Showing posts with label सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा. Show all posts

Monday, August 21, 2017

आई होते मुलगी माझी....

काही चित्रपट मनात घर करून राहतात, तुम्ही त्यात बुडून जाऊन जगत असता तो चित्रपट. त्यातली पात्र फक्त पात्र राहत नाही, तुम्हीच होऊन जाता. आणि मग कित्येक दिवस उतरत नाही तो सिनेमा तुमच्या मानगुटीवरून. इतका भिनून जातो तो की वागताना बोलताना घुमत असतो डोक्यात. अशीच अॅलीस ठाण मांडून बसली आहे माझ्या डोक्यात. ५० व्या वाढदिवस मुलांसोबत साजरा करणारी, अगदी आपल्यातलीच एक कुणीतरी. भाषाविद्यानाची प्राध्यापक असणारी ही बया अगदी साधं सरळ आयुष्य जगत असते आणि अचानक ती बोलता बोलता शब्द विसरते, मग एकदा रस्ताच विसरते. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता ती जाते डॉक्टरकडे.

काय झालं असू शकेल हिला आपण पण विचार करायला लागतो, आणि मग समोर येऊन उभा राहतो अल्झायमर्स चा काळोखाचा बोगदा. सुरुवातीला नाकारलं तरी आपण हे नाकारू शकत नाही कळल्यावर तिनी स्वीकारलेलं वास्तव. मग सुरु होते तिची स्वतःची एक लढाई . अल्झायमर मुळे आयुष्य थांबत नाही. आपण ते थांबवू शकत नाही हे पटवण्याची धडपड. तिला असलेला आजार हा आनुवंशिक आहे हे कळल्यावर तिच्या तीन मुलांपैकी मोठी मुलगी आणि मुलगा टेस्ट करून घेतात, पण धाकटी मुलगी जी बाकी दोघांपेक्षा वेगळी आहे, बंडखोर आहे ती नाकारते. तिचं म्हणणं, टेस्ट करून काय मिळणार आहे. जेव्हा तिच्या मोठ्या मुलीला शक्यता आहे हा रोग होण्याची तेव्हा हताश झालेली अॅलीस मधली आई जणू ती तिचीच चूक असल्यासारखी माफी मागत राहते. मग हळू हळू ती विसरायला लागते आजूबाजूची माणसं, शब्द. जे तिचे कधी काळी सख्खे सोबती होते. तेच आत तिची साथ सोडत होते. आयुष्यात तिनी स्वतःच स्थान निर्माण केलं होत शब्दांच्या जोरावर पण आता धूसर होत जाते तेच शब्द. एकीकडे हे होत असतानाच तिचा नवरा, मुलं मात्र तिला सांभाळून घेत असतात. तिला एकाच गोष्ट चार चार पाच पाच वेळा सांगत असतात, ते ही न कंटाळता, न वैतागता.

यातला एक प्रसंग कायम माझ्या डोळ्याच्या कडा पाणावतो. अॅलीस तिच्या धाकट्या मुलीच्या लिडीयाच्या खोलीत जाते, आणि तिची खोली आवरता आवरता तिला मुलीची डायरी मिळाली, आणि तिनी ती वाचायला सुरुवात केली, आपण काय करतोय हे कळण्या न कळण्याच्या पलीकडे गेलेली अॅलीस मुलीच्या मनातली खळबळ जाणून घेत होती. त्याच दिवशी ती मुलीला त्या अनुषंगाने काही बोलते, तेव्हा तिची मुलगी चिडून तिला सांगते ती माझी खासगी डायरी आहे, ती तू का वाचलीस? त्यावर भांबावलेली अॅलीस म्हणते मला खरंच माफ कर मला कळत नव्हतं मी काय वाचतीये. मला खरंच कळत नव्हतं मी काय करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी अॅलीस लीडीयाला विचारते तिच्या नाटकाचा प्रयोग कधी आहे मी नक्की येईन. आणि ती तिच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवते. बाकीचे सगळे विरोध करत असतानाही ती म्हणते नाही मी नक्की जाईन.  सगळे निघून गेल्यावर ती म्हणते, लिडीया मी काल काहीतरी केलं ज्यामुळे ती चिडली होतीस इतकंच मला आठवतंय, पण मी काय केलं ते आठवत नाहीये. मला माफ कर, तेव्हा लेक म्हणते माझीच चूक होती, मीच माफी मागते. तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू पुसत ती म्हणते ठीक आहे ग. मला कुठे काय लक्षात राहणार आहे. पण हे बोलतानाही कुठेच अगतिकता तिच्या आवाजात नसते. तिच्यातली आई सतत जागी असते. आणि त्यानंतर लिडियाच्या खोलीत जेव्हा ती परत जाते तेव्हा तिला त्याच डायरीवर no secrets लिहिलेलं दिसतं. लेकीची आई होऊ घातली होती.

अॅलीस अल्झायमर्स शी निगडीत एका परिषदेत स्वतःचे अनुभव मांडते, तेव्हाही ती विसरत असते एकेक अनुभव, तिच्या मुलीचा नाटकातला अभिनय बघताना ती विसरून जाते ती तिचीच मुलगी आहे, स्वतःच्या नातीला पहिल्यांदा घेतानासुद्धा ती विसरली असते तिच्या मुलांचं बालपण, एकेक शब्द विसरत असताना ती विसरत असते तिच्या आठवणी, विझून जात असतं तिच्या डोळ्यातलं चैतन्य. जेव्हा कोणी सांभाळायला नसतं तेव्हा तिची तीच हट्टी बंडखोर लेक लिडिया येते तिची काळजी घ्यायला. तिच्या सोबत रहायला. तेव्हा अॅलीस होऊन गेलेली असते एक बाळ. फक्त प्रेम समजू शकणारं, प्रेम करू शकणारं एक लहान मूल. एक निरागस जीव जो पोहोचला असतो सगळ्या भाव भावनांच्यापुढे. आणि तिला समर्थपणे सांभाळत असते तिची लेक!

