Friday, October 7, 2016

हळवा हिरवा

मस्त मनासारखी हिरवी गर्द इरकल  साडी नेसून गळ्यात सासू बाईंनी खास घालायला दिलेली मोहनमाळ, आईनी दिलेली ठुशी, इकडच्या स्वारीनी आणलेली नथ, मनसोक्त घातलेलं गजरे, कपाळावर लावलेली चंद्रकोर, कानात सोन्याची कुडी  कशी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती ती. कौतुकाच्या सोहळ्यात ती तर अगदी गुंगून गेली होती. त्या क्षणी जगातली सर्वात सुखी स्त्री तीच होती. सजवलेल्या झोपाळ्यावर बसून परडी भरवून घेताना तिला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं होतं. हलकेच पोटात होणाऱ्या गुदगुल्यांनी चेहऱ्यावरचं तेज अजूनच वाढत होतं. हातात परडी घेऊन जेव्हा ती टवरलेल्या पोटानी ओटी भरायला बसली होती तेव्हा एखाद्या देवीचं तेजच तिच्या चेहऱ्यावर होतं. नवव्या महिन्यातली भरल्या दिवसांची गर्भारशी ही एक वेगळीच स्त्री असते. ओटी भरायला आलेल्या प्रत्येकिनी आईला, सासूला तिची दृष्ट काढायला सांगितली होती.  

तशी ती सुखीच होती, बाकीच्या मैत्रिणीसारखा तिला सासुरवास काही खास नव्हता, अगदी सासुरवास म्हणावा असं काहीच नव्हत. सासरी कोणी मुलगीच नव्हती त्यामुळे मुलीशी कसं वागायचं ते सासूबाई सोडून कोणाला माहीतच नव्हतं, त्यामुळे लाड ही भरपूर झाले आणि कुचंबणाही बऱ्याच वेळा झाल्या. पण सगळं तसं चांगलच होतं. मग त्यात हे सुख दाराशी आलं, दिवस गेले हे कळल्यापासून तर घरीदारी निव्वळ कौतुक सोहळाच होता. मागच्या दोन पिढ्यात कोणी मुलगीच नव्हती आणि सासूबाईच्या लग्नाआधीच त्यांची सासू गेली होती त्यामुळे सासूचे डोहाळे जेवण काही झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी सुनेच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. स्त्री मुळातच हौशी असते, त्यात संसाराला फुटणाऱ्या नव्या पालवीचे कौतुक करण्यात कोणत्याही नात्याचे अडसर येत नाहीत. पहिलेपणा असेल तर साऱ्या कुरबुरी , हेवे दावे देखील विसरले जातात. कोंबाला फुटणारी कोवळी पानं मातीतून जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा तो हिरवा रंग आयुष्यातल्या संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा देत असतो.

डोहळेजेवणाचा सगळा सोहळा संपून दुसरा दिवस सुरु होण्याच्या आधीच तिला कळा सुरु झाल्या, आणि सुरु झाला एका नव्या जीवाच्या जन्माचा सोहळा. पण ते बाळ रडलंच नाही आणि त्यामुळे नंतर सारे रडले. ते बाळ रडलं असतं तरी सारं घरदार त्याला शांत करायला धावलं असतं पण काही क्षणासाठी देखील ते बाळ रडलंच नाही आणि जीवनाच्या सोहळ्याला मुकलं. मग सारे तिचं रडणं थांबवायला धावले. पहिल्या गोष्टीचं अप्रूप जास्त असतं, इथं तर पहिलं मातृत्वचं गळून पडलं होतं. नंतर सुद्धा कित्येक दिवस तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. नंतर काही महिन्यानंतर निसर्गधर्मानी त्याचं काम चोख केलं होतं, दुसरा डाव तिच्या ओटीत पडला होता. पण यावेळी सासुबाईनी सारी सूत्र हातात घेऊन पाच महिन्यापर्यंत कोणालाच कळू दिलं नव्हतं. दुसऱ्या डोहाळेजेवणाची पद्धत नसल्यामुळे यावेळी ते ही करण्याचा प्रश्न नव्हता. घरीच ओटी भरताना त्यांनी सक्त ताकीद दिली होती, हिरव्या रंगाची साडी, चोळी काहीच नको. यावेळी मातृत्व, नशीब जे काही असेल ते बलवत्तर होतं, त्यामुळे मूल रडलं आणि सारं घरदार हसलं.  त्यानंतर घरात अजून दोन मुलं आणि शेवटी घरपण पूर्ण करणारी मुलगी देखील झाली. पण सासुबाईनी तिची ती हिरवी इरकल आतच ठेवून दिली, आणि सक्त हुकुम दिला, यापुढे या घरात ना मुलीचं, ना सुनेचं डोहाळेजेवण होणार. हिरवी साडी कोणीही विकत घेणार नाही, आली तर नऊ महिने कोणीही घालणार नाही. प्रत्येक वेळी विषाची परीक्षा घ्यायची गरज नसते, आधीच्यांनी घेतलेल्या परीक्षेतून आपण शिकायचं असतं.

