Monday, October 3, 2016

शांत निवांत शुभ्रांत...

तिनी१८ व्या महिन्यात आईची मांडी सोडून दिली नुकत्याच जन्मलेल्या भावासाठी , ती होती तिची पहिली तडजोड, मग हातातले खेळणं, चॉकलेट, पेढा, गाडीवर पुढे उभं राहायचा हक्क, कोणत्याही खेळण्यात जिंकण्याचा आनंद, असे छोटे मोठे प्रसंग ती घडवत गेली, प्रत्येक वेळी तिच्या पदरी पडायचं मोठे पणाचं आणि तडजोडीचं मापटं. ताई तू मोठी आहेस ना, मग दे ना सोडून. अग त्याला नाही कळत म्हणून तू दे सोडून. जणू मोठं होणं म्हणजे तिच्यासाठी थोडे थोडे सगळं सोडून देणं शिकणं होतं. मग त्या सगळ्याची इतकी सवय झाली की तिला सोडून देणं म्हणजेच जगणं वाटायला लागलं.

मोठेपणाच्या रस्त्यात कधी तरी तो भेटला. शाळेत , कॉलेजात समोरच वाटेवरच असायचा. पण स्वतःहून काही मागायचं, पाहायचं माहीत नसल्यानं तिच्या लेखी त्याचं अस्तित्व शून्य होतं. तो मात्र सावलीसारखा फिरायचा, त्याची काही अपेक्षा नव्हती, तिला बघायला मिळालं की त्याला छान वाटायचं.  ते वयच असं होतं की कोणावर तरी जीव ओवाळून टाकावासा वाटायचा, प्रेम वगैरे म्हणण्यापेक्षाही नैसर्गिक तारुण्यासुलभ आकर्षण जास्त असावं. पण चारपाच वर्षाहून अधिक काळ ते टिकलं, प्रेमच असावं ते बहुदा. तिच्यापर्यंतच काय अख्ख्या गावाला कळल होतं. तर मग तिच्या वडिलांपासून ते कसं लपेल. तिनी कोणालाच नाही म्हणलं नव्हतं, आधी त्याच्या प्रेमाला, आणि नंतर चिडलेल्या वडिलांना.

प्रेमाला जितक्या सहज तिनी हो म्हणलं होतं तितक्याच सहजतेनं तिनी वडिलांचा विरोध सहज स्वीकारला. तडजोड, शरणागती म्हणजे सगळं संपण नसतं, कदाचित ती दुसऱ्या नवीन कशाची सुरुवात असते असं ती म्हणायची, त्यामुळे ती पांढऱ्या रंगाचा ध्वज घेऊन कायम उभीच असायची. शिक्षण संपवून वडिलांनी बघून दिलेल्या मुलाच्या गळ्यात हार घातला आणि त्यानी घातलेल्या मंगळसूत्राच बंधन आयुष्यभरासाठी बांधून घेतलं.

तिचा संसार अगदी सुखाचाच चालला होता, कारण तिची कोणत्याही बाबतीत कोणतीच तक्रार नव्हती. सगळ्यांचं म्हणणं ऐकताना आपलंही काही म्हणणं असू शकतं हे देखील ती विसरली होती, त्यामुळे सारं काही सुरळीत चाललं होतं. दोन मुलं सासू सासरे, नवरा येणारे जाणारे सारे काही ती पाहून घेत होती. घर सावरत होती, उभारत होती. सगळं कसं चाकोरीतल्या सारखं चाललं असताना अगदी एका क्षणात सारं काही बदललं, तिचा नवरा चालता बोलता गेला, मुलं आडनीड वयात होती. पण तिनी सगळं सावरून घेतलं. थकलेल्या सासू सासऱ्यांना मुलाची कमी भासू दिली नाही. त्यांनीही शांतपणे तिच्या मांडीवर जीव सोडला.

शिकून मुलं बाहेर पडली, आणि घरात उरली फक्त ती. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत असताना आता स्वतःसाठी कसं जगायचं हा प्रश्नच पडला होता. आता कोणाच्या साठी काहीतरी सोडायचं?, कोणाच्या हो मधे हो म्हणायचं? पावित्र्य तर तिनी आयुष्यभर जपलच होतं, आणि शरणाचा पांढरा झेंडा तर जणू तिच्या शरीराचाच एक भाग होता. पांढरा रंग जसा पावित्र्याचा, तसाच शांततेचा रंग असतो. पाश्चिमात्य समाजात हा रंग धार्मिक साधनशुचीतेचा रंग देखील समजला जातो. आपल्याकडे पांढऱ्या रंगाकडे अशुभाची सावली म्हणून ही बघितलं जातं. मुळात साऱ्या रंगांहून वेगळा असूनही स्वतंत्र ओळख मिरवणारा हा रंग. आजचा पांढरा रंग स्वतःसाठी न जगणाऱ्या, कायम शरणागतिच्या, तडजोडीच्या तयारीत असणाऱ्या ‘स्त्री’ जातीला..!!!!!!!!!!!!!!!!!


No comments:

Post a Comment