Sunday, October 23, 2016

पणतीचं वलय

माईंनी मुलांना त्यांच्या खोलीत बोलावलं तेव्हा सारेच जरा गोंधळले होते. आता काय सांगायचं असेल माईला? आपलं कोणाचं काही चुकलं तर नाही ना? सगळेच जण दोन चार दिवसात आपण कोणाला काही बोललो नाही ना आठवत होते. नाना अचानक गेले म्हणून सगळेच धावत घरी आले होते. असे खूप वर्षांनी तिन्ही भाऊ आणि बहिण घरी जमले होते. चालते बोलते नाना गेले याचे दुःख तर होतेच पण स्वाभिमानी नानांना जर दुसऱ्या कोणाकडून सेवा करून घ्यावी लागली असती तर मारान यातनांपेक्षा जड गेले असतं, त्यामुळे आलं ते मरण चांगलंच आलं असं सगळ्यांना वाटत होतं. माई पण शांत स्थिर होत्या. नानांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी करायचे नव्हते. त्यामुळे एक दोन दिवसात सगळेच आपापल्या घरी जायचं ठरवत होते. अशात माईंनी कशाला बोलावलं असेल, सगळ्यानांच प्रश्न पडला होता.

तिघा भावांपैकी एक जण माई नानांबरोबर राहायचा तर दुसरा त्याच गावाच्या दुसऱ्या बाजूला राहायचा. धाकटा असूनही सर्वात श्रीमंत असलेला भाऊ जरा लांबच होता, फारसा यायचा नाही, बहिण जवळच्या गावात दिलेली होती. माईच्या एका फोन सरशी सारे बायको मुलांसह आले होते. नाना माई मध्ये नाना कायम कर्मवादी होते. देव धर्म या निव्वळ संकल्पना आहेत म्हणायचे. त्या उलट माई कायम देव सण वारात बुडलेली.  नाना रागीट तापट तर माई एकदम शांत. नाना बोलघेवडे तर माई जरा घुमीच. दोघे दोन वेगळ्या पध्दतीचे होते, पण तरीही त्यांचे वाद मुलांनी कधी पाहिले नव्हते. नानांची इच्छा म्हणून माईंनी मंगळसूत्र देखील उतरवलं नव्हतं.
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की मी असं तुम्हाला माझ्या खोलीत का बोलावलं म्हणून ना. माईनी बोलायला सुरुवात केली.

आमच्या दोघांपैकी कोणी तरी आधी जाणार हे नक्कीच होते. माझी खूप इच्छा होती सवाष्ण जाण्याची पण नानांची कर्मश्रद्धा माझ्या श्रद्धेपेक्षा वरचढ ठरली. जशी जन्म ही नैसर्गिक गोष्ट आहे तशीच मृत्यू देखील. मी काय नाना काय आम्ही अगदी समृद्ध आयुष्य जगलो. समाधानी आहोत आम्ही. आमची मुलं व्यवस्थित धडधाकट आहेत. आई वडील म्हणून पार पाडायच्या कोणत्याही कर्तव्यात आम्ही कमी पडलो नाही असं आम्हाला तरी वाटतं. त्यांची इच्छा म्हणून आपण कोणतेही विधी केले नाहीत. आणि दुखवटा पण नाही पाळणार. मुलांनो खरंच आत्ताही आणि मी गेल्यावरही दुःख करू नका. आमची कोणतीही आशा अपेक्षा तुमच्याकडून आयुष्याकडून उरलेली नाही. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी सण साजरा करा. केवळ हाच नाही तर इतर सारे सण समारंभ देखील साजरे करा.

‘माई अग पण लोकं काय म्हणतील, अजून पंधरा दिवस पण झाले नाहीत आणि आम्ही सण साजरा कसा करायचा ‘ भीत भीत लेक म्हणाली.

‘ तुझ्या प्रेमविवाहाच्या वेळी जर नाना असंच वाक्य बोलले असते तर तुझं लग्न झालं असतं का? हे बघा मुलांनो काही रूढी परंपरा चालत आल्या म्हणून आंधळ्या सारख्या पाळू नका. नाना ८० वर्ष जगले, आता ते गेले तर तर आपण वर्षभर शोक म्हणून सण करायचे नाहीत, अमकं करायचं नाही वगैरे मलाही पटत नाही. जर नानांची तुम्हाला आठवणच ठेवायची असेल तर त्यांना आवडायच्या त्या गोष्टी करा, त्यांच्या नावानी गरजूंना मदत करा. आठवण ही सहज आली पाहिजे, त्यागातून, काही गोष्टी सोडण्यातून आली तर तो जबरदस्तीचा राम राम असतो. दिवाळीचा सण हा तर खरा अंधारातून रस्ता काढण्याचा. आपल्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचा उत्सव! आपल्या घरात मुलबाळ आहेत, त्यांना नाराज ठेवून नानांची आठवण काढलेली नानांनाही चालणार नाही आणि मलाही. आयुष्याचा जोडीदार गमावल्याच दुःख मलाही आहे, पण ते दुःख सतत उगाळल्याने कमी होणार नाही. शरीराने गेले तरी नाना आपल्यातच आहेत, त्यांच्या आठवणी, विचार शिकवण आपल्या सोबत कायम असणार आहेत.’


माई बोलत होती, अगदी मनापासून बोलत होती. आणि मुलांना तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात नानांचा आभास होत होता. तिच्या चेहऱ्यावर दिवाळीतल्या पणतीचे तेज पसरलं होतं. 

4 comments: