ती
हे लग्न करताना आईनेच
काय सगळ्यांना मला घाबरवून सोडलं होतं. सासू नाही तर आज्जे सासू सुध्दा आहे त्या
घरात. नीट विचार करून हो म्हण बरं का. पण माझ्या बाकीच्या सगळ्या अटींमध्ये बसत
असल्यामुळे मी हो म्हणाले आणि आज ७ वर्षानंतरही त्याचा पश्चाताप नाही होत आहे.
आज्जेसासुबाई आता ८०च्या पुढे गेल्यात थकल्यात. सासूबाई या वर्षी शाळेतून निवृत्त
होत आहेत. म्हणजे काय तर त्यांनी २५ वर्षांपूर्वी सुरु केलेली बालवाडी आता बंद करत
आहेत. माझ्या बँकेतल्या नोकरीचे त्यांना खूप कौतुक वाटायचं. कधीही त्यांनी मला ही
गोष्ट करू नकोस असं सांगितलं नाही, मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आज्जींना विचारल्याशिवाय
पुढे सरकायची नाही. एक दोनदा तर माझ्यासाठी त्यांनी आज्जींकडे रदबदली देखील केली
होती, अर्थात हे मला त्यांनी नाही तर आज्जींनी सांगितलं होतं. पूर्वी एकत्र कुटुंब
होतं, आणि सुयोगचे बाबा मोठे, त्यामुळे आमच्या आई मोठ्या सून बाई. हे केलं तर
चांगलं दिसणार नाही, घरातल्या आल्या गेल्यांचं कोण करणार, सणवार, कुळधर्म सगळे
काही चालत मोठ्या सुनेच्याच गळ्यात पडतात. तरी बर सुयोग बालवाडीमध्ये जायला इतका
रडायचा कि मग त्याच्यानिमित्ताने आईंनी ही बालवाडी सुरु केली आणि त्यांना जरा
स्वतःचा वेळ मिळाला. सासुपुढे आजही त्या तेवढ्याच दबून असतात, आज्जींच्या समोर एक
शब्दही उच्चारायची आजही त्यांची हिम्मत नाही. मला कधी कधी गंमत वाटते या सगळ्याची.
म्हणजे बाबा त्यांच्या तोंडावर चार गोष्टी सुनावतात, पण आई एक शब्द नाही काढत
तोंडातून. आता आई बाबांसाठी आम्ही मुद्दामून युरोप ची २० दिवसांची ट्रीप बुक केली,
पण यांचा घोषा वेगळाच, आई काय म्हणतील.
यांना सून आली तरी या अजून सुनेच्या भूमिकेतून बाहेर पडतच नाहीयेत.
बरं आज्जी अगदी खाष्ट सासू
अशा काही वाटत नाहीत, म्हणजे गेल्या ७ वर्षात त्यांनी मला फारशी काही बंधनं नाही
घातली, दोन वर्ष थांबण्याचा आमचा निर्णय सुद्धा त्यांनीच सगळ्यांना नीट पटवून
दिला. अगदी गेल्या वर्षीपर्यंत दर वर्षी दिवाळीचे अनारसे त्याच करायच्या. अहो
आईंना साडीमधून पंजाबी ड्रेसमध्ये त्यांनीच आणले, आणि हे आईंनी, आज्जींनीच मला
सांगितलं. सुयोगच्या दोन्ही आत्या माहेरपणाला आल्या कि आज्जी आईला पण माहेरी
पाठवायच्या सुट्टीसाठी. तरी आई आज्जींना का घाबरतात हे मला कळतंच नाही. आई बाबा
असे एकत्र कधी जातंच नाहीत, आता जबाबदारी नाहीत म्हणून त्यांनी मोकळं फिरावं असे आम्हाला
वाटतं. सासू आणि आज्जेसासू सोबत असल्यामुळे मी अगदी बिनधास्त नोकरी करू शकते, मला त्यांच्यामुळे
जे काही मिळतंय त्याची परतफेड करणे शक्य तर नाही, पण एक छोटासा प्रयत्न म्हणून
आम्ही आई बाबांना जग फिरायला पाठवतोय तर ते हे घरच आमचे जग म्हणत पाय बाहेर काढत
नाहीयेत.
