Sunday, January 24, 2016

मासिक कथा

एकेक इमले जोडत जातात
नवी नवी स्वप्ने रचत जातात
पळे, घटिका सेकंद, मिनिट
काळाचे हिशोब सुरूच असतात
मग असे होईल, आणि आपण असे करू
मग त्यासाठी ती तयारी करू
सगळे काही घडत असते एका आपुर्तीसाठी
स्वप्नाचा ध्यास इतका मजबूत असतो
कि त्यासाठी त्याचाही अपघात घडवायचीही तयारी असते

मग कळते शक्य नाही स्वप्नपूर्ती
मग धडाधड कोसळतात सारे इमले,
उलगडून येते सारे अस्तर
फाटतात सारे विणलेले धागे
होतो कल्लोळ मूक हुंदक्यांचा
आणि वाहतो पाट रक्ताचा


स्त्राव होत राहतो निष्फलनिर्मितीचा

शून्य सहचर

सकाळ सुरु होते एका अनामिक स्पर्शाने
मी सहजच बदलते कूस, आणि सरकवते
हात स्पर्शाकडे
तेव्हा लागतो एक शून्य सहचर
डोळे आपोआप उघडले जातात
शोधत राहतात
नेहमीच्या आकृती
तेव्हा दिसतो एक शून्य सहचर
हलक्या सुरु होतात रोजच्या हालचाली
जुने संदर्भ घिरट्या घालतात सभोती
नवीन आठवणी वाट पाहतात समोर यायची
तेव्हा फक्त सापडतो एक शून्य सहचर
असूनही नसूनही असते एक चाहूल
जपलेली मिठी, सांडलेली दिठी,
विखुरलेले सुखासीन श्वास

शून्यातून उभे राहिलेले आपले सहचर 

Friday, January 22, 2016

सहोदरा

तुला कशी कळते रे माझी प्रत्येक धडधड
माझ्या प्रत्येक विचार कृतीच्याही आधी


कित्येक वेळा प्रश्न पडतो मला,
आधी मी काहीतरी वागते आणि मग
तू तेच मला सांगतोस का आधी तू विचार करतोस
आणि मग मी तशीच वागते


किती सारखे असत आपले वागणे
म्हणजे अगदी एकाच साच्यातून काढल्यासारखे
साचा असेल वेगळे पण गाभा तर एकाच आहे ना


कधी कधी  माझ्याही आधी येतो तुझा विचार,
माझ्या प्र्ताय्के कृतीला असत तुझे परिमाण,
त असतोच ना माझ्या पुढे प्रत्येकवेळी


सहोदरा, माझ्या सहोदरा,
भासतोस तू मला माझ्यामधेच,
आईच्या उदरात सोडला होतास
तू तुझा एक श्वास, जगण्याचा एक क्षण, मायेचे अस्तर
माझ्यासाठीच


आईचा गर्भ अजूनही भरलेला आहे
तुझ्या अस्तित्वाने,
आणि त्याच वातावरणात वाढले मी सहोदरा
तुझ्याशिवाय पण तुझ्याच वासात, सहवासात, गंधात, बंधात


श्वासांचे ठसे

तुझ्या एका शब्दाने फुलत जातो
फुलांचा मळा
आणि मग मी हरवून जाते
आपल्या जगात


एकेका पाकळी वर आपण लिहित
असतो एकेक आठवण
आणि सोडून देत असतो
इंद्रधनुच्या पल्याडच्या
चालता येणाऱ्या सुवासिक समुद्राकडे


शब्द हरवत जातात,
तेव्हा नजरा वेध घेतात
पापण्या मिटत च नाहीत,
तुझे माझे सारे गोठुन् जाते
त्या बाहुल्यांमधे


तुझा आवाज थांबतो
आणि सुळळ करून
येतात सारे शब्द, तुझी आठवण
माझा पाठलाग करत


मी अर्धवट शब्दात हरवलेली,
पूर्ण तुझ्यात गुंतलेली,
स्वतःला सोडवून घ्यायला


परत येते तुझ्या श्वांसांचे ठसे शोधत

अमृत पोळी

आजी असते तेव्हा असते पुरणपोळी,
आणि आता असते फ़क्त आठवण
खरपुस भजलेली, तुपात भिजलेली,
तोंडात घातल्याबरोबर विरघळणारी


तिच्या तोंडून ऐकलि,
वहीत लिहून घेतली,
जशीच्या तशी करून पाहिली
अगदी चिमुटभर सुद्धा फरक नाही,


खमंग झाली, चाँगली झाली,
आवडली पण ती चव् नाही
आजी समोर उभे राहून करून पाहिले
पण ती चव मिळाली नाही


सायीचे हसत,मेतकुटाच्या हातानि
तिने पाठीवर हात ठेवला
आणि म्हणाली बयो सोप्प आहे ग सगळे
फ़क्त त्यासाठी सोसाव्या लागतात
स्त्रीजात खुणावा , सुनेच्या कळा,
लेकिच्या वेणा
सगळे डाग, चटके, पडले हातावर
की आपोआप येते चव हाताला,
झाले मनावर आघात की
होते उतरते गोडी हातात


स्वतःला विसरून जगण्याची होते सवय
आणि मग जमत जातात एकेक पदार्थ


तोवर तोंडातल्या पुरणपोलीचे अमृत
उतरले असते जिव्हांग्रंवर
लागली असते समाधि
विरुन गेलेले असतात आजीचे शब्द,


मिळून जाईल तिला मोक्ष,
सफल होईल तिची तपश्चर्या
आणि मी करत राहीन तिच्यासारखी साधना
भाजत राहीन पोळ्या चव येईपर्यंत
जळत राहीन स्वाद येइपर्यंत,
स्त्रैत्वाच्या खुणा जमवत राहीन
कध्धितरि नातीला अमृतपोळी खायला घालेपर्यंत

अनंताच्या पलीकडे

तू असा समोर असतोस,
एक टक बघत असतोस,
शोधत असतोस दिसतय का कुठे
आपले जग,


मग तुला घेऊन मी बुडी मारते
माझ्याच डोळ्यात


आणि मग 17 जन्म,
15 युगे लोटून आपण
जातो एका वेगळ्याच जाग्गात


तिथे सुरर्कन मासे आणून देतात मोती,
तुझे माझे नाव असलेले,
आणि झाडे आपल्या मागे येतात सावली धरून


तुझी मिठी कधी सैल पडायचीच नाही,
तुझे ओठ कधी ओठातून निसटायचेच नाहीत,


जगण्यासाठी पुरेसे होते एकमेकांचे श्वास,
स्वर्गाचे होते तिथे आभास,


तिथे थांबत होता काळ,
सरकतच नव्हती वेळ


सावल्याना तिथे जागा मिळत नव्हती म्हणून
त्या ही घुटमळत होत्या आपल्याच डोळ्यात
निळ्या पाण्याच्या काठावर्
सोनेरी रेतीवर थांबला होता सूर्य
मावळतीच्या वळणा वर
आणि चंद्र डोकावत होता पापणीच्या
टोकावर


किती काळ होतो तिथे तुलाच ठाऊक
लवली कोणाची तरी पापणी
आणि बुडले जग आपले


जेव्हा परत सापड़तील आपल्या
सावल्याना त्यांचे रंग तेव्हा परत
मिळेल आपल्याला आपले जग

Sunday, March 13, 2011

पुस्तकाचा कोपरा : उत्तम- मध्यम

लेखनातील दैवी मध्यम
मानसी होळेहोनूर - रविवार १३ मार्च २०११
शास्त्रीय संगीतात सात स्वर मानलेले आहेत. त्यातला मध्यम हा फक्त नावाने नव्हे तर खरोखर मधला स्वर. बरं नुसताच मधला नव्हे तर जरा हटकेदेखील. म्हणजे इतर स्वर शुद्ध तरी राहतील किंवा स्वत:चे स्थान सोडून खाली तरी उतरतील पण हा एकमेव स्वर स्वत:पेक्षाही मोठा होणारा, अगदी तसेच काहीसे म्हणता येईल. श्री. बा. जोशींच्या ‘उत्तम- मध्यम या पुस्तकाबद्दल!
एक व्यासंगी वाचक, संग्राहक म्हणून श्री. बा. प्रसिद्ध आहेतच, पण वृत्तपत्रांमधील विविध सदरांमधून त्यांनी ही ‘गंगाजळी’ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. गंगाजळीचे चारही भाग सुज्ञ वाचकांच्या ग्रंथसंग्रहात कधीच जाऊन बसले आहेत, त्याच परंपरेचा वारसा सांगणारं श्रीबांचं पुढचं पुस्तक आहे. ‘उत्तम- मध्यम’. वस्तुत: १९८८ साली श्री.बांनी केलेल्या स्फुटलेखनाचे हे संपादित रूप. पण लेखकाच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘उपवर मोठय़ा मुलीच्या आधी धाकटीचं लगीन जुळून यावं असा सुयोग कधीकधी अनुभवास येतो. तसेच काहीसे या थोरल्या लेकीला उजवण्याबाबत घडून आले. कनिष्ठ ‘गंगाजळीचे’ शुभमंगल अगोदर झाले आणि नंतर ज्येष्ठा ‘मध्यमा’ बोहल्यावर चढली. श्री.बां.चा हा मिस्कीलपणा पूर्ण पुस्तकभर जाणवत राहतो.
पाश्चिमात्य चित्रपटांचे, दूरवाहिनीवरील मालिकांचे भारतीयीकरण हे सध्याचे चलनी नाणे आहे. पण २२ वर्षांपूर्वी श्री.बां.नी लंडन टाइम्समधल्या ‘थर्ड लिडर्स’ च्या धर्तीवर वर्षभर ‘मध्यम’ हे सदर लिहिले होते. जडभारी समस्यांचे विवेचन करणाऱ्या आणि भारदस्त भाषेत रखडलेल्या दोन अग्रलेखांचा भार हलका करण्याचे काम हे ‘थर्ड लीडर्स’ करत असत. नंतर यथावकाश ‘थर्ड लीडर्स’ ‘फोटो लीडर्स’ झाले. या दोन्हीचे संग्रह वाचनात आल्यावर नकळत त्यांच्या प्रेरणेने, त्याच्या धर्तीवर ‘मध्यम’ हे सदर लिहिले गेले. श्री. बा. जोशी त्या काळी कलकत्त्यामध्ये वास्तव्यास होते. पण हे सदर मात्र त्यांनी ‘मधुमंत’ या टोपणनावाने लिहिले होते आणि कोण हा मधुमंत यावर त्या काळी वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. वेगवेगळे तर्क, वितर्कही लढवले जात होते.
एखाद्या विशिष्ट तारखेच्या निमित्ताने, एखाद्या पुरस्काराच्या निमित्ताने कधी किंवा कधी कुठल्याही कारणाशिवाय लिहिलेले असे स्फुट लेख या संग्रहात आहेत. कधी एखाद्या वाचलेल्या लेखाच्या पुस्तकाच्या निमित्ताने श्री. बा. वाचकांना लंडनच्या लायब्ररीत फिरवून आणतात तर कधी टीकेचे, उपेक्षेचे धनी झालेल्या शेवटच्या बाजीरावांबद्दल रोचक माहिती देतात. कधी टिनटिन या जगभर गाजलेल्या कॉमिक्सबद्दल लिहून बालसाहित्य हे फक्त काळापुरते मर्यादित नसते