Monday, January 28, 2019

समाधानाई-तृप्ताई


अंजु लक्षात आहे ना यावर्षी गौरी गणपती तुमच्याकडेच बसवायचे आहरेत. सवाष्ण सांगावी लागेल बरं  का गौरी जेवतात त्या दिवशी. तरी बरं  आपल्या गौरी उभ्या नाहीत. '
'हो आई सगळे लक्षात हाये, आता इतकी वर्ष तुम्हाला करताना पहिलेच आहे की मी, या वर्षी करेन सगळे नीट.  तुम्ही पियु ची काळजी घ्या.  नववा लागला ना तिला आता.'
'अग  इकडे या बायका डिलेव्हरीच्या  अगदी आदल्या दिवसापर्यंत जातात जॉबला , आणि त्यानंतर लगेच ३ महिन्यात परत रुजू पण होतात. आता या अरविवारी डोहाळजेवणाचा घाट घातलाय,बघू कसे होईल सगळॆ.'
'आई अहो काही काळजी करू नका, आपल्या घरी नेहेमीच २०, २५ जणांचा  गोतावळा असतोच, त्यात अजून एक ५, १० माणसे वाढवा  तेवढीच लोकं  असतील , आणि नरेन पण असेलच मदतीला. अजून एक सांगू का, तिकडे लोकं  येऊन फक्त जेवून नाही जात सगळे मांडायला, आवरायला देखील मदत करतात. दोन चार जणी तर फोन करून आधीच विचारतील काय मदत करू म्हणून. '
'हो गं  अंजु ते आहेच  म्हणा. बरं ते जाऊ दे आमचा बाळ्या  आणि त्याचा बाळ्या  कसे आहेत? शनिवारी आपण व्हिडीओ कॉल  करूयात, तेव्हा तुला तयारी पण दाखवेन काही राहिले तर सांग . 
'हो चालेल चालेल. तुम्हाला गुड नाईट, मी पण पळते शाळेत.
लेकीच्या बाळंतपणासाठी अंजूच्या सासूबाई अमेरिकेला गेल्या होत्या खऱ्या पण त्यांचे सगळे लक्ष इकडे लागून राहिले होते. कदाचित बाळाच्या आगमनानंतर त्या त्यात गुंतून पडतील आणि इकडच्या गोष्टींचा त्यांना विसर पडेल असे सगळ्यांनाच वाटत होते. त्यांचे दिवसा-रात्री येणारे मेसेजेस, फॉर्वर्डस यामुळे लेकाला सुनेला कळले होते आईला काही तिथे करमत नाहीये. पण अंतर असे होते की सहजासहजी येणे देखील जमणार नव्हते. त्यामुळे त्या एकाच एक गोष्ट दोन दोनदा तीन तीनतीनदा सांगत होत्या, आणि अंजू न चिडता ऐकून घेत होती. शाळेच्या नोकरीमुळे अंजूची पेशन्स लेव्हल खूप वाढली होती. कित्येकवेळा तर त्यांचा लेक त्यांचे ऐकून घ्यायचा नाही पण ती शहाण्या मुलीसारखे सगळे ऐकून घ्यायची. सासऱ्यांना जाऊन पण आता सहा सात वर्ष झाली होती, त्यामुळे कोणाशी बोलायचं हा त्यांना पडलेला एक प्रश्न होता.
अंजूच्या लग्नानंतर वर्षाच्या आत सासरे गेले, पण ते गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी सासूबाईंनी अंजूला सांगीतले होते, ‘ते गेले हा निसर्ग धर्म आहे, त्यांना हृदयविकाराचा त्रास होता, आपण शक्य तेवढी सगळी काळजी घेतली तरीही मृत्यूने त्यांना गाठलेच. यात तुझी काहीच चूक नाही. तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस, आणि पायगुण वगैरे गोष्टींचा विचार देखील करू नकोस, लोक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणे नाही.’ त्या दिवसानंतर अंजूला एकदम मोकळे वाटले होते, सासर माहेर मधले अंतरच जणू संपून गेले होते. ती तिच्या सासूची दुसरी मुलगी झाली होती. त्यामुळेच नणंदेच्या लग्नात अंजू आणि अनिरुद्धने नरेनच्या घरच्यांना आधीच सांगितले होते, की काहीही झाले तरी सगळे विधी आईच करणार, आणि जर ते पटत नसेल तर सरळ रजिस्टर लग्न करूया. नरेनच्या लोकांनी अगदी हसत हसत याला परवानगी दिली होती.
असे काळाशी सुसंगत विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत म्हणून अंजूला नेहेमी अभिमान वाटायचा.अगदी कर्मठ घरात देव देव करणाऱ्या घरापेक्षा माणसात देव पाहणाऱ्या या लोकांचे तिला अभिमान होता. लग्न झाल्यापासून त्यांनी बेंगलोरलाच आपलेसे म्हणाले होते, इथे एक नवीन जग वसवत होते. इथली भाषा, इथली संस्कृती यांना समजून घेत होते. गणपती दिवाळीला पाच दिवस तरी काढून ते घरी नक्कीच जात होते. अजून अर्णव लहान होता त्यामुळे शाळा बुडायचा फारसा प्रश्न आला नव्हता पण हा पुढचा प्रश्न पियूच्या बाळानेच सोडवला. आईला तिकडे जावे लागणार होतेच म्हणून तिने अनिरुद्ध आणि अंजूला विचारण्या’पेक्षा सांगितले, की आता देव तुमच्याकडेच ठेवा. कधी न कधी तरी तुम्हाला ही जबाबदारी घ्यायचीच होती, मग आता घ्याच.
आता गणपती आपल्याकडेच बसणार म्हणून अर्णव खुश होता. सवाष्ण कोणाला बोलवावं हा एक मोठ्ठा प्रश्न तिच्यासमोर होता. तशा मैत्रिणी बऱ्याच होत्या, पण बहुतेक नोकरी करणाऱ्या नाहीतर लांब राहणाऱ्या. एका जेवणासाठी कोणाला एवढ्या लामाब बोलावणं तसं तिला जीवावरच आले होते. सकाळी सासूबाईंच्या फोन च्या नंतर ती त्याच विचारात होती, तेव्हाच रत्नम्मा त्यांच्या घरी कामाला येत होती. गेली सहा सात वर्ष रत्नमाच्या मदतीनेच ते घर चालवत होते. पहिले अर्णवला सांभाळायला म्हणून यायची आणि उरलेल्या वेळेत घर काम पण करायची, आता फक्त घरकाम म्हणजे भांडी, फरशीचे काम आहे, पण ही तिचे घर असल्यासारखे मधूनच फर्निचर पुसून ठेवते, खिडक्यांच्या काचा पुसते. कित्येकवेळा स्वतः बघूनच कामं ठरवते आणि काम करून मोकळी होते. त्यामुळे ती कधीही बाहेरची वाटलीच नाही. घरातलीच एक सदस्य वाटायची.

तसे गणपतीला अजून एक आठवडा होता, पण आतापासून हळूहळू एकेक तयारी केले तर शेवटची धावपळ टाळता येईल, आता आज रात्री शांत बसून आपण यादी करूया असे ठरवून ती शाळेसाठी पळाली पण. तसे अनिरुद्ध आणि अर्णव पण मदतीला असणार होतेच पण तरीही आपल्या पद्धतीने सण साजरा करायचा म्हणजे थोडं व्यवस्थित नियोजन करूनच करावे लागणार. पहिलेच वर्ष आहे, पुढच्या वर्षी जरा अंदाज येईल पण यावर्षी मात्र नियोजन अगदी पक्के पाहिजे. सासूबाईंनी सुध्दा शाबासकीची थाप दिली पाहिजे असे ती स्वतःलाच बजावत होती.

एक दोन जणींना तिने विचारून पाहिले सवाष्ण म्हणून याल का? पण प्रत्येकीची काहीतरी कारणे होती. इथल्या लोकल मैत्रिणींना बोलवावे तर त्यांना आपले जेवण आवडेल की नाही इथपासून शंका. शेवटी मनाचा हिय्या करून तिने सासू बाईंशी बोलायचे ठरवले. ती त्यांना फोन लावणार तेवढ्यात त्यांचाच फोन आला. घरात लक्ष्मी आल्याचा आनंद त्यांच्या आवाजातून अंजुपर्यंत पोहोचत होता. आता त्यांना काही विचारणे योग्य वाटणार नाही म्हणत तिने मनातला विचार मनातच ठेवला. मामी झाल्याचा आनंद आता ती पण अनुभवत होती.

गणपती बसले, त्यादिवशी व्हिडीओ कॉल वरून सासूबाईंनी सारी व्यवस्था पाहिली. लेकाला सुनेला शाबासकी पण दिली. मग गौरीची पूजा त्यांना कसे आणायचे हे सगळे सविस्तर सांगितले, आणि सवाष्ण म्हणून कोणाला बोलावले विचारले, ती काही बोलणार तेवढ्यात छोटीचा रडायचा आवाज आला, आणि आणि आपण नंतर बोलू म्हणत फोन संपला पण.

गौरी बसतात त्या दिवशी शनिवारच होता त्यामुळे सुट्टी घ्यायचा काही प्रश्नच आला नाही. पण त्या दिवशी तिने रत्नम्माला जरा वेळ थांबवून घेतले. तिच्याच मदतीने गौरींना घरी घेतले, आणि सजवले. इकडे मुबलक असणाऱ्या फुलांनी सजवून जणू गौराईना त्यांनी फुलराणीच करून टाकले होते. रत्नम्माचा देखील पाय निघत नव्हता, शेवटी अंधार व्हायला लागल्यावर ती निघते म्हणाली, तेव्हा अंजू म्हणाली रत्नम्मा उद्या भरजरी साडी नेसून ये, आणि जेवण इकडेच करून जायचे आहे. तसे याआधी पण सणावाराला ती रत्नम्मालाच नाही तर तिच्या पोरींना पण जेवण पाठवायची.
‘अंजू उद्या कोणाला बोलावले आहेस जेवायला?’ अनिरुद्धने विचारले.
‘तूच बघ उद्या, तुझ्या चांगल्याच ओळखीची आहे सवाष्ण.’ अंजूने उगाच सस्पेन्स वाढवला.