ती हिरवी रेशमी इरकल कपाटातून काही काळ उन खाण्यासाठी तेवढी बाहेर याची, त्याच्यासोबत जागायच्या तिच्या आठवणी. मुलं मोठी झाली, सुना आल्या, लेकही लग्नकरून  तिच्या घरी गेली पण घरात हिरवी साडी, कापड कधी घेतलं नाही. मुलांना मुलं झाली पण डोहाळेजेवण नाही झालं, मुलीच्या वेळीस तिला लेकीचा कौतुक करावं खूप आतून वाटलं, पण तिच्याबरोबर जे काही झालं ते आठवून ती शांतच बसली. नंतर कधीतरी तिनी ती हिरवी साडीच लेकीला देऊन टाकली, नकोच ती साडी घरात, नकोच त्या आठवणी आणि आतून एक खोटं समाधान आपण लेकीला हिरवी साडी देऊन तिची ओटी भरल्याचं. लेकीनीही आई आजीचा मान ठेवत ती साडी तशीच कपाटात ठेवली होती. आईसारखं ती देखील कधीतरी ती साडी उन्ह दाखवायला बाहेर काढायची, आणि न जगलेल्या भावासाठी भावूक व्हायची आणि ती साडी परत आत ठेवून द्यायची. चांगल्या रेशमी साड्यांना कधीही मरण नसतं. त्या विस्मृतीत जातात, विरतात पण मरत नाहीत. आजीची साडी नातीपर्यंत प्रवास करून आली होती. तशीही ती साडी नेसली गेली होती एकदाच, तिच्यावरचं हळदी कुंकू तसाच होतं, अगदी ५०,५५ वर्षानंतरही त्या नऊवारी साडीची शान टिकून होती.


नातीनं हट्ट केला मी माझ्या डोहाळजेवणाला नेसणार तर हीच साडी. आईनी परोपरीनं विनवलं नको पण ती नव्या काळाची बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखव मताची. तिनी हट्टानी तीच साडी अगदी आजी सारखीच नेसली, चार ठसठशीत दागिने घातले, तशीच चंद्रकोर लावली, नाकात नथ घातली, अंबाडा बांधून त्यावर वेण्या गुंफल्या. अगदी बघत राहावंसं वाटत होतं, आईनं डोळ्यात काजळ भरताना मुद्दाम विस्कटवलं होतं, आणि एक मोठा काळा ठिपका मानेवर ही ठेवला होता. सगळा सोहळा कौतुकात न्हाहून निघत होता. आजीच्या साडीनी जणू समारंभ जिंकून घेतला होता. तिला मात्र ते आजीचे आशीर्वाद वाटत होते. तिला खात्री होती, कोणत्याही रंगात उद्ध्वस्त करण्याची ताकद नसते, आणि त्यातही हिरव्या रंगात तर शक्यच नाही. सृष्टीतला सगळ्यात अभिजात रंग वाटायचा तिला हिरवा! साऱ्या सृष्टीच्या सृजनाचा रंग. त्यामुळेच नव्या जन्माचा सोहळा साजरा करताना मुद्दाम हा रंग निवडला असणार, अन कधी तरी आपण एखादा प्रसंग त्या रंगाशी जोडतो आणी त्या रंगाशी कायमची कट्टी, किंवा बट्टी करून टाकतो. लेकीची नीट सुटका होऊन बाळ रडेपर्यंत आईच्या जीवात जीव नव्हता. पण यावेळी हिरव्या रंगानी त्याचं निरागसत्व सिद्ध केलं. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते, तेव्हा ती साडी हातात घेऊन नवीन आजी तिच्या आईच्या आठवणीनं रडली. तिच्या आईचं अस्तित्व अजूनही त्या साडीत होतं, एकदाच अंगाला लागलेल्या त्या हिरव्या साडीत तिला आई परत भेटत होती. त्या नऊवारीची सहावारी करून तिनी उरलेल्या कापडाची हौशीनं दुपटी केली आणि त्या बाळाला पणजीच्या प्रेमात घट्ट लपेटून घेतलं...!!!!!!!!!!!!!!    

Thursday, October 6, 2016

कथा एका रंगाची...

तिला कायम प्रश्न पडायचा आपल्या आईला माहेर कसं नाही. लहानपणी मामाच्या गावाला जाऊ या हे गाणं ऐकताना तिनी विचारलं होतं, आई माझ्या मामाचं गाव कोणतं? आई काहीच बोलली नव्हती पण तिच्या डोळ्यातला लपलेला अश्रू मात्र तिला आज इतक्या वर्षानंतरही आठवतो. मग कधी तरी एका निबंधात तिनी मला मामा नाहीत आणि माझ्या आईला माहेर नाही असं लिहिलं होतं, तेव्हा बसवून आईनी सांगितलं होतं की तिला पण माहेर आहे, तिलाही भाऊ बहिण आहेत फक्त ते सारे आता दुरावलेत, परत असं कधी लिहू पण नकोस आणि त्या बद्दल विचारू पण नकोस, मला जेव्हा वाटेल की तुला सगळं समजेल तेव्हा मी स्वतःच तुला सांगेन.

बाकीच्या मुलांसारखे आपल्या घरी जास्त नातेवाईक येत नाहीत, क्वचित कधी आले तर वडिलांचेच, बाकी घरी जास्त राबता असायचा मित्र मैत्रीणींचाच, हे जेव्हा तिला आणि तिच्या भावाला लक्षात यायला लागलं तेव्हा ही ते गप्प राहिले होते, कारण त्यांचे आई बाबा बाकीच्या आई बाबांसारखे नव्हतेच. घरात कोणाला कोणाचीही चूक दाखवायचा हक्क होता, लहान मोठे पणा प्रत्येक गोष्टींबाबत केला जात नव्हता. आई बाबाला नावानी हाक मारत होती, आई वर मंगळसूत्र घालायची सक्ती नव्हती, बाबानीच किती तरी वेळा त्यांना अंघोळी घातल्या होत्या, आणि हो आईपेक्षा तोच स्वैपाक चांगला करायचा. आई साड्या, पंजाबी ड्रेस घालायची पण चुकूनही कधी आईकडे पिवळ्या रंगाचे काही नसायचं.

