Sunday, July 24, 2016

कागदावरच प्रतिबिंब

ती तेव्हा एक चौदा पंधरा वर्षाची असावी, घरी कोणी नव्हतं, अभ्यास करून झालेला होता. मोठ्या जबाबदारीनं तिच्यावर घर सोडलं होतं. तिच्या आईचं म्हणणं होतं, ही तर अगदी सद्धी गोष्ट आहे, आपल्या घरात आपल्याला कसली भीती?, त्यामुळे अगदी १० वर्षांची असल्यापासून आई तिला अशी एकटी सोडून जायची, कधी गरज म्हणून तर कधी एक नवीन अनुभव शिकवण्यासाठी. त्यावेळी टीव्ही वर आजच्या सारखं २४ तास कोणी ना कोणी नाचत, बोलत नसायचं, जेवायच्या, झोपायच्या वेळेसारखा टीव्ही पण ठराविकच वेळ असायचा.
त्या दिवशी दुसरं काही करण्याचा मूड नव्हता म्हणून तिला घर आवरण्याची हुक्की आली. अशी फार कमी वेळी तिलिया हुक्की यायची, पण आली तर मग इकडचं घर तिकडं व्हायचं. त्या ही दिवशी तिनी तिच्या कपाटापासून सुरु केलं, कपडे सगळे नीट ठेवून झाल्यावर, आज आई बाबांचे कपाट ही आवरावं असं तिला वाटलं. आईच्या साड्या नीट घडी केलेल्याच होत्या, तिच्या कपाटासारखा सावळा गोंधळ नव्हता तिथं, पण मग साडीच्या कप्प्याच्या खालचा कागद बदलताना तिला तिथं काही दहा , वीस रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि अगदी हसूच आलं, तिच्या दप्तरात कधी कधी तिला असेच आठ आणे, एखादा रुपया मिळायचा तो ही तिनीच कधी तरी टाकलेला असायचा, पण अनपेक्षितपणे असे पैसे मिळण्यातला आनंद वेगळाच होता. तिच्या या सवयीचं मूळ आता तिला कळल होतं. साड्या नीट लावून झाल्या मग ब्लाऊजचा कप्पा लावता लावता तिला एक पिशवी मिळाली, अगदी उत्सुकतेनं तिनं ते उघडलं, त्यात काही पत्र दिसत होती. खरंतर आई नी खूप वेळा सांगितलं होतं अशी कोणाचीही पत्र, डायरी न विचारता वाचू नये, पण आईच्या कप्प्यात अशी कोणाची पत्र असावीत. ती पण अशी जपून ठेवलेली. तिनी मनातल्या मनात देवाची माफी मागून ती पत्र वाचायला सुरुवात केली. लग्नाच्या आधी तिच्या बाबांनी तिच्या आईला लिहिलेली, ४, ५ पत्रं होती ती. किती वेगळे होते बाबा त्या पत्रांमध्ये, अगदी एखाद्या प्रियकारासारखेच, तिला खूप भारी वाटलं. त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पेन नी ती पत्रं लिहिली होती, मग कुठे फुलं होती, एका पत्रावर तर मोगऱ्याचे अत्तर लावलेलं होतं, आईला अत्तरं आवडतात हे तिला त्या दिवशी नव्यानंच कळत होतं.
आई वडील म्हणून आपण आपल्या आई वडिलांना अगदी गृहीत धरून चालतो, ते एकमेकांशी किराण सामान, नातेवाईक, मुलं, पाहुणे यावरच बोलत असतील असा आपला ठाम विश्वास असतो, पण मग ते प्रियकर प्रेयसी नसतात का? फक्त समाजानी गाठ बांधून दिली म्हणून एकत्र राहायचं बंधन त्यांनी स्वीकारलं असतं का? हे काही कळण्याचं ते वयही नव्हतं, पण तिला अगदी फुलावर झुलल्यासारखं वाटत होतं.   आई वडिलांना एक वेगळीच ओळख त्या दिवशी होत होती. प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधण्याचेच दिवस होते ते, आई वडिलांवर अजून जास्त प्रेम वाटायला लागलं होतं.
कोणाला कळायच्या आधीच तिनी तो सगळा मौल्यवान ऐवज परत जशाचा तसा ठेवला, आणि आईचे कपाट लावल्याच्या सगळ्या खुणा मिटवून दिल्या. पण आपण पण आपल्या नवऱ्याला अशी पत्रं लिहायची, आणि त्याच्याकडून लिहून घ्यायची असं तिनी ठरवलं होतं.
प्रेमात पडायचं वय आहे ह्याची सगळीकडून जाणीव झाल्यावर सिने अभिनेते, क्रिकेटपटू असा आसपासच्या तमाम मदनांवर भाळून झाल्यावर तिला कॉलेजमधल्या प्रेमाची आठवण झाली, कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, कोणाबरोबर तरी फिरणं म्हणजे प्रेम, कोणालातरी आपण आवडणं म्हणजे प्रेम, सारखं बघत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम अशा प्रेमाच्या अनेक व्याख्या अनुभवून होईपर्यंत कॉलेज संपलं होतं, पण हात अजूनही मोकळेच होते.
ठरायच्या वयात लग्न ठरलं, इंटरनेट वरून फोटो पाहिले, एकमेकांशी chat करून मत जाणून घेतली, आणि मग भेटून बोलून सावरून हो म्हणलं. साखरपुडा, लग्न यामध्ये असलेल्या ४, ५ महिन्यात फोन वर सतत बोलणं होतंच, भेटणं तर must होतं. लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपल आणि तिला एकदम घरी कपाट बघून आठवण आली आई बाबांच्या लग्नाआधीच्या पत्रांची. अरे हे तर करायचंच राहिलं.  पत्र फक्त परीक्षेत नाहीतर सरकारी ऑफिसमध्ये लिहिली जात होती तेव्हा, पण तरीही तिनी निश्चयान एक तरी पत्र लिहायचा चंग बांधला. काळ किती बदलला होता, बाबा साखरपुड्यानंतर आईला थेट लग्नात भेटले होते, आणि फोन वगैरे तर तेव्हा फक्त चित्रपटांमध्येच दिसायचे. बाबांनी त्यांच्या अपेक्षा, घराच्या माणसांची ओळख असं काय काय लिहिलं होतं पत्रात, पण आता आपण काय लिहायचं, जवळपास रोज त्याला भेटणं होत होते, बोलणं तर स्वतःशी होत नाही इतकं त्याच्याशी होत होतं, मग आता या सगळ्यातून असं उरलेलं काय आहे जे आपण पत्रात लिहायचं? मोठ्ठा प्रश्न घेऊन ती पत्र लिहायला बसली. पण जसं लिहायला सुरु केलं तसं अगदी सहज सुचत गेलं, लिहित राहिली इमेल राहील कॉम्पुटर मध्ये कदाचित जगाच्या अंतापर्यंत मिटणारही नाही, पण त्याला गंध नसणार हाताचा, त्याला स्पर्श नसणार प्रेमाचा. आपली मुलं मोठी झाल्यावर विचारणार नाहीत आपल्याला आपली गोष्ट, आपल्या लग्नाची गोष्ट, किंवा कदाचित आपणच त्यांना सांगू how I met your mother. जगातल्या ९९.९९ % सर्वसामान्यांसारखी आपली सामान्यळू गोष्ट. फोटो जपतात काही खास क्षण तशीच पत्रही जागवतात जुन्या आठवणी, ती मजा नसते इमेल, मेसेज त्यातल्या स्माईलीमध्ये. माझं तुझ्यावरच प्रेम दाखवायचा एक मार्ग असेही समज या पत्राला. अक्षर पुसत होतील, पान पिवळ पडेल, पण पत्राची आठवण मात्र कधीच संपणार नाही...
ती लिहित होती, खूप वर्षांपासून साचलेले, आत मध्ये दाटलेलं प्रेम ती कागदावर उतरवत होती आपल्या पोरांना रोमिओ ज्युलीएट आई बापामध्ये दिसावेत म्हणून लिहित होती.....    


1 comment:

  1. wonderful..
    It is for the people who know the beauty of 'juni patr'
    I am one of those..

    ReplyDelete