त्या
वयाची पन्नाशी ओलांडली
तरी आईंना विचारल्याशिवाय स्वतःचा काही निर्णय घ्यायची हिम्मत होत नाही. माझ्या
हाताखालच्या हजारो मुलांना मी धीट धाडसी केलं पण मी स्वतः मात्र नाही होऊ शकले
तशी. लग्न झालं तेव्हा जेमतेम २० वर्षांची होते मी. आईकडे कधी निर्णय घ्यायची वेळ
नाही आली, आणि इकडे तर सगळीच वेगळीच गत. सासऱ्यापेक्षा सासुबाईच जास्त कर्तबगार.
माहेरच्या पेक्षा पूर्ण वेगळे वातावरण, मी काहीतरीच बोलून जाईन असे मला वाटायचं
म्हणून मी पहिल्यापासूनच कमी बोलायचे, सगळं ऐकत राहायचे. सासूबाई जे काही सांगतील
ते काही चुकीचे नसेल असा एक विश्वासच बसला. सुरुवातीचे अनुभव सुध्दा तसे आले.
आता सुयोग झाल्यावर
सुध्दा त्यांनी मला मागे लागून बालवाडीचा कोर्स करायला लावला, मी जेव्हा जेव्हा
परीक्षेला जायचे सुयोगला मस्त सांभाळायच्या. मग त्यांनीच मला बालवाडी सुरु करायला
सांगितली. हे यांच्या दोन्ही बहिणी मला कधी परके व्तालेच नाही. उलट हे सगळे
म्हणजेच मला माझे जग वाटायला लागले. दरवर्षी माझ्या दोन्ही नणंदा माहेरपणाला यायच्या
तेव्हा मला कित्ती वाटायचं, त्यांचे माहेरपण करावं, त्यांना चांगलचुगल खायला
घालावं. पण आई म्हणायच्या, तू पण जाऊन ये माहेरी. त्यांना सांगताही यायचं नाही कि
माहेरी मला सासरी असल्यासारखं वाटतं, आणि सासरीच मोकळं वाटतं. नंतर सुयोगंच कारण
पुढे करून मी माहेरी जाण थांबवलं, तेव्हा एक वर्षी त्यांना दोन्ही लेकींना
माहेरपणाला बोलावलं नाही, मग मी त्यांना पहिल्यांदाच स्पष्ट माझ्या मनातलं सांगितलं.
तेव्हा त्यांनी पाठीवरून हात फिरवला आणि आईपेक्षाही त्या हातातली माया जास्त आहे
हे जाणवलं.
त्या थोड्या रागीट
होत्या, एकदा बोलायला लागल्या की बोलत राहायच्या, पण नंतर शांत झाल्या की सगळे
विसरून जायच्या. सुरुवातीला भीती वाटायची, पण मग सवय होत गेली. आजही त्यांना एखादी
गोष्ट बाहेरून कळलेली आवडत नाही. त्यांचे म्हणणे आम्ही त्यांना ती सांगावी. लेकाने
सुनेने ही युरोपची ट्रीप बुक केली आणि आम्हाला देखील सांगितलं नव्हतं, पण नेमकी
आईंची भाची सुध्दा त्याच ट्रीप मध्ये आहे, आणि तिनेच आईंना सांगितलं. त्यामुळे
त्या बसल्या फुगून, मी जाऊ नको असे थोडीच म्हणाले असते, नातसुनेपुढे आज्जी म्हणून
त्या वेगळ्याच असतात, पण सासू म्हणून त्या वेगळ्या आहेत हे कसे सांगू कोणाला. सासू
झाले तरी माझी सासू असेपर्यंत तरी मी सूनच राहणार, आणि सुनेची भूमिका इतकी अंगवळणी
पडली आहे कि मी कधी खरंच सासू म्हणून वागू शकेन का माहित नाही.
मानसी होळेहोन्नुर
No comments:
Post a Comment