हा चित्रपट खूप काही शिकवून जातो, एकीकडे हे आई लेकीचं तरल नातं तर दुसरीकडे स्वतःच्या असाध्य रोगाशी लढण्याची दुर्दम्य इच्छा. अॅलीस जेव्हा आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असते तेव्हाच इतरांना आपलं ओझं होऊ नये म्हणून आत्महत्या करण्याचा व्हिडीओ करून ठेव स्वतःसाठीच पण भविष्यासाठी. ही लढाई जिंकू शकत नाही हे माहित असूनही तिची लढण्याची जिद्द कुठतरी आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन घाबरून जातो , निराश होऊन जातो याची जाणीव करून देते. अॅलीस तिच्या भाषणात सांगते, मी हरवतीये रोज काही आठवणी, माझं आयुष्य. माझी एकाच इच्छा आहे भविष्यात माझी मुलं किंवा त्यांची मुलं यांच्यावर येऊ नये ही वेळ. या आजारपणामुळे मी शिकतीये क्षणांमधली मजा लुटायला शेवटी आयुष्य काय क्षणांचेच तर आहे. स्वतःला होणारा त्रास मुलांना होऊ नये म्हणून विचार करणारी ही आई खरंच मनात घर करते.!!!   

मानसी होळेहोन्नुर


Still Alis:  https://en.wikipedia.org/wiki/Still_Alice

Monday, July 31, 2017

ब्रुकलीन मधला शहाणा...

एक पन्नाशीतला माणूस गाडी चालवत असतो, सिग्नल ला थांबतो, आणि सिग्नल सुटल्यावर निघतो तर दुसऱ्या बाजूनी एक गाडी येऊन त्याच्यावर आदळते, आधीच गाडीमध्ये वैतागलेला, आता तर त्याचा स्वतःवरचा ताबा सुद्धा सुटतो आणि तो त्या टॅक्सी ड्रायव्हरशी अगदी हमरी तुमरीवर येऊन भांडायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून तो दाखवून देत असतो सगळ्यात जास्त चिडणारा माणूस आहे तो. त्याच दिवशी त्याची हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असते, तिथे जाऊन त्याला कळतं त्याचा नेहेमीचा डॉक्टर नाही तर दुसरीच कोणती तरी बाई आलेली आहे, जरा थांबलेला राग परत त्याला गाठतो, आणि तो त्याच रागाच्या भरात प्रश्नांची फैरी झाडतो त्या डॉक्टरवर. ती डॉक्टर स्वतःच गोळ्या खाऊन स्वतःला शांत करायचा प्रयत्नात असताना त्या चिडणाऱ्या पेशंट कडे डॉक्टर म्हणून बघूच शकत नसते हे आपल्याला कळत असते, पण त्या दोघांनाही ते उमगत नसतं. तो खरतरं गंभीर आजारी आहे, त्याच्या डोक्यातला ट्युमर फुटून रक्तस्त्राव सुरु झालेला आहे, तो कधीही कोसळू शकतो, ती डॉक्टर ही सगळी तांत्रिक माहिती त्याला अगदी निर्विकारपणे देत असते, आणि मृत्यू असा फारसा लांब नाही हे उमगून तो अजूनच वैतागतो, चिडतो, आता तो चिडलेला असतो, स्वतःच्या आयुष्यावर, चाहूल लागलेल्या मृत्यूवर. मृत्यूला आपणा हरवू शकत नाही हे माहीत असतं, त्यामुळे किमान हातात अजून किती वेळ आहे हे कळल तर किमान आपण ते उरलेले महिने, दिवस तास चांगले घालवू उगाच एक भाबडी आशा मनाशी बाळगत तो त्या डॉक्टरला छळत राहतो, विचारत राहतो किती वेळ आहे माझ्याकडे? स्वतःच्या वेळेत अडकलेली ती डॉक्टर एकाच सांगत राहते, किती वेळ ते मी नाही सांगू शकत. शेवटी कंटाळून वैतागून समोर पडलेल्या मासिकावरचा आकडा बघत ती म्हणते ९० मिनिटं राहिलीत, झालं समाधान तुझं.
आकडा कळेपर्यंत धडपडणारा तो माणूस आकडा ऐकल्यावरही क्षणभर लटपटतो, फक्त ९० मिनिटं. आणि मग ठरवतो जवळच्या माणसांना एकदा शेवटचं भेटायचं. आपण ९० मिनिटानंतर या जगात नसू कल्पनाच किती भयंकर असू शकते, किती तरी गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, किती तरी गोष्टी अनुभवायच्या असतात आणि असा ९० मिनटात आपल्याला निरोप घ्यायचा आहे सगळ्यांचा सोपं बिलकुल नसतं. त्याचवेळी आपण काय बोलून गेलो आहोत हे त्या डॉक्टरला तिचे सिनिअर डॉक्टर लक्षात आणून देतात, जर तो माणूस मेला, त्यानी कोणाला या सगळ्याबद्दल सांगितलं तर तिचं लायसन्स जप्त होऊ शकतं याची जाणीव झाल्यावर सुरु होतो एक पकडापकडी चा खेळ. मृत्यू भेटण्याआधी जवळच्या माणसांना गाठण्याची त्या माणसाची धावपळ, आणि मृत्यू त्या माणसाला गाठण्याआधी त्याला पकडून हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्या डॉक्टरची पळापळ.
द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन ची कथा ही. आपलं आयुष्य फक्त आपलं नसतं. आजूबाजूच्या ओळखीच्या अनोळखीच्या लोकांमुळे ते घडत असतं. एक पेशंट, आणि डॉक्टरची ही गोष्ट फक्त तेवढीच नाही. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं, आपण ते कारण समजून घेण्याचा प्रयत्न न करता सरळ हल्ले चढवून, सूचना देऊन, सल्ले सांगून मोकळे होत असतो! दोन वर्षापूर्वी तरुण मुलगा मेल्यामुळे सैरभैर होऊन चिडचिड्या झालेल्या नवऱ्याला बायको समजून घेत नाही, स्वतःच्या मर्जीचं करिअर करू पाहणाऱ्या मुलाला बाप समजून घेत नाही, विवाहित प्रियकर धोका देत आहे हे शिकलेली डॉक्टर तरुणी समजून घेत नाही. जगात प्रत्येकाला चिडायला प्रत्येक सेकंदाला एक कारण मिळत असतं, आणि तो एक चिडका क्षण जन्म देत असतो पुढच्या चिडक्या क्षणांना. छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडत असताना आपण जगणं हरवत चाललोय हे आपल्याला लक्षातच येत नसतं. किंवा लक्षात आलं तरी तोवर वेळ निघून गेलेली असते.
हातात १९ मिनिट राहिलेली असताना भाऊ, बायको, मुलगा या तिघांशी शेवटचा भांडून, मनात असलेलं प्रेम अव्यक्तच ठेवून तो चिडका माणूस आत्महत्या करायला निघतो, त्यावेळी त्याला ती डॉक्टर गाठते, त्याला विनवते किमान माझ्यासाठी तरी आत्महत्या करू नकोस, पण स्वतःच्या आत्मसन्मानाची काळजी करणारा हेन्री आल्टमन पुलावरून खाली उडी मारतो. मे २०१४ मध्ये आलेला हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन मध्ये नायक आत्महत्या करायचा प्रयत्न करतो पण त्याची डॉक्टर त्याला वाचवते, पण खऱ्या आयुष्यात मात्र असं कोणीच वाचवायला आलं नाही रॉबिन विल्यम्सला! आत्महत्या करून त्यानं स्वतःला संपवलं. उत्तमोत्तम चित्रपटात काम करून एकापेक्षा सरस एकेक सरस भूमिका करणारा हा अभिनेता देखील रागाच्या एका सेकंदात, स्वतःवरचा ताबा विसरून शरण गेला रागाला, मृत्यूला. हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या चांगल्या चित्रपटांमध्ये गणला जात नाही, समीक्षकांनी पण याला नाकं मुरडली होती. पण तरीही मला वाटतं, यातले योगायोग नाट्य सोडलं तरीही हा चित्रपट ब्रुकलिन मधल्याच नव्हे तर जगातल्या सामान्य माणसाच आयुष्य दाखवतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून जगण्यातली गंमत विसरलेल्या माणसाला आरसा समोर धरून त्याच्या आयुष्यात काय हरवत चाललंय हे सांगत.

आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाच उत्तर नसतं. आणि कोणत्याही वयोगटासाठी, कोणत्याही स्तरातील, समाजातील माणसांसाठी ते भूषण असू शकत नाही. मृत्यू सगळीकडेच फिरत असतो, त्याला शोधत जाण्यापेक्षा हसणाऱ्या क्षणांना शोधत आयुष्य जगणं जास्त धैर्याच, साहसाचं आणि समाधानकारक असतं. रागावून चिडून आपण मनात असलेलं बोलतच नाही, भावना व्यक्त करतच नाही. ब्रुकलिन मध्ये राहणाऱ्या एका चिडक्या माणसाने सांगेपर्यंत हे मला कळलं नव्हतं असं नव्हतं, पण काही गोष्ट दुसऱ्यांच्या बघूनच आपण लवकर शिकतो हे मात्र मला परत एकदा कळलं.   
मानसी होळेहोन्नुर

https://en.wikipedia.org/wiki/The_Angriest_Man_in_Brooklyn

Wednesday, July 12, 2017

एका टकल्या मुलाची गोष्ट.... !

चित्रपट आवडण्यासाठी कधीही चित्रपटाची भाषा हा अडसर ठरत नाही. किंबहुना भाषेचा अडथळा दूर सारून जो चित्रपट तुमच्या मनात घर करतो तो नक्कीच चांगला चित्रपट समजला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते, कधी कधी जगाने नावाजलेल्या चित्रपटात दहाव्या मिनिटाला तुम्ही घोरत असू शकता, आणि तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचं नाव ऐकताक्षणी नाक मुरडणारी लोकं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. आणि अशी वेगवेगळी अभिरुची असणारी लोकं आहेत म्हणूनच वेगवेगळे प्रयोग चित्रपट क्षेत्रात होत असतात, आणि निराळ्या प्रकारचे चित्रपट आपल्यासमोर येत असतात. सच्च्या चित्रपट रसिकाला कोणताही वेगळं काही देणारा चित्रपट आवडतो.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बघितलेला नवीन कन्नडा चित्रपट ‘वंदू मोट्टेय कथे’. इंग्लिश मध्ये एगहेड असं नाव असणारा हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे एका टकल्या मुलाची. सौंदर्य हे फक्त बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं हे वाक्य बोलून, लिहून अगदी गुळगुळीत झालंय, पण तरीही ते खरं आहे. भोली सुरत दिल के खोटे म्हणणाऱ्या मास्टर भगवान ला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं पण नायक म्हणून नाही. नायक काय किंवा नायिका हे कायम सुंदर, हुशार तरुण, सडसडीत असलेच हवे.जाडे , टकले लोक हे फक्त हसवण्यासाठीच असतात असा एक गंभीर समज आहे. ७० , ८० च्या दशकात प्रायोगिक सिनेमांनी नायकांना खऱ्या प्रतिमेच्या जवळ न्यायला सुरुवात केली, म्हणजे ते नोकरीला जायचे, ट्रेन नी प्रवास करायचे, आपल्यातले वाटायचे, पण तरीही कोणताही नायक कधीच टकला नसायचा. नायिका देखील बदलत होत्या, पण तरीही जाड नायिका दिसली ती दम लगा के हैशा मध्ये.
या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नावापासूनच ज्याला कायम अंड म्हणून चिडवलं जातंय अशा मुलाची गोष्ट बघायची उत्सुकता होती. हा २८ वर्षाचा मुलगा आहे, जो एका कॉलेज मध्ये कन्नडा शिकवतो. त्याच्या लग्नासाठी हालचाली सुरु आहेत, पण दरवेळी आडवं येतं असतं त्याचं टक्कल. टकला असला तरी त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा आहेत, एखादी सुंदर, देखणी मुलगी त्याला हवी आहे. जेव्हा आई वडिलांकडून होणारे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तो स्वतःच ठरवतो मीच शोधेन मुलगी. या सगळ्याला मस्त जोड दिली आहे कन्नडा चित्रसृष्टीचे सुपरस्टार राजकुमार यांच्या चित्रपटांची, गाण्यांची. अगदी मस्त प्रसंगोपात गाणी येतात.  नायक हा राजकुमार यांचा भक्त आहे , दिवसरात्र त्याच्या डोक्यात राजकुमार यांचही, गाणी, चित्रपट असतात. इन फॅक्ट त्यामुळेच राजकुमार यांचा वावर पूर्ण सिनेमाभर एखादी मार्गदर्शकासारखा आहे. जेव्हा जेव्हा तो एखाद्या द्विधेत सापडतो, राजकुमार त्याच्या मदतीला धावून येतात. राजकुमार आजही इथल्या सिनेरसिकांच्या नसानसात भरून राहिलेले आहेत.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे. मुळात हा चित्रपट राज शेट्टी यानी स्वतःच लिहिला, दिग्दर्शित केला आणि प्रमुख भूमिका देखील केली, हा चित्रपटात मेंगलोर कडची कन्नडा बोलली जाते. पहीलाच प्रयत्न असल्याने आणि मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नसल्याने हा चित्रपट फक्त मेंगलोर आणि जवळपास च्या भागत प्रदर्शित करणार होते, पण हा चित्रपट बेंगलोर मधल्या काही चित्रपटदर्दींनी पाहिला, आणि मग कन्नडा चित्रसृष्टीतल्या यशस्वी दिग्दर्शकानी त्याच्या बॅनर खाली याला फक्त देशात नव्हे तर परदेशातही प्रदर्शित केला.
उगाच काहीतरी संदेश देत आहे असं सांगणाऱ्या किंवा मनोरंजनासाठी म्हणून काहीही दाखवणाऱ्या सिनेमांपेक्षा दोन्हीचा योग्य मिलाफ या सिनेमात साधला आहे, उत्तरार्ध अजून एक दहा मिनिटं कमी केला असता तर सिनेमा अजून नेटका झाला असता, इतकं मात्र खरं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं, तर आपल्या आयुष्यात तरी आपण हिरो असूच शकतो. नायक नायिकांना त्यांच्या टिपिकल सौदर्याच्या परिमाणामधून बाहेर काढून गर्दीचा भाग असलेला एखाद्याची कथा मोठ्या पडद्यावर बघताना आपण जास्त गुंगतो, हे मात्र खरं. चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात त्यामुळेच हृषीकेश मुखर्जींचे सर्वसामान्य नायक असणारे चित्रपट आजही आवडीने बघितले जातात, ‘वंदू मोट्टेय कथे’ नक्कीच अशा सिनेमांची आठवण जागवून जातो एवढं निश्चित !

(मुद्दाम कन्नडा शब्द सगळीकडे वापरला आहे, कारण कन्नडिगा त्यांच्या भाषेला कन्नड नव्हे तर कन्नडा म्हणतात. ज्या पद्धतीने मराठी भाषेत कोल्हापुरी, वैदर्भीय, पश्चिम महाराष्टातली मराठी वेगळी आहे त्याच पद्धतीने कन्नडा मधेय देखील बेंगलोर कन्नडा, मैसूर कन्नडा, मेंगलोर कन्नडा, नॉर्थ कर्नाटका कन्नडा अशा वेगवेगळी बोलीभाषा आहेत. )

मानसी होळेहोन्नुर

https://www.youtube.com/watch?v=UXv-9QdR3s8


Monday, July 3, 2017

कार्स ३ रेसिंगच्या पुढची गोष्ट

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, तो काळ गेला की आपण परत आणू शकत नाही, पण तो काळ वेगवेगळ्या मार्गानी परत अनुभवू मात्र शकतो. कोणाही प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्ती साठी निवृत्ती हा एक नाजूक प्रश्न असतो. त्यांनी आजवर जे करून यश मिळवलं ते करण्यासाठी वय साथ देत नसतं आणि ते कायमचं सोडण्यासाठी मन तयार नसतं. याखेरीज इतरांच्या, चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं असते ते वेगळचं. सन्मानाने निवृत्त व्हायचं की आपल्या खालावत जाणाऱ्या कामगिरीवर लोकांनी सतत बोट ठेवत आपल्याला प्रवृत्त करेपर्यंत सोडायचं नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो. one has to take that call. अगदी हाच विषय आहे डिस्नेच्या नव्या कार्स ३ या चित्रपटात.
अॅनिमेशन चित्रपट हे काही फक्त मुलांना समोर ठेवून तयार केलेलं नसतात, जसं अॅलीस इन वंडरलंड हे काही लहानांचे पुस्तक नाही, अगदी तसंच! वेगळा विचार, वेगळा दृष्टीकोन हा अशा चित्रपटांमधून इतका सहज दाखवला जातो की आपल्याही नकळत आपण त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो. मग कुंग फु पांडा सिरीज मधल्या चित्रपटांमधून दत्तक मुलांबद्दल केलेली भाष्ये असोत किंवा डीस्पेकेबल मी या त्रयी मधून वाईट माणसांमधला चांगुलपणा शोधण्याचा केलेला प्रयत्न असो, फ्रोजन मधून आपल्या शक्ती, सामर्थ्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे जास्त गरजेचे असते, दैवदत्त देणगी मिळालेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेणं आपल्याच हातात असतं. कोणतीही गोष्ट फक्त शाप किंवा फक्त वरदान असू शकत नाही, ती शाप ठरवायची की वरदान हे आपल्या हातात असतं, तशीच गोष्ट इनसाईड आउट ची, पौगंडावस्थेत मुलांचे प्रश्न एकदम अवघड का होतात, याचं सोप्पं उदाहरण आहे ते. आपल्या आठवणी हेच आपलं आयुष्य असतं, त्यामुळे चांगल्या वाईट आठवणी जपणं, त्यातून शिकणं हे गरजेचं असतं.
कार्स च्या आधीच्या दोन भागांमधून अशीच एका कार च गोष्ट सांगितली होती, रेसिंग कारच्या दुनियेतली, स्वतःला मोठा खेळाडू समजणारा लाईटिंग मॅक्वीन चुकून एका गावात येतो, तिथे त्याच्याकडून एक चूक होते, त्याची शिक्षा म्हणून त्याला तिथे काही दिवस राहून रस्ता तयार करावा लागतो, त्या गावात राहता राहता त्याची तिथल्या लोकांशी ओळख होते, तिथे असणारी एक कार ही नामांकित स्पर्धा जिंकलेली पण आता विस्मृतीच्या गर्तेत गेलेली असते, हे कळल्यावर कार्स चित्रपटाच्या नायकाचा लाईटिंग मॅक्वीन चा दृष्टीकोनच बदलून जातो. स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठी नसते, आणि येनकेनप्रकारेण जिंकणाऱ्या पेक्षा इतर स्पर्धकांना मान देऊन, खिलाडूवृत्ती दाखवत हरणारा स्पर्धक जास्त मनावर राज्य करतो हे सांगत पहिला चित्रपट संपला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी दुसरा भाग आला, ह्या भागात लाईटिंग मॅक्वीन ला अमेरिके बाहेर नेऊन डिस्नेनी जपान, इटली, युके मधल्या प्रेक्षकांनासुद्धा आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता, या भागात हेर गिरी, बरोबरच खेळांच्या स्पर्धांच्या आडून चालणारं राजकारण यावर संयत भाष्य केलं होतं. जाता जाता खेळाडू जिंकतो तेव्हा ते त्याचं एकट्याचं यश नसतं तर त्याच्या बरोबर असणारे मार्गदर्शक, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे,डॉक्टर, मित्र, अशा सगळ्यांचेच यश असतात, खेळणाऱ्याचा जेवढा स्वतःवर विश्वास असतो तेवढाच या सपोर्ट सिस्टीम वर देखील विश्वास असावा लागतो हा मोलाचा सल्ला या भागातून दिला होता. त्यामुळेच आता तिसऱ्या भागात अजून काय नवीन सांगतील याची खूप उत्सुकता होती.
मुळात या चित्रपट सीरीज चे भाग ५, ६ वर्षांनंतर येतात कारण त्यात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर सुद्धा मेहनत घेऊन काम केलं जातं, अॅनिमेशन तर आहे, मुलांच्या साठी तर आहे अशा सबबी देण्याऐवजी अजून जास्त चांगलं कसं देता येईल हा विचार असतो. या भागात इतकी वर्ष स्पर्धा जिंकणारा लाईटिंग मॅक्वीन स्पर्धा जिंकता जिंकता हारतो. त्याला हरवणारा नवीन खेळाडू हा नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याला सारून पुढे जातो. अनुभव आणि तंत्रज्ञान यामध्ये तंत्रज्ञान जिंकतं, पण त्याचा अर्थ अनुभव कमी असतो असं नाही. नवीन खेळाडूला मात देण्याच्या नादात लाईटिंग मॅक्वीन स्वतःलाच इजा करून घेतो, मग त्यानंतर तो स्वतःलाच उभारी देऊन परत स्पर्धेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतो, मग त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यायची तो ठरवतो, पण त्याच्या उतावळेपणा मुळे तो नवीन मशीन तोडून टाकतो. या सगळ्यामुळे त्याला आर्थिक सहाय्य करणारा कंपनीचा प्रमुख त्याला सांगतो, तुझे दिवस संपले, आता तू खेळाच्या मैदानावर जाण्याऐवजी जाहिरातीच्या व्यासपीठावर जा. आता तू काही खेळू शकणार नाहीस, आता तुझ्या नावावर जाहिरातीतून पैसे कमावण्याचे दिवस आता आहेत. मनातून कुठे तरी दुखावलेला पण तरीही जगज्जेता असलेला लाईटिंग मॅक्वीन म्हणतो, मला फक्त एक शेवटची संधी हवी आहे, जर मी ती स्पर्धा जिंकली तर मी ठरवेन कधी रिटायर व्हायचं, आणि जर ती संधी मी हरलो, तर तुम्ही म्हणाल तसं मी करेन, हे आव्हान त्यानी स्वतःलाच दिलं होतं. या सगळ्यामध्ये त्याच्या सोबत असते त्याची ट्रेनर जी आहे नव्या दमाची, जिला फक्त बंदिस्त खोल्यांमध्ये घाम गाळून प्रॅक्टिस करायची माहीत आहे,  तिला सांभाळून स्वतःला हवा तसा सराव करून घेणं त्याला जमत नसतं. त्यात त्याचा गुरु ज्याच्या मदतीने त्याने आधीच्या काही स्पर्धा जिंकल्या होत्या, त्याने जिंकलेली एक वेगळ्या धर्तीची स्पर्धा खेळायला लाईटिंग मॅक्वीन जातो, अर्थात तिथे त्याची ट्रेनर क्रूझ देखील असतेच, तिला सांभाळून घेता घेता तो मागे पडतो आणि मग अशी वेळ येते की तीच पुढे जाऊन स्पर्धा जिंकते. यामुळे दुखावलेला लाईटिंग मॅक्वीन तिला बोलतो, आणि मग ती तिचं मन मोकळं करते, मला खरंतर आयुष्यात हेच करायचं होतं. रेसिंग स्पर्धेत भाग घेणं हेच माझं स्वप्न होतं, पण माझा माझ्यावर विश्वास नव्हता आणि त्यामुळे मी कधी भागच घेऊ शकले नाही.
स्वतःवरचा विश्वास गमावत चाललेला लाईटिंग मॅक्वीन जेव्हा जिवलग मित्राला मीटर ला फोन लावतो तेव्हा तो सांगतो, तुला डॉक नी शिकवलं, तो आता नाही, पण त्याचा गुरु तर आहे ना. आणि मग तो निघतो त्याच्या गुरूला घडवणाऱ्या गुरूच्या शोधात, आणि एका क्षणी क्रुझ ची माफी मागून तिलाही सोबत घेतो.
अनुभव हा नेहेमीच काही ना काही शिकवून जात असतो, आपण जेव्हा जिंकतो तेव्हा फक्त आपणच जगज्जेते आहोत असा अभिनिवेश ठेवला तर आपण त्याक्षणीच स्वतःच्या विस्मृतीच्या वाटेकडे वाटचाल करत असतो, पण त्याचवेळी जर आपल्या पूर्वसुरींचा आदर ठेवला तर एक खेळाडू म्हणून आपण मोठे होत असतो, याची जाणीव असल्यामुळे मॅक्वीन जेव्हा तिथे जुन्या दिग्गज लोकांना भेटतो तेव्हा तो त्यांना त्याला शिकवायची विनंती करतो. मग नवीन तंत्रज्ञानाला हरवण्यासाठी त्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान हवं नाहीतर अनुभवाच्या जोरावर मिळणारं शहाणपण चलाखी हवी. त्यामुळे तो हे अनवट शहाणपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि अर्थात त्याचा फायदा क्रुझ ला देखील होत असतो, जी त्याच्यासोबत सावलीसारखी असते. एका क्षणी मॅक्वीन म्हणतो, परत रेस न करायला मिळण्यासारखं दुःख नाही, त्यावर त्याचा नवा गुरु स्मोकी म्हणतो, हे काही अंतिम सत्य नाही, आपल्यासारखा किंवा आपल्यापेक्षा चांगला विद्यार्थी घडवणं हे ही तेवढंच सुखकारक असतं.
शेवटची स्पर्धा सुरु होते, ज्याच्या जिंकण्याची शक्यता ९६ % आहे असा स्पर्धक स्पर्धेत असताना देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅक्वीन स्पर्धेत उतरतो, पहिल्या दहापर्यंत पोहोचतो. आणि तेव्हाच क्रुझ जी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिथेच थांबलेली असते, तिला तिचा बॉस सांगतो, तू इथे काय करतेस, हे काही बायकांचं काम नाही, जा निघून तुझ्या ट्रेनिंग च्या कामाला. हिरमुसलेली ती निघते, पण हे सारे शब्द गाडी चालवत असलेल्या मॅक्वीनच्या कानावर पडतात, आणि त्याच क्षणी त्याला स्मोकी नी सांगितलेलं आठवतं, आणि जाणवतं हाच क्षण आहे ती संधी मिळवण्याचा, आणि तो क्रुझ ला बोलावून घेतो आणि सांगतो, माझ्याऐवजी आता तू पळणार आहेस या स्पर्धेत, मानसिकरीत्या तयार नसलेल्या क्रुझ ला तो कसा तयार करतो, एका क्षणात स्पर्धकाच्या भूमिकेतून मार्गदर्शकाच्या भूमिकेत कसा जातो हे सगळं मुळातून पाहण्यासारखं आहे. चित्रपटाचा शेवट हा अर्थात अपेक्षित वाटेनी जातो, पण तरीही अजूनही खेळाच्या मैदानावर असलेल्या स्त्री पुरुष भेदभावावर काहीच न बोलता खूप काही बोलून जातो.
आजही अनेक गोष्टींवर पुरुष, स्त्री अशी लेबलं चिकटवलेली आहेत, ती कधी तरी कोणी तरी काढावीच लागतात. खेळ हा फक्त  शारीरिकदृष्ट्या खेळायचा नसतो तर तो मानसिकदृष्ट्या खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे, अगदी हेच चक दे मधून कबीर खान सांगतो किंवा दंगल मधून महावीर सिंग फोगट सांगतो. कोणत्याही खेळाचा सराव हा ठराविक पद्धतीनेच केला पाहिजे असं नसतं, तर तुमच्याकडे असणाऱ्या साधनसुविधांचा वापर करून, कल्पकतेनी तुम्ही नवीन गोष्टी आत्मसात करून त्या कशा अमलात आणता हे जास्त महत्वाचं असतं. शिखरावरून कधी ना कधी खाली यावंच लागतं मग ते  कधी उतरायचं हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही शिखरावरून उतरलात तरी तुम्ही शिखरावरच असता. डिस्ने अनेक वेळा या कठीण गोष्टी अशा सोप्प्या करून सांगतं. त्यामुळेच कार्स हा फक्त गाड्यांचा सिनेमा उरत नाही, त्यातल्या भाव भावना, नाते संबंध, सहज जाता येत केलेली भाष्य यामुळे तो आजचा सिनेमा ठरतो. आज मुलांना तो कार्स च्या रेसिंग साठी आवडेल, पण वय वाढता वाढता त्यातली गंमत, नव्याने काळात जाईल आणि मग जगण्यातली गंमत देखील कळायला लागेल.

