चार चौघींसारखीच
होती ती, दिसायला ही, वागायला ही. सर्वसामान्य घरासारखं घर, बाबा कमावणारे, आई घरी
सगळी कामं करणारी, एक भाऊ एक बहिण, येऊन जाऊन असणारे पाहुणे, समाज मान्य चौकटी मधे
जे जे करतात, मग २२ व्या वर्षी तिच्या
बहिणीचं लग्न झालं, आणि २३ व्या वर्षी तिची बहिण आई झाली, भाऊ इंग्रजी माधाय्मात
शिकत होता,आणि हिनी बी एड केलं होतं. शाळेत नोकरी सुरु झाली आणि घरी लग्नाची शोध
मोहीम, सुरु झाली. ओळखीतून पाळखीतून स्थळ आलं होतं, मुलगा तिच्या पेक्षा जास्त शिकलेला होता, कमावत होता, स्वतःचं घर
होतं, बहिणीचं लग्न झालं होतं, खास काही जबाबदारी देखील नव्हती, दिसायला सावळा
होता, पण तिची तशी खास काही अपेक्षा नव्हती, अट म्हणजे एकच होती की मला नोकरी करू
द्यावी. आणि मुलाची देखील तीच अट होती, की नोकरी करणारी बायको हवी, त्यामुळे लग्न
जुळण्यात काहीच अडचण नव्हती.
लग्न करून ती
नव्या नावानी नव्या घरात आली, नव्या माणसात रुळायला जार वेळ लागला, पण ती देखील
माणसच असतात, सवयी स्वभाव थोडा वेगळा असला, तरी त्यांनाही आपल्यासारखाच आनंद होतो,
राग येतो, त्यांच्या आवडी निवडी जपल्या की ती ही पूर्वग्रह सारून जवळ येतात,
मानसशास्त्रात शिकलेलं ती प्रत्यक्षात अनुभवत होती. सासू सासरे नणंद, जावा या
सगळ्यात कधी जीव गुंततो सासुरवाशिणीला कळतच नाही. नवऱ्याचे गुणही हळूहळू समोर
दिसायला लागतात. नवरा आधी एक पुरुष असतो, मग मुलगा,मग नवरा. हा क्रम कधी कुठे
बदलतो, पण हिच्या घरी मात्र हाच होता. त्याचे
प्राधान्यक्रम कायमच वेगळेच असायचे. पण वडिलांचे तसंच रूप पाहिल्यान, जर तो तसा
नसता तर तिला नवल वाटलं असतं.
त्याला कोणतीही
गोष्ट जास्त काळ करायची सवयच नव्हती, त्यामुळे एकाच नोकरीत स्थिर स्थावर होणायची
अपेक्षा त्याच्याकडून करणं म्हणजे फुटक्या घागरीन घर भरण्यासारखं होतं. पण तिला हे
कळेस्तोवर त्याच्या २ नोकऱ्या ३ बिझनेस आणि २ पोरं जन्माला घालून झाली होती. आता
तिला त्याचा अटीचं कारण कळत होतं, पण आता मागं फिरणं ही शक्य नव्हतं, संसार मोडणं
हे पाप असतं, संसार ओढणं ही रीत असते, शिक्षणानी संस्कार थोडीच बदलतात. तसं बिडी
काडीच व्यसन नव्हतं, पण नाद होता, सतत काहीतरी करून बघण्याचा, मग त्या नादात पैसे
गेले तरी बेहत्तर. धंदा शब्दाला एक निराळच
वलय असतं त्यामुळे इंग्लिश बिझनेसच बर वाटतं कोणताही बिझनेस हा लोणच्या सारखा
असतो, मुरत गेला की खरी चव कळते, एखादं लोणचं चालू असतं, पण ते जास्त दिवस
टिकवायचा प्रयत्न केला तर खराब होतं, त्याला ही गोष्ट कळत नव्हती की समजून घायची
नव्हती कोणास ठाऊक. लोणची, पापड, आंबे, फटाके, सौंदर्यप्रसाधने ते कपडे, खाद्य
पदार्थ विकणाऱ्या कंपनीची, टपरवेअर, मातीची भांडी, साड्या, व्हिटामिनच्या गोळ्या,
कसली कसली आयुर्वेदिक औषधं कशा कशाची म्हणून त्यांनी एजन्सी घेतली होती, दर वेळी
तिनी शाळेत, घराच्या शिकवण्यांमध्ये त्याची जाहिरात करायची, मुद्दल परत हातात आली
की याचा नवीन ‘धंदा’ सुरु. एकेकांना एकेक शौक असतो, तसा याला नव नवीन एजन्सी
घेण्याचा शौक होता. घर तिच्या खर्चात चालतच होतं, त्यामुळे घरासाठी वेगळा काही
पैसा द्यायचा असतो हे त्याच्या गावी देखील नव्हतं.
पोराचे प्रताप
आई वडिलांना कळत होते, पण त्याला काही सुनावण्याची वेळ कधीच गेली होती, त्यामुळे
ते निमुटपणे सुनेची पाठराखण करत होते. मुलं काळाबरोबर मोठी होतच असतात, तो कधी तरी
शिकेल या आशेवर ती प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर हिशोब मांडायला बसायची, आणि १०
रुपयाचा देखील नफा झाला तरी तो पुढचं नवीन काही तरी करून बघायला तयार असायचा, ती
त्याला बोलून थकायची नाही आणि तो तिला कानामागं टाकून. त्यांनी फार मोठी कर्जे
केली नाहीत, पण छोटी छोटी कर्ज बरीच केली, प्रत्येक वेळी एकेक फटका म्हणून कधी
दागिना, कधी FD मोडायची. सगळ्याला ती कंटाळून गेली होती, पण तरी रेटत होती. क्वचित
कधी त्यानी तिला मोडलेला दागिना करून दिला, नाही म्हणायला, एकदा परदेशात फिरवूनही
आणलं होतं. पण साधारणपणे त्याचं लाखाचे बारा हजार करणं सुरूच होतं.
जेव्हा त्यानी
नवीन व्यवसायासाठी घर विकायची भाषा सुरु केली तेव्हा ती वाघिणीसारखी चिडून उठली,
आजवर त्याला न ऐकवलेलं सारं ऐकवलं, आणि दर महिना मी तुला हातखर्चाला काही रककम
देईन पण तू घरात बस, आजवर केलेस तेवढ पुष्कळ झालं. घराच्या आत ती पुरुष झाली होती.
त्यानी थयथयाट केला, पण ती नाही बधली. बाई अशीच असते. सासऱ्यानी मरताना घर तिच्या
नावावर केलं असल्यामुळं मी म्हणते तसं राहा नाहीतर घराबाहेर हो म्हणायला देखील
तिनं कमी केलं नाही.
महिषासुरमर्दिनी,
काली, चंडिका या सगळ्या असतातच आजूबाजूला, देवळातच नव्हे तर अशा कित्येक घरांमध्ये.
वर्तमानपत्रात छापून येण्याएवढ, पुस्तक लिहिण्याइतक कर्तुत्व गाजवाण्याऱ्याच महान
महिला असतात असं नाही, पण त्यांनीही त्यांच्या आयुष्यात खूप मोठी मजल मारलेली असते.
आयुष्यातल्या काळ्या, गोऱ्या प्रसंगाला धीटपणे सामोऱ्या जाणाऱ्या अनेक अनामिकांसाठी
आजचा करडा रंग. आयुष्य हे वाईटातून चांगलं शिकणं आणि चांगल्यातून नवीन काही शिकणं
हेच तर असतं ना. जरासा औदासिन्याकडे झुकणारा, करडा रंग आयुष्यात कधी उदास करतो तर
कधी आशा दाखवतो. आयुष्य काही एकाच रंगात रंगलेलं नसतं, त्यात चांगलं वाईट दोन्ही
असतं, याचीच आठवण हा करडा रंग करून देतो.
No comments:
Post a Comment