Monday, May 22, 2017

शोध स्वतःचा !

सुट्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातही काम करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या साऱ्याच बायकांना ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटत असते ती अनेक कारणांनी. मुलांच्या अभ्यासाचं, शाळेचं असं कोणतंच कारण नसतं. माहेरपण अनुभवण्यासाठी, भटकण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. मग काही जण कुटुंबाची एकत्र अशी एखादी सहल काढतात, ह्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी म्हणून एखादे थंड हवेचे ठिकाण मग ते भारतातील असो व परदेशातील सहल.काही जन तिर्थस्थळाना भेट देतात. पण उन्हाळ्यात एखादी तरी सहल होतेच. रोजच्या त्याच त्या रुटीन पासून थोडा बदल म्हणून काही तरी हवेच असतं. हा असा स्थान बदल, एक नवीन तरतरी मिळवून देतो. या अशा सहलींमध्येच एक नवा ट्रेंड रुजत आहे बायकांच्या एकटीच्या सहली !
कुटुंबासोबत सहलीला गेलं तरी बायकांच्या मागच्या अनेक गोष्टी सुटत नाहीत, मुलांना वेळेवर खायला देणं, सामान नीट लावून घेणं, मुलांकडे बघणं अशा एक न अनेक गोष्टी असतातच त्यामुळे अनेक बायकांसाठी हे असं फिरायला जाणं म्हणजे फक्त जागेचा बदल असतो, घरामध्ये जे करतो तेच बाहेरही येऊन करायचं, फरक एवढाच की इथे स्वैपाक आयता मिळतो आणि कामवाली आज येईल की नाही याची फिकीर करावी लागत नाही. कितीही घरात, मुलांमध्ये जीव असला तरी बाईला थोडा स्वतःचा वेळ देखील हवाच असतो. त्यामुळेच फक्त बायकांच्या सहली जशा जोर धरू लागल्या आहेत तशाच एकट्या प्रवास करणाऱ्या बायकांची संख्या देखील वाढत आहे.
खरंच सतत दुसऱ्यांचा विचार करत जगणाऱ्या बाईला स्वतःच्या मनासारखं जगायला मिळतं का? कुटुंबासोबत सहलीला जाताना बायकांना विचारलंदेखील जात नाही, अगदी साधं हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा आईला, बायकोला काय हवं आहे, तिला काय खायचं आहे हा प्रश्न येतंच नाही, अनेकदा मुलंच हे सारे प्रश्न सोडवतात किंवा उरलेल्या ठिकाणी घरातले पुरुष! अनेक कमावत्या बायका, मुली एकटं फिरायला आजकाल बाहेर पडतात याचं कारण हे देखील असावं. सारी माहिती ऑन लाईन मिळवून, वेगवेगळ्या ब्लॉगच्या आधाराने अनेक जणी स्वतःच स्वतःच्या सहलींच आयोजन करतात. सावधानी बाळगण्यासाठी अनेकवेळा b&b मध्ये राहणं पसंत करतात. b&b म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट ची सोय देणारी घरं. अशा अनेक वेबसाईटस आहेत ज्यावर आपण ही बुकिंग करू शकतो. या अशा ठिकाणी शक्यतो कुटुंब रहात असल्या कारणाने सुरक्षेचा फारसा प्रश्न येत नाही. त्याच बरोबर स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेता येतो. आणि हे हॉटेल मधे राहण्यापेक्षा किफायतशीर देखील पडतं.
साऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून एकट , किंवा ग्रुप मध्ये फिरताना अनेक गोष्टी नव्यानी कळतात. स्वतःशी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला जातो. स्वतःमधल्या क्षमतांची नव्याने ओळख होते. त्याचबरोबर एक अहंकार देखील गळून पडतो. अनेक वेळा बायकांना वाटत असतं त्यांच्याशिवाय घर चालूच शकणार नाही. पण आपल्या गैरहजेरीत घराची घडी विस्कटते पण तरीही घर सुरु असतं. त्यामुळे माझ्यावाचून कोणाचं काही अडत नाही हे कळतंच पण आपण नसल्याचा परिणाम घरावर झाला आहे हे देखील दिसत असतं. अनेक टूर्स कंपन्या देशातच नव्हे तर परदेशातही अशा फक्त बायकांच्या सहली आयोजित करतात, आणि तिथे बायका आपली वय विसरून धमाल गंमती करतात. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची मजा अनुभवतात.
परदेशात अनेक जण एकेकटा प्रवास करत असतात, लोनली प्लॅनेट सारखी पुस्तके हाताशी धरून पुरुष, बायका वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश फिरतात. भाषा येत नसलेल्या प्रांतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नवे नवे अनुभव गाठीला बांधतात. अनेकदा असा एकटा प्रवास करणाऱ्यांना तुम्हाला भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारून लोकच जास्त घाबरवतात. एकटे फिरताना अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावं लागतं पण त्याचबरोबर माणुसकीचे वेगवेगळे रंग, पुस्तकाबाहेरचे अनुभव देखील अनुभवता येतात हे ही तितकंच खरं. असं एकट फिरणाऱ्याना कोणत्याही गायडेड टूर शिवाय प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून फिरावं लागतं. अनेकदा अपेक्षा नसलेल्या ठिकाणी जास्त आपुलकी बघायला मिळते. एकट्या फिरणाऱ्या बायकांबद्दल तर समाजात कुतूहलाबरोबरच एक प्रकारचं प्रश्नार्थक आश्चर्य पण असतं. म्हणजे एखादी बाई अशी एकटी सगळ्या गोष्टी कशा करू शकेल इथ पासून ते तुम्हाला कोणी काही केलं तर इथपर्यंत.
क्वीन चित्रपटामुळे तर एकट्या फिरणाऱ्या महिलांना जणू ग्लॅमरच मिळालं. जर एखादी लग्न तुटलेली सामान्य मुलगी एकटीच युरोप फिरू शकते तर आपण आपला देश का नाही? मग ट्रीपलिंग सारख्या वेब सीरिअल मुळे याला अजून खात पाणी मिळालं. कधी सोबत नाही म्हणून, कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून, कधी गरज म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पहिला सोलो प्रवास होतो, आणि मग त्यातली मजा आवडायला लागते आणि मग सुरु होतो एकट्यानी प्रवास करण्याचा नवा प्रवास. स्वतःला शोधण्यासाठी, नव्यानी भेटण्यासाठी, स्वतःवर, आयुष्यावर नव्यानी प्रेम करण्यासाठी एकदा तरी घराचा उंबरठा एकटीनी ओलांडून पहा, परत तुमच्या जगात याल तेव्हा अजून जास्त प्रेम, अनुभव, नात्यांचे दोर जास्त घट्ट करतील.

जग फिरणं, नवीन माणसांना भेटणं हे एक प्रकारचं शिक्षणचं असतं. या शिक्षणाला कोणताही अभाय्साक्रम नसतो, पदोपदी परीक्षेची वेळ असते, आणि पास नापास असा कोणताच पर्याय नसतोच, तुम्ही फक्त पुढे जायचं असतं. एक स्त्री जेव्हा असा प्रवास एकटीने करते तेव्हा तिला सोबत करत असतात तिच्या आतल्या अंतःप्रेरणा, आणि एक व्यक्ती म्हणून त्या तिला अजून जास्त समृद्ध करत असतात. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मग हा अनुभव घेण्यासाठी कधी करताय तुमची बॅग पॅक? सुट्टीचे दिवस अजून संपलेले नाहीत, तेव्हा टेक अ ब्रेक, अँड मीट युअरसेल्फ...  
(महाराष्ट्र टाईम्स २२ मे २०१७ )

Sunday, May 7, 2017

आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव... माऊलींग!

Mawlynnong.
मेघांचे घर असणाऱ्या मेघालयाच्या बद्दल खूप कुतूहल होतं. भारतातले ईशान्येकडचे महत्वाचं राज्य. सैन्य दलाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं ठिकाण. गारो, खासी, जयंतिया या जमातीच्या लोकांमध्ये विभागलेले राज्य. भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणं जिथे आहेत त्या राज्यात पाणी आणि हिरवा रंग यांना काही कमी नसणार एवढेच मनात ठेवून शिलॉंग च्या प्रवासाला सुरुवात केली. घाटाघाटातून वळणारे रस्ते, प्रत्येक वळणावर एक नवा निसर्ग समोर दाखवत होते. आता घाट संपला आता सरळ रस्ता सुरु होईल असं वाटत असतानाच नवी चढण सुरु होते. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव याच राज्यात आहे, ते बघण्याची खूप इच्छा होती. माऊलीन्नोंग गाव म्हणजे अगदी बांगलादेशाच्या सीमेवर लागून असलेलं गाव. साध ९२ घरांचं गाव.वस्ती असेल एक ६०० च्या आसपास. या गावाबद्दल बरंच वाचलं होतं, त्यामुळे बघायची उत्सुकता पण होती. मेघालय मधे







खूप डोंगर दऱ्या असल्यामुळे रस्ते बांधणं सोपं नाही, त्यामुळे अनेक गावं रस्त्यांनी जोडलेली आहेत पण आपापसात जोडली गेलेली नाहीत, म्हणजे चालत एखाद्या गावाला जायला अर्धा तास लागत असेल तर रस्त्यांनी देखील तेवढाच वेळ लागू शकतो, कारण, तुम्हाला पूर्ण वळसा घालून जावं लागतं. हे गाव देखील तसंच. नकाशावर अगदी जवळ दिसणारं पण रस्त्यानी गेलं तर बराच वेळ लागणारं. या गावापर्यंत रस्ता जातो, आणि त्याच रस्त्यानी परत हमरस्त्याला लागता येतं.
गावात गेल्याबरोबर एंट्री फी कम पार्किंग फी म्हणून पन्नास रुपये घेतले, तेव्हा क्षणभर वाटलं, स्वच्छ गाव बघण्याचा अजून एक कर! गाडी लावून जेव्हा गावात फेर फटका मारायला गेले तेव्हा सुरुवातीला बाकीच्या गावांपेक्षा फार काही वेगळे नाही दिसलं. म्हणजे इथे प्रत्येक गावातच सिमेंटची पायवाट दिसते, कारण पाऊस इतका प्रचंड पडतो, तो ही जवळपास वर्षातले ६, ७ महिने त्यामुळे माती, डांबर कधीच वाहून जातं. पण मग फिरता फिरता जाणवलं, इथे प्रत्येकानी घराच्या बाहेर कुंपण म्हणून झाडंच लावली होती. प्रत्येकानी आपलं घर आणि बाग उत्तम राखली होती. अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वाटेवर सुद्धा लावली होती. जागोजागी बांबूच्या टोकऱ्या लावल्या होत्या. म्हणजे बघायला येणाऱ्या लोकांनी देखील त्यांचा कचरा त्या टोकऱ्यामध्ये टाकावा. कपडे वाळत घालताना देखील नीट नेटेकेसे होते. व्यवस्थितपणा इतका टोकाचा की डायपर देखील चिमटा लावून वाळायला ठेवले होते.
चालतानाच जिथे घरं संपली तिथे एक मस्त मोठ्ठ मैदान होतं. आणि दोन गोल पोस्ट. जर कधी काळी भविष्यात भारत फुटबॉल विश्वचषकात खेळलाचा तर तो अशा छोट्या छोट्या गावांमधल्या फुटबॉलवेड्यांमुळे असेल हे नक्की. जेव्हा तिथल्या काही लोकांशी बोलले तेव्हा कळल, की गावातल्या प्रत्येक घरात  LPG चे कनेक्शन आलेलं आहे, घरात चूलही वापरतात, आणि त्या चूल वापरण्यामुळे घरातला ओला कचरा हा अनेकदा त्या चुलीमध्येच वापरला जातो. आमच्या गावात प्रत्येकाच्या घरात संडास आहे हे सांगताना त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा अभिमान त्याला जाणवलेलं महत्व सांगून गेला. गाव स्वच्छ राहावं म्हणून त्यांनी पाळीव प्राण्यांवर खास करून डूक्करांवर प्रतिबंध घातलेला आहे. ज्यांना गायी, किंवा इतर प्राणी पाळायचे असतील त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर गाव खराब होऊ न देता करायचे असतात. ६०० लोकसंख्येच्या त्या गावात एक आठवीपर्यतची शाळा देखील आहे. या गावाच्या जवळच लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे झाडांच्या मुळांनी तयार झालेला पूल आहे तो बघायला येणारे अनेक जण या गावाला देखील भेट देतात. त्यामूळे इथे देखील होम स्टे वाढले आहेत.  त्यातल्या एकाच नाव फारच गंमतीशीर होतं, बांगलादेश व्ह्यू होम स्टे. मान्य आहे या गावातून बांगलादेश दिसतो, पण जमीन पठारावर असणाऱ्या आपल्या शेजाऱ्याच्या नावाच्या त्या होम स्टे की मात्र गंमत वाटली.

मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या इतर गावांप्रमाणे या ही गावात विड्याची पाने, सुपारी, झाडू ( त्याबद्दल एक स्वतंत्र प्रकरण लिहिणार आहे) हे होतात, तसेच काळी मिरी, पांढरी मिरी , तमाल पत्र यांची देखील शेती होते. खासी बहुल या भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. कदाचित सुबत्तेमुळे असेल पण या गावात सिमेंटची घर जास्त दिसली. पैसा सुबत्ता आली की आपण निसर्गाला विसरून त्या पैशांनी जास्तीत जास्त महाग मोलाचं काही कसं घेता येईल याचा जास्त विचार करायला लागतो असंही  जाणवलं. स्वच्छ गाव हे फक्त शाळेतल्या प्रयोगांमध्ये, किंवा पुस्तकात नसतं. आखीव रेखीव टुमदार गाव हे फक्त स्वप्न नसतं. हे सगळं बघण्यासाठी अनुभवण्यासाठी तरी एकदा माउलीन्न्ग ला भेट दिलीच पाहिजे. 

Thursday, May 4, 2017

मेघालय डायरी १

शाळेत असताना भूगोलामध्ये वाचलं होतं मेघालयात गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या असतात. तिथल्या लोकांच्या जमातीवरूनच ही नावे पडली आहेत. केरळ सोडून फक्त मेघालयात असलेली मातृसत्ताक पद्धती. नावानुसारच ढगांचं घर असलेलं राज्य, आणि त्यामुळेच पावसाचा वरदहस्त असलेलं मेघालय, इतका पाउस की भारतातलं सर्वात जास्त पाउस नोंदवलेलं ठिकाण देखील याच राज्यात आहे. या सगळ्यामुळेच हे राज्य कायम एक कुतूहलाचा विषय होतं. काही दिवसानापुर्वी इथे एका गावात राहण्याचा योग आला होता. कोणतही शहर जसं स्वतः चालून बघितल्याशिवाय त्याचं दर्शन घडवत नाही तसचं कोणतीही संस्कृती ही प्रत्यक्ष्य राहायचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.
मेघालय, आसाम च्या शेजारचं राज्य. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी एक. ख्रिश्चन बहुसंख्य असलं तरी स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारं राज्य. शिलॉंग ही या राज्याची राजधानी भारतीय हवाई दलाचं मोठा तळ इथे आहे. ज्याप्रमाणे आसामी संस्कृतीवर बांगला छाप दिसून येते तशी या राज्यावर इंग्रजांची छाप दिसून येते. आज इंग्रज जाऊन आता ६७ वर्षे झाली असली तरी देखील शिलॉंग शहरात त्यांच्या खुणा जागोजागी मिळतात. मग ते क्रिकेट सोडून फुटबॉल खेळणं असो किंवा पारंपारिक लोकसंगीताबरोबरच रॉक संगीतावर यांचे पाय थरकतात. शिलॉंग ला भारताची रॉक संगीताची राजधानी मानलं जातं. शिलॉंग या अराज्याच्या राजधानीच्या शहरात संमिश्र लोकसंख्या आढळते, खासी, गारो, पनार या स्थानिक जमातीच्या लोकांबरोबरच बंगाली, आसामी आणि थोड्या फार प्रमाणात बिहारी लोकांचं अस्तित्व जाणवतं. शहरात कुठेही भाषेचा अडसर जाणवत नाही, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा वापरून सहज फिरता येतं. उंचसखल भागेत वसलेलं गाव असल्यामुळे कित्येक घरांचे पहिला मजला खालच्या रस्त्यावर तर दुसरा मजला वरच्या रस्त्यावर आलेला आहे. शहरातले रस्ते रुंदीला फारसेवाढवणे शक्य नसल्यामुळे वाहतुकीला आपोआपच शिस्त आलेली आहे. गाडीचालक साऱ्या नियमांचे पालन करतात, कारण जर एकानी चूक केली तर त्याचा परिणाम बाकीच्या गाडीवाल्यांना भोगावा लागून वाहतूक खोळंबून राहते हे स्वनुभावानी सगळ्यांना माहीत झालेलं आहे.
जसजसे शिलॉंग मधून बाहेर पडावे तसे वळण वाटांचे रस्ते सोबत अजूनच घट्ट करतात. सुंदर हिरवे डोंगर आणि त्या हिरव्या रंगाला मध्येच छेद देणारे पांढरे शुभ्र धबधबे हे साऱ्या मेघालय चं वैशिष्ट्य. गारो, खासी आणि जयंतिया या तीन टेकड्यांमुळे इथे पाऊस अडवला जातो आणि त्यामुळे इथली जंगलं कायम हिरवीगार राहतात. इथला स्थानिक माणूस आजही शेतीत रमतो, त्यांच्या स्थानिक सणांमध्ये गातो, नाचतो, पारंपारिक भात, भाज्या, मांसाहार करतो. पर्यटनाच्या नकाशावर आलेली गावं वगळता आजही इथली गावातली लोकं हिंदी इंग्रजी पासून लांब आहेत, बाहेरच्या लोकांमध्ये ते बुजतात. जरी इथे ख्रिश्चन बहुभाषिक असले तरीही इंग्रजी सगळीकडे समजली जाते असं नाही. आपण उगाचच भाषा आणि धर्म यांची सांगड घालतो, खरंतर त्या दोन वेगळ्या गोष्टी. आताशा खाजगी मोबाईल कंपन्या सर्वदूर पसरल्या आहेत आणि त्यांचे इंटरनेट, खासगी वाहिन्यांचे जाळे पसरत चालले आहे त्यामुळे हिंदी मालिका बघितल्या जातात. उर्वरित भारताशी त्यांचा संपर्क होत असतो तो याच माध्यमातून. आता आता अनेक गावांतून मुलं शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला, शिलॉंगला गेलेत, किंवा काही आसाम, भारताच्या इतर भागातही जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे गावांची नावे अगदीच अनोळखी नसतात.
शहरांमध्ये असणाऱ्या औपचारिकता गावांमध्ये नसतात, तिथे सगळाच मोकलेधाकळे असतं. त्यामुळेच पहिल्याच भेटीत मला एक दोन जणांनी माझं वय विचारलं, तर त्यानंतर लग्न झालंय का? हिंदी मालिका, आणि चित्रपट बघितल्याचे परिणामस्वरूप मला त्या लोकांनी लगेच मग मी ‘मांग मध्ये सिंदूर’ नाही लावत म्हणून देखील विचारलं. मग मी मंगळसूत्र घालते सांगितल्यावर म्हणजे सगळेच नॉन ट्राईबल्स सिंदूर लावत नाही का असंही विचारलं, आणि मला ऐकायला खूप मजा वाटली. धर्म, भाषा, यावरून खूप वेळा माझं वेगळेपण दाखवलं गेलं होतं पण यावेळी या सर्वांपेक्षा मी त्यांच्या जमातीची नसणं हे अधोरेखित करून इतर जमातीची प्रतिनिधी म्हणून बघितलं जात होतं. खूप सारे प्रश्न तिथल्या डोळ्यांमध्ये, ओठांमध्ये होते, तोडक्या मोडक्या मालिकांमधून शिकलेल्या हिंदी मधून ते मला विचारत होते, आणि माझी उत्तरं समजून घेत होते. सगळ्यांचा एकाच लाडका प्रश्न होता मी कोणकोणत्या अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना भेटले. मला अनेक नवीन गाणी येत नाही हे पाहून त्यांना माझ्या भारतीय चित्रपटविश्व अज्ञानाची कीव येऊन त्यांनी मला बरीच नवीन गाणी शिकवली, आणि कोणा कोणाचं कोणाकोणाशी अफेअर सुरु आहे हे सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर एकीनी सांगितलं दीदी मला रणबीर कपूर आवडत नाही कारण त्यानी कॅटरीना कैफ ला नाही म्हणलं.
असं म्हणतात की क्रिकेट, आणि सिनेमा या दोन गोष्टी भारतात कोणालाही जोडू शकतात. याची परत एकदा खात्री पटली. रस्ते फक्त गावं जोडण्याची कामं नसतात करत. ते त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनाही जोडत असतात. या राज्यात सरकारी वाहतूक व्यवस्था फारशी दिसत नाही, तिथे जीप, अल्टो तत्सम गाड्यांमधून वाहतूक होत असते. खरंतर इथली ती वाहतूक बघून या कार कंपन्या त्यांची जाहिरात देखील बदलू शकतात, कारण आल्तो गाडी ८ माणसांना घेऊन आरामात घाट चढते आणि उतरते. आणि आरामात गाडीचं आतच जागा हवी असं काही नसतं, लोकं बाहेरच्या कठड्यांना, टपावर बसून देखी हसत प्रवास करतात. मेघालयातच नव्हे तर आसाम, अरुणाचल प्रदेश मध्ये देखील रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्या सगळ्या रस्त्यांवरून हसत प्रवास करणाऱ्या साऱ्या लोकांना बघून साहजिकच एक सहज हसू तोंडावर उमटतं आणि मग  तिथल्या माणसांशी मन जोडायला वेळ लागत नाही. कारण शब्दांपेक्षा हसणं जास्त प्रभावी संवादक असतं.   



Tuesday, March 21, 2017

तळहातावरच्या रेषा

एका अगदी निवांत क्षणी
त्यानी धरला होता तिचा हात
बघत होता तळहातावरची रेष न रेष
तिचे डोळे वाचले होते आधी
आता हात वाचू पाहत होतास
तेव्हाची गोष्ट...

उगाच रेषांवर बोट गिरवून
बहुदा घेत होतास अंदाज
किती खोलवर काय काय घुसलं आहे याचा
मग तळहातावरचा एक एवलुला तीळ
बघत बसलास कैक मिनीट
मग असे डोळे बंद करून समाधीस्थ
झाल्यासारखं करून झाल्यावरही
निरखत राहिलास तिचा तळहात,
त्याच्यावरच्या रेषा, फुटलेले फाटे,
दाबत राहिलास बोटांनी, उंचवटे,
वाकवत राहिलास बोटांची पेरं,
मग हुं म्हणत आठवत राहिलास काहीतरी
मग हात सोडून देऊन
डोळ्यात डोळे घालून म्हणालास
खूप प्रेम आहे तुझ्या आत,
लुटत राहा प्रेम,
न संपणारा प्रेमाचा झरा फुटलाय आत
त्याला आता थांबवता येत नाही
प्रेम लुटायचं थांबलीस
तर हळू हळू गळून पडतील
नखं, बोटं, हात, केस,
पापण्या, डोळे, पाय,
उरेल फक्त एक हृदय...

बुडेपर्यंत प्रेम घेतल्यावर
तो ही गायब झाला एक दिवस
तरीही ती प्रेमातच होती,
त्याच्या, त्यानी सांगितलेल्या भविष्याच्या,
हातावरच्या रेषांच्या...

तेव्हापासून ती भेटलेल्या प्रत्येकावर
उधळून करत आहे प्रेम,
प्रत्येक पुरुषाला वाटतं ती त्याची आहे,
प्रत्येक स्त्रीला वाटतं ती वेडी आहे,
जगाला ती वाटते व्यभिचारी,
तिला ती वाटते दमलेली...

रागाचा, द्वेषाचा, अपेक्षांचा
गाळ नकळत साचायला लागला,
झऱ्यावर शेवाळं जमायला लागलं,
तिचं प्रेम समाजचौकटीत धडपडायला लागलं.

आता आता बिन बोटांनी ती
लोकांना कुरवाळते तेव्हा
तेव्हा लोकांना खुपत तिचं प्रेम
पण तरीही ती प्रेमत असते
स्वतःसाठी, जगासाठी, प्रेमासाठी!


Thursday, March 16, 2017

जादूची वही

रपरपत्या पावसात गाडीवरून
गेलो होतो रस्त्याच्या मागे मागे
रस्ता संपला, पाउस संपला,
आठवण ही हरवली होती कुठे तरी
पण परवा पाहिले दोन वेडे,
तुफान पावसात घट्ट बिलगून चाललेले
आणि आठवली आपली जादूची वही

तुझी माझी होती एक जादूची वही
प्रत्येक आठवण लिहून ठेवायचो आपण त्यात,
आणि पान संपलं म्हणून उलटलं की
नाहीशी होऊन जायच्या त्या आठवणी

खूप मज्जा वाटायची तेव्हा त्या वहीची
कधीतरी मी तुला विचारलं होतं
जातात तरी कुठं या साऱ्या आठवणी
नेहेमीसारखा प्रेमभर हासत तू म्हणालास,
जात असतील तिच्या मुलीच्या गावाला,
तूप रोटी खाऊन , जाडजूड होऊन
केस पिकवून भेटतील आपल्याला परत

आता माझ्या पिकल्या केसांनी
तुझ्या थरथरत्या हातांना धरून बाहेर जाते,
तेव्हा एकेक आठवणी येऊन भेटतात
आपल्या जादूच्या वहीतल्या.


Tuesday, March 7, 2017

ती आहे पूर्णत्व…पुरूषाचं....

१. 

लहानपणी आजीकडून त्यांनी एक गोष्ट ऐकली होतीबृहन्नडेची. अर्जुनासारखा शूरवीर धनुर्धारीमहापुरुष एका वर्षासाठी स्त्री होतो त्याची कथा. दहा बारा वर्षाचा असताना ऐकलेली ती गोष्ट. रामकृष्ण यांच्या मैत्रीच्या पराक्रमाच्या गोष्टीनी भारून जायचं वय होतं ते. तोपर्यंत प्रत्येक खेळात त्याला राम किंवा कृष्ण व्हायचं होतं. कृष्णच जास्त. त्याची ती बासरी वाजवणंगोपिकांसोबत मस्ती करणं हे सारंच आगळावेगळ वाटायचं. त्याचा धोरणी चतुरपणासोयीस्कर सबबी  सारं काही मानवी वाटायचं. मग अशातच कधी तरी पांडवांचीत्यांच्या कथाविश्वात एन्ट्री झाली.  पाच भावांमध्ये मिळून एकच बायकोपाच भाऊ पण.  प्रत्येकाचा जन्मदाता वेगळा कसा, असा प्रश्न पडायचा. पण आजी पुढे विचारायची हिंमत कधी झाली नाही. मग अशातच एकदा कधी तरी आज्जीनी बृहन्नडेची गोष्ट ऐकवली आणि मग पुढचे कित्येक दिवस महिने ती डोक्यातच घुमत होती. उर्वशीनी शाप दिला म्हणून अर्जुनाला एक वर्ष स्त्रीवेश घालून स्त्रियांच्या अंतःपुरात राहायचंनृत्यशिकवायचं सोपं नक्कीच नव्हत. मग कसं काय त्यानी निभावून नेलं असेल. काय विचार आले असतील त्याच्या मनातबाईच्या आयुष्याची कल्पना आली असेल कात्या एका वर्षाच्या अनुभवामुळे अर्जुनाचा स्त्रियांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला असेल काहे प्रश्न त्या वयात पडले नाहीत. पण एक बालसुलभ प्रश्न पडला होता,अर्जुनाकडे फक्त त्याचे कपडे होते मग त्यानी मुलींचे कपडे कुठून आणलेया प्रश्नावर आजी खूप हसली होती आणि तिनी पुढचे आठ दहा दिवस येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला ऐकवलं होतं. मुलगा म्हणून वागत असताना देखील कुठे तरी ती गोष्ट आत होतीच. अर्जुनाला स्वतःच्या रूपाचा,पौरुषत्वाचा अभिमान होतातो गळावा म्हणून तर दिला गेला नसेल ना हा शापअसंही कधी कधी मनात उगाचच डोकावून जायचं.
समाजरितीप्रमाणे शिक्षणनोकरीलग्न सारं झालं. एक मुलगा भाऊनवरावडील सारं काही निभावून नेताना त्याच्या डोक्यात ती बृहन्नडा असायचीच. कित्येक वेळा त्याला निर्णय घेताना ती बृहन्नडा अप्रत्यक्षपणे मदत करायची. त्याच्या बायकांबद्दलच्या हळव्या कोपऱ्यामुळे त्याला बाईल्या म्हणूनही कधी हिणवलं गेलंकधी बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हटलं गेलं, पण त्याला माहीत होतं, पुरुषामध्ये दडलेल्या स्त्रीचा सन्मान जपला तरच माणूस म्हणवून घेण्यात अर्थ आहे.
त्यामुळेच स्त्री म्हणून जगुनही अर्जुनाच्या पुरुषत्वाला कोणी कधी बोल लावला नाही.

२.
आपण वेगळे आहोत हे त्याला जसं जसं उमगत गेलं, तसा तो त्याच्या चित्रांमध्ये जास्त रमत होता. आपलं दिसणं जेव्हा आपल्याला चुकीचं वाटतं. आपल्या ओळखीचा शोध घेत असताना काहीतरी वेगळंच कळत जातं. स्वतः बद्दल नवे शोध लागत असताना तो सगळ्याच आघाड्यांवर लढत होता. पहिले स्वतःशीमग कुटुंबाशीसमाजाशीअनेक समजांशी. एक हात मदतीसाठी मिळत असताना दहा हात उगारले जात होते.  त्या सगळ्या मंथनातून एक होत होतं स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तो अभ्यासात अव्वल येत होता. सोबतीला चित्रं होतीच. खूप छोट्या छोट्या इच्छा तो मारत होता पुढचा विचार करून. घरात कोणीही नसताना एकदा तो आईची साडी नेसला. हातात बांगड्या घातल्याछोटीशी टिकली लावून पाहिली. हलकासा मेक अप सुद्धा केला. बोटांवर नेल पॉलिश लावताना जणू तो स्वतःलाच पॉलिश करत होता. स्वतःला तयार करत असताना त्याचा रोम रोम फुलत होता. आरशामाधलं स्वतःच प्रतिबिंब पाहून स्वतःशी नव्यानं ओळख करून घेत होता. लहानपणापासून त्याला हे  आईसारखे कपडे घालावेसे वाटायचे. नटावंसं वाटायचंस्वतःला एकदा तरी मुली सारखं तयार करून आरशात बघायचं हे त्याचं वर्षानुवर्षाचं एक छोटंसं स्वप्न होतं. ते एक छोटंसं स्वप्न पूर्ण करायला त्याला काही वर्ष लागली होती. आपल्याला जे वाटतं ते नक्की काय आहे हे समजण्यात त्याची पौगंडावस्थेतील वर्ष गेली होती. आणि जेव्हा ते कळलं तेव्हा बाकीचे हे कसं काय स्वीकारतील याची भीती होती. पण हळू हळू स्वतःलाच तो कणखर बनवत गेला. स्वतःबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल लाज सोडून सगळं काही वाटत होतं त्याला. पुरुषाच्या आत स्त्री लपलेली असतेच ना. मग मला आतून वाटणाऱ्या या हाकेला मी का नाही उत्तर द्यायचं. ही केवळ विचारांच्या पातळीवर राहिलेली बंडखोरी त्याला पुरेशी वाटत नव्हती. एकदा तरी पूर्ण स्त्री वेशात त्याला स्वतःला भेटायचं होतं. आपण आहे तसचं राहावंपेहराव बदलावा की शस्त्रक्रिया करावीया साऱ्या खूप पुढच्या गोष्टी होत्या. त्याला फक्त एक इच्छा पूर्ण करायची होती. जेव्हा ती इच्छा पूर्ण झाली तेव्हा त्याचं स्वतःवरचजगावरच प्रेम अजूनच वाढलं होतं.
आपल्याला जे वाटतंय त्यात अनैसर्गिक काहीही नाही. कणखरपणाभावना हे सारे लिंग विरहित असतातपण तरीही काही भावनांना स्त्रीत्वाचं लेबल लावून वेगळ बसवलं जातं. पण निसर्गतः सगळे सारखेच असतात. स्त्रीच्या आत पुरुष दडलेला असतो तर पुरुषांच्या आत स्त्री असते च कारण ह्या दोन जाती नाहीत तर त्या अंतःप्रेरणा असतात.

३.

तिनी विचारलं," बाबा women’s day असतो तसा men’s day का नसतो?"

निरागसतेच्या सुखी वयातून पार होत अल्लड तारुण्याच्या अधल्या मधल्या टप्प्यावर येत असलेल्या आपल्या लेकीला खर सांगावं की गोल गुळगुळीतथातूर मातुर उत्तर द्यावं या संभ्रमात बापानी दोन क्षण घालवले आणि मग तिचा हात हातात घेऊन म्हणाला.


अग बाई होणं काही सोपं नसतं. सतत दुसऱ्याचा विचार करून जगणं म्हणजे असतं बाई पण. कोणत्याही परिस्थितीत उभं राहणं म्हणजे असतं बाईपणशून्यातून नव्याची सुरुवात करून विश्व वसवणं म्हणजे असतं बाई पणउद्याचाच नाही तर परवाचा तेरवाचा विचार करून निर्णय घेणं म्हणजे असतं बाई होणंनाती जन्माला घालून ती जोपासणं असतं बाईपणसृजनाचा शोध घेत राहून आयुष्य सुंदर करणं असतं बाईपण,विश्वासावर विश्वास ठेवून विश्वास सार्थक करणं म्हणजे असतं बाईपणकितीही अंधार असला तरी प्रकाशाचे कान शोधणारी असते ती बाई,स्वतःची क्षमता माहित असूनही कमी लेखण म्हणजे असते बाईपण. पण कधीतरी स्त्री स्वतःची ओळख विसरतेस्वतःवरच्या अन्यायाला समाजव्यवस्थेचा न्याय समजायला लागतेकर्तव्य पार पाडता पाडता हक्क विसरून जाते तेव्हा तिला जागं करावं लागतंतिला सांगावं लागतं. बाई तू कमी नाहीस. सृष्टीचा आधार आहेस तू. तुझ्या पायावर तर उभा आहे हा सारा डोलारा. तुझी सहनशक्ती हा तुझा कमकुवतपणा नाही तर शक्ती आहेतुझं समर्पण तुला इतरांपेक्षा वेगळ ठरवतं. तुझा सृजनाचा शोध हा खरंतर कारण आहे आपल्या सुखी जीवनाचं. पुरुषाशी बरोबरी करणं म्हणजे सगळं मिळवणं नसतंपुरुषाच्या बरोबरीनं उभं राहणं म्हणजे असतं बाईपण. स्त्री फक्त बाई नसते ती बाई माणूस असते. त्या बाईमाणूस पणाला जगणं म्हणजे असतं बाईपण. बयो सोप्प नसतं बाई होणंबाई व्हावसं वाटणं. ती एक जबाबदारी असते माणूस पण समृद्ध करण्याचीआयुष्य सुंदर करण्याचीजगात सुख फुलवण्याची. ही सगळी स्वप्न पाहणाऱ्याती प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास घेणाऱ्या राकट कणखर हातांवर उब धरण्यासाठीचा हा एक दिवस. बाई असण्याचा अभिमान जागवण्याचा एक दिवस.
बाप बोलतच होताकाही लेकीसाठी काही स्वतःसाठीतिला कितपत कळत होतं माहित नाहीपण त्याला International Women’s Day नव्यानी कळत होता इतकं नक्की.
बाबा म्हणजे हा day तुमचा पण आहे कीबघ women मधे men आहेच किंवा female मधे male आहेच की. म्हणजे बाई माणसाला पूर्ण करते असंच तुला मगाचपासून म्हणायचं होतं ना. 
इतक्या साध्या  सोप्या शब्दात आयुष्याचं सार मांडू शकणाऱ्याजगणाऱ्या, तमाम स्त्रियांनास्त्रीत्वाचं भान असणाऱ्यांना सगळ्यांना  जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा....   

Tuesday, February 14, 2017

प्रेमानी जुळलेली नाळ

सुमारे १९५१ च्या वेळेसची गोष्ट आहे. नव्या आलेल्या सून बाईंना सासू बाईनी पोळ्या करायला सांगितल्या होत्या आणि त्या बाहेर गेल्या होत्या. दुसऱ्या मुलखातून आलेली पोरगी, त्या काळी शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेली वगैरे, पुस्तक वाचायची माहिती, स्वैपाक घरात मात्र जेमतेम कधी तरी पाउल टाकलेलं. भात करता यायचा, पण पहिल्याच दिवशी पोळ्या करायला सांगितल्या, पार दांडी उडली होती. परातीत आधी पाणी घालायचं की पीठ हे ही माहित नव्हतं. घर, घरातली माणसंच काय आजूबाजूची भाषा सुद्धा ओळखीची नव्हती. काय करायचं कसं करायचं काहीच सुचत नव्हतं. फक्त रडू कोसळत होतं. सगळा पसारा मांडून मग ती नवी सून रडत बसली होती. थोड्या वेळानी सासू बाई आल्या आणि सून बाईना अशा रडताना पाहून म्हणाल्या ,सुनबाई काय झालं. रडत रडत सून बाईनी सांगितलं मला पोळ्या कशा करतात माहित नाही. रडणाऱ्या सून बाईंना थोपटत सासूबाई म्हणाल्या, अहो एवढच ना. मग रडता कशाला सांगायचं आम्हाला. आता आम्ही शिकवू हो तुम्हाला पोळ्या करायला. सून बाईंची कळी खुलली आणि त्यांनी सासू बाईंकडून फक्त साध्या पोळ्याच नाही तर पुरण पोळ्या सुद्धा इतक्या सहज शिकून घेतल्या की खाणारा त्याची चव कधी विसरू शकायचा नाही. अहो जाहो म्हणल्यावर अंतर वाटतं असंच नसतं तर ते एकमेकांना आदर देणं असतं, एकमेकांच्या चुकांवर हसण्यापेक्षा त्यांना मदत करणं हा एखाद्या नात्याचा सुंदर पाया असू शकतो हे मी माझ्याच घरात पाहीलं. १९व्या वर्षी लग्न होऊनही ( त्या काळात घोडनवरीच) स्वैपाक न येणाऱ्या माझ्या आजीला तिच्या सासूनी एक नवा माणूस म्हणून घडवलं की आज ती गेल्यानंतरही गावात कोणाच्या ना कोणाच्या घरात , सहज म्हणून, कारणासाठी म्हणून आजीची आठवण नक्कीच निघत असते.

ज्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा नवा प्रघात सुरु झाला आहे त्याच दिवशी आजीचा वाढदिवस असणं हा नक्कीच फक्त एक योगायोग नव्हता. कर्नाटकातून एक दिवस लग्न करून पुण्या जवळच्या एका खेड्यात आली, खेडच ते फक्त फरक एवढाच होता की त्या गावातून रेल्वे लाईन जायची. मराठी बोलता यायचं पण ते ही तोडकं मोडकं, कन्नड मात्र अस्खलित लिहिता वाचता बोलता यायचं. इंग्रजीची देखील ओळख होती, पण आता एक वेगळी भाषा समोर येऊन ठाकली होती. पण तिनी ती भाषाच नाही तर ते गाव तिथली माणसं इतकी सहज आपलीशी केली की जणू ती त्याच मातीत जन्माला आली होती.

आजी म्हणल्यावर ज्या अनेक गोष्टी आठवतात त्यातली एक गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, गावातल्या विठोबाच्या देवळात सेवा करता करता ती कधी विष्णुदास झाली होती तिलाच कळल नव्हतं. गीतेचे अठरा अध्याय, विष्णू सहस्त्रनाम, तुकोबांचे अभंग तिच्या तोंडी सहज असायचे. ज्ञानेश्वरी, भागवताची किती पारायणं केली होती याची काही गणतीच नव्हती. मी तिला कधीच शांत निवांत बसलेलं पाहील नाही अर्थात शेवटचे दोन वर्ष जेव्हा ती अंथरुणाला खिळून होती तेव्हाचे सोडून. सतत कोणता तरी श्लोक, अभंग, नाहीतर किमान नामस्मरण तर सुरूच असायचं, बसल्या बसल्या फुलवाती तर कर, गजरे, हार गुंफत बस, वृत्तपत्र वाच, नवीन पुस्तक वाच, कोणाला तरी काहीतरी नवीन शिकव, एक ना अनेक गोष्टी पण ती सतत स्वतःला गुंतवून ठेवायची. देवळामध्ये बसून काकडा करताना , किंवा सहज दर्शनाला जाऊन रोजचे अभंग श्लोक म्हणताना ती अगदी तल्लीन होऊन जायची. देऊळ हे काही फक्त तिच्यासाठी देव दर्शन नव्हतं, तिथं येणाऱ्या प्रत्येकाशी दोन वाक्य तरी बोलून प्रत्त्येकाची संवादाची गरज भागवायची. एखाद्या सासुरवाशिणीला मायेनी आईचा आधार द्यायची, कोणाला धीर, कोणाला उमेद, कोणाला प्रेरणा साध्या शब्दातून ती अवघड, अगम्य गोष्टी साध्या करून सांगायची.  त्यामुळेच आजी म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर देवाच्या गाभाऱ्यात शांत तेवणारी समईच डोळ्यासमोर येते.

आजीला वाचनाची दांडगी हौस होती, कोणताही विषय तिच्या वाचनात वर्ज्य नसायचा. माझ्या मामा कडचं पुस्तकाचं वेड हे आजीकडूनच मिळालेलं बाळकडू होतं. नवीन पुस्तक हातात आलं की कधी संपेल याची इतकी घाई असायची की मग त्या वेळी घरात फक्त भात आमटी किंवा खिचडीचा स्वैपाक व्हायचा. आजोबांचं पुस्तकांशी वाकडं नव्हतं, पण त्यांना इतकं पुस्तकांच्या आहारी गेलेलं आवडायचं नाही, त्यामुळे त्यामुळे वादावादी व्हायची पण अशा वेळी आजीला ते काही ऐकूच यायचं नाही. वृत्तपत्र वाचून तिची स्वतःची अशी ठाम मत होती. पूर्वीची कॉग्रेसवासी असलेली आजी हळू हळू जनसंघ मग भाजपा कडे सरकली. पण तरीही कोणी चुकीचे वागतंय दिसलं तर तितकीच बोलूनही दाखवायची. राजकीय पक्षांवर आंधळं प्रेम तिनी कधीच केलं नव्हतं, पण राजकारणाचा अनुभव घ्यावा म्हणून ती एकदा चक्क नगरपालिकेच्या निवडणुकांना देखील उभी राहिली होती, पण नंतर त्या विषयावर कधी विचारलंच तर जाऊ दे गं कधी कधी थोडा वेडेपणा करायचा असतो, सारखं काय शहाण्या सारखं वागायचं.

आजीच्या आठवेन तितक्या आठवणी आहेत, वृत्तपत्र वाचून माझं मत विचारणारी आजी, मी काय लिहिते ते वाचून कधी कधी हे कसं सुचतं विचारणार, एखाद्या ज्वलंत प्रश्नांवर मला काय वाटतं ते विचारणारी, मऊसुत पुरणपोळ्या शिकवणारी, केसांना तेल पाणी करते म्हणत जवळ बसवून घेत तेलानी पार माखून टाकणारी, कधी कधी जुन्या विचारांची भासणारी, भावाला भेटून लहान मुलीसारखी खुश होणारी, कोणतीही साडी कोणत्याही ब्लाऊज वर घालून मला म्हातारीला कोण बघतंय म्हणणारी, होत नसतानाही हौस भागवायची म्हणून पतवंडाला न्हाऊ माखू घालणारी, वय साथ देत नसतानाही जावयासाठी म्हणून अधिक मासाची तयारी करणारी, नवीन मालिका अगदी आवडीनी बघणारी, कोणतीही नवीन गोष्ट करून तरी बघू म्हणणारी, आजी माझी आजी. तिला विमानात बसायची खूप इच्छा होती, मग तिच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाला मी तिला भेट म्हणून विमानाचं तिकीट दिलं होतं. ज्या प्रवासाला तिला १८, २० तास लागायचे तो प्रवास दीड तासात संपला, त्यामुळे उतरताना ती म्हणायची बस संपला पण इतक्यात. मग पुढचे काही दिवस तो छोटासा विमान प्रवास तिच्या सगळ्या गप्पांचा केंद्र बिंदू होता. वय वाढता वाढता तिच्यातली लहान मुलगी अजून जास्त उफाळून वर येताना दिसत होती. शेवटच्या भेटीत ती जेव्हा गाऊन घालून होती तेव्हा मला बघून म्हणाली बघ हे घालायचं राहिलं होतं, आता ते ही घालून पाहिलं.

आज आजी जिवंत असती तर ८५ वर्षांची तरुणी असती. आजीच्या आठवणी हाच एक आयुष्याचा खास ठेवा असतो, तिनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरवून पुरवून वापरताना तिचं आपल्या आयुष्यात असणं हे देखील सुखावणारं असतं. ती सासू म्हणून आई म्हणून वेगळी असू शकते, चुकू शकते पण आजी बनताना मात्र ती मेणाहून मऊ झालेली होती. वडिलांच्या आईपेक्षा काकणभर माया आईच्या आई वर जास्त असते कारण कुठे तरी नाळेची नाळ जुडलेली असते किमान माझ्या बाबतीत तर असंच होतं ! आजीचं गोष्टी ऐकणं, सांगणं हा देखील एक आनंदच असतो. त्या गोष्टीबरोबर आपण आजचं आयुष्य ताडून बघत असतो, भूतकाळात डोकावणं म्हणजे एक प्रकारे ते परत जगून घेणंच असतं ना. मुलीची मुलगी म्हणून एक खास नातं आधीच तयार झालेलं होतं, असं म्हणतात काही खास अनुवांशिक जनुक ही आईकडून फक्त लेकीला जातात, मला कायम कौतुक वाटायचं आजीच्या सहज कोणतही मिसळून जायचं, स्वतःला विसरून घेऊन  इतरांसाठी काही करण्याचं, जे मी माझ्या आई मध्ये देखील पाहिलं आयुष्यात मी मागितलेलं काही मिळणार असेल तर मला आजीला आजी बनवणारी ती खास जनुक हवी आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाधान शोधणारी, स्वतःचे आनंदाचे क्षण स्वतः निर्माण करायचे असतात, त्यासाठी कोणावर अवलंबून राहायचं नसतं सांगणारी, सर्वांवर प्रेम करता करता काहींवर थोडं जास्त प्रेम करणारी, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, तो ही चुकतो, देवच चुकतो तर आपली माणसांची काय बात असं सांगत चुका करण्याचा अधिकार देणारी आजी, माझी आजी !

मला खात्री आहे स्वर्ग वगैरे काही असेलच तर तिथे जाऊन ती तिच्या आवडत्या लेखकांना नक्की भेटली असेल, त्यांनी तिथेही काही नवीन लिहिलं असेल तर त्याचा फडशा तिनी कधीच पाडला असेल. नवीन विद्यार्थी शोधून त्यांना गीतेचे अध्याय, विष्णू सहस्त्रनाम शिकवत असेल. मऊसुत पुरणपोळ्या, खमंग बेसनाच्या लाडवांची कृती कोणाला तरी सांगत असेल, एखाद्या हळव्या जीवाला आधार देत असेल. आणि जर स्वर्ग नसेल तर जिथे कुठे जाईल तिथे ती नवा स्वर्ग तयार करत असेल. प्रेम दिवसाच्या दिवशी जन्मलेल्या माणसाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करता येईल कारण प्रेम चिरायूच असतं.