Sunday, October 2, 2016

केसरीया बालमा....

अगदी दाखवायच्या कार्यक्रमापासूनच तिला त्याच्यातला साधेपणा आवडला होता, ज्या काळात मुलाकडच्यांनी मुलीकडच्या लोकांना वेठीला धरण्याचा एक कलमी कार्यक्रम असायचा, हुंडा न घेणं म्हणजे कमीपणाचं समजलं जायचं, लग्न म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर मोठेपण मिरवणं असायचं. आजही त्यात फार काही फरक पडलेला नाही, पण आज त्या सगळ्याला हौसेचं गोंडस नाव दिलं जातं. तर साधारण ४०, ५० वर्षांपूर्वी त्यानं बघण्याच्या कार्यक्रमातच सांगितलं होतं आम्हाला साधं लग्न हवं आहे, पण जरा तुम्हाला साग्रसंगीत लग्न करायचं असेल तर निम्मा खर्च आम्ही करू. त्यानंतरही लग्नात त्यानी ना स्वतःचे पाय धुवू दिले ना त्याच्या आई चे. कन्यादान शब्दाऐवजी कन्याभेट हा शब्द वापरायला लावला. छोट्या छोट्या गोष्टीतला त्याचा साधेपणा तिला भावत होता.
त्याच्याशी लग्न झाल्यावर तिला आयुष्याचं खरं सार्थक वाटत होतं. तिला शिकायला त्यानीच प्रोत्साहन दिलं, आणि तो एकटाच अपवाद होता असं नाही त्याचं सारं घरदार असा जगाच्या  चार पावलं पुढचा विचार करणारं होतं. इतका मोकळा श्वास तिनी तिच्या घरात क्वचितच घेतला होता, स्त्री पुरुष समानता फक्त पुस्तकात नसते तर अशी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवता येते. स्त्री पुरुष समानता म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करणं नसतं, किंवा पुरुष करतात त्या साऱ्या गोष्टी करणं नसतं, स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री पुरुष दोघांनी एकमेकांचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करणं असतं, स्वतंत्र विचारांचा आदर करणं असतं. तील रोज नवीन काही तरी शिकायला जगायला मिळत होतं.  
लग्नाला ५ वर्ष होऊनही तिची कूस काही उजत नव्हती, तशी घरातल्या कोणाचीच काहीच तक्रार नव्हती. वाट बघूयात, काही झाडांना उशिरा फळ धरत, शेवटी मूल जन्मण हा ही निसर्ग धर्मच असतो ना. एकमेकांची समजूत काढणं सुरु असायचं. मग कधी तरी विज्ञानाचाही सल्ला घेऊ म्हणत तिनी जवळपास ओढतच त्याला डॉक्टरकडे नेलं. त्याचं म्हणणं होतं, मूल नाही म्हणून काय झालं? त्यासाठी काही प्रयत्न करावे असं त्याला मनापासून वाटत नव्हतं.तिच्या हट्टाखातर जेव्हा ते डॉक्टर कडे गेले.
आपण आपल्या नवऱ्याला मुल देऊ शकत नाही ह्याचा त्रास स्त्रीला जास्त होतो, समाजानी जाणीव करून देण्याच्या आधीच तिचंच मन तिला खात असतं. जेव्हा नवरा सख्ख मित्र झालेला असतो तेव्हा बायकोला मुल न होणं हा जणू तिचाच अपमान वाटतो. आपण कुठेतरी कमी पडलोय, ज्यावर त्याचा हक्क आहे ते आपण त्याला देऊ शकत नाही याचं दुःख जास्त असतं. मातृत्वाचा आनंद फक्त जन्मातून मिळत नसतो, पण वंशसातत्याची भ्रामक कल्पना मात्र मनावर इतकी घट्ट पकडून असते की बाईला आपण एखादा गुन्हा केलाय असच वाटत असतं. दुर्दैवाने तिच्यातच दोष होता ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्यानी समजूत घातली तरी तिच्या मनातून डोक्यातुन ते जात नव्हतं. वैद्यकीय शास्त्रही आजच्या एवढ प्रगत नव्हत. तिला आयुष्यभर तिच्यामुळे नवऱ्याला कोणत्याही अप्रिय प्रसंगाला तोंड देऊ द्यायचं नव्हतं.

मग एक दिवस स्वतःच निर्णय घेऊन तिनी गावाकडून एक मुलगी आणली,पहिले तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली, आणि नवऱ्याला बोहोल्यावर चढवलं. स्वतःच्या जीवाची शपथ घालून तिनी त्याच्याकडून जबरदस्ती हे लग्न करवून घेतलं. त्याला मुल नको होतं ती हवी होती, पण तिला त्याला जगातलं सारी सुखं द्यायची होती. सुरुवातीचे कितीतरी दिवस तो त्या नव्या बायकोशी एक शब्दही बोलला नव्हता, जवळ येणं  तर लांबच राहिलं. पण तिनी तिचा हेका सोडला नव्हता. शेवटी ती काही दिवसांसाठी म्हणून घराबाहेर पडली, आणि जोवर मला काही बातमी मिळत नाही तोवर मी या घरात पाउल ठेवणार नाही म्हणाली त्यानंतर २, ४ महिन्यांनी कधी तरी त्यांनी त्याचा पुरुष धर्म गाजवला, आणि फळ निष्पत्ती झाली. मग कुठे ती घरी आली. सवत तिनीच आणलेली होती, एका सध्या घरातली, खायचे प्यायचे वांदे होते, शिक्षण जेमतेम झालं होतं. परिस्थिती अशी होती, की या दुसरेपणावर सुद्धा ती खुश होती.

आपल्या जोडीदाराला त्याचा वंश पुढे नेण्यासाठी आपला काहीच उपयोग होऊ शकत नाही याचं दुःख  आई होऊ शकत नाही या दुःखापेक्षा जास्त होतं. पण जेव्हा त्याचं मूल जन्माला आलं तेव्हा तिलाच भरून पावल्या सारखं वाटलं. मग कधी तरी ती त्यांच्या घरातून बाहेर पडली ती कायमचीच, कारण ती त्या घरात असे पर्यंत दुसरीला बायकोची जागा मिळाली नसती. त्यागातून मिळणारा आनंद स्वतःला काही मिळण्याच्या आनंदापेक्षा जास्त असतो हे तिनी अनुभवलं होतं.

केशरी रंग हा कायम त्यागाचा, धार्मिक अनुष्ठानाचा रंग समजला जातो. मुळात प्रत्येक धर्म एकच गोष्ट सांगतो, जगा आणि जगू द्या. शक्य तेवढा आनंद समाजाला, लोकांना द्या. आणि त्याग म्हणजे तरी काय, आपल्याच लोकांसाठी काही तरी सोडणं, काहीतरी करणं. त्यामुळे या दोन्ही भावना दाखवणारा रंग एकच आहे यात काही विशेष नाहीच. आजचा हा केशरी रंग हा असाच सतत त्याग करणाऱ्या पण तरीही आनंदी असणाऱ्या, किंवा जगण्यातून धर्माचा परिपाठ ठेवणाऱ्या साऱ्याच आई काकू,मावशी आत्या, ताई, आजी सगळ्याच ‘तिच्या’साठी!!!!!!!!!!!!!!!   

No comments:

Post a Comment