मग आता मुलांना समजेल असं जेव्हा आईला वाटलं तेव्हा आईनी सांगितलं होतं, तिचा आणि बाबाचा प्रेम विवाह होता. दोघांच्याही घरून विरोध होता, पण बाबानी स्पष्टच सांगितलं होतं, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर तुम्ही अंतर ठेवू शकता, पण बाबाची आर्थिक मदत त्या घराला हवी असल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष अंतर ठेवलं होतं, आईचे मात्र माहेर या लग्नामुळे पूर्णच तुटलं होतं. दोन भावांची लाडकी बहिण होती ती, वडिलांची सगळ्यात लाडकी लेक होती, तिच्या दोन बहिणीपेक्षा हिला कायम प्रत्येक गोष्टीत झुकतं माप मिळायचं, त्यामानाने श्रीमंतीतच वाढली होती, आणि कॉलेज मध्ये बाबा भेटला आणि त्याच्या प्रेमात पडली, प्रेमात पडताना जात, श्रीमंती थोडीच बघितली जाते. तिला वाटलं होतं, तिचे पारंपारिक बाबा तिच्यासाठी बदलतील, पण तिच्या एका निर्णयानी तिचं आयुष्य बदललं पण बाबा नाही बदलले.

लग्नात पिवळी साडी मामा कडून येते, पण तिच्या आई बाबांच्या लग्नात असल्या साऱ्या प्रथा पाळायला कोणीच नव्हतं, तिच्या हट्टाखातर त्याचा विश्वास नसतानाही त्यानी विधी केले होते, पण तेव्हाही त्यांचे काही मित्र मैत्रिणी त्याची आई , आणि लग्न लावणारे गुरुजी इतकेच लोक होते. मग आयुष्यभर आई बाबांची आठवण म्हणून अग्नी सारखाच धगधगता जिवंत असा पिवळा रंग नेसायाचाच तिनी सोडला. आई वडिलांची आठवण विसरली जात नाही पण तरीही आपण आपल्या आनंदासाठी त्यांना दुखावलं याची बोच सलत राहावी म्हणून तिनी स्वतःलाच शिक्षा दिली होती. आईला तिच्या निर्णयाचा कधी पश्चाताप बाबानी होऊ दिला नव्हता पण तरीही एक घर आपल्यामुळे तुटलं याचा त्यालाही त्रास व्हायचा.

तिचं लग्न तिनीच ठरवलं होतं, समाज २०,२५ वर्ष पुढे गेला होता, घरातून विरोधाची शक्यता नव्हतीच बाहेरून कुठून पण तिला फारसे काही ऐकावं लागलं नव्हतं. त्याच्या घरून फक्त एकच अट होती लग्न विधीवत झालं पाहिजे. आपल्याला पटत नाही म्हणून कोणावर आपलं म्हणणं लादणं तिच्या घरी कोणालाच मान्य नव्हतं, त्यामुळे तिच्या बाबानी याहीवेळी माघार घेतली. बायकोला जो त्रास झाला तो लेकीला होऊ नये म्हणून ते जपत होते. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. आपण लग्नाला पिवळ्या साडीत उभ्या राहू तेव्हा आईच्या जखमेवरची खपली निघेल असं तिला वाटता होतं, तर आईनी एका मानलेल्या भावाला सांगूनही ठेवलं होतं, लेकीला पिवळ्या साडी घेण्यासाठी, आपल्याला जे मिळालं नाही ते लेकीला मिळावं म्हणून.
तिनी जुनं पानं शोधून काढून मामाचा पत्ता मिळवला, मग काहीतरी कारण सांगून त्या गावाला गेली, आणि दत्त म्हणून दारात उभी राहिली. काळ सगळ्या जखमा भरून काढतो, इथं तर व्याज आजीच्या समोर उभं राहिलं होतं. सारं काही विसरायला सगळे तयार होते फक्त प्रश्न होता पुढच्या पावलाचा, जे तिनी तिच्या आईसाठी उचललं होतं. आजोबादेखील मावळले होते. लेकीला भेटायला उत्सुक होते, तिच्या नावाने सोडलेलं तर्पण विसरले होते. मामांच्या घराचा पहिला पाहुणचार घेवून ती तिच्या घरी गेली ती मामाला घरी गेली. आई तर किती तरी वेळ निःशब्द दारातच उभी होती. तिला सुचतच नव्हतं काय बोलावं. ओळख पटली होती पण सुरुवात कुठून करावी हेच माहित नव्हतं.

मग तिच्या लग्नासाठी म्हणून दोन पिवळ्या रंगाच्या साड्या घरात आल्या. आईचा मामा नव्हता पण माहेरची साडी तिनी घेतली आणि त्या धगधगत्या पिवळ्या रंगात तिला सोन्याचं झळाळत सुख मिळालं. बोहोल्यावर जेव्हा ती पिवळ्या साडीत उभी होती तेव्हा तिची आई देखील पिवळ्या साडीत दिमाखात तिच्या आईचा हात हातात धरून उभी होती. एका लग्नात सारं तुटलं होतं, तर दुसऱ्या लग्नात सारं जुळून येत होतं. आयुष्यभर पिवळ्या रंगाची धग आईनी डोळ्यांनी अनुभवली होती, आता पिवळ्या रंगाची उब अंगावर अनुभवत होती.


जाळणारा देखील पिवळा रंगच असतो, आणि सृष्टीचा रथ हाकणाऱ्या सूर्याचा रंग देखील पिवळाच, झळाळणाऱ्या सोन्याचा रंगही पिवळा, पिकल्या गळणाऱ्या पानाचा रंगही पिवळा, हळद ही इवली, डाळही पिवळी, सुर्यफुलही पिवळ, मोहरीचं फुलही पिवळ , पिवळ्या रंगाच्या छटांनी व्यापून राहिलंय आपलं आयुष्य. प्रत्येकीच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सोनेरी होवो असं सांगणारा पिवळा.... !!!!!!!!!!!!!! 

Wednesday, October 5, 2016

निळवाणी

आकाशापासून ते पाण्यापर्यंत व्यापून राहिलेला निळा रंग म्हणजे जगनरंग. डोळ्यांना एक सुखद जाणीव करून देणारा निळा रंग. त्याच्या छटा त्या किती. प्रत्येक निळा दुसऱ्यापेक्षा वेगळा. प्राचीन काळापासून माणसांना सोबत करत आलाय हा रंग... इतका उतरलाय हा रंग जनामनात की कृष्णाला, रामाला देखील रंगलेत निळाईत. सायंकाळ झुकता झुकता घेऊन येणारा निळा रंग, पहाटेला सोबत करणारा निळा रंग, आकाशाच्या अधे मध्ये डोकावणारा निळा रंग, शब्दांना रंगवणारा शाई निळा, मोरापिसातला निळयाचा पसारा सौंदर्य भरून वाहणारा निळा रंग.
निळ्या रंगावर मी बापुडी काय बोलणार, आज केवळ निळ्या रंगाच्या सुरेख कविता...

निळीये मंडळी निळवर्ण सावळी
तेथे वेधलीसे बाळी ध्यानरुपा!
वेधू वेधला निळा पाहे घन निळा
विरहिणी केवळ रंग रसने!
निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ
वेधे वेधू न लाभे वैकुंठीचा!
ज्ञानदेव निळी हृदयी सावळी
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत!
ज्ञानेश्वर

आज ही ज्ञानदेवांच्या शब्दांमधली जादू कमी झालेली नाही.

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनीळातला एक गोड राजबिंड निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा,

असे नानागुणी निळे किती सांगू त्याचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे,
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग!!
बा भ बोरकर

बोरकर इतक्या सहजतेनं आयुष्यातला निळा रंग समोर आणतात की परत एकदा त्यांच्या कवितेच्या आणि निळ्या रंगाच्या प्रेमात पडतो आपण. त्या निळ्या शब्दांच्या जादूतून बाहेर पडता पडता ग्रेसचे हे शब्द भूल घालतात.

असे रंग आणि ढगांच्या किनारीनिळे उन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचेकिती अर्ध्य देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा?
निळे गार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले
निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी
किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे
प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे....
ग्रेस   

आज सर्वव्यापी निळा रंग जाणीव करून देतो एकाच आभाळाखाली अथांग पसरलेल्या पाण्यासारख्या प्रवाही आयुष्याची.. आयुष्य चालतच असतं, ते काही थांबत नसत, त्यात सोबत करायला सारे भाव, रंग, शब्द असतातच. त्याच शब्दांचे प्रतिबिंब म्हणजे या कविता.

तुमच्याही काही आवडत्या निळ्या रंगात न्हाहिलेल्या कविता असतील तर नक्की टाका प्रतिक्रियेत. 

Tuesday, October 4, 2016

ये लाल रंग कब मुझे छोडेगा.....

मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी काही दिवसांची आणि ती खूप साऱ्या वर्षांची होती. तिचं नाव काढल्याबरोबर आमच्या घरात सारे जण जरा सावरूनच बसायचे. तिचा दबाबा म्हणा, आदर म्हणा किंवा भीती म्हणा पण आजोबांपासून ते माझ्यापर्यंत सारेच काहीही बोलताना, वागताना दोन सेकंद विचार करायचे आणि मगच वागायचे. तिच्यामुळे घर सांधल गेलं होतं. तिच्यात आणि माझ्यात तब्बल दोन पिढ्यांचं अंतर होतं. ती गेली तेव्हा मी काही वर्षांची होते, पण तरीही तिची ती लाल साडीतली पिटुकली मूर्ती डोळ्यातून काही हलत नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती १०,१२ वर्षाची होती, त्या काळात त्याच वयात तर व्हायची तर लग्न. तिचं नशीब चांगलं म्हणून तिला वैद्यकीय शिक्षण घेणारा नवरा मिळाला होता. एका छोट्याशा गावात ती आपलं काचापाणी खेळण्यात, शेगडीवर स्वैपाक शिकण्यात, सोवळ ओवळ शिकत असताना साथीच्या तापाचं निमित्त झालं आणि तिच्या कुंकवाचा धनी अचानक गेला. लग्नात फक्त त्याला बघितलं होतं, आणि न्हाण झाल्यावर एक दोन वर्ष सासरी काढली तेवढाच काय संसाराशी तिचा संबंध आलेला. पहिल्यांदा तिचं केशवपन केलं तेव्हा ती १६ वर्षांचीच होती. आज आत्ता हे लिहिताना देखील माझे हात थरथराताहेत आणि तिनी तर आयुष्यभरासाठी लाल साडी जवळ केली होती.

ती खरं तर माझ्या आजोबांची आत्या, पण तिला भविष्यात कोण बघणार म्हणून मग आजोबा तिला दत्तक गेले आणि तिचा भविष्यकाळ सुरक्षित झाला. समाजात स्थान मिळवण्यासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी आता तिला आधार होता तिच्या सोवळेपणाचाच. शक्य तेवढे उपवास, देवाचं भजन कीर्तन, कमीत कमी जेवण, तीर्थटन( ते ही स्वतःच्याच शिध्यासह , किंवा देवळांमध्ये जेवायच्या सोयीवर ), केशवपन आणि लाल आलवण तर जगण्याचाच एक भाग होता तिच्या. काळ बदलला तरी तिनी बदलणं शक्य नव्हत कारण तिच्या आयुष्यात काही बदल घडणं शक्यच नव्हतं, तो पर्याय जणू तिच्यावरच्या संस्कारांनी कधीच संपवला होता.

निर्जळी एकादशी करणं चातुर्मासाचे नेम पाळणं, नवनवीन भजनं गाणी म्हणणं हाच त्यांच्या आयुष्याचा परिक्रम होता. साधं सात्विक खाताना, आपली साधनशुचिता आजूबाजूच्या साऱ्यांवर लादणं ह्यात त्यांना कधीच काही गैर वाटलं नाही. मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यांना मिळू नये असा भाव नव्हता त्यात तर हे असंच जगायचं असतं अशी त्यांची ठाम धारणा होती. या मानलेल्या मुलाचा संसार त्यांनी त्यांचा मानला होता. त्यामुळे त्या संसारासाठी शक्य होईल तेवढी मदतही त्यांनी केली होती, त्यामुळे आश्रिताचं जीवन त्यांच्या नशिबी आलं नव्हतं. त्यांच्या त्या कष्टाची जाण घरातल्या मुलांनीच नव्हे तर घरात येणाऱ्या सुनांनीदेखील ठेवली होती. कुरबुरी थोड्या अनिच्छेनेच पण घरात पणजी असेपर्यंत तिचे सोवळेओवळे, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी घरात पाळल्या जात होत्या. त्या बरोबर होत्या कि नव्हत्या या पेक्षाही त्या सवयी, प्रथा पाळल्या तर पणजीला आनंद होतो म्हणून पाळल्या जायच्या. तेवढा मान तिनी तिच्या त्या लाल अलावण मधून कमावला होता.

आज सांगून खऱ्या वाटणार नाही अशा लाल साडीतल्या बायकांच्याबद्दल मी नंतर कन्नड साहित्यिक अनंतमूर्थी, भैरप्पा यांच्या पुस्तकांमधून वाचलं. तेव्हापासून तो लाल रंग डोक्यातून जाताच नाही. आजही जेव्हा जेव्हा पणजी आजीची जपून ठेवलेली लाल साडी हातात धरते तेव्हा तिचे न सांडलेले अश्रू मला हाताला लागतात. न जगलेल्या आयुष्याचे खरखरीत स्पर्श अंगावर काटा उभा करतात, अपूर्ण इच्छा आकांक्षाचे कढ हाताला लागतात, मारलेल्या मनाचे ओरखडे कुठे कुठे बोचतात. समाजाने भाग पाडायला लावलेल्या या सक्तीच्या आयुष्याची बोचही कुठे कधी जाणवते. पण तरी या सगळ्याला पुरून उरलेलं समाधान मायेच्या उबेनी बाकी सारं झाकून टाकत!


मला लाल रंग कधी मनापासून भावला नाही कारण माझ्या आजूबाजूचा हा लाल रंग मला कायम आठवण करून देतो अशा आयुष्यांची. खरं तर लाल रंग हा उत्तर भारतात अतिशय शुभ मानतात, नव्या जीवनाची सुरुवात समजला जातो. पण याच लाल रंगात आयुष्य संपवणाऱ्या अनेक विधवा, सधवांसाठी आजचा लाल रंग.....!!!!!!!!!!!!   

Monday, October 3, 2016

शांत निवांत शुभ्रांत...

तिनी१८ व्या महिन्यात आईची मांडी सोडून दिली नुकत्याच जन्मलेल्या भावासाठी , ती होती तिची पहिली तडजोड, मग हातातले खेळणं, चॉकलेट, पेढा, गाडीवर पुढे उभं राहायचा हक्क, कोणत्याही खेळण्यात जिंकण्याचा आनंद, असे छोटे मोठे प्रसंग ती घडवत गेली, प्रत्येक वेळी तिच्या पदरी पडायचं मोठे पणाचं आणि तडजोडीचं मापटं. ताई तू मोठी आहेस ना, मग दे ना सोडून. अग त्याला नाही कळत म्हणून तू दे सोडून. जणू मोठं होणं म्हणजे तिच्यासाठी थोडे थोडे सगळं सोडून देणं शिकणं होतं. मग त्या सगळ्याची इतकी सवय झाली की तिला सोडून देणं म्हणजेच जगणं वाटायला लागलं.

मोठेपणाच्या रस्त्यात कधी तरी तो भेटला. शाळेत , कॉलेजात समोरच वाटेवरच असायचा. पण स्वतःहून काही मागायचं, पाहायचं माहीत नसल्यानं तिच्या लेखी त्याचं अस्तित्व शून्य होतं. तो मात्र सावलीसारखा फिरायचा, त्याची काही अपेक्षा नव्हती, तिला बघायला मिळालं की त्याला छान वाटायचं.  ते वयच असं होतं की कोणावर तरी जीव ओवाळून टाकावासा वाटायचा, प्रेम वगैरे म्हणण्यापेक्षाही नैसर्गिक तारुण्यासुलभ आकर्षण जास्त असावं. पण चारपाच वर्षाहून अधिक काळ ते टिकलं, प्रेमच असावं ते बहुदा. तिच्यापर्यंतच काय अख्ख्या गावाला कळल होतं. तर मग तिच्या वडिलांपासून ते कसं लपेल. तिनी कोणालाच नाही म्हणलं नव्हतं, आधी त्याच्या प्रेमाला, आणि नंतर चिडलेल्या वडिलांना.

प्रेमाला जितक्या सहज तिनी हो म्हणलं होतं तितक्याच सहजतेनं तिनी वडिलांचा विरोध सहज स्वीकारला. तडजोड, शरणागती म्हणजे सगळं संपण नसतं, कदाचित ती दुसऱ्या नवीन कशाची सुरुवात असते असं ती म्हणायची, त्यामुळे ती पांढऱ्या रंगाचा ध्वज घेऊन कायम उभीच असायची. शिक्षण संपवून वडिलांनी बघून दिलेल्या मुलाच्या गळ्यात हार घातला आणि त्यानी घातलेल्या मंगळसूत्राच बंधन आयुष्यभरासाठी बांधून घेतलं.