रत्नम्मा तिच्याच वेळेला आली, तर अंजूने तिला बाहेरच बसवले, आत कामाला जाउच दिले नाही. आणि सांगीतले बाई आज तू माझी लक्ष्मी आहेस. माझे घर आवरतेस, स्वच्छ ठेवतेस माझ्या लेकरावर स्वतःच्या लेकारासारखी माया करतेस, देव काय याहून वेगळा असतो.  अनिरुद्ध गोंधळात पडला होता, पण तरीही बायकोच्या या विचारांचा त्याला आनंदही वाटला आणि भीतीही वाटली आई काय म्हणेल याची. त्याने अंजूला आतल्या खोलीत बोलावून त्याची शंका विचारली.
‘अनि मला आईंना विचारायचे होते पण चान्सच मिळाला नाही, इरा २ आठवडे आधीच आली, आणि आई एकदम बिझी होऊन गेल्या. हे बघ त्या नेहेमीच म्हणतात चांगल्या मनाने केलेली कोणतीही गोष्ट वाईट नसते. भले ती आपल्या समाजाच्या चौकटीत बसत नसेल. तुला आठवतंय अर्णव चे उष्टावण पण आपण रत्नम्माच्याच मांडीवर केले होते, कारण तो तेव्हा तिला अगदी चिटकून असायचा. मला खात्री आहे या वेळी पण त्या काहीच बोलणार नाहीत.’
रत्नम्माला आनंदही होत होता, पण अवघडल्यासारखे पण होत होते, गेल्या ७, ८ वर्षात तिला मराठी बोलता येत नसली तरी कळायची, आणि ती कन्नड मध्ये जे बोलायची ते अंजूला समजायचे. ती डोळ्यातले पाणी पुसत अक्का मला केवढा मोठा मान दिला म्हणत होती, आणि तिच्या हातावर हात ठेवत अंजू सांगत होती, आमचे जेवण गोड मानून जेवून घ्या, तेव्हाच मला समाधान वाटेल.
तिला पाटावर बसवून रांगोळी काढून, जेव्हा केळीच्या पानावर चार कोशिंबिरी, पाच सहा भाज्या, पुरणपोळी, पंचामृत, वरण भात खीर, करंज्या, वाढले तेव्हा रत्नम्मा फक्त अय्यो केवढे काय काय आहे एवढेच म्हणत होती, मनाने अगदी तृप्त झाली होती ती. तसा एक फोटो अंजूने काढला, आणि त्यांच्या फॅमिली ग्रुपवर टाकला, आता जे काय होईल ते नंतर बघुया. जाताना तिने तिची हळद कुंकू लावून ओटी भरली, आणी एका साडीबरोबरच दक्षिणा म्हणून पैसे दिले. जेव्हा ती नमस्कार करायला वाकली तेव्हा तिला पाठीवर अगदी आईच्या हाताची उब जाणवली. हो तर तिच्या आईच्याच वयाची असावी ती, दारुडा नवरा, आणि तीन पोरींचा संसार मात्र अगदी आनंदाने ओढत होती ती. दोन पोरी लग्न होऊन सासरी गेलाय होत्या, धाकटी अजून शिकत होती. आपण आज काहीच कामा न करता फक्त जेवण करून जातोय याचे रत्नम्माला खूप वाईट वाटत होते, पण त्याच वेळी आनंद समाधान देखील वाटत होता.
तो फोटो आईंनी बघितला आहे पण अजून काहीच कशा बोलल्या नाहीत, या भीतीत अंजूला जेवणच गेले नाही, तसेही नातीच्या मुळे त्या रात्री अपरात्री सुध्दा जाग्याच असायच्या. आपण फोन करावा की त्यांच्या फोनची वाट पाहावी. अंजूला काहीच कळत नव्हते, अनिरुद्ध मात्र भरपेट पुरणपोळी ओरपून झोपला होता. शेवटी न राहवून मेसेज करावा आणि आपल्या मनात जे आहे ते सांगावे असा विचार करून अंजूने फोन घेतला तेवढ्यात सासूबाईंचाच फोन आला. ‘अंजली,’ त्या तिचे पूर्ण नाव चिडल्या किंवा खुशीत असल्यावरच घेतात त्यामुळे तिला कधी नव्हे ती त्यांच्याशी बोलायची भीती वाटायला लागली.
‘अंजली, आजवर मला जे जमले नाही ते तू करून दाखवलेस, मला खूप आनंद झाला. ‘
‘आई तुम्ही खरेच बोलातंय ना की माझे मन राखण्यासाठी बोलताय?’
‘अंजू तुला मी माहिती आहे, आवडले नाही तर पहिले सांगते, आवडले तर मात्र सांगायला काचकूच करते. आता निम्म्या झोपेत आहे, उद्या सकाळी उठाल्यावर निवांत बोलते. पण एक नक्की तू माणसात देव पाहायला लागली म्हणजे तुला देव कळला. अशीच खुश, समाधानी विचार करती राहा.’

त्या क्षणी तिने जाऊन त्या गौराईना परत एकदा नमस्कार केला आणि सांगीतले, तुम्ही सोन्याच्या, चांदीच्या, रूपाच्या पावलांपेक्षा समाधानाच्या पावलांनी या, आणि तृप्तीच्या पावलांनी इथेच राहा.

मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment