Sunday, September 4, 2016

प्राणप्रतिष्ठापना

लहानपणी त्याला घरी येणाऱ्या गणपतीचं खूप कौतुक असायचं. मूर्ती घ्यायला बाबांबरोबर जाताना, त्यांच्यासारखी टोपी त्याला हवी असायची. मग नेहेमीच्या काकांच्या दुकानात गेल्यावर याच रंगाचे धोतर घातलेला, त्याच रंगाचं कद घातलेला, गणपती हवा असायचा. नंतर नंतर कमळात बसलेला काय , पगडी घातलेला काय, अशा काही तरी त्याच्या अटी. दरवर्षी त्याच्याच आवडीचा गणपती यायचा, यायचा याचा त्याला कोण आनंद व्हायचा. एकदा तर त्याला संगणकासमोर बसलेला गणपती पूजेला म्हणून आणायचा होता, बाबांनी तेव्हा कशी तरी समजूत काढून त्याला तसे चित्र काढायला सांगितलं आणि मग पूजेच्या वेळी ते पण मांडलं. आपले आई वडील आपल्याला समजून घेतात याचा आनंद न सांगता येणारा होता. आमच्या घरी दहा दिवस बसतो म्हणून त्याला कोण अप्रूप होतं. त्या दहा दिवसात त्याचा सारा अभ्यास गणपतीच्या सोबतीनच व्हायचा. पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापणा करताना मी पण बाबांसारख धोतर नेसणार म्हणून तो हट्टान धोतर नेसवून घ्यायचा. मग ते सारे मंत्र भारल्यागत ऐकत राहायचा. बाबा पूजा करताना त्याला दुसरेच कोणी तरी भासायचे. घरात फुलांचा दरवळ आणि मोदकांचा वास भरलेला असायचा. त्यातलं जास्त काय आवडायचं हे तेव्हा सांगणं त्याला कधीच जमायचं नाही. आईनी गणेश चतुर्थीला केलेल्या मोदकांची चव वर्षभरात कधीही केलेल्या मोदकांना यायचीच नाही. आरती ची वेळ येता येता आई उकडलेल्या मोदकांच ताट घेऊन यायची तेव्हा त्याला आई बाबांना फक्त बघत राहावसं वाटायचं. हा क्षण कधीच संपू नये म्हणून तो मनात थांबवून ठेवायचा, पण मग आरतीच्या घंटेनी परत या जगात यायचा. सुखकर्ता दुःखहर्ता आरती १०*२  वेळा म्हणून म्हणून इतकी सवय झालेली असायची की अनंत चतुर्दशीच्या नंतर दोन चार दिवस तो एकटाच देवापाशी जाऊन आरती म्हणत राहायचा. १०, १२ वर्षांचा होईपर्यंत यात काहीच खंड नव्हता. दर वर्षी त्याच उत्साहानं गणपतीची वाट बघायचा, आरास काय करायची  याचा वर्षभर विचार करत बसायचा.
मग काही वर्ष हीच पोरं कॉलनीचा गणपती बसवायला लागली होती. dj ची गाणी लावून नाचायचा काळ अजून यायचा होता, त्यामुळे थोड्या फार लिंबू टिंबू स्पर्धा, गाणी, नाटक असलं काही तरी असायचं. पण एक जिवंत पणा आसमंतात भरून वाहायचा. जणू प्राण प्रतिष्ठा झालेल्या गणपतीच्या श्वासात साऱ्यांचे श्वास मिळून जायचे आणि खरंच सुख मिळायचं, दुःख विसरलं जायचं. गणपतीत जमा झालेल्या वर्गणी पेक्षा आरतीला येणारा प्रसाद जास्त असायचा. विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पा जातोय याचे दुःख असायचं पण आपणा दहा दिवस त्याला छान सांभाळल याचं समाधान जास्त असायचं, परत येणारच की हा पुढच्या वर्षी ही खात्री देखील असायची.
मग काय दहावी, बारावी, दुसऱ्या गावातलं कॉलेज, हॉस्टेल सगळी गणितंच बदलत चालली होती. घराचा गणपती त्याच डौलात बसायचा, पण त्याचा सोबती दुसरीकडे कुठे तरी असायचा. नवीन काही शिकता शिकता धारणाही बदलत होत्या. देव संकल्पनेपासून फारकत व्हायला सुरुवात झाली होती. शास्त्र प्रमाण तर देव  कल्पना, साऱ्या कल्पना खुळचट वाटायचं वयचं होतं ते. देवांचे अस्तित्व नाकारत असतानाही गणपती ला कुठेतरी तो शास्त्रा जवळ आणायचा प्रयत्न करायचा, त्याचे वाहन मूषक, तेच आपण संगणकवापरताना वापरतो, गणपती ६४ कलांचा अधिपती आणि ६४ म्हणजे २चा ६ वा वर्ग , किंवा कॉम्पुटर शास्त्रातही हा नंबर महत्वाचा समजला जातो, बुद्धिबळ हा देखील ६४ घरांचा खेळ आहे म्हणजे गणपती हा देव नसून ज्ञानाची संकल्पना आहे, तो घरीदारी सगळीकडे सांगत राहायचा.
मी देव मानत नाही, मी धर्म मानत नाही म्हणत मोदकांना मानत तो गणेश चतुर्थी मात्र साजरी करायचा. आयुष्यात कधी तरी जेव्हा आपल्या धारणा तपासाव्या लागतात तेव्हाही तो त्याच्या धारणांवर ठाम होता. गणपती देव म्हणून नको, मित्र म्हणून असेल तर चालेल.
त्यानी खो दिला तरी बाबांनी गणपती बसवणं सोडलं नव्हतं, मात्र आता त्यांच्या मदतीला त्यांचा नातू होता. त्याचाच मुलगा तो, वडिलांसारखाच  सारं काही कुतूहलानं बघत राहायचा. त्याला त्याचाच भूतकाळ असा समोर उभा राहिलेला दिसायचा. स्वतःच्या प्रतिमेला हसत तो एक मोदक जास्त घ्यायचा. एका वर्षी त्याच्या मुलानी हट्ट धरला, हातात मोबाईल धरलेला गणपती आणायचा, कुठेही शोधून तसा गणपती कुठे मिळेना तेव्हा, त्यानी मुलाच्याच खेळण्यातली प्ले डो घेतली, आणि त्याच्या मुलाला हवा तसा मोबाईल धरलेला गणपती तयार केला. तो गणपती करता करता त्यालाच जाणवलं, बाबा जेव्हा ते सारे मंत्र म्हणायचे, आणि आपल्याला खरंच वाटायचं की बाबा मूर्तीत प्राण घालतात, त्या क्षणी ते कोणी तरी वेगळेच वाटायचे, आपले वडील असे काही करू शकतात याचा एक अभिमान त्याला वाटायचा, आज जेव्हा तोच अभिमान त्याला त्याच्या मुलाच्या डोळ्यात दिसला तेव्हा त्याला जणू एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं.
देव मूर्तीत आहे, की माणसात आहे, धर्म मानावा की कल्पना म्हणावी या पलीकडे जाऊन आई वडिलांवरचा विश्वास ही काही तरी आयुष्य बदलवणारी धारणा असते, हे जेव्हा कळत तेव्हा आपल्याही नकळत आपल्या मनात जगण्याच्या इच्छेची प्राणप्रतिष्ठापना झालेली असते.   

5 comments: