Wednesday, April 11, 2018

चांग भलं....


आठवणी कशाकशात गुंतलेल्या असतात सांगताच येत नाही. कधी एखादा फोटो बघून जाग्या होतात, तर कधी एखादी जागा बघून, कधी एखादे गाणे ऐकून तर कधी अशाच काहीच कारण नसताना भेटायला येतात आठवणी. त्या आठवणींमध्ये वय एकदम हरवलं जातं, अस्पष्ट झालेले संदर्भ ताजे होऊन जातात, जगण्याचं अजून एखादं नवं कारण सापडतं या आठवणींमध्ये.
परवा असाच आजोळच्या ग्रामदैवताचा फोटो पाहिला आणि मनातल्या जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.
शहरात राहताना सगळेच देव एकत्र होऊन जातात, एखादा वेगळा असा उरत नाही, त्या उलट गावात गावाची ओळख म्हणून एखादा, भैरोबा, बिरोबा, म्हाळसाई, खंडोबा, काळेश्वर आणि असे नानाविध नावाचे देव त्या त्या गावात सुखाने राहत असतात. गावातल्या लोकांनी गाव सोडला तरी त्यांच्या देवावरची श्रद्धा कमी होत नसते, अडीनडीला, सुखाच्या प्रसंगी या सगळ्यांची हमखास आठवण निघत असतेच. साधारण मार्चपासून मेपर्यंतचा काळ हा पूर्वीपासून शेतीसाठी थोडा निवांत काळ समजला जातो त्यामुळे गेल्या पिढीपर्यंत अनेकांचा लग्नाचा मुहूर्त याच काळात धरला जायचा. आजही गावांकडे लग्नासाठी हाच मुहूर्त धरण्याचा पहिला प्रयत्न असतो. हाच काळ असतो गावाच्या यात्रांचा पण. उन्हाळ्याची सुट्टी, शेतीतला थोडा विसावा सगळं कसं कित्येक पिढ्यांपासून जुळवून आणलेलं.
गावच्या देवाच्या/ देवीच्या यात्रेला म्हणून लोकं न चुकता गावची वारी करतात. प्रत्येक दारात पाहुणारावळा असतो, घरोघरी पुरणपोळी शिजते. गावची यात्रा हा मुळात एका दुसऱ्याचा सण नसतो तर तो पूर्ण गावचा सण असतो. देवाची रात्री निघणारी पालखी, त्यातल्या प्रत्येकाच्या हातावर गुळ ठेवणारे गावकरी, रस्ता झाडून पाण्याने सडा घालून त्यावर रांगोळ्या घालणाऱ्या बायका, आकाशात होणारी रोषणाई. फुल, फळ, मिठाई यांनी भरून वाहणारा बाजार. गाव कसा रंगीबेरंगी दिसत असतो. त्यातच देवपूजेच्या नंतर पोटपूजा, मनाची शांती झालीच पाहिजे, म्हणून एका मोकळ्या माळरानावर वेगवेगळे ठेले टाकलेले असतात. कुस्तीचा, तमाशाचा फड याबरोबरच आकाशपाळणे, तलवारी, बाजे, पिपाणी ,धनुष्यबाण, पिसापिसाची टोपी असं काय काय तरी अदभूत मिळायचं तिथं. या सगळ्याचे खूप अप्रूप वाटायचं. आख्या गावात लागतात त्याहून जास्त दिवे त्या दोन तीन दिवसात