Sunday, July 31, 2016

इनसाईड आऊट

त्या शाळेतला पहिलाच दिवस होता, बाबांच्या या अशा सारख्या बदल्यांना खरच ती आता कंटाळली होती. तसे बाबा ही बदली रद्द करायचा प्रयत्न करत होते, पण तसे काही झालं नाही, ती ८ वीत होती, बदलीचे शहर आधीच्या गावापेक्षा मोठं होतं जिल्ह्याचं गाव होतं, आजीचे गाव पण तिकडून तासभराच्या अंतरावर होतं, त्यामुळे हो नाही करता करता त्या गावात जायचं ठरलं. मग बँकेतल्याच लोकांच्या सल्ल्यानी घर आणि शाळा ठरवून टाकली. इकडचं घर अगदी मोकळं ढाकळ होतं, पुढे अंगण, मागे झाडं, जवळपास पाच, सहा वर्ष वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं. त्या वर्षात ती, तिची बहिण झाडावर चढायला शिकल्या, पोहायला शिकल्याहोत्या कैऱ्या, चिंचा पाडण्यात तरबेज झाल्या होत्या. त्या गावात त्यांना खरा भारत, लोकं बघायला मिळत होती, शेती कशी करतात हे टीव्ही वर किंवा पुस्तकात वाचायची गरजच पडली नव्हती. निसर्गाचं शिक्षण घेत होत्या त्या. शाळेत पहिला नंबर तिचा ठरलेला होता, मग ती परीक्षा असो व स्पर्धा, पण मैदानावर मात्र ती खूप काही शिकत स्पर्धेच्या बाहेरच होती, ते सगळं तिला आवडत होतं, न आणि ण च्या शुद्ध भाषेच्या गुंत्यात न पडणारी मैत्री तिला खुणावत होती, कोणाच्याही घरून येणाऱ्या वासाबरोबर वानोळा ही यायचा, घराचा स्वैपाक फक्त एका घरापुरता नाही तर शेजार पाजारच्या साऱ्यांसाठी असायचा, हे ती बघत होती. आयुष्य शिकत होती. रात्रीचे दिवे, असो नसो, माणसं मात्र हाक मारल्यासरशी धावून येतात हे पाहत होती. आणि तिकडून एकदम काडेपेटीसारख्या बिल्डींगमध्ये राहायला गेल्यावर तिला रडूच कोसळलं. ह्या अशा घरात राहायचं? रांगोळी काढायला जागा नाही, फुलांसाठी जागा नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ, तिनी आणि तिच्या बहिणीनी एकच घोष लावला होता. तिथल्या मैत्रिणींची नावं काढत काढत रात्र कशी तरी काढली. सकाळी बाबांना तिनी जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे रहा इथे, मी त्या गावात राहते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आई नवीन घर लावता लावता आधीच वैतागली होती, तिला तिनी एक धपाटा घातला आणी परत तिच्या कामाला गेली. त्याच दिवशी तिच्या शाळेचा पहिला दिवस होता, नकोच वाटतं होतं सगळ. बाबांनी जवळ घेतलं, आणी समजावलं काहीतरी, मग म्हणाले, चाल एक चक्कर मारून येऊ स्कूटर वर. आणि मग तिला एका दुकानात नेऊन छान पेन, कंपास बॉक्स घेऊन दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आतापर्यंत झिरपत नव्हतं.
शाळेची मोठी इमारत बघूनच तिला दडपायला झालं, आपला वर्ग कसा ओळखायचा? शाळा घराजवळ होती म्हणून किमान रस्त्यात हरवायची तरी भीती नव्हती. कशी बशी विचारत शोधात ती वर्गात पोहोचली, आपल्यापेक्षा चटपटीत मुलं, मुली पाहून ती अजूनच बुजली, तशीच खाली मान घालून जो बाक रिकामा दिसला तिथं जाऊन बसली,  कोणी विचारलं तर जेम तेम पुटपुटत्या स्वरात नाव सांगायची. शिक्षकांपैकी काहींनी तिची दखल घेतली काहींनी विचारलंही नाही, तशीही शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले होतेच. तिला जुन्या शाळेची बचकभर आठवण आली, दुपारी एकटीच बसून डबा खाताना तिला भयंकर रडू कोसळत होतं. उत्तर माहीत असूनही द्यायचं नाही असा तिनी चंगच बांधला होता, कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचा नाही, विचारल्याशिवाय बोलायची नाही, इतर कोणाशी मैत्री तर बिलकुल नाहीच नाही, ती जशी नव्हती तशी ती व्हायचा प्रयत्न करत होती. उगाचच चिडत होती, आधी किती छान गायची इथे गाण्याच्या क्लास ला जायला पण नाही म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीवरून हिचं वाद घालणं, आईचे रागावणं, मग चिडणं, त्यावर उतारा म्हणून हिचं रडणं हा त्यांच्या घरातला रोजचाच कार्यक्रम होत चालला होता. बाबा मध्ये पडून सावरू बघत होते पण ती काही बधायला तयार नव्हती. तेरा, चौदा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या मुली कशा छान केसांचे भंग पाडायच्या, शाम्पू, पिना, पावडर अशा कशाबद्दल बोलायच्या, पण तिला ते काही माहिती ही नव्हतं आणि त्याबद्दल बोलावसं वाटायचंही नाही. तिच्या लांब वेण्या नको वाटायच्या, गायला नको वाटायचं, सगळ्या जगावर रागवावस वाटायचं.
मग कधी तरी एका मोकळ्या तासाला त्या बाई त्यांच्या वर्गावर आल्या, त्या म्हणे मोठ्या वर्गाना शिकवायच्या. खांद्यापर्यंत रुळतील असे मोकळे सोडलेले कुरळे केस, त्यावर दोन छोट्या पिना, एका पिनेत गजरा माळलेला, आकाशी रंगाची साडी घट्ट चोपून बसवलेली, कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावलेली. आणि तोंडभर हसू.  तिला त्यांच्याकडे बघतच बसावसं वाटलं. का कोणास ठाऊक तिला त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटली. त्या दिवशी त्यांनी वर्गात कविता सांगायला सुरुवात केली, आणि तिच्याही न नकळत तिचा हात वर गेला,जवळ जवळ महिना दीड महिन्यांनी तिला वर्गात काही तरी बोलावसं वाटलं. या नव्या बाई शेतकऱ्यांची कैफियत सांगत होत्या कविता, कथा, अनुभव सारे अनुभव देत होत्या, तिनी एकदम हात वर करून बाई मी काही बोलू का?
आख्ख्या वर्गानं मागं वळून पाहिलं ही आता काय बोलणार, बाई इतक्या छान सांगताहेत आणी आता हिचं काय मधेच, सारा वर्ग तिला शिष्टाम्बिका म्हणायचा. बाईनी तिला बोलायला सांगितलं, मग ती त्यांचे आधीच गाव, तिथल्या मैत्रिणी, त्या कशा शेतात काम करायच्या, त्यांच्या वडिलांना कसा कधीच नीट मोबदला मिळायचा नाही, मग वर्गातल्या एका मुलीच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, हे सगळं सांगताना तिचा सगळा बांध फुटला. आणि मग ती रडतच खाली बसली, बाईं तिच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्या स्पर्शामुळे तिला अजूनच आश्वस्त वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मोकळ वाटलं. मग हळू हळू सगळंच गाड रस्त्यावर आलं, ३, ४ दिवसात कधी तरी तिला पहिलं न्हाण देखील आलं. आणि मग सगळाच गुंता सुटल्यासारखं वाटलं. ती गायला लागली होती, मैत्रिणी जमवायला लागली होती, कोशातून फुलपाखरासारखी बाहेर पडली होती.  हे गाव, घर , ही शाळा सगळं तिला आवडायला लागलं होतं.
खूप वर्षांनी मुलीसोबत इनसाईड आउट पिक्चर बघताना तिला वाटलं अरे ही तर माझीच गोष्ट आहे, यांना कशी कळली. मीच तर आहे ती मधेच हसणं, खुश होणं विसरलेली मुलगी. मीच तर होते ना अशी सगळ्या भावनांचा गुंताडा करून जगावर रुसलेली मुलगी. आउटसाईड काहीही असलं तरी इन सगळं एकच असतं, सगळ्यांची गोष्ट येऊन जाऊन एकच असते.
तुकाराम म्हणतात तेच खरं आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरू कोटी कोटी, परि अंती ब्रह्म एकले... !!!!!!



संदर्भ : इनसाईड आऊट 
https://en.wikipedia.org/wiki/Inside_Out_(2015_film)
     

Thursday, July 28, 2016

जुनी कोणी तरी

सखे ग ,
धावत ये पूर्वीसारखी,
आणि मार मिठी पूर्वीसारखीच,

जेव्हा,
आपल्या दोघींव्यतिरिक्त जगच नव्हतं तेव्हा,
प्रत्येक क्षण सोबत असावासायचा तेव्हा,

निःशब्दतेतही भगवदगीता सापडायची तेव्हा,
माझ्याआधी तुझं नाव आठवायचं तेव्हा,
फार पूर्वी नाही पण,
आपण पहिल्या प्रेमात होतो तेव्हा,

जेव्हा,
शब्दांचे अर्थ नव्याने कळत होते, तेव्हा,
फुलपाखरांचे रंग आपण चोरत होतो तेव्हा,
आरश्यांची नव्यानं ओळख झाली होती तेव्हा ,
स्वतःच स्वतःला नव्यानं भेटत होतो तेव्हा,

या सगळ्या तेव्हांना भेटायचीस ना तशीच भेट कधीतरी..

आताही भेटतेस तू कधीतरी
पण आता ना
आपल्या जगात तू आणि मी सोडून सगळे असतो,
प्रत्येक क्षणावर नात्यांचे हिशोब असतात,
शब्दांमध्ये अर्थही दडलेले असतात,
बोलतो आपण अर्थाचं पण त्यातून शब्द निसटलेले असतात,

जुन्या प्रेमाच्या कथा कधीच विसरतात,
फुलपाखराचे रंग उडून जातात,
आरसा फसवतो हे लक्षात येतं,
सोबतच्या आठवणीही विरतात

आताही भेटतेस तू त्याच मैत्रिणीच्या हक्कानं
गळ्यातही येऊन पडतेस पूर्वीसारखीच
समोर फक्त मी असले तरी
विचारात मात्र मी नसते.