संदर्भ :https://en.wikipedia.org/wiki/Cars_(film)
        https://en.wikipedia.org/wiki/Cars_2
            


Wednesday, December 7, 2016

एक आहे गुड्डी....

एका चित्रपट महोत्सवात खूप दिवसांनी परत गुड्डी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बघूनही हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, चित्रपट बिलकुल शिळा वाटला नाही. जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा मी देखील गुड्डीच्याच वयाची असेन. अगदी साधी सरळ एका चित्रपट वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे गुड्डी. जया भादुरी आजची जया बच्चन हिचा पहिला चित्रपट हा. माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा आणि दिग्दर्शकाचा हृषिकेश मुखर्जींचा हा सिनेमा मला आपल्या सगळ्यांचीच गोष्ट वाटते.

एका छोटाश्या गावातल्या मुलीचा आवडता नायक धर्मेंद्र, त्याचा प्रत्येक चित्रपट तिला पाठ! शाळा बुडवून सिनेमा बघायचं तिला वेड. आयुष्य म्हणजे एक सिनेमा मानून चालणाऱ्या लाखो भारतीयांचं प्रतिक म्हणजे गुड्डी. सिनेमातली वाक्य, प्रसंग, माणसं खरी मानून आपण एक समांतर आयुष्य जगत असतो. सिनेमातल्या, मालिकांमधल्या पात्रांमध्ये आपण शोधात असतो स्वतःलाच. त्यांच्या सारखेच कपडे करून, त्यांची भाषा बोलून, त्यांच्यासारखा विचार करून आपण ते स्वप्नी जग आणि सत्यीत जग एकाच करायचा प्रयत्न करत असतो. शाळा बुडवून सिनेमाचं शुटींग बघायला गेलेल्या गुड्डीला सही देताना with love म्हणून लिहिणाऱ्या धर्मेंद्र च्या प्रेमात पडलेली गुड्डी स्वतःला मीरा आणि धर्मेंद्र ला कृष्ण समजायला लागते. मग तिला पडद्यावरचा धर्मेंद्र खरा खरा तिचा देव वाटायला लागतो, गुंडांशी भांडणारा, पियानो वाजवणारा, कधी डॉक्टर, कधी क्रांतिकारक, कधी कवी, कधी प्रोफेसर जेवढे सिनेमे तेवढी रूपं, एक माणूस जे जे काही स्वप्नात, कल्पनेत करू इच्छितो ते ते हे नायक मोठ्या पडद्यावर अगदी सहज करत असतो. गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात असते, आणि गुड्डीच्या प्रेमात नवीन, तिच्या वहिनीचा भाऊ असतो. गुड्डी चित्रपटांमध्ये इतकी रंगलेली असते की रडताना तिच्यासमोर आदर्श असतो मीनाकुमारीचा, तिला कपडे हवे असतात माला सिन्हा सारखे. भावना प्रगट करताना देखील तिला सिनेमाचा आधार लागायचा.  
जेव्हा नवीनला कळतं की गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात आहे तेव्हा तो खरंच खचतो, पण मग मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले त्याचे मामा त्याल समजावून सांगतात, अरे तिला जे वाटतंय ते प्रेम नाही तर आकर्षण आहे. प्रत्येकाच्या मनात अशी एक छबी रुतून बसते, मग मोठ्या पडद्यावर ते सारं बघून आपण त्या माणसाच्या नव्हे तर प्रतिमेच्या प्रेमात असतो.