त्या माळरानावर दिसायचे, गाव असं वेगळंच वाटायचं त्या दिवसात. हक्काने आलेल्या माहेरवाशिणी, त्यांची चिल्लीपिल्ली, हौशे नवशे, गवशे, शेजारच्या गावातला पाव्हना अशा सगळ्यांनी माळरान बहरून गेलेलं असत. एक छोटा बाजा , शिट्टी मिळाली तरी खुश होणारी पोरं, मैत्रिणींना भेटून, आईच्या, वहिनीच्या हातचं खाऊन खुश होणाऱ्या लेकी, चार दिवस घर भरलं म्हणून खुश होणारे थकलेले हात, कुस्तीचे डाव पाहता पाहता हात चालवणारे तरणे, पहिल्यांदा तमाशा बघायला लाजत जाऊन आत सगळीच ओळखीचे चेहरे बघून चेपणारी भीती, यात्रेची एक वेगळीच नशा असते. यात्राही फक्त बघायची नव्हे तर अनुभवायची गोष्ट असते.  
आता मात्र गल्ली बोळात खेळण्यांची दुकाने झालीत, एकेका घरातच शेकड्याने दिवे लागतात, रात्रीचा अंधार आता नावालाही नसतो. घरात गोड करायला काही निमित्त लागत नाही. घरातल्या चुली वेगळ्या झाल्यात त्यामुळे पाहुणे आपोआपच गळालेत. खाण्याची चंगळ करण्यासाठी आता वर्षभर थांबावं लागत नाही. कुस्ती, तमाशा यापेक्षा कितीतरी वेगळी मनोरंजनाची साधने आता बोटाच्या अंतरावर आली आहेत. सारवायच्या अंगणांऐवजी गाड्या ठेवायला फरश्या आल्या आहेत. काही अंतरं वाढली आहेत, तर काही जाणीवा बदलल्या आहेत. काही ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती यातली गल्लत व्हायला लागली आहे, तर काही ठिकाणी वेळ, पैसा याचे गणित सोडवता येत नाहीये. बदल चिरकालिक असतो.
यात्रा होत होत्या, त्या होतंच राहणार, लोकं येत राहतील, यात्रा होत राहतील, त्यांचं स्वरूप बदलेल, लोकं त्या बदललेल्या स्वरूपाला आत्मसात करतील, सोहळे साजरे होतच राहतील, ते कधीही कोणासाठीही थांबत नसतात. आनंद घेण्यासाठी, देण्यासाठी नातं, कारण, पैसा कशाचीच गरज नसते. वर्षे लोटली गावच्या यात्रेला जाऊन, तेव्हा बोलावणारे आता नाहीत, आता जे आहेत त्यांच्या बोलावण्यात आग्रह नाही, पण तरीही यात्रा म्हणाल्यावर दंडवत घालणारे, रात्रीची पालखी, देवळात मिळणारे गुळ खोबरं, आणि चांगभलंचा गजर कानात उमटतच राहतो. यात्रेत म्हणलेलं चांग भलं साऱ्या सृष्टीसाठी असतं, फक्त तिथे येणाऱ्या, नमस्कार करणाऱ्यांसाठी नाही असं कधी तरी आजीच्या तोंडून ऐकलं होतं. तेच आठवत दरवर्षी यात्रेला न जाताही यात्रेची आठवण काढत, चांग भलं म्हणत मी यात्रा जगून घेते.  
मानसी होळेहोन्नुर