Sunday, July 24, 2016

कागदावरच प्रतिबिंब

ती तेव्हा एक चौदा पंधरा वर्षाची असावी, घरी कोणी नव्हतं, अभ्यास करून झालेला होता. मोठ्या जबाबदारीनं तिच्यावर घर सोडलं होतं. तिच्या आईचं म्हणणं होतं, ही तर अगदी सद्धी गोष्ट आहे, आपल्या घरात आपल्याला कसली भीती?, त्यामुळे अगदी १० वर्षांची असल्यापासून आई तिला अशी एकटी सोडून जायची, कधी गरज म्हणून तर कधी एक नवीन अनुभव शिकवण्यासाठी. त्यावेळी टीव्ही वर आजच्या सारखं २४ तास कोणी ना कोणी नाचत, बोलत नसायचं, जेवायच्या, झोपायच्या वेळेसारखा टीव्ही पण ठराविकच वेळ असायचा.
त्या दिवशी दुसरं काही करण्याचा मूड नव्हता म्हणून तिला घर आवरण्याची हुक्की आली. अशी फार कमी वेळी तिलिया हुक्की यायची, पण आली तर मग इकडचं घर तिकडं व्हायचं. त्या ही दिवशी तिनी तिच्या कपाटापासून सुरु केलं, कपडे सगळे नीट ठेवून झाल्यावर, आज आई बाबांचे कपाट ही आवरावं असं तिला वाटलं. आईच्या साड्या नीट घडी केलेल्याच होत्या, तिच्या कपाटासारखा सावळा गोंधळ नव्हता तिथं, पण मग साडीच्या कप्प्याच्या खालचा कागद बदलताना तिला तिथं काही दहा , वीस रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि अगदी हसूच आलं, तिच्या दप्तरात कधी कधी तिला असेच आठ आणे, एखादा रुपया मिळायचा तो ही तिनीच कधी तरी टाकलेला असायचा, पण अनपेक्षितपणे असे पैसे मिळण्यातला आनंद वेगळाच होता. तिच्या या सवयीचं मूळ आता तिला कळल होतं. साड्या नीट लावून झाल्या मग ब्लाऊजचा कप्पा लावता लावता तिला एक पिशवी मिळाली, अगदी उत्सुकतेनं तिनं ते उघडलं, त्यात काही पत्र दिसत होती. खरंतर आई नी खूप वेळा सांगितलं होतं अशी कोणाचीही पत्र, डायरी न विचारता वाचू नये, पण आईच्या कप्प्यात अशी कोणाची पत्र असावीत. ती पण अशी जपून ठेवलेली. तिनी मनातल्या मनात देवाची माफी मागून ती पत्र वाचायला सुरुवात केली. लग्नाच्या आधी तिच्या बाबांनी तिच्या आईला लिहिलेली, ४, ५ पत्रं होती ती. किती वेगळे होते बाबा त्या पत्रांमध्ये, अगदी एखाद्या प्रियकारासारखेच, तिला खूप भारी वाटलं. त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पेन नी ती पत्रं लिहिली होती, मग कुठे फुलं होती, एका पत्रावर तर मोगऱ्याचे अत्तर लावलेलं होतं, आईला अत्तरं आवडतात हे तिला त्या दिवशी नव्यानंच कळत होतं.
आई वडील म्हणून आपण आपल्या आई वडिलांना अगदी गृहीत धरून चालतो, ते एकमेकांशी किराण सामान, नातेवाईक, मुलं, पाहुणे यावरच बोलत असतील असा आपला ठाम विश्वास असतो, पण मग ते प्रियकर प्रेयसी नसतात का? फक्त समाजानी गाठ बांधून दिली म्हणून एकत्र राहायचं बंधन त्यांनी स्वीकारलं असतं का? हे काही कळण्याचं ते वयही नव्हतं, पण तिला अगदी फुलावर झुलल्यासारखं वाटत होतं.   आई वडिलांना एक वेगळीच ओळख त्या दिवशी होत होती. प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधण्याचेच दिवस होते ते, आई वडिलांवर अजून जास्त प्रेम वाटायला लागलं होतं.
कोणाला कळायच्या आधीच तिनी तो सगळा मौल्यवान ऐवज परत जशाचा तसा ठेवला, आणि आईचे कपाट लावल्याच्या सगळ्या खुणा मिटवून दिल्या. पण आपण पण आपल्या नवऱ्याला अशी पत्रं लिहायची, आणि त्याच्याकडून लिहून घ्यायची असं तिनी ठरवलं होतं.
प्रेमात पडायचं वय आहे ह्याची सगळीकडून जाणीव झाल्यावर सिने अभिनेते, क्रिकेटपटू असा आसपासच्या तमाम मदनांवर भाळून झाल्यावर तिला कॉलेजमधल्या प्रेमाची आठवण झाली, कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, कोणाबरोबर तरी फिरणं म्हणजे प्रेम, कोणालातरी आपण आवडणं म्हणजे प्रेम, सारखं बघत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम अशा प्रेमाच्या अनेक व्याख्या अनुभवून होईपर्यंत कॉलेज संपलं होतं, पण हात अजूनही मोकळेच होते.
ठरायच्या वयात लग्न ठरलं, इंटरनेट वरून फोटो पाहिले, एकमेकांशी chat करून मत जाणून घेतली, आणि मग भेटून बोलून सावरून हो म्हणलं. साखरपुडा, लग्न यामध्ये असलेल्या ४, ५ महिन्यात फोन वर सतत बोलणं होतंच, भेटणं तर must होतं. लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपल आणि तिला एकदम घरी कपाट बघून आठवण आली आई बाबांच्या लग्नाआधीच्या पत्रांची. अरे हे तर करायचंच राहिलं.  पत्र फक्त परीक्षेत नाहीतर सरकारी ऑफिसमध्ये लिहिली जात होती तेव्हा, पण तरीही तिनी निश्चयान एक तरी पत्र लिहायचा चंग बांधला. काळ किती बदलला होता, बाबा साखरपुड्यानंतर आईला थेट लग्नात भेटले होते, आणि फोन वगैरे तर तेव्हा फक्त चित्रपटांमध्येच दिसायचे. बाबांनी त्यांच्या अपेक्षा, घराच्या माणसांची ओळख असं काय काय लिहिलं होतं पत्रात, पण आता आपण काय लिहायचं, जवळपास रोज त्याला भेटणं होत होते, बोलणं तर स्वतःशी होत नाही इतकं त्याच्याशी होत होतं, मग आता या सगळ्यातून असं उरलेलं काय आहे जे आपण पत्रात लिहायचं? मोठ्ठा प्रश्न घेऊन ती पत्र लिहायला बसली. पण जसं लिहायला सुरु केलं तसं अगदी सहज सुचत गेलं, लिहित राहिली इमेल राहील कॉम्पुटर मध्ये कदाचित जगाच्या अंतापर्यंत मिटणारही नाही, पण त्याला गंध नसणार हाताचा, त्याला स्पर्श नसणार प्रेमाचा. आपली मुलं मोठी झाल्यावर विचारणार नाहीत आपल्याला आपली गोष्ट, आपल्या लग्नाची गोष्ट, किंवा कदाचित आपणच त्यांना सांगू how I met your mother. जगातल्या ९९.९९ % सर्वसामान्यांसारखी आपली सामान्यळू गोष्ट. फोटो जपतात काही खास क्षण तशीच पत्रही जागवतात जुन्या आठवणी, ती मजा नसते इमेल, मेसेज त्यातल्या स्माईलीमध्ये. माझं तुझ्यावरच प्रेम दाखवायचा एक मार्ग असेही समज या पत्राला. अक्षर पुसत होतील, पान पिवळ पडेल, पण पत्राची आठवण मात्र कधीच संपणार नाही...
ती लिहित होती, खूप वर्षांपासून साचलेले, आत मध्ये दाटलेलं प्रेम ती कागदावर उतरवत होती आपल्या पोरांना रोमिओ ज्युलीएट आई बापामध्ये दिसावेत म्हणून लिहित होती.....    


Monday, July 18, 2016

वेण्यांचे झाड


मैत्री म्हणजे हे कळायच्या आधीच किंवा मैत्री हा शब्द उच्चारायच्या आधीपासूनच होती तिची माझी गट्टी. ती माझी आणि मी तिची असा आमचा मंत्र होता तेव्हा. बहिणी म्हणा मैत्रिणी म्हणा, सख्या म्हणा काही फरक न पडण्याचं वय होतं ते. कोणतेही रुसवे फुगवे २ मिनिटांच्या वर न उरण्याचा काळ होता तो. आता वयही वाढलीत आणि निरागसता कधीच हरवलीये, पण तरीही काही हळव्या आठवणी आजही मनात पिंगा घालतात आणि डोळ्यात पाणी आणतात.
मैत्रीण माझी लांब सडक केसांची. मस्त मोठ्या दोन वेण्या मिरवणारी. कमरेपर्यंत रुळणाऱ्या लांब वेण्या हीच खरी तिची ओळख होती. कित्येक क्षण गुंतलेले होते तिच्या त्या लांब वेण्यांमध्ये. कधी व्हायच्या त्या वेण्या शेपूट , कधी असायच्या झाडू, कधी असायच्या ओढण्या, कधी असायच्या जोड साखळी. मोकळ्या केसांपेक्षाही जास्त आवडायच्या त्या वेण्या, अगदी जवळच्या वाटायच्या त्या वेण्या. एखादा मान मिरवावा तश्या मिरवल्या त्या वेण्या तिनी आणि मी ही.....
आज इतक्या वर्षांनंतरही आठवतंय मावशी तिचे केस किती निगुतिनी सांभाळायची.आज असंही वाटतं की तिचे लांब केस बहुदा मावशीचीच हौस होती. शनिवारी वाटीभर तेल सहज तिच्या केसात मुरून जायचं, मग रविवारी शिकेकाईच्या पाण्यानी आंघोळ, ती शिकेकाई डोळ्यात जातीये म्हणून तिचा आरडओरडा, आणि मग केस वाळल्यावर फणीनी ती शिकेकाई काढून टाकणं. अगदी आवडीनं आणि सहज करायची मावशी. आज फणी बघायलाही मिळत नाही, आणि शिकेकाई चे नाव फक्त शाम्पू मध्ये वाचायला मिळत.  
आयुष्याच्या अशाच कुठल्यातरी अल्लड वेळी खेळता खेळता मी तिला म्हणलं,’ जमिनीत बी पुरलं की मग झाड येतं आपल्याला शाळेत शिकवलंय ना, मग आपण तुझी वेणी जमिनीत पुरुयात ना आणि बघुयात काय होतंय ते. त्या वेणीचही कदाचित झाड येईल मग आपण अशी झाडं सगळ्यांना देऊयात. पहिलं झाड मी मला घेणार. दर तीन महिन्यांनी बाबांबरोबर सलून मध्ये जाऊन केस कापून यायचा खरंतर मला कंटाळा यायचा, पण का कोणास ठाऊक ते केस सत्र थांबवण्यासाठी रडावं, नको म्हणावं असेही कधी वाटलं नाही. केस सांभाळण्याची आपली क्षमता मी चांगलीच ओळखून होते त्या मुळे असेल कदाचित, पण तिच्या वेण्या बघून मी खुश होते, त्यामुळे मला केस कापण्याच दुःख नव्हतं, किमान असं आत्ता तरी वाटतं.
मग एक दिवस दोघींनी हिय्या करून ठरवलं आज आपण वेण्यांची झाडं लावायची म्हणून. दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही दोघी गुपचूप बागेत जाऊन बसलो, मग एक छोटा खड्डा खणला आणि त्यात वेणी पुरली. आणि मग दर ५ मिनिटांनी माती थोडीशी उकरायची आणि बघायचं झाड फुटलं का. तास झाला, दोन तास झाला, पण नवीन वेणीच कुठेच चिन्ह दिसेना, संध्याकाळ झाली, अंधार दाटायला लागला तशी मैत्रीण रडवेली झाली, झाड तर आलंच नाही आणि केसही असे मातीत बरबटलेले.. कसेतरी केस सोडवले त्या चिखलातून. घरी जाताना तिला सोबत म्हणून गेले राणी लक्ष्मीबाईच्या आवेशात, पण वेण्यांकडे, चिखलाकडे पाहिल्यावर लक्ष्मीबाई गळून पडली आणि भित्री राणी तेवढी उरली. मावशी घराचे सगळे रागावतील असे वाटलं, म्हणून ओरडून घेण्यासाठी खोटी कारण काही सांगण्याऐवजी आम्ही सगळी खरी खरी गोष्ट सांगितली आणि त्या सगळ्यांच्या हसू बघून आम्हाला अजूनच रडायला आलं.
त्यानंतर कित्येक दिवस सगळे आम्हाला विचारायचे वेण्यांच्या झाडाबद्दल, वाईट्ट मोठ्या माणसांचा राग येऊन मी म्हणायचे तुमच्या सारखी चिडवणारी, अविश्वासी माणसं असतात ना म्हणून आलं नाही आमचं वेण्यांचे झाड, नाहीतर नक्की आलं असतं.

वर्ष सरली, आणि सरत्या वर्षांबरोबर आम्हीही बदललो, मैत्रीचे संदर्भ बदलले. अंतर वाढली तरी धागा अजूनही कुठे तरी कायम होता. मैत्रीण भेटली त्याच ओढीनं भेटली आणि जाणवलं काहीतरी सुटलंय, गायब झालेल्या वेण्यांनी जणू सोबत नेलं होतं आमचे बालपण. वयात येताना, बाकीच्या सगळ्यांसारख दिसायच्या नादात, तिनीही त्या वेण्यांना टाटा केला होता. 
निरागसतेच्या ज्या जगाला आम्ही निरोप देऊन आलो होतो, त्याच जगात शांत पहुडलेल्या असाव्यात त्या वेण्या. वाट पाहत असाव्यात परत दोन मैत्रिणींची ज्यांच्या चांगुलपणाच्या जोरावर त्या वेण्यांची झाडं येणार आहेत अशा दोन घट्ट मैत्रिणींची. !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Sunday, March 6, 2016

स्वयम्

नेहमीसारखा मी पळत पळत बस स्टॉप गाठला. सकाळी घाईत आरशात बघायला वेळच मिळाला नव्हता. टिकली लावली होती की नाही हे ही आठवत नव्हते. आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष करतो याचंच मला हसू फुटलं. घड्याळाकडे पाहिलं आणि नंतर नेहेमीचे चेहरे शोधात बसस्टॉपवरून नजर फिरवली. कोपऱ्यात उभा असलेला तो माझ्याकडे पाहून प्रसन्न हसला. मला काहीच कळेना, ओळखीचा म्हणावा तर चेहरा आठवत नव्हताआणि अनोळखी असेल तर उगा कशाला स्माईलदेऊन त्याला भाव द्यायचा. परत मनात आलं. आपल्या गबाळग्रंथी वेशाकडे पाहून तर हसला नसेल ना, आणि मी जवळपासच्या गाडीचा आरसा शोधायला लागले, चेहरा तर ठीक होता, रोजच्यासारखाच, आरशात बघताना काही वेगळ तरी वाटलं नव्हतं, माझा रोजचाच  ओळखीचा चेहरा आरशात दिसला होता. मग तो का हसला? मी प्रश्नावर विचार करत बसची वाट पहात होते. तो ही तिथेच त्याच्या स्मित हास्यासह बसची वाट पाहत होता. त्याचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते, संवादाची आस लावत होते, या सगळ्यात बस आली आणि गच्च भरलेल्या बस मध्ये मी त्याला विसरूनही गेले.

ऑफिस मध्ये काम करतानाही मनात कुठेतरी काहीतरी वेगळे वाटत होते.   एक अस्वस्थता वाटत होती, मन ओढून आणलं तर कामात लागत नव्हतं मग सरळ हाफ डे टाकून ऑफीसबाहेर पडले, कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हत, मोकाट सुटलेल्या मनाच्या मागे मी हि चालत चालले होते. मग पाय वळतील तिकडे वळवायचे, विचारांचे रस्ते बंद केले, तर आज असे का वाटतंय याचं उत्तर बापुडा मेंदू शोधात होता. सकाळच्या त्या एका अनोळखी स्मितहास्याचा हा परिणाम असावा असा निष्कर्षही मग निघाला. चालता चालता अचानक नाव्याव्ने उघडलेल्या मॉलपाशी पाय थबकले. जरा गार झुळूक घ्यावी म्हणून आत शिरले.