किंवा कॉमिक्ससुद्धा अभ्यासपूर्वक लिहिली जातात हेही त्यानिमित्ताने ते सांगून जातात. एका लेखामध्ये ग्रंथ, ग्रंथसंग्राहक आणि गृहिणी या व्यस्त त्रराशिकाबद्दल सांगताना देशविदेशातल्या अट्टल ग्रंथसंग्राहकांबद्दल सांगून जातात, तर कधी मराठी लोकांच्या विस्मरणात गेलेल्या, पण  मराठीच असलेल्या पं. केशवराम भट्ट, तुलसीसाहेब, बापूदेव म्हणजेच एन. नृसिंग सीताराम परांजपे यांबद्दल लिहून या विस्मृतीत गेलेल्यांचा यथोचित सन्मान करतात. वस्तुत: या पुस्तकातील स्फुट लेख, त्या लेखांवरून झडलेल्या पत्रांच्या फैरी हे एका स्वतंत्र लेखाचे विषय होऊ शकतील.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सु. रा. चुनेकर म्हणतात, त्याप्रमाणे ज्ञानकोश आणि शब्दकोश यांच्यामधला हा एक वेगळाच प्रकार आहे. पण हे पुस्तक वाचत असताना प्रत्येक वाक्यागणिक आपल्याला जाणवत राहते श्री. बां. ची माहिती आणि पुस्तकांची श्रीमंती. त्याचबरोबर  आपण किती खुजे आहोत, हेही लक्षात येत राहते. स्वत: लेखकाला मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच गुजराथी, बंगालीदेखील अवगत असल्या कारणामुळे त्या त्या भाषेतील संदर्भही सहजगत्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याचबरोबर लक्षात राहते ती श्री. बां. ची ज्ञानशूरता. श्री. बां. मधले परीसत्व, त्यांच्या स्पर्शामुळे दगडाचे सोन्यात रुपांतर होते आणि आपल्याला ‘घरबसल्या’ या सोन्याचा उपभोग घेता येतो. ज्ञानाचा अहंकार बाळगणारे, मिरवणारे अनेकजण असतात पण इतक्या सहजतेने ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या श्री. बां. ना ‘ग्रंथोपजीवी’ हे विशेषण शोभून दिसते.
खरे तर १९८८ हे स्फुटलेखन, पण त्याला वाचकांपर्यंत पोहोचायला उजाडले २०१० साल. जसे माणसांच्या पत्रिकेत ‘उशिरा भाग्योदय’, किंवा ‘कष्टाचे फळ मिळेल पण काही काळाने’ असे लिहिलेले असते, त्याप्रमाणे पुस्तकांची कुंडली मांडायची ठरवली तर ‘उत्तम मध्यम’बद्दल सर्व गुण उत्तम पण तरीही भाग्योदय उशिरा असेच म्हणावे लागेल. ‘मध्यम’ नावाच्या सदराचे पुस्तक येताना ‘उत्तम मध्यम’ झाले; पण तेही एक प्रकारे उत्तमच म्हटले पाहिजे. अनेक लेखांवरील आक्षेप किंवा भलामण करणारी अनेक पत्रे शेवटी छापली आहेत. ती वाचतानाच कळू शकतं या सदराने त्याकाळी वृत्तपत्रसृष्टीतच नव्हे तर जाणकार लेखक वाचकांमध्ये किती धुरळा उडवला होता. पद्मगंधा प्रकाशनच्या अरुण जाखडेंनी केवळ लेखच न छापता ही पत्रेसुद्धा छापून एकप्रकारे श्री. बां.चे, त्यांच्या लेखनाचे ‘मोठेपण’च नीटपणे पोचवले आहे.
गाण्यामध्ये स्वर्गीय, दैवी असा मध्यम लागणे हा साक्षात्कार समजला जातो, अनेकजण या साक्षात्काराचे साक्षीदार झाले असतील. परंतु असा दैव मध्यम लेखनातही लागू शकतो याचा प्रत्यय हे पुस्तक देते.