Wednesday, April 4, 2018

ती_आणि_त्या १




ती

पण काय हरकत होती त्यांनी सोहमला दोन तास सांभाळायला. तिची नुसती चिडचिड चालली होती. पॉपकॉर्न फुटावे तशी ती फुटत होती. सोहम च्या जागी निशा ताईंचा अर्णव असता तर त्यांनी दोन तास काय दोन महिने बघून घेतलं असतं. तुझ्या आईला मला कधीच मदत करायची नसते. ही काही आजची पहिली वेळ नाही. लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. काहीही करताना निशा ताईंना माझ्यापेक्षा चांगलं घेतात त्या. मला काही करायचं झालं की त्या आजारी तरी असतात, किंवा उरकायचं म्हणून उरकतात.
नाही म्हणायला घरात मदत करतात, पण कधी तोंड उघडून कौतुक करायचं नाही की कशाला चांगलं म्हणायचं नाही. बोलणं तर इतकं मोजून मापून जणू काही पैसेच पडणार आहेत दोन शब्द सुनेशी जास्त बोलल्या तर.
हां आता मी काय करावं याबद्दल कधी काही सांगत नाहीत, पैश्याबद्दल तर चुकूनही विचारत नाहीत. पण तरी स्वतःहून कोणती गोष्टही करत नाहीत. आता मी जर त्यांना एखादी साडी आणली, तर लगेच पुढच्या महिन्यात तेवढ्याच किंमतीची साडी मला आणून देतील. आपण सगळे एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यावर जेवणाचं बिल दिलं तर पुढच्या वेळी पुढे होऊन लगेच त्या नाहीतर बाबा बिल देतील. बाबा आपले साधे सरळ आहेत, कधीतरी चुकून ते बिल द्यायला लागले तर याच डोळे मोठे करून बघतील.
आम्ही नवरा बायको कुठेही फिरायला गेलो तरी यांची तक्रार भुणभुण नसते, आता माहेर जवळ आहे त्यामुळे आईकडे जाणे येणे असतेच पण त्यावरून गेल्या दहा वर्षात कधी बोलल्या नाहीत पण सोहमला कधी एक दिवस त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत.
आम्ही ही समजून घेऊन सोहमला शाळेनंतर दोन तास पाळणाघरात ठेवायचं ठरवलं होतं. सगळे नीट चाललं होतं, पण नेमक्या त्या काकू आजारी पडल्या आणि आता काहीतरी वेगळी सोय करावी लागणार हे लक्षात आल्यावर त्यांनी साफ हात वर झटकले. म्हणजे आता मला नोकरी सोडावी लागेल नाहीतर सोहमला आईकडे सोडावं लागेल. तसा तो आधीही आईकडेच असायचा दिवसभर म्हणा.त्यावर आता हा काय म्हणतोय माहित नाही. बरं हा आता दुसरीत आहे, स्वतः सगळं करून घेतो, तसा त्याचा काही त्रास नाही, फक्त त्याच्याशी भरपूर बोलावं लागतं. सतत तो काहीना काही विचारत असतो. पण काय हरकत आहे तुमचाच नातू आहे ना तो.
यांच्यासाठी आम्ही दुसऱ्या शहरात आलेल्या चांगल्या संधी घालवल्या, वेगळे घर घेतलं पण राहायला गेलो नाही. घरात कायम कोणतीही गोष्ट करताना दोघांना विचारात घेऊन मगच निर्णय घेतले, आता आमची ही थोडी गरज त्यांना पूर्ण करता येत नाही का?

त्या

मला खरं तर ही इतकं बोलणारी सून नकोच होती, पण पोराला पसंत पडली आणि आमच्यासाठी पवित्र झाली. कसं काय लोकांना इतकं बोलवतं बाबा मला कधीच कळलं नाही. यांचं तोंड कसं दुखत नाही कधी. ही काय हिचा गोतावळा काय साधी सरळ गोष्ट एका वाक्यात सांगून कधीच संपवणार नाहीत. हे लांबण लावणार त्याला. आता लग्नानंतर आम्ही एकत्र राहणार म्हणजे तिची काहीच हरकत नव्हती त्याला उलट तिला तसेच घर हवं होतं. पण मग मला साधी सरळ हाक मारायची सोडून प्रसादच्या आई असं म्हणायला लागल्यावर मात्र मीच म्हटलं, काकू, मावशी, आत्या, आई सासूबाई अशी काहीही हाक मार.
माझी लेक निशू पण माझ्यासारखीच अबोल, कधी मनातलं काही बोलणार नाही, माझ्यासारखीच असल्यामुळे मला बरोबर तिच्या मनातलं कळायचं. आता ती नोकरी नाही करत, त्यामुळे स्वतःवर खर्च पण नाही करत कधी म्हणून मी कधी तिला जरा काही जास्त घेतलं की लगेच सून बाईंच्या पोटात दुखायला लागायचं. मला हे जसं लक्षात आलं मग आपलं निशाला काहीही द्यायचं असलं की हिच्यासमोर देणंच बंद केलं. तिने आणि तिच्या नवऱ्याने अगदी ठरवून मुलगा मोठाहोईपर्यंत एका तरी पालकाने घरीच थांबायचा निर्णय घेतला, आणि मस्त घरबसल्या शक्य आहे ते ते सगळं करते ती. मुलाला कसं अगदी छान वळण लावलं आहे, अगदी सॉफ्ट आहे, हळू बोलतो, ओरडत नाही, आला की त्याचे पुस्तक घेऊन बसतो, कधीतरी चित्र रंगवत बसतो. काही म्हणून बघावं लागतं नाही त्याच्याकडे. आणि आमचा सोहम म्हणजे बरोबर त्याचं दुसरं टोक आहे. एक मिनिट हा मुलगा एका जागी शांत बसत नाही. नुसता बोलत तरी असतो, नाहीतर काही तरी शंका विचारत असतो. ह्याला हात लावेल, ते पाडून ठेवेल, नुसता गोंधळ असतो हा घरात असला म्हणजे.
आता यांची गरज म्हणून आम्ही दोन तास त्याला सांभाळायचं म्हणे, मुळात आम्हाला न विचारता त्यांनीच हा निर्णय घेतला. मला पहिले राग त्याचा आला, मग नंतर तिने अर्णव आणि सोहम ची तुलना करायला सुरुवात केली, आता जर मी हिची आणि निशा ची तुलना केली तर आवडणार आहे का हिला. तरी मी काही बोलायला गेले नाही, फक्त साफ सांगितलं आम्हाला जमणार नाही, तुम्ही दुसरी काही तरी सोय बघा. हे म्हणत होते असे एकदम तोडू नकोस, पण माझे म्हणणं आता परत अडकून पडायचं का/ एखाद दिवसाचा प्रश्न असता तर ठीक होतं,पण रोज जमणार नाही बाबा. आमचा फिरायचा ग्रुप मस्त जमलाय सगळं विसरावं लागेल आता.
आज दहा वर्षात मी कधीच ह्यांना काहीच विचारलं नाही, उलट त्या दोघांना तिघांना कायम फिरायला जायला सुचवलं, ते गेले की तेवढंच माझे घर परत मला माझं वाटायचं. हिने घराची शिस्त पूर्ण बदलवली, पण मी काही बोलले नाही, तिची हौस होऊन जाऊ देत म्हणत गप्प राहिले. घर खर्चात आम्हीही त्यांच्या एवढाच वाटा उचलला, त्यामुळे तर ते दोघं त्यांचं स्वतःच घर घेऊ शकले पण कधी त्याबद्दल काहीच बोलले नाही हे दोघेही. आता जेव्हा केव्हा बाहेर गेलो तर यांच्यावर भार नाही पडू दिला आमचा, एकदा यांनी खर्च केला म्हणाल्यावर पुढच्या वेळी लगेच आम्ही केला.
खरंतर मला किती तरी गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण नको कशाला म्हणत दर वेळी गप्प बसले, आणि तसेही बोलणे माझ्या स्वभावात नाही. पण यावेळी मात्र राहवलं नाही आन ठाम पणे माझा निर्णय सांगितला. शेवटी सासू म्हणून माझाही मान आहेच ना..!
मानसी होळेहोन्नुर

Wednesday, March 28, 2018

चालणाऱ्या बाईची कहाणी

बोलणाऱ्या बायकांबरोबरच चालणाऱ्या बायकांचा पण एक ट्रड असतो. जसं कधीही न थांबणाऱ्या सतत बोलणाऱ्या, फक्त स्वतःबद्दल बोलणाऱ्या, झोपेतही बोलणाऱ्या, दगडाबरोबरही बोलणाऱ्या अशा वेगवेगळ्या बायका असतात तशाच वजन कमी करण्यासाठी चालणाऱ्या, गप्पा मारता याव्यात म्हणून चालणाऱ्या, मी पण एक्सरसाईज करते दाखवण्यासाठी चालणाऱ्या, वेळ आहे तर थोडून चालून बघावं म्हणून चालणाऱ्या असे अनेक चालणाऱ्या बायकांचे प्रकार कोणत्याही वॉकिंग ट्रॅक वर बघायला मिळतात.
स्वतःला एकदम फिट ठेवायचं आहे या एका दृढ निश्चयाने चालणाऱ्या बायका या चालण्यासाठी खास पोशाख करूनच मैदानात उतरतात, म्हणजे अगदी ट्रॅक पँट टी शर्ट घालतातच असे नाही, पण पायात शूज मात्र आठवणीनी घालतात. कुर्ता, जीन्स, सलवार कमीज, घालून त्यावर शूज नक्की घातलेले असतात. आणि कानात हेडफोन असतात. चालताना यांची नजर एकदम झापडं लावलेल्या घोड्यासारखी असते. या बायकांना स्वतःच्या मागून पुढे गेलेलं कोणी आवडत नाही, झपाझप चालून त्यांना पुढे पुढे जाण्याचे वेध लागलेलं असतात. या गटात फक्त बायकाच असतात असं नाही, तरुणी देखील मोठ्या प्रमाणावर असतात, म्हणजे या गटातल्या बायका सुद्धा स्वतःला तरुणीच समजत असतात. मनाने त्या तरुणच असतात. या तरुणी अर्जुनासारख्या स्वतःला फिट ठेवायचं या एकाच हेतूने चालत असतात, पळत असतात. त्यांनी स्वतःच सारं टाईम टेबल आखलेलं असतं आणि चालण्यात खंड पडू देत नसतात. रिमझिम पाउस असला तर त्या रेनकोट घालून चालायला येतात, थंडी असली तर त्या लाईट जॅकेट घालून येतात, पण चालणं सोडत नाहीत. चालणं हा यांचा एक छंद असतो. चालताना गाणी ऐकत त्या स्वतःशीच संवाद साधू पाहत असतात. स्वतःला उत्तम ठेवणं, डौलदार शरीर राखण्यासाठी त्या योगा, जिमला सुद्धा जातात. खाणं, पिणं झोपणं यासारखच चालणं हे देखील यांच्यासाठी मस्ट असतं.
टाईप टू मधल्या बायका या वजन कमी करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरणाऱ्या असतात. त्या आपले घरात पडलेले जुने शूज किंवा सँडल्स घालून चालायला सुरुवात करतात, निश्चयाच्या पहिल्या आठवड्यात अगदी नेमाने येऊन मग नंतर हळू हळू गायब होत जातात. या साधारण त्यांच्या सारख्याच विचार करणाऱ्या बायकांच्या शोधात असतात. एकटीने चालायला खूप कंटाळा येतो बाई, सोबत असली तर बरं म्हणत त्या मैत्रिणींच्या घोळक्यात चालत असतात. आपण चालून आपलं वजन कमी करणारच  याची पुरेपूर खात्री असल्यामुळे त्या बाकी कोणतेही डायेट करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. उलट चालून झाल्यावर आलेला थकवा घालवण्यासाठी एखादं सरबत, चाट, मात्र नक्की आठवणीने पितात खातात.
या नंतरच्या चालणाऱ्या बायका म्हणजे घरातून बाहेर पडायची सुवर्ण संधी मानतात अशा. म्हणजे व्यायामाच्या नावाखाली चालणं होतंच, पण चालता चालता मैत्रिणींसोबत मस्त गप्पा होतात, नवीन पदार्थांच्या रेसिपी शेअर केल्या जातात, नवीन कपडे साड्यांच्या बद्दल बोललं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या सेलच्या बद्दल नवीन नवीन माहिती कळते. कुठे काय नवीन आलं आहे, यापासून घरातले प्रश्न व्यक्त होण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे हे चालण्याचं ठिकाण असतं. एक खिडकी योजनेसारखं, सगळी काही माहिती अशी एकाच ठिकाणी अनेक जणींना मिळत असते. त्यामुळे हे असे बहुगुणी चालणं फारच आवडत असतं. त्यामुळे या बायकासुद्धा अगदी नित्यनेमाने येत असतात चालायला. यांच्यासाठी चालणं हा एक विरंगुळा असतो.
या खेरीज अधूनमधून थोडा बदल म्हणून फिरायला येणाऱ्या, ४ दिवस चालून २ किलो वजन कमी करण्याची स्वप्न पाहणाऱ्या, फोन वर निवांत बोलायला मिळावे म्हणून चालायला येणाऱ्या पण काही कमी नसतात. कारणं काहीही असो, पण या चालणाऱ्या बायकांचं एक वेगळं विश्व असतं. घरातल्या गोष्टींपासून थोडा पळ काढून स्वतःला वेळ द्यायला जरी त्या बाहेर पडल्या तरी घरची कामं, व्यवधानं काही त्यांना सुटत नसतात. चालून खरंच किती जणींची वजनं कमी झाली माहित नाही पण त्यांच्या मनावरची ओझी मात्र हलकी नक्कीच होत असतात.
मानसी होळेहोन्नुर

Thursday, March 22, 2018

गुंता

केसांतून कंगवा फिरवत,
त्यांना घट्ट पकडत त्यांची वेणी घालत तू विचारलंस,
‘तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे?’
शर्टच्या गुंड्या लावता लावता मीच गडबडलो,
हे असले प्रश्न म्हणजे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेपेक्षा भयानक,
असाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मी तिला विचारला होता,
तेव्हा तिला उत्तरं देता आलं नव्हतं,
आणि त्यामुळे एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखा
मी त्या मैत्रीतून मोकळा झालो होतो,
अजूनही मित्रांमध्ये बोलताना तिचा उल्लेख टाळून बोलतो मी,
तिचं माझ्यावर प्रेम होतं असं म्हणणं होतं तिचं,
पण तिला ते स्पष्ट करता आलं नव्हतं.
आता दशकभर जुन्या बायकोने एकदम
असा काही प्रश्न विचारला म्हणजे नात्याचीच भीती वाटायला लागते.
कुठं काही तुटणार तर नाही ना,
कुठं काही चुकलंय का आपलं,
हजार प्रश्नांचे भुंगे डोक्यात भिरभिरायला लागतात.
उगाच जुनी भांडणं, जुने वाद,
दोन चार दिवसातल्या घटना आठवायला लागतात.
खालीवर लागलेली बटण नीट लावत बायको म्हणते,
प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं असतंच आणि आपल्यालाच सापडतं असं नसतं,
काही गोष्टी असतात म्हणून असतात,
उगाच त्यांची कारणं शोधू नये.
बयो हेच उत्तरं तिने तेव्हा हातावर हात ठेवून दिलं होतं.
आता तू छातीवर हात ठेवून दिलंस,
मी अजूनही गोंधळातच आहे,
प्रेम तिचं माझ्यावर होतं, की माझं तुझ्यावर आहे
की माझं माझ्यावर आहे?
बिचकत मी तिचा हात हातात घेतला, आणि म्हणालो,
तू माझं उलटपालट झालेलं आयुष्य नीट लावतेस,
त्यामुळे जगणं सोपं होतं,
सोप्या जगण्यात आनंद वाटतो,
तो आनंद म्हणजे माझं तुझ्यावरच प्रेम असावं...
ती हसत म्हणाली,
‘फसलास गड्या, ते सगळं झूट आहे,
गेल्या दहा वर्षात मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीचा जाब विचारला नाही,
जबाबदारी टाकली नाही,
या सगळ्याची कृतज्ञता म्हणजे तुला माझ्याबद्दल वाटतं ते प्रेम आहे.’
माझ्या मोठ्या डोळ्यांकडे बघत ती म्हणाली,
‘तू मला आवडतोस, तुला मी सहन करू शकते,
तुझ्या सगळ्या गोष्टीत आनंद मानून घेते, ते माझं प्रेम आहे तुझ्यावरचं’
स्वतःच्या केसांचा गुंता तिने कचरापेटीत टाकला
आणि तिच्या तिच्या कामाला निघून गेली,
कधी कधी काही गोष्टी खऱ्या असल्या तरी
बोलू नयेत आणि बायकोने तर नाहीच नाही
मानसी होळेहोन्नुर

प्रेमवेग

रस्त्याच्या दुसऱ्या टोकाच्या दुकानात उभ्या असलेल्या
माणसाच्या चष्म्याची फ्रेम थेट तुझ्याच चष्म्याच्या फ्रेम सारखी होती,
काल दोन सेकंद शेजारून गेलेल्या माणसाचा परफ्युम
तोच होता ज्याचा वास मी स्वप्नातसुद्धा घेते,
कुरियर द्यायला आलेल्या माणसाचं नाक थेट तुझ्यासारखच होतं,
हे तो गेल्यावर सुध्दा मला चांगलं लक्षात आहे,
परवा तर गल्लीतला बहरलेल्या चाफ्याच्या खाली मला तूच दिसलास,
इमी त्याच्या खाली जाऊन पाहिले तर दोन फुलं पडलेली होती,
पदोपदी तुझे आभास व्हायला लागतात,
जागोजागी तू दिसायला लागतोस,
छोट्या छोट्या गोष्टीत तुझी आठवण यायला लागते,
तुझ्यावाचून गोष्टी अडायला लागतात,
वय वाढता वाढता प्रेम मोठं होत असतं,
दुराव्यात ते तिप्पट वेगानं वाढत असतं...
मानसी

गृहलक्ष्मी

...

ती घरी येते तेव्हा घर असतं पसरलेलं,
उष्टी खरकटी भांडी पडलेली असतात सिंकमध्ये,
काही तासांचा कचरा तसाच पडून वाट बघत असतो तिची,
कधी कधी तर कपडे भिजलेले,
भिजवलेले बादलीत पडून निवांत असतात,
मग ती फिरवते जादूची काडी
आणि सपासप एकेक काम उरकत जाते,
धुतलेली भांडी, पुसलेली लादी,
डब्यात गेलेला कचरा,
दोरीवर वाळणारे कपडे,
घर हसायला लागतं पुन्हयांदा
कपाळावरचा घाम पुसत,
शिळे काहीबाही पोटात ढकलत ती उघडते
दुसरं दार तिथेही असेच काही बाही वाट पाहत असतं तिचं
अशी अनेक वाट पाहणारी दार उघडून झाल्यानंतर
ती येते स्वतःच्या हक्काच्या दारात,
जादूच्या काडीतली जादू ओसरलेली असते,
तरीही ती पदर खोचते, नाहीतर ओढणी घट्ट बांधून घेते,
सारं काही झाक पाक करते,
तेव्हा तिचा खरा दिवस संपतो.
तिच्या घराला ती जास्तीच मायेने गोंजारते,
कारण ते घरच पुरवत असतं
जादू तिच्या काडीत, ते घर आहे म्हणून ती असते उभी
सगळ्यांची घर उभीच ठेवत...!!!!!

Saturday, January 13, 2018

बटाट्याचा शिरा - आठवणींचा पेटारा



काही पदार्थ काही आठवणींशी जोडले गेलेले असतात. 

जवळपास 12,13 वर्षांपूर्वी मी एका घरात भाड्याने राहत होते. खरंतर ते एका बिल्डिंगच आऊट हाऊस होते. माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं ते अतिशय सुरेख घर होतं. पहिल्यांदाच मी एकटी राहत होते, स्वतःच्या हाताने रांधून खात होते, त्याचवेळी वन डिश मील चे खूप सारे प्रयोग मी करून बघितले होते, एकाच किंमतीच्या दोन तीन भाज्या एकत्र करून पाव किलो भाजी आणून एक आठवडाभर सहज स्वैपाक होत होता. खूप प्रयोग तेव्हा स्वैपाकघरात आणि मित्र मैत्रिणींवर होत होते. सुरुवातीला एक मैत्रीण सोबत राहायची, मग दोघी मिळून स्वैपाक लवकर आणि चांगला करण्याच्या निरनिराळ्या पध्दती सोडून काढत होतो. 
स्वतःच स्वतःसाठी स्वैपाक करण्यात एक वेगळीच मजा असते, त्यातही अनेकवेळा, दुध जास्त आहे, म्हणून ज्यात त्यात दुध घालून दुधाचे  पदार्थ कर, दुध नाही म्हणून बिनदुधाचे काय पदार्थ करता येईल हा विचार केला जायचा. हाताशी असलेल्या सामानात काय काय करता येईल, हे सगळे मी नव्याने शिकत होते. भातुकली सारखा एवढासा भात पिटुकल्या वाटीत वरण अशी सगळी चंगळ करून घ्यायचे. कित्येक वेळा तर तेव्हा मी लोकांच्या घरी भाज्या घेऊन जायचे त्यांना सांगायचे, मला १ च वांग हवंय, उरलेली तुम्ही ठेवून घ्या. मग पालेभाज्यांचंही तसेच. घरी आणलेलं दुध नासेल म्हणून मी रंगलेली गप्पांची मैफिल सोडून घरी पळत जायचे. त्या घराच्या अशा सांगू तेवढ्या आठवणी कमी आहेत.