मग शांतपणे कॉफीचे दोन घुटके घशाखाली उतरल्यावर वाटलं, असा ब्रेक हवाच आयुष्यात, काहीच न ठरवता, असे काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठीचे क्षण जोडायला हवे. मग एक दहा पंधरा मिनिट गप्पा मारत कॉफी पिणारी, बिझनेस च्या गप्पा मारणारी, मस्ती करणारी अ लॉट कॅन हॅपन हे वाक्य सार्थ करणारी लोकं बघून कंटाळा आला तेव्हा मात्र मी बाहेरचा रस्ता धरला. असेच फिरता फिरता एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सुंदरशा नारिंगी-पिवळ्या रंगाच्या कुर्त्याने माझं लक्ष खेचलंखरंतर. मला हे असलं विंडो शॉपिंग कधीच आवडत नाही, कोणीतरी ते मुद्दाम तुंच्याकडून करवून घेतं असे वाटतं. पण एखादा दिवसा वेगळा असतो, मी आत जाऊन विचारलं आणि चक्क तो अंगाला लावून बघावा म्हणून मागितला, एकटीनं खरेदी करायला मला आवडत नाही, कारण आपण घेतलेलं आपल्याला नंतर परत कधी आवडेल याचाही खात्री नसते, पण दुअसार्या कोणी सांगितले छान दिसतंय तर त्या आवडण्यावर एक प्रकारची मोहर बसते. मी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बघ्यानाऐवजी, फक्त मापाला बरोबर आहे ना बघत होते, तेवढ्यात कोणीतरी मागून म्हणाले वाह सुपर्ब, मस्त दिसतोय, घेच तू हा कुर्ता.' मला एकेरीवर येऊन सांगणारा कोणता मित्र आत्ता इथे येऊन टपकला म्हणून माग पाहिले तर चक्क बसस्टॉप वाला. जाम तिडीक आली, नकोच घ्यायला हा कुर्ता, सरळ जाऊन त्याला विचारावं काय चाललंय काय?
 पण का कोणास ठाऊक त्या कुर्त्याची भुरळ जास्त पडली होती. हा रंग आपल्याकडे असावे असे प्रकर्षानं वाटत होत त्यामुळे पैसे देऊन सरळ बाहेर पडले. 'एक्सक्युज मी, जस्ट अ मिनिट, कॅन वी हॅव अ कप ऑफ टी , कॉफी?
आगाऊपणाची हद्द झाली होती, मी न वळताच चालता चालता सांगितलं मी चहा घेत नाही,
बर मग आपण कॉफी घेऊ, हा लोचट सोडायलाच तयार नव्हता.
दोन सेकंद मी थांबले, तर लगेच म्हणाला हे बघा इथेच आहे शेजारी
ही काय जबरदस्ती? मला नकोय आत्ता कॉफी.
मग मला कंपनी द्या.
एरवी कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मी चक्क त्या अनोळखी माणसाला कंपनी देण्यासाठी कॉफी शॉप मध्ये गेले. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, पण ती ही मानभावीपणे! टेबलवर मी त्याला निरखून पाहत होते, आणि मनाशी काही आडाखे बांधत होते, उंच म्हणावा असाच होता, रंग सावळाच पण त्याला शोभून दिसत होता. नाक डोळे अगदी तरतरीत होते. हसल्यावर उजव्या गालावर पडणारी खळी पाहून याच्या मागे पोरीच काय बायका सुद्धा लागत असणार हे नक्की कळत होतं. वयाचा मात्र अंदाज बांधता येत नव्हता, एखाद दुसरा पंधरा केस चमकत होता, पण ते सोडलं तर फार काही वयाची जाणीव करून देणारे दिसत नव्हते, वागण्यात, बोलण्यात एक आदब, सौजन्य होतं. कुठेही थिल्लरपणा, उथळपणा  नव्हता. पण मग तरीही हा असा अनोळखी पोरींशी कसा काय बोलत असेल. माझा गोंधळ वाढतच होता.
'झालं का  निरीक्षण पूर्ण? मग काय वर्णन करणार पोलिसांकडे?' त्याने हसत हसत विचारलं
'वय अंदाजे २७-२८, उंची सुमारे ५ फुट ९ इंच, उजव्या गालावर खाली पडते, डाव्या भुवईच्या वर एक खोक पडल्याची खूण आहे. असा वर्णनाचा इसम दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
मुलींच्या फसवणुकीच्या अनेक प्रकरणात या इसमाचा हात आहे. कितीही गोड बोलला, आग्रह केला तरी याच्या सोबत कॉफी प्यायला जाऊ नका. असं वर्णन करते पोलिसांकडे. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? माझा राग शब्दाशब्दातून ठीपकत होता.
'ह्म्म्म बाकी तसं सगळ ठीक आहा,ए वय थोडाफार कमी जास्त चालतंच म्हणा उंचीचा अंदाज मात्र २ इंचांनी चुकला, आईस टी घ्या आणि शांत व्हा.' तो शांतपणे म्हणाला.
'पहिले मला तुमचं नाव सांगा, माझा पाठलाग का करताय ते सांगा, मग मी ठरवेन इथं थांबायचं की नाही आणि हा आईस टी घ्यायचा की नाही ते.
'तुमचा पाठलाग वगैरे काही करत नाहीये, अगदीच योगायोगाने, आजच्या दिवसात आपली दोनदा भेट झाली इतकंच. या शहरातल्या लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी अशक्य कोटीतली घटना. पण घडली खरी. आणि माझ नाव म्हणाल तर त्या दिवशी, त्या क्षणी जे वाटेल ते सांगतो. नाव ही आपली खरच ओळख असते का? बहुतेक ठिकाणी आपण नावाशिवायच वावरत असतो, मग माझ नाव मी तुम्हाला सांगून खरच फरक पडेल? आत्ता तुमच्याशी बोलताना मला वाटल माझं नवा स्वयम असत तर छान झालं असते, त्यामुळे आपण हे च नाव ठेउयात. म्हणजे माझं नाव घेता घेता स्वतःलाही साद घालता येते.
२१व्या शतकातला खराखुरा लखोबा लोखंडे म्हणायच वाटत याला. ' मी मनात म्हणलं.
'मग आता तुला वाटत असेल माझा तपकिरीचा धंदा आहे म्हणून' स्वयम म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरचे  बारा वाजलेले कोणालाही वाचता आले असते, स्वयम् कसा काय त्याला अपवाद असेल.
'तुला कसं कळल मी मनातल्या मनात काय बोलले ते?' मी माझ्याही नकळत बोलून गेले.
'हे बघ ' त्याने अगदी गांभीर्याने बोलायला सुरुवात केली. ,' तू विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस पण मी तुला काही इथ इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा फ्लर्टीग करण्यासाठी बोलावलं नाही, तुझे डोळे खूप बोलके आहेत, पारदर्शी आहेत. तुझं हसणं मोकळं आणि मनमोहक आहे. इतके सुंदर संवाद साधणारे डोळे, क्षणात आपलंसं करणारं हसू मी याआधी बघितलं नव्हतं, तुला हे सकाळीच सांगावस वाटलं, पण, सांगितलं नाही, किंवा राहून गेलं. तू काहीतरी चुकीचा अर्थ काढशील म्हणूनही कदाचित मी गप्प राहिलो असेन पण आवडलेल्या अनोळखी माणसाची एकाच दिवसात दोनदा भेट झाली तेव्हा मात्र राहवलं गेलं नाही मला. आणि हे तुला सांगितलेच पाहिजे म्हणून मग तूला इकडे घेऊन आलो.'
या त्याच्या बोलण्यावर काय बोलावं हेच मला कळेना  मी मख्खपणे त्याच्याकडे बघत राहिले.