गुड्डी ज्याच्या प्रेमात असते त्या धर्मेंद्र च्या मदतीने नवीन चे मामा, गुड्डीला सिनेमाच्या फसव्या जगाचं दर्शन घडवतात. प्रत्यक्ष सिनेमात संवाद लिहिणारा कथा/ संवाद लेखक , ते संवाद कशा प्रकारे बोलायचे हे दाखवणारा दिग्दर्शक, आणि हे सगळं चित्रित करणारा कॅमेरामन हे आणि यांच्या सारखे अनेक जण मेहनत करतात तेव्हा जाऊन एक स्टार जन्माला येत असतो. अगदी साध्या सरळ भाषेत , दृश्यांमध्ये हृषीकेश मुखर्जींनी कित्येकांना त्यांच्या भ्रमातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. जवळपास ४६ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आजही तेवढाच खरा वाटतो, पटतो. ह्या नाटकी दुनियेचा अनुभव घेतल्यावर गुड्डीला साक्षात्कार होतो तिच्या अवती भोवती घुटमळणाऱ्या प्रेमाचा .. आपण स्वप्नांच्या मागे पळता पळता, अप्राप्य गोष्टींचा ध्यास घेता घेता आपल्याला जे सहज शक्य आहे ते सुद्धा मिळवत नाही. गुड्डीला झालेल्या नव्यानं झालेल्या प्रेमाच्या साक्षात्कारावरच हृषिदा हा चित्रपट संपवतात आणि आपण परत येतो वास्तवात.
  
आजही नायक नायिकेच्या पडद्यावरच्या छबीलाच खरं मानणारे अनेक जण आहेत, नायक नायिकेसाठी काहीही करायला तयार असणारे आजही आहेत, फक्त धर्मेंद्रच्या जागी, शाहरुख खान, सलमान खान, ह्रितिक रोशन ,रणबीर कपूर, शहीद कपूर अशी फक्त नावं बदलली आहेत, आजही लोकांना फक्त पडद्यावर चमकणारे तारेच भुरळ घालतात, त्यांना चमकवणाऱ्या हातांचे कष्ट, आणि प्रतिमा आजही दुर्लक्षितच असतात.

जितकं गुड्डी मधलं हम को मन की शक्ती देना डोक्यात गात राहत तशीच सिनेमामधली सिनेमावरची दिग्दर्शकाची टिप्पणी लक्षात राहते. आपण प्रत्येक जण आयुष्यात एक फँटसी शोधत असतो. एकाच जन्मात आपल्याला अनेक जन्म जागून घ्यायचे असतात. जे जे उत्तम उद्दात्त ते ते आपल्याला आपल्याकडे हवंसं असतं. आपल्या सुखाच्या, आनंदाच्या कल्पना आपण दुसऱ्यांकडून प्रेरित होऊन घेत असतो. आपल्या प्रियकरामध्ये आपल्याला आपला आवडतो ‘हिरो’ दिसत असतो, तर आपल्या आवडत्या ‘हिरोईन’ चे भास अनेकांना त्यांच्या प्रेयसी मध्ये होता असतात. नवरा बायको देखील एकमेकांच आयुष्य फिल्मी पद्धतीनं जोडायचा प्रयत्न करत असतात. हे वागणं जगावेगळ बिलकुल नसतं, मुळात हे असतं, आपल्या आयुष्यातले प्रश्न विसरण्याचा, किंवा असुरक्षितता विसरण्याचा सोप्पा मार्ग. सिनेमातलं बघून लग्नामधले विधी जेव्हा बदलायला लागतात, जेव्हा कपड्यांची फॅशन बदलते, फिरायला जाण्याची ठिकाणं बदलतात तेव्हा सिनेमातल्या आपल्या आयुष्यावरच्या प्रभावाची जाणीव होते. सिनेमाला समाजमनाचा आरसा समजलं जातं. पण हा आरसा अगदी गंमतीशीर असतो, म्हणजे ही खरतर काच असते, ज्यामध्ये दोन्ही बाजूचं दिसत असतं.


चित्रपट हा एक उत्तम कलाप्रकार मानला जातो. आपण आपली जागाही न सोडता एका वेगळ्या जगात सैर करून येत असतो, माहीत असलेली गोष्ट वेगळ्या पद्धतीनं बघत असतो, अनुभवत असतो. त्यामुळेच ४६ वर्षापूर्वी बनवलेल्या सिनेमा आजही तेवढाच valid ठरतो. माझा ५ वर्षाचा मुलगा जेव्हा मालिकेतलं, जाहिरातीतलं जग खरं मानून मला काही विचारतो , त्या त्या वेळी मला त्याच्यात गुड्डा दिसतो. मी वाट बघतीये त्याच्यासोबत बसून गुड्डी बघायची, कदाचित त्याला दाखवता दाखवता मीच परत काही तरी शोधेन, मला काय हवं आहे याचा परत एकदा मला साक्षात्कार होऊ शकेल. 