तिचा संसार अगदी सुखाचाच चालला होता, कारण तिची कोणत्याही बाबतीत कोणतीच तक्रार नव्हती. सगळ्यांचं म्हणणं ऐकताना आपलंही काही म्हणणं असू शकतं हे देखील ती विसरली होती, त्यामुळे सारं काही सुरळीत चाललं होतं. दोन मुलं सासू सासरे, नवरा येणारे जाणारे सारे काही ती पाहून घेत होती. घर सावरत होती, उभारत होती. सगळं कसं चाकोरीतल्या सारखं चाललं असताना अगदी एका क्षणात सारं काही बदललं, तिचा नवरा चालता बोलता गेला, मुलं आडनीड वयात होती. पण तिनी सगळं सावरून घेतलं. थकलेल्या सासू सासऱ्यांना मुलाची कमी भासू दिली नाही. त्यांनीही शांतपणे तिच्या मांडीवर जीव सोडला.

शिकून मुलं बाहेर पडली, आणि घरात उरली फक्त ती. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत असताना आता स्वतःसाठी कसं जगायचं हा प्रश्नच पडला होता. आता कोणाच्या साठी काहीतरी सोडायचं?, कोणाच्या हो मधे हो म्हणायचं? पावित्र्य तर तिनी आयुष्यभर जपलच होतं, आणि शरणाचा पांढरा झेंडा तर जणू तिच्या शरीराचाच एक भाग होता. पांढरा रंग जसा पावित्र्याचा, तसाच शांततेचा रंग असतो. पाश्चिमात्य समाजात हा रंग धार्मिक साधनशुचीतेचा रंग देखील समजला जातो. आपल्याकडे पांढऱ्या रंगाकडे अशुभाची सावली म्हणून ही बघितलं जातं. मुळात साऱ्या रंगांहून वेगळा असूनही स्वतंत्र ओळख मिरवणारा हा रंग. आजचा पांढरा रंग स्वतःसाठी न जगणाऱ्या, कायम शरणागतिच्या, तडजोडीच्या तयारीत असणाऱ्या ‘स्त्री’ जातीला..!!!!!!!!!!!!!!!!!


Sunday, October 2, 2016

केसरीया बालमा....

अगदी दाखवायच्या कार्यक्रमापासूनच तिला त्याच्यातला साधेपणा आवडला होता, ज्या काळात मुलाकडच्यांनी मुलीकडच्या लोकांना वेठीला धरण्याचा एक कलमी कार्यक्रम असायचा, हुंडा न घेणं म्हणजे कमीपणाचं समजलं जायचं, लग्न म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर मोठेपण मिरवणं असायचं. आजही त्यात फार काही फरक पडलेला नाही, पण आज त्या सगळ्याला हौसेचं गोंडस नाव दिलं जातं. तर साधारण ४०, ५० वर्षांपूर्वी त्यानं बघण्याच्या कार्यक्रमातच सांगितलं होतं आम्हाला साधं लग्न हवं आहे, पण जरा तुम्हाला साग्रसंगीत लग्न करायचं असेल तर निम्मा खर्च आम्ही करू. त्यानंतरही लग्नात त्यानी ना स्वतःचे पाय धुवू दिले ना त्याच्या आई चे. कन्यादान शब्दाऐवजी कन्याभेट हा शब्द वापरायला लावला. छोट्या छोट्या गोष्टीतला त्याचा साधेपणा तिला भावत होता.
त्याच्याशी लग्न झाल्यावर तिला आयुष्याचं खरं सार्थक वाटत होतं. तिला शिकायला त्यानीच प्रोत्साहन दिलं, आणि तो एकटाच अपवाद होता असं नाही त्याचं सारं घरदार असा जगाच्या  चार पावलं पुढचा विचार करणारं होतं. इतका मोकळा श्वास तिनी तिच्या घरात क्वचितच घेतला होता, स्त्री पुरुष समानता फक्त पुस्तकात नसते तर अशी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवता येते. स्त्री पुरुष समानता म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करणं नसतं, किंवा पुरुष करतात त्या साऱ्या गोष्टी करणं नसतं, स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री पुरुष दोघांनी एकमेकांचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करणं असतं, स्वतंत्र विचारांचा आदर करणं असतं. तील रोज नवीन काही तरी शिकायला जगायला मिळत होतं.  
लग्नाला ५ वर्ष होऊनही तिची कूस काही उजत नव्हती, तशी घरातल्या कोणाचीच काहीच तक्रार नव्हती. वाट बघूयात, काही झाडांना उशिरा फळ धरत, शेवटी मूल जन्मण हा ही निसर्ग धर्मच असतो ना. एकमेकांची समजूत काढणं सुरु असायचं. मग कधी तरी विज्ञानाचाही सल्ला घेऊ म्हणत तिनी जवळपास ओढतच त्याला डॉक्टरकडे नेलं. त्याचं म्हणणं होतं, मूल नाही म्हणून काय झालं? त्यासाठी काही प्रयत्न करावे असं त्याला मनापासून वाटत नव्हतं.तिच्या हट्टाखातर जेव्हा ते डॉक्टर कडे गेले.
आपण आपल्या नवऱ्याला मुल देऊ शकत नाही ह्याचा त्रास स्त्रीला जास्त होतो, समाजानी जाणीव करून देण्याच्या आधीच तिचंच मन तिला खात असतं. जेव्हा नवरा सख्ख मित्र झालेला असतो तेव्हा बायकोला मुल न होणं हा जणू तिचाच अपमान वाटतो. आपण कुठेतरी कमी पडलोय, ज्यावर त्याचा हक्क आहे ते आपण त्याला देऊ शकत नाही याचं दुःख जास्त असतं. मातृत्वाचा आनंद फक्त जन्मातून मिळत नसतो, पण वंशसातत्याची भ्रामक कल्पना मात्र मनावर इतकी घट्ट पकडून असते की बाईला आपण एखादा गुन्हा केलाय असच वाटत असतं. दुर्दैवाने तिच्यातच दोष होता ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्यानी समजूत घातली तरी तिच्या मनातून डोक्यातुन ते जात नव्हतं. वैद्यकीय शास्त्रही आजच्या एवढ प्रगत नव्हत. तिला आयुष्यभर तिच्यामुळे नवऱ्याला कोणत्याही अप्रिय प्रसंगाला तोंड देऊ द्यायचं नव्हतं.