'आणि अजून एक सांगायचंराहिलं, मला तुझं नाव माहित नाही, आणि माहित करून घेण्याची गरजही वाटत नाही, कारण मला जे सांगायचं होतं ते मी सांगितले.
'मला हे सांगून तुला काय मिळालं? सॉरी तुम्हीवरून तू वर आले. पण हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? कितीही नाकारलं तरी मला हा मुलींना फूस लावण्याचाच प्रकार वाटतो. मि. सौन्दर्यौपासक. 'जगाची ही रीतच मला कळत नाही, प्रत्येक गोष्टीला, कारण, प्रत्येक नात्याला लेबल लावायची काय गरज आहे, साधं चांगल म्हणायला,अॅप्रिशिएट करायलाही  वेळ ओळख का हवी?' जरा घुश्यातच तो बोलला. ती उलटून काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, 'माझ्या कॉफीचे बिल मी दिलंय, तुझ्या आईस टी च तू दे, मी दिले तर तू परत त्याचे काहीतरी अर्थ शोधायला जाशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कोणीतरी तुला तुझे डोळे, हसन सुंदर, निरागस असल्याचे सांगितले होतं. आणि हो माझ्या रिक्वेस्टला हो म्हणल्याबद्दल  थंक्स. आयुष्यात मोकळेपणानी जगायला शीक.
त्यादिवशीआरशात बघताना पहिल्यांदा जाणवलं की खरेच माझे डोळे नितळ आहेत. कुणाशीही बोलायची उर्मी त्यांच्यात ठासून भरली आहे. पण कोणा स्वयम नावाच्या अनोळखी माणसाने संगे पर्यंत मला का कळली नाही ही गोष्ट?, चार शब्दांनी जे काम होणार नाही ते माझ्या एका हास्यानी होतं हे ही मला नव्यानेच कळल. माझ्या आजू बाजूच्या लोकांना हे कधी कळलचं नाही की त्यांनी हे कधी मला सांगितलं नाही? दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा माझ्या मलाच या गोष्टी का कळू नये? थेट वर्मावरच घाव घालणारा प्रश्न माझी डोळ्यांनी मला विचारला होता, उत्तर माहीत नाही, पण किमान प्रश्न उभे केल्याबद्दल थँक्यू स्वयम्!
एखादं वादळ येतं आणि जातपण जाताना आपल्या खुणा ठेवून जातं. तसाच त्या अपरिचित स्वयम् नावाच्या वादळाच झालं होतं. माझ्या वागण्यात, बोलण्यात, देहबोलीत एक वेगळच फरक होता. पण या फरकाला देखील कारणाच बंधन नको होतं.
विचारांमध्ये बदल झाले की आपोआप ते वागण्यातही येतात याचा अनुभव मी घेत होते. त्यामुळेच की काय वाढदिवसाला स्वतःच स्वतःला काहीतरी भेट द्यावीशी वाटली. आपण सगळेच स्वतःचे उत्तम टीकाकार, समीक्षक, मित्र असतो. किमान वाढदिवशी तरी या टीकाकाराला खुश करूया म्हणून पुस्तक खरेदीला गेले, तशी घ्यायच्या पुस्तकांची यादी तयार होती, पण तरीही पुस्तकंचे भांडार समोर असले की पुस्तक किमान चाळायचा तरी मोह होतोच. त्यामुळे यादीत नसलेली दोन पुस्तकही सोबत येऊ घातली होती. निघता निघता सीडीज सेक्शन मध्ये जरा पाय थबकले, लताच्या शास्त्रीय गाण्यांची एक डीव्हीडी अगदी हाक मारत होती, पण मी डोळे मिटून तिथून काढता पाय घेतला. आणि मोहाच्या त्या एक क्षणाच्या विजयाचं कौतुक करत काउंटरवर आले. बिल घेता घेतानाही, ती सीडीच समोर दिसत होती, शेजारच्या काउंटरवर कोणीतरी घेत असावं,
एक मिनिट ही सीडी पण मॅडमचीच आहे, मी चमकून बघितलं तर स्वयम्.
'तू इथे?'
'का कलंदर, चक्रम लोकांना इथे प्रवेश नसतो का?तू पण  कमालच करतेस, आणि हो ऑस्कर वाइल्ड म्हणतो, माणसानं मोहाला शरण जावं, त्यामुळे तुला हि सीडी गिफ्ट.'
'ह्म्म्म'
'बर घाईत नाहीस ना? माझ्याबरोबर येतेस भटकायला? इथेच चालत फिरुयात, हा त्या दिवशी घेतलेला ड्रेस ना? मी म्हणालो नव्हतो, तुला छान दिसेल. माझी निवड सहसा चुकत नाही.'
'अॅक्चुअली तुझं बरोबर आहे, मला या कुर्त्यामुळे खूप कॉम्पलीमेंटस मिळाल्या. त्यामुळे मनापासून धन्यवाद, असं मी म्हणाले खरं पण मनात धाकधूक होतीच हा आता काय म्हणेल याची. अगदी आपलं मन वाचल्यासारखी त्यांनी ती सीडी दिली. कसं वागावं तरी कसं. त्या सगळ्या गोंधळात मी बोलून गेले, अशा सीडीज, गिफ्ट्स देऊन किती जणींना फिरायला नेतोस रे?'
'छे परत तेच. तू पण कठीणच आहेस, मला वाटलं बदलली असशील. ती सीडी मी गिफ्ट दिली म्हणण्यापेक्षा तुझ्यातल्या बदलासाठी बक्षीस दिलं असं मी म्हणेन. बसस्टॉपवरची तू आणी आजची तू खूप फरक वाटला मला, छान वाटलं मला. आपल्यातलं नेमकं काय बदलायचं याची जाणीव झाली की होणारा बदल सुखावह असतो. पण दुर्दैवाने बऱ्याच जणांना त्यांच्याकडे काय आहे, याची जाणीवच नसते, पिसाऱ्याची ऐत सांभाळणारा मोर, अंगावरचे पत्ते मिरवणारा वाघ, स्वतःच्या आवाजाची जान असणारा कोकीळ यांची गोष्टच निराळी. खरतर त्या दिवशी मला तुझ्याशी बोलायची काहीच गरज नव्हती. आजही नाही. त्यादिवशी तुझ्या बोलक्या डोळ्यांचे, हसण्याचे कौतुक मनातच ठेवलं असते, तर कदाचित हा आजचा दिवस उगवलाही नसता, माझी प्रौढी नाही पण सत्य आहे हे. एखादी सुंदर कलाकृती, रांगोळी, निसर्गाचा अविष्कार बघितला की आपण म्हणून जातो, वाह काय सुंदर आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्या निर्मिकाच्या ओळखीची गरज भासत नाही, मग ईश्वरनिर्मित , निसर्गनिर्मित मनुष्यकलाकृतीच्या सौदार्याबद्दल बोलतानाच का आपल्याला ओळख लागते? मी पुरुष आहे म्हणून एखाद्या स्त्रीच्या केलेल्या कौतुकाला प्रत्येक वेळी हेतू लावायची काय गरज आहे? मी जाणीव करून देईपर्यंत तू स्वतः तरी कधी स्वतःच्या सौंदर्याची दखल घेतली होतीस का? हिऱ्याला मातीत असताना किंमत नसते, खाणीतून काढून त्याला पैलू पाडावे लागतात, पण तुला मी फक्त हिरा आहे सांगितले आणि तुझे तूच पैलू पाडून घेतलेस. याबद्दल कॉम्प्लिमेंट म्हणून मी तुला ही सीडी दिली. माझ्याकडे एक व्यक्ती, पुरुष म्हणून न बघता एक प्रवृत्ती म्हणून बघ. आग कदाचित तुला माझे वागण समजेल. कारणाशिवाय काही घडत नाही आणि काही नात्यांना नाव नसत. या आडन गोष्टी लक्षात तेह्वाल्यास तरी पुष्कळ. भेटूयात असेच परत कधी तरी अनपेक्षितपणे. माझ्या उत्तराची वाट ही न पाहता स्वयम् निघून गेला, मला पुन्हा नव्या विचारांच्या रस्त्यावर सोडून!