त्या घरी राहायला जाऊन जास्त दिवस झाले नव्हते, कोणतातरी मोठा उपवास होता. बहुदा आषाढी एकादशीचा उपवास होता. शाळेपासून त्या दिवशी खिचडी, पापड्या, भगर, चिक्की असे सगळं आवडीचं खायला मिळायचं म्हणून उपवास करायची सवय लागली होती. त्यामुळे एकटी असले तरी उपवास ठेवावासा वाटला. मग असच काहीतरी फराळाचे करायची हुक्की आली. पटकन होईल,असं सोप्पं काय करावं असा विचार करत असताना एकदम बटाट्याचा शिरा आठवला. मग काय झटपट बटाटे  उकडून घेतले. मंद तुपावर परतून घेतले आणि मग त्यात साखर घातली, वासासाठी एकाच एका वेलदोड्याची पूड घातली, घरभर वास पसरला होता. मीच खूप हौसेने केलेला शिरा एकदम मला एकटीला खावासा वाटेना. बहुतेक अजून कोणी तरी त्याला चांगलं म्हणावं अशी सुप्त इच्छा असावी, पण मला तो कोणाला तरी द्यावासा वाटला. नव्याने आलेल्या त्या जागी अशी फारशी कोणाशी ओळख नव्हती. बरं मित्र मैत्रिणींना फक्त बटाट्याचा शिरा खाण्यासाठी घरी बोलावणं बरोबर वाटत नव्हतं. मग कोणाला द्यावा असा विचार करत असताना पटकन डोळयांसमोर त्या घराच्या पुढच्या बाजूला एक आजी राहत होत्या त्याच डोळ्यासमोर आल्या. माझ्या घराच्या रस्त्यावर त्या आजींच्या खोलीची खिडकी होती. संध्याकाळचा मालिकांचा वेळ सोडला तर बहुत करून त्या आज्जी त्या खिडकीतच बसलेल्या असायच्या. त्या आजी कायम बोलायला उत्सुक असायच्या, त्यांच्या सुनेकडून कळलं होतं त्या 86,87 वर्षांच्या होत्या, एक कानातल श्रवणयंत्र सोडलं तर त्या एकदम मस्त टकाटक होत्या. त्यांच्या कडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज नक्कीच येत नव्हता. सतत थांबून काहीतरी विचारू पहायच्या, त्यांना बोलायचं असायचं, त्यामुळे हमखास थांबवून काही ना काही विचारायच्या. म्हणून नंतर  कंटाळून आम्ही त्यांच्यासमोर फोन वर बोलायचं आभास करत पुढे जायचो. तेव्हासुद्धा  त्या प्रसन्न डोळ्यांनी संवाद साधायच्या. त्यामुळेच का कोणास ठाऊक तो गोड आनंद त्यांच्याबरोबर वाटून घ्यावासा वाटला. 

मी जेव्हा एका छोट्या वाटीत तो शिरा घेऊन गेले तेव्हा त्यांना काय बोलू किती बोलू झालं होतं. तो संवाद आता काही आठवत नाही पण त्यांचे एक वाक्य मात्र आजही आठवतंय अग हे तर
आमचे जुने पदार्थ ,आजही करतात का हे? छान वाटलं हं बघूनच. नंतर त्या वाटीतून त्यांनी मला छान लाडू दिले आणि ती देवाणघेवाण मी तिथे राहत असेपर्यंत सुरूच राहिली. त्या समाधानी आज्जींना फक्त बोलण्याचं सुख हवं होतं.  आता त्या आजी पण नाहीत पण तरीही इतक्या वर्षानंतरही बटाट्याचा शिरा केला की आजीची आठवण आली नाही असे होत नाही. श्रवणयंत्राचा घर घर आवाज, थांबून थांबून त्यांचं बोलणं, आणि ,मग पाठीवरून फिरणारा त्यांचा मायेचा हात या सगळ्या गोड आठवणींमुळे माझा बटाट्याचा शिरा नेहमीच जास्त गोड होतो. 

मानसी होळेहोन्नुर