मग एक दिवस स्वतःच निर्णय घेऊन तिनी गावाकडून एक मुलगी आणली,पहिले तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली, आणि नवऱ्याला बोहोल्यावर चढवलं. स्वतःच्या जीवाची शपथ घालून तिनी त्याच्याकडून जबरदस्ती हे लग्न करवून घेतलं. त्याला मुल नको होतं ती हवी होती, पण तिला त्याला जगातलं सारी सुखं द्यायची होती. सुरुवातीचे कितीतरी दिवस तो त्या नव्या बायकोशी एक शब्दही बोलला नव्हता, जवळ येणं  तर लांबच राहिलं. पण तिनी तिचा हेका सोडला नव्हता. शेवटी ती काही दिवसांसाठी म्हणून घराबाहेर पडली, आणि जोवर मला काही बातमी मिळत नाही तोवर मी या घरात पाउल ठेवणार नाही म्हणाली त्यानंतर २, ४ महिन्यांनी कधी तरी त्यांनी त्याचा पुरुष धर्म गाजवला, आणि फळ निष्पत्ती झाली. मग कुठे ती घरी आली. सवत तिनीच आणलेली होती, एका सध्या घरातली, खायचे प्यायचे वांदे होते, शिक्षण जेमतेम झालं होतं. परिस्थिती अशी होती, की या दुसरेपणावर सुद्धा ती खुश होती.

आपल्या जोडीदाराला त्याचा वंश पुढे नेण्यासाठी आपला काहीच उपयोग होऊ शकत नाही याचं दुःख  आई होऊ शकत नाही या दुःखापेक्षा जास्त होतं. पण जेव्हा त्याचं मूल जन्माला आलं तेव्हा तिलाच भरून पावल्या सारखं वाटलं. मग कधी तरी ती त्यांच्या घरातून बाहेर पडली ती कायमचीच, कारण ती त्या घरात असे पर्यंत दुसरीला बायकोची जागा मिळाली नसती. त्यागातून मिळणारा आनंद स्वतःला काही मिळण्याच्या आनंदापेक्षा जास्त असतो हे तिनी अनुभवलं होतं.

केशरी रंग हा कायम त्यागाचा, धार्मिक अनुष्ठानाचा रंग समजला जातो. मुळात प्रत्येक धर्म एकच गोष्ट सांगतो, जगा आणि जगू द्या. शक्य तेवढा आनंद समाजाला, लोकांना द्या. आणि त्याग म्हणजे तरी काय, आपल्याच लोकांसाठी काही तरी सोडणं, काहीतरी करणं. त्यामुळे या दोन्ही भावना दाखवणारा रंग एकच आहे यात काही विशेष नाहीच. आजचा हा केशरी रंग हा असाच सतत त्याग करणाऱ्या पण तरीही आनंदी असणाऱ्या, किंवा जगण्यातून धर्माचा परिपाठ ठेवणाऱ्या साऱ्याच आई काकू,मावशी आत्या, ताई, आजी सगळ्याच ‘तिच्या’साठी!!!!!!!!!!!!!!!   