नकळत त्या मार्गावर चालत असताना माझी मीच मला नव्याने भेटत होते. काळात होतं. स्वयम् ने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे उमगत नव्हत्या पण थोड्या थोड्या समजत होत्या. भोवतालाच सौंदर्य आता माझ्याही नजरेत भरायला लागले होते. अशाच काळात कधीतरी हॉटेलमध्ये शेजारच्या तेबाल्वाराच्या बाळाला पाहून नकळत बोलले, किती सुंदर आहेत याचे डोळे, नाव काय बाळाचे? आणि स्वयम् ची आठवण झाली.
मग कधीतरी बसस्टॉपवरच्या एका षोडशेला म्हणलं, काय सुंदर केस आहेत तुझे. तेव्हा खरच वाटल, स्वयम् ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. कोणाला चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी खरच ओळख लागते का?
(चारचौघी २००७)





Thursday, March 3, 2016

मोरपिसातला मोर

आपण प्रत्येक गोष्टीतून अपेक्षा करायचे जेव्हा थांबवू तेव्हा आपल्याला निखळ आनंद मिळेल. आलेल्या अडचणीवर रडण्याऐवजी आपण जेव्हा मार्ग काढायला शिकू तेव्हा यश लांब नसतं. छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद घायला शिकलं पाहिजे.’
समोरचा सेल्फ हेल्प ग्रुप वाला त्याच्या खास तासलेल्या इंग्रजी मधून काही बाही सांगत होता, आणि अश्विनी ते खूप गांभीर्याने ऐकून घेतल्याचा आव आणत हळूच घड्याळात बघत अजून किती वेळ हे रटाळ पुराण ऐकावे लागणार हे बघत होती. अजून १० मिनिट हे ऐकून घेऊन मग तिला याचा उपयोग तिच्या ताण नियंत्रणासाठी करायच्या होता, म्हणजे कंपनीचा तरी तसा उद्देश होता, या माणसाला भली मोठी रक्कम देऊन इथं हे असे  बोलायला लावण्यापेक्षा शनिवार रविवार काम नाही म्हणजे नाही, रात्री ९ नंतर कामाचे फोन नाही एवढे जरी केलं तरी पुष्कळ होईल हे तिच्या परत मनात येऊन गेलं. सालं  जावं  तिथं काही तरी प्रश्न, टेन्शन आहेतच, शाळेत असताना मोठं होण्याचे टेन्शन, मग इंजिनिअरिंग तत्सम चांगल्या नोकरीची खात्री देणारे शिक्षण घेण्याचे टेन्शन, मग आपले मार्क्स, कमवत पैसे मिळवण्याचे टेन्शन, नोकरीत पुढे जाण्याचे टेन्शन, लग्न जमवण्याचे, ते निभावण्याचे टेन्शन, बर ही सारी टेन्शन्सयेतात कुठून’ एक छोट्याशा  अपेक्षेमधून. आपणच अपेक्षा ठरवतो आणि मग त्या गुंत्यात अडकून पडतो. टाळ्यांचा आवाज आल्यावर विचारांची तार तुटलेल्या अश्विनीला लक्षात आलं अपान आत्ता पटकन इथून कलटी मारू शकतो, तसंही आपण एक प्रश्न विचारून आपली उपस्थिती दाखवलीच होती. सहकाऱ्याना परत एकदा तोंड दाखवत वक्त्याचे कौतुक करत ती तिथून सटकली.
घराच्या खाली जाऊन गाडीचा हॉर्न वाजवत ती माईंची वाट बघत होती, तर चक्क बाबा येऊन म्हणाले तिनी चहा ठेवलाय आता येऊन घेऊन जा. बाबा काही बोलले तर ती आज्ञाच असते हे तिला आता कळून चुकले होतं. शांत पणे गाडी बंद करून ती घरात गेली. खरं तर तिला घरी लवकर जायचे होते, कारण सानूचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. पटकन तिनं अविला मेसेज करून घरी लवकर यायला सांगितलं. आत गेल्यावर तिनं सवयीनं बाबांना नमस्कार केला, तर चक्क ते सुखी हो असे काहीसे पुटपुटले. तोवर मैं चहा घेऊन आल्याच होत्या. या माणसामुळे आपल्याला या घरात राहता येत नाहीये, तिचा राग उफाळून येत होता, पण आता जरा ती शांत बसायलाही शिकली होती. आपली गोष्ट प्रत्येकावर लादून काय समाधान मिळत यांना माहीत नाही. पण जगात अशा लोकांची काही कमी नाही हेही खरेच.
माई निघायचे का? बाबा मी नंतर माईना परत सोडून जाईन. बाबांना सांगायची फॉर्मलिटी करून ती निघाली. तेव्हा माईच बाबांना काहीतरी कुजबुजत्या आवाजात म्हणत होत्या.
सानू कशी आहे? तिच्यासाठी ही दोन पुस्तकं आणली आहेत.
नक्कीच माईंनी सांगितले असणार. पण ते काही मनात न ठेवता ती म्हणाली,  बाबा तुम्हीच देता का तिला, ते जास्त