Sunday, May 7, 2017

आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव... माऊलींग!

Mawlynnong.
मेघांचे घर असणाऱ्या मेघालयाच्या बद्दल खूप कुतूहल होतं. भारतातले ईशान्येकडचे महत्वाचं राज्य. सैन्य दलाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं ठिकाण. गारो, खासी, जयंतिया या जमातीच्या लोकांमध्ये विभागलेले राज्य. भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणं जिथे आहेत त्या राज्यात पाणी आणि हिरवा रंग यांना काही कमी नसणार एवढेच मनात ठेवून शिलॉंग च्या प्रवासाला सुरुवात केली. घाटाघाटातून वळणारे रस्ते, प्रत्येक वळणावर एक नवा निसर्ग समोर दाखवत होते. आता घाट संपला आता सरळ रस्ता सुरु होईल असं वाटत असतानाच नवी चढण सुरु होते. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव याच राज्यात आहे, ते बघण्याची खूप इच्छा होती. माऊलीन्नोंग गाव म्हणजे अगदी बांगलादेशाच्या सीमेवर लागून असलेलं गाव. साध ९२ घरांचं गाव.वस्ती असेल एक ६०० च्या आसपास. या गावाबद्दल बरंच वाचलं होतं, त्यामुळे बघायची उत्सुकता पण होती. मेघालय मधे







खूप डोंगर दऱ्या असल्यामुळे रस्ते बांधणं सोपं नाही, त्यामुळे अनेक गावं रस्त्यांनी जोडलेली आहेत पण आपापसात जोडली गेलेली नाहीत, म्हणजे चालत एखाद्या गावाला जायला अर्धा तास लागत असेल तर रस्त्यांनी देखील तेवढाच वेळ लागू शकतो, कारण, तुम्हाला पूर्ण वळसा घालून जावं लागतं. हे गाव देखील तसंच. नकाशावर अगदी जवळ दिसणारं पण रस्त्यानी गेलं तर बराच वेळ लागणारं. या गावापर्यंत रस्ता जातो, आणि त्याच रस्त्यानी परत हमरस्त्याला लागता येतं.
गावात गेल्याबरोबर एंट्री फी कम पार्किंग फी म्हणून पन्नास रुपये घेतले, तेव्हा क्षणभर वाटलं, स्वच्छ गाव बघण्याचा अजून एक कर! गाडी लावून जेव्हा गावात फेर फटका मारायला गेले तेव्हा सुरुवातीला बाकीच्या गावांपेक्षा फार काही वेगळे नाही दिसलं. म्हणजे इथे प्रत्येक गावातच सिमेंटची पायवाट दिसते, कारण पाऊस इतका प्रचंड पडतो, तो ही जवळपास वर्षातले ६, ७ महिने त्यामुळे माती, डांबर कधीच वाहून जातं. पण मग फिरता फिरता जाणवलं, इथे प्रत्येकानी घराच्या बाहेर कुंपण म्हणून झाडंच लावली होती. प्रत्येकानी आपलं घर आणि बाग उत्तम राखली होती. अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वाटेवर सुद्धा लावली होती. जागोजागी बांबूच्या टोकऱ्या लावल्या होत्या. म्हणजे बघायला येणाऱ्या लोकांनी देखील त्यांचा कचरा त्या टोकऱ्यामध्ये टाकावा. कपडे वाळत घालताना देखील नीट नेटेकेसे होते. व्यवस्थितपणा इतका टोकाचा की डायपर देखील चिमटा लावून वाळायला ठेवले होते.
चालतानाच जिथे घरं संपली तिथे एक मस्त मोठ्ठ मैदान होतं. आणि दोन गोल पोस्ट. जर कधी काळी भविष्यात भारत फुटबॉल विश्वचषकात खेळलाचा तर तो अशा छोट्या छोट्या गावांमधल्या फुटबॉलवेड्यांमुळे असेल हे नक्की. जेव्हा तिथल्या काही लोकांशी बोलले तेव्हा कळल, की गावातल्या प्रत्येक घरात  LPG चे कनेक्शन आलेलं आहे, घरात चूलही वापरतात, आणि त्या चूल वापरण्यामुळे घरातला ओला कचरा हा अनेकदा त्या चुलीमध्येच वापरला जातो. आमच्या गावात प्रत्येकाच्या घरात संडास आहे हे सांगताना त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा अभिमान त्याला जाणवलेलं महत्व सांगून गेला. गाव स्वच्छ राहावं म्हणून त्यांनी पाळीव प्राण्यांवर खास करून डूक्करांवर प्रतिबंध घातलेला आहे. ज्यांना गायी, किंवा इतर प्राणी पाळायचे असतील त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर गाव खराब होऊ न देता करायचे असतात. ६०० लोकसंख्येच्या त्या गावात एक आठवीपर्यतची शाळा देखील आहे. या गावाच्या जवळच लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे झाडांच्या मुळांनी तयार झालेला पूल आहे तो बघायला येणारे अनेक जण या गावाला देखील भेट देतात. त्यामूळे इथे देखील होम स्टे वाढले आहेत.  त्यातल्या एकाच नाव फारच गंमतीशीर होतं, बांगलादेश व्ह्यू होम स्टे. मान्य आहे या गावातून बांगलादेश दिसतो, पण जमीन पठारावर असणाऱ्या आपल्या शेजाऱ्याच्या नावाच्या त्या होम स्टे की मात्र गंमत वाटली.

मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या इतर गावांप्रमाणे या ही गावात विड्याची पाने, सुपारी, झाडू ( त्याबद्दल एक स्वतंत्र प्रकरण लिहिणार आहे) हे होतात, तसेच काळी मिरी, पांढरी मिरी , तमाल पत्र यांची देखील शेती होते. खासी बहुल या भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. कदाचित सुबत्तेमुळे असेल पण या गावात सिमेंटची घर जास्त दिसली. पैसा सुबत्ता आली की आपण निसर्गाला विसरून त्या पैशांनी जास्तीत जास्त महाग मोलाचं काही कसं घेता येईल याचा जास्त विचार करायला लागतो असंही  जाणवलं. स्वच्छ गाव हे फक्त शाळेतल्या प्रयोगांमध्ये, किंवा पुस्तकात नसतं. आखीव रेखीव टुमदार गाव हे फक्त स्वप्न नसतं. हे सगळं बघण्यासाठी अनुभवण्यासाठी तरी एकदा माउलीन्न्ग ला भेट दिलीच पाहिजे. 

No comments:

Post a Comment