Saturday, October 1, 2016

काळा + पांढरा

चार चौघींसारखीच होती ती, दिसायला ही, वागायला ही. सर्वसामान्य घरासारखं घर, बाबा कमावणारे, आई घरी सगळी कामं करणारी, एक भाऊ एक बहिण, येऊन जाऊन असणारे पाहुणे, समाज मान्य चौकटी मधे जे जे करतात,  मग २२ व्या वर्षी तिच्या बहिणीचं लग्न झालं, आणि २३ व्या वर्षी तिची बहिण आई झाली, भाऊ इंग्रजी माधाय्मात शिकत होता,आणि हिनी बी एड केलं होतं. शाळेत नोकरी सुरु झाली आणि घरी लग्नाची शोध मोहीम, सुरु झाली. ओळखीतून पाळखीतून स्थळ आलं होतं, मुलगा तिच्या पेक्षा  जास्त शिकलेला होता, कमावत होता, स्वतःचं घर होतं, बहिणीचं लग्न झालं होतं, खास काही जबाबदारी देखील नव्हती, दिसायला सावळा होता, पण तिची तशी खास काही अपेक्षा नव्हती, अट म्हणजे एकच होती की मला नोकरी करू द्यावी. आणि मुलाची देखील तीच अट होती, की नोकरी करणारी बायको हवी, त्यामुळे लग्न जुळण्यात काहीच अडचण नव्हती.
लग्न करून ती नव्या नावानी नव्या घरात आली, नव्या माणसात रुळायला जार वेळ लागला, पण ती देखील माणसच असतात, सवयी स्वभाव थोडा वेगळा असला, तरी त्यांनाही आपल्यासारखाच आनंद होतो, राग येतो, त्यांच्या आवडी निवडी जपल्या की ती ही पूर्वग्रह सारून जवळ येतात, मानसशास्त्रात शिकलेलं ती प्रत्यक्षात अनुभवत होती. सासू सासरे नणंद, जावा या सगळ्यात कधी जीव गुंततो सासुरवाशिणीला कळतच नाही. नवऱ्याचे गुणही हळूहळू समोर दिसायला लागतात. नवरा आधी एक पुरुष असतो, मग मुलगा,मग नवरा. हा क्रम कधी कुठे बदलतो, पण हिच्या घरी मात्र हाच होता.  त्याचे प्राधान्यक्रम कायमच वेगळेच असायचे. पण वडिलांचे तसंच रूप पाहिल्यान, जर तो तसा नसता तर तिला नवल वाटलं असतं.
त्याला कोणतीही गोष्ट जास्त काळ करायची सवयच नव्हती, त्यामुळे एकाच नोकरीत स्थिर स्थावर होणायची अपेक्षा त्याच्याकडून करणं म्हणजे फुटक्या घागरीन घर भरण्यासारखं होतं. पण तिला हे कळेस्तोवर त्याच्या २ नोकऱ्या ३ बिझनेस आणि २ पोरं जन्माला घालून झाली होती. आता तिला त्याचा अटीचं कारण कळत होतं, पण आता मागं फिरणं ही शक्य नव्हतं, संसार मोडणं हे पाप असतं, संसार ओढणं ही रीत असते, शिक्षणानी संस्कार थोडीच बदलतात. तसं बिडी काडीच व्यसन नव्हतं, पण नाद होता, सतत काहीतरी करून बघण्याचा, मग त्या नादात पैसे गेले तरी बेहत्तर.  धंदा शब्दाला एक निराळच वलय असतं त्यामुळे इंग्लिश बिझनेसच बर वाटतं कोणताही बिझनेस हा लोणच्या सारखा असतो, मुरत गेला की खरी चव कळते, एखादं लोणचं चालू असतं, पण ते जास्त दिवस टिकवायचा प्रयत्न केला तर खराब होतं, त्याला ही गोष्ट कळत नव्हती की समजून घायची नव्हती कोणास ठाऊक. लोणची, पापड, आंबे, फटाके, सौंदर्यप्रसाधने ते कपडे, खाद्य पदार्थ विकणाऱ्या कंपनीची, टपरवेअर, मातीची भांडी, साड्या, व्हिटामिनच्या गोळ्या, कसली कसली आयुर्वेदिक औषधं कशा कशाची म्हणून त्यांनी एजन्सी घेतली होती, दर वेळी तिनी शाळेत, घराच्या शिकवण्यांमध्ये त्याची जाहिरात करायची, मुद्दल परत हातात आली की याचा नवीन ‘धंदा’ सुरु. एकेकांना एकेक शौक असतो, तसा याला नव नवीन एजन्सी घेण्याचा शौक होता. घर तिच्या खर्चात चालतच होतं, त्यामुळे घरासाठी वेगळा काही पैसा द्यायचा असतो हे त्याच्या गावी देखील नव्हतं.
पोराचे प्रताप आई वडिलांना कळत होते, पण त्याला काही सुनावण्याची वेळ कधीच गेली होती, त्यामुळे ते निमुटपणे सुनेची पाठराखण करत होते. मुलं काळाबरोबर मोठी होतच असतात, तो कधी तरी शिकेल या आशेवर ती प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर हिशोब मांडायला बसायची, आणि १० रुपयाचा देखील नफा झाला तरी तो पुढचं नवीन काही तरी करून बघायला तयार असायचा, ती त्याला बोलून थकायची नाही आणि तो तिला कानामागं टाकून. त्यांनी फार मोठी कर्जे केली नाहीत, पण छोटी छोटी कर्ज बरीच केली, प्रत्येक वेळी एकेक फटका म्हणून कधी दागिना, कधी FD मोडायची. सगळ्याला ती कंटाळून गेली होती, पण तरी रेटत होती. क्वचित कधी त्यानी तिला मोडलेला दागिना करून दिला, नाही म्हणायला, एकदा परदेशात फिरवूनही आणलं होतं. पण साधारणपणे त्याचं लाखाचे बारा हजार करणं सुरूच होतं.
जेव्हा त्यानी नवीन व्यवसायासाठी घर विकायची भाषा सुरु केली तेव्हा ती वाघिणीसारखी चिडून उठली, आजवर त्याला न ऐकवलेलं सारं ऐकवलं, आणि दर महिना मी तुला हातखर्चाला काही रककम देईन पण तू घरात बस, आजवर केलेस तेवढ पुष्कळ झालं. घराच्या आत ती पुरुष झाली होती. त्यानी थयथयाट केला, पण ती नाही बधली. बाई अशीच असते. सासऱ्यानी मरताना घर तिच्या नावावर केलं असल्यामुळं मी म्हणते तसं राहा नाहीतर घराबाहेर हो म्हणायला देखील तिनं कमी केलं नाही.

महिषासुरमर्दिनी, काली, चंडिका या सगळ्या असतातच आजूबाजूला, देवळातच नव्हे तर अशा कित्येक घरांमध्ये. वर्तमानपत्रात छापून येण्याएवढ, पुस्तक लिहिण्याइतक कर्तुत्व गाजवाण्याऱ्याच महान महिला असतात असं नाही, पण त्यांनीही त्यांच्या आयुष्यात खूप मोठी मजल मारलेली असते. आयुष्यातल्या काळ्या, गोऱ्या प्रसंगाला धीटपणे सामोऱ्या जाणाऱ्या अनेक अनामिकांसाठी आजचा करडा रंग. आयुष्य हे वाईटातून चांगलं शिकणं आणि चांगल्यातून नवीन काही शिकणं हेच तर असतं ना. जरासा औदासिन्याकडे झुकणारा, करडा रंग आयुष्यात कधी उदास करतो तर कधी आशा दाखवतो. आयुष्य काही एकाच रंगात रंगलेलं नसतं, त्यात चांगलं वाईट दोन्ही असतं, याचीच आठवण हा करडा रंग करून देतो.