Thursday, May 4, 2017

मेघालय डायरी १

शाळेत असताना भूगोलामध्ये वाचलं होतं मेघालयात गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या असतात. तिथल्या लोकांच्या जमातीवरूनच ही नावे पडली आहेत. केरळ सोडून फक्त मेघालयात असलेली मातृसत्ताक पद्धती. नावानुसारच ढगांचं घर असलेलं राज्य, आणि त्यामुळेच पावसाचा वरदहस्त असलेलं मेघालय, इतका पाउस की भारतातलं सर्वात जास्त पाउस नोंदवलेलं ठिकाण देखील याच राज्यात आहे. या सगळ्यामुळेच हे राज्य कायम एक कुतूहलाचा विषय होतं. काही दिवसानापुर्वी इथे एका गावात राहण्याचा योग आला होता. कोणतही शहर जसं स्वतः चालून बघितल्याशिवाय त्याचं दर्शन घडवत नाही तसचं कोणतीही संस्कृती ही प्रत्यक्ष्य राहायचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.
मेघालय, आसाम च्या शेजारचं राज्य. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी एक. ख्रिश्चन बहुसंख्य असलं तरी स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारं राज्य. शिलॉंग ही या राज्याची राजधानी भारतीय हवाई दलाचं मोठा तळ इथे आहे. ज्याप्रमाणे आसामी संस्कृतीवर बांगला छाप दिसून येते तशी या राज्यावर इंग्रजांची छाप दिसून येते. आज इंग्रज जाऊन आता ६७ वर्षे झाली असली तरी देखील शिलॉंग शहरात त्यांच्या खुणा जागोजागी मिळतात. मग ते क्रिकेट सोडून फुटबॉल खेळणं असो किंवा पारंपारिक लोकसंगीताबरोबरच रॉक संगीतावर यांचे पाय थरकतात. शिलॉंग ला भारताची रॉक संगीताची राजधानी मानलं जातं. शिलॉंग या अराज्याच्या राजधानीच्या शहरात संमिश्र लोकसंख्या आढळते, खासी, गारो, पनार या स्थानिक जमातीच्या लोकांबरोबरच बंगाली, आसामी आणि थोड्या फार प्रमाणात बिहारी लोकांचं अस्तित्व जाणवतं. शहरात कुठेही भाषेचा अडसर जाणवत नाही, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा वापरून सहज फिरता येतं. उंचसखल भागेत वसलेलं गाव असल्यामुळे कित्येक घरांचे पहिला मजला खालच्या रस्त्यावर तर दुसरा मजला वरच्या रस्त्यावर आलेला आहे. शहरातले रस्ते रुंदीला फारसेवाढवणे शक्य नसल्यामुळे वाहतुकीला आपोआपच शिस्त आलेली आहे. गाडीचालक साऱ्या नियमांचे पालन करतात, कारण जर एकानी चूक केली तर त्याचा परिणाम बाकीच्या गाडीवाल्यांना भोगावा लागून वाहतूक खोळंबून राहते हे स्वनुभावानी सगळ्यांना माहीत झालेलं आहे.
जसजसे शिलॉंग मधून बाहेर पडावे तसे वळण वाटांचे रस्ते सोबत अजूनच घट्ट करतात. सुंदर हिरवे डोंगर आणि त्या हिरव्या रंगाला मध्येच छेद देणारे पांढरे शुभ्र धबधबे हे साऱ्या मेघालय चं वैशिष्ट्य. गारो, खासी आणि जयंतिया या तीन टेकड्यांमुळे इथे पाऊस अडवला जातो आणि त्यामुळे इथली जंगलं कायम हिरवीगार राहतात. इथला स्थानिक माणूस आजही शेतीत रमतो, त्यांच्या स्थानिक सणांमध्ये गातो, नाचतो, पारंपारिक भात, भाज्या, मांसाहार करतो. पर्यटनाच्या नकाशावर आलेली गावं वगळता आजही इथली गावातली लोकं हिंदी इंग्रजी पासून लांब आहेत, बाहेरच्या लोकांमध्ये ते बुजतात. जरी इथे ख्रिश्चन बहुभाषिक असले तरीही इंग्रजी सगळीकडे समजली जाते असं नाही. आपण उगाचच भाषा