारावरच हृषिदा हा चित्रपट संपवतात आणि आपण परत येतो वास्तवात.
  
आजही नायक नायिकेच्या पडद्यावरच्या छबीलाच खरं मानणारे अनेक जण आहेत, नायक नायिकेसाठी काहीही करायला तयार असणारे आजही आहेत, फक्त धर्मेंद्रच्या जागी, शाहरुख खान, सलमान खान, ह्रितिक रोशन ,रणबीर कपूर, शहीद कपूर अशी फक्त नावं बदलली आहेत, आजही लोकांना फक्त पडद्यावर चमकणारे तारेच भुरळ घालतात, त्यांना चमकवणाऱ्या हातांचे कष्ट, आणि प्रतिमा आजही दुर्लक्षितच असतात.

जितकं गुड्डी मधलं हम को मन की शक्ती देना डोक्यात गात राहत तशीच सिनेमामधली सिनेमावरची दिग्दर्शकाची टिप्पणी लक्षात राहते. आपण प्रत्येक जण आयुष्यात एक फँटसी शोधत असतो. एकाच जन्मात आपल्याला अनेक जन्म जागून घ्यायचे असतात. जे जे उत्तम उद्दात्त ते ते आपल्याला आपल्याकडे हवंसं असतं. आपल्या सुखाच्या, आनंदाच्या कल्पना आपण दुसऱ्यांकडून प्रेरित होऊन घेत असतो. आपल्या प्रियकरामध्ये आपल्याला आपला आवडतो ‘हिरो’ दिसत असतो, तर आपल्या आवडत्या ‘हिरोईन’ चे भास अनेकांना त्यांच्या प्रेयसी मध्ये होता असतात. नवरा बायको देखील एकमेकांच आयुष्य फिल्मी पद्धतीनं जोडायचा प्रयत्न करत असतात. हे वागणं जगावेगळ बिलकुल नसतं, मुळात हे असतं, आपल्या आयुष्यातले प्रश्न विसरण्याचा, किंवा असुरक्षितता विसरण्याचा सोप्पा मार्ग. सिनेमातलं बघून लग्नामधले विधी जेव्हा बदलायला लागतात, जेव्हा कपड्यांची फॅशन बदलते, फिरायला जाण्याची ठिकाणं बदलतात तेव्हा सिनेमातल्या आपल्या आयुष्यावरच्या प्रभावाची जाणीव होते. सिनेमाला समाजमनाचा आरसा समजलं जातं. पण हा आरसा अगदी गंमतीशीर असतो, म्हणजे ही खरतर काच असते, ज्यामध्ये दोन्ही बाजूचं दिसत असतं.


चित्रपट हा एक उत्तम कलाप्रकार मानला जातो. आपण आपली जागाही न सोडता एका वेगळ्या जगात सैर करून येत असतो, माहीत असलेली गोष्ट वेगळ्या पद्धतीनं बघत असतो, अनुभवत असतो. त्यामुळेच ४६ वर्षापूर्वी बनवलेल्या सिनेमा आजही तेवढाच valid ठरतो. माझा ५ वर्षाचा मुलगा जेव्हा मालिकेतलं, जाहिरातीतलं जग खरं मानून मला काही विचारतो , त्या त्या वेळी मला त्याच्यात गुड्डा दिसतो. मी वाट बघतीये त्याच्यासोबत बसून गुड्डी बघायची, कदाचित त्याला दाखवता दाखवता मीच परत काही तरी शोधेन, मला काय हवं आहे याचा परत एकदा मला साक्षात्कार होऊ शकेल. 


No comments:

Post a Comment