Sunday, July 31, 2016

इनसाईड आऊट

त्या शाळेतला पहिलाच दिवस होता, बाबांच्या या अशा सारख्या बदल्यांना खरच ती आता कंटाळली होती. तसे बाबा ही बदली रद्द करायचा प्रयत्न करत होते, पण तसे काही झालं नाही, ती ८ वीत होती, बदलीचे शहर आधीच्या गावापेक्षा मोठं होतं जिल्ह्याचं गाव होतं, आजीचे गाव पण तिकडून तासभराच्या अंतरावर होतं, त्यामुळे हो नाही करता करता त्या गावात जायचं ठरलं. मग बँकेतल्याच लोकांच्या सल्ल्यानी घर आणि शाळा ठरवून टाकली. इकडचं घर अगदी मोकळं ढाकळ होतं, पुढे अंगण, मागे झाडं, जवळपास पाच, सहा वर्ष वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं. त्या वर्षात ती, तिची बहिण झाडावर चढायला शिकल्या, पोहायला शिकल्याहोत्या कैऱ्या, चिंचा पाडण्यात तरबेज झाल्या होत्या. त्या गावात त्यांना खरा भारत, लोकं बघायला मिळत होती, शेती कशी करतात हे टीव्ही वर किंवा पुस्तकात वाचायची गरजच पडली नव्हती. निसर्गाचं शिक्षण घेत होत्या त्या. शाळेत पहिला नंबर तिचा ठरलेला होता, मग ती परीक्षा असो व स्पर्धा, पण मैदानावर मात्र ती खूप काही शिकत स्पर्धेच्या बाहेरच होती, ते सगळं तिला आवडत होतं, न आणि ण च्या शुद्ध भाषेच्या गुंत्यात न पडणारी मैत्री तिला खुणावत होती, कोणाच्याही घरून येणाऱ्या वासाबरोबर वानोळा ही यायचा, घराचा स्वैपाक फक्त एका घरापुरता नाही तर शेजार पाजारच्या साऱ्यांसाठी असायचा, हे ती बघत होती. आयुष्य शिकत होती. रात्रीचे दिवे, असो नसो, माणसं मात्र हाक मारल्यासरशी धावून येतात हे पाहत होती. आणि तिकडून एकदम काडेपेटीसारख्या बिल्डींगमध्ये राहायला गेल्यावर तिला रडूच कोसळलं. ह्या अशा घरात राहायचं? रांगोळी काढायला जागा नाही, फुलांसाठी जागा नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ, तिनी आणि तिच्या बहिणीनी एकच घोष लावला होता. तिथल्या मैत्रिणींची नावं काढत काढत रात्र कशी तरी काढली. सकाळी बाबांना तिनी जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे रहा इथे, मी त्या गावात राहते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आई नवीन घर लावता लावता आधीच वैतागली होती, तिला तिनी एक धपाटा घातला आणी परत तिच्या कामाला गेली. त्याच दिवशी तिच्या शाळेचा पहिला दिवस होता, नकोच वाटतं होतं सगळ. बाबांनी जवळ घेतलं, आणी समजावलं काहीतरी, मग म्हणाले, चाल एक चक्कर मारून येऊ स्कूटर वर. आणि मग तिला एका दुकानात नेऊन छान पेन, कंपास बॉक्स घेऊन दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आतापर्यंत झिरपत नव्हतं.
शाळेची मोठी इमारत बघूनच तिला दडपायला झालं, आपला वर्ग कसा ओळखायचा? शाळा घराजवळ होती म्हणून किमान रस्त्यात हरवायची तरी भीती नव्हती. कशी बशी विचारत शोधात ती वर्गात पोहोचली, आपल्यापेक्षा चटपटीत मुलं, मुली पाहून ती अजूनच बुजली, तशीच खाली मान घालून जो बाक रिकामा दिसला तिथं जाऊन बसली,  कोणी विचारलं तर जेम तेम पुटपुटत्या स्वरात नाव सांगायची. शिक्षकांपैकी काहींनी तिची दखल घेतली काहींनी विचारलंही नाही, तशीही शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले होतेच. तिला जुन्या शाळेची बचकभर आठवण आली, दुपारी एकटीच बसून डबा खाताना तिला भयंकर रडू कोसळत होतं. उत्तर माहीत असूनही द्यायचं नाही असा तिनी चंगच बांधला होता, कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचा नाही, विचारल्याशिवाय बोलायची नाही, इतर कोणाशी मैत्री तर बिलकुल नाहीच नाही, ती जशी नव्हती तशी ती व्हायचा प्रयत्न करत होती. उगाचच चिडत होती, आधी किती छान गायची इथे गाण्याच्या क्लास ला जायला पण नाही म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीवरून हिचं वाद घालणं, आईचे रागावणं, मग चिडणं, त्यावर उतारा म्हणून हिचं रडणं हा त्यांच्या घरातला रोजचाच कार्यक्रम होत चालला होता. बाबा मध्ये पडून सावरू बघत होते पण ती काही बधायला तयार नव्हती. तेरा, चौदा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या मुली कशा छान केसांचे भंग पाडायच्या, शाम्पू, पिना, पावडर अशा कशाबद्दल बोलायच्या, पण तिला ते काही माहिती ही नव्हतं आणि त्याबद्दल बोलावसं वाटायचंही नाही. तिच्या लांब वेण्या नको वाटायच्या, गायला नको वाटायचं, सगळ्या जगावर रागवावस वाटायचं.
मग कधी तरी एका मोकळ्या तासाला त्या बाई त्यांच्या वर्गावर आल्या, त्या म्हणे मोठ्या वर्गाना शिकवायच्या. खांद्यापर्यंत रुळतील असे मोकळे सोडलेले कुरळे केस, त्यावर दोन छोट्या पिना, एका पिनेत गजरा माळलेला, आकाशी रंगाची साडी घट्ट चोपून बसवलेली, कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावलेली. आणि तोंडभर हसू.  तिला त्यांच्याकडे बघतच बसावसं वाटलं. का कोणास ठाऊक तिला त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटली. त्या दिवशी त्यांनी वर्गात कविता सांगायला सुरुवात केली, आणि तिच्याही न नकळत तिचा हात वर गेला,जवळ जवळ महिना दीड महिन्यांनी तिला वर्गात काही तरी बोलावसं वाटलं. या नव्या बाई शेतकऱ्यांची कैफियत सांगत होत्या कविता, कथा, अनुभव सारे अनुभव देत होत्या, तिनी एकदम हात वर करून बाई मी काही बोलू का?
आख्ख्या वर्गानं मागं वळून पाहिलं ही आता काय बोलणार, बाई इतक्या छान सांगताहेत आणी आता हिचं काय मधेच, सारा वर्ग तिला शिष्टाम्बिका म्हणायचा. बाईनी तिला बोलायला सांगितलं, मग ती त्यांचे आधीच गाव, तिथल्या मैत्रिणी, त्या कशा शेतात काम करायच्या, त्यांच्या वडिलांना कसा कधीच नीट मोबदला मिळायचा नाही, मग वर्गातल्या एका मुलीच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, हे सगळं सांगताना तिचा सगळा बांध फुटला. आणि मग ती रडतच खाली बसली, बाईं तिच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्या स्पर्शामुळे तिला अजूनच आश्वस्त वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मोकळ वाटलं. मग हळू हळू सगळंच गाड रस्त्यावर आलं, ३, ४ दिवसात कधी तरी तिला पहिलं न्हाण देखील आलं. आणि मग सगळाच गुंता सुटल्यासारखं वाटलं. ती गायला लागली होती, मैत्रिणी जमवायला लागली होती, कोशातून फुलपाखरासारखी बाहेर पडली होती.  हे गाव, घर , ही शाळा सगळं तिला आवडायला लागलं होतं.
खूप वर्षांनी मुलीसोबत इनसाईड आउट पिक्चर बघताना तिला वाटलं अरे ही तर माझीच गोष्ट आहे, यांना कशी कळली. मीच तर आहे ती मधेच हसणं, खुश होणं विसरलेली मुलगी. मीच तर होते ना अशी सगळ्या भावनांचा गुंताडा करून जगावर रुसलेली मुलगी. आउटसाईड काहीही असलं तरी इन सगळं एकच असतं, सगळ्यांची गोष्ट येऊन जाऊन एकच असते.
तुकाराम म्हणतात तेच खरं आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरू कोटी कोटी, परि अंती ब्रह्म एकले... !!!!!!



संदर्भ : इनसाईड आऊट 
https://en.wikipedia.org/wiki/Inside_Out_(2015_film)