आणि धर्म यांची सांगड घालतो, खरंतर त्या दोन वेगळ्या गोष्टी. आताशा खाजगी मोबाईल कंपन्या सर्वदूर पसरल्या आहेत आणि त्यांचे इंटरनेट, खासगी वाहिन्यांचे जाळे पसरत चालले आहे त्यामुळे हिंदी मालिका बघितल्या जातात. उर्वरित भारताशी त्यांचा संपर्क होत असतो तो याच माध्यमातून. आता आता अनेक गावांतून मुलं शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला, शिलॉंगला गेलेत, किंवा काही आसाम, भारताच्या इतर भागातही जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे गावांची नावे अगदीच अनोळखी नसतात.
शहरांमध्ये असणाऱ्या औपचारिकता गावांमध्ये नसतात, तिथे सगळाच मोकलेधाकळे असतं. त्यामुळेच पहिल्याच भेटीत मला एक दोन जणांनी माझं वय विचारलं, तर त्यानंतर लग्न झालंय का? हिंदी मालिका, आणि चित्रपट बघितल्याचे परिणामस्वरूप मला त्या लोकांनी लगेच मग मी ‘मांग मध्ये सिंदूर’ नाही लावत म्हणून देखील विचारलं. मग मी मंगळसूत्र घालते सांगितल्यावर म्हणजे सगळेच नॉन ट्राईबल्स सिंदूर लावत नाही का असंही विचारलं, आणि मला ऐकायला खूप मजा वाटली. धर्म, भाषा, यावरून खूप वेळा माझं वेगळेपण दाखवलं गेलं होतं पण यावेळी या सर्वांपेक्षा मी त्यांच्या जमातीची नसणं हे अधोरेखित करून इतर जमातीची प्रतिनिधी म्हणून बघितलं जात होतं. खूप सारे प्रश्न तिथल्या डोळ्यांमध्ये, ओठांमध्ये होते, तोडक्या मोडक्या मालिकांमधून शिकलेल्या हिंदी मधून ते मला विचारत होते, आणि माझी उत्तरं समजून घेत होते. सगळ्यांचा एकाच लाडका प्रश्न होता मी कोणकोणत्या अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना भेटले. मला अनेक नवीन गाणी येत नाही हे पाहून त्यांना माझ्या भारतीय चित्रपटविश्व अज्ञानाची कीव येऊन त्यांनी मला बरीच नवीन गाणी शिकवली, आणि कोणा कोणाचं कोणाकोणाशी अफेअर सुरु आहे हे सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर एकीनी सांगितलं दीदी मला रणबीर कपूर आवडत नाही कारण त्यानी कॅटरीना कैफ ला नाही म्हणलं.
असं म्हणतात की क्रिकेट, आणि सिनेमा या दोन गोष्टी भारतात कोणालाही जोडू शकतात. याची परत एकदा खात्री पटली. रस्ते फक्त गावं जोडण्याची कामं नसतात करत. ते त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनाही जोडत असतात. या राज्यात सरकारी वाहतूक व्यवस्था फारशी दिसत नाही, तिथे जीप, अल्टो तत्सम गाड्यांमधून वाहतूक होत असते. खरंतर इथली ती वाहतूक बघून या कार कंपन्या त्यांची जाहिरात देखील बदलू शकतात, कारण आल्तो गाडी ८ माणसांना घेऊन आरामात घाट चढते आणि उतरते. आणि आरामात गाडीचं आतच जागा हवी असं काही नसतं, लोकं बाहेरच्या कठड्यांना, टपावर बसून देखी हसत प्रवास करतात. मेघालयातच नव्हे तर आसाम, अरुणाचल प्रदेश मध्ये देखील रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्या सगळ्या रस्त्यांवरून हसत प्रवास करणाऱ्या साऱ्या लोकांना बघून साहजिकच एक सहज हसू तोंडावर उमटतं आणि मग  तिथल्या माणसांशी मन जोडायला वेळ लागत नाही. कारण शब्दांपेक्षा हसणं जास्त प्रभावी संवादक असतं.   



No comments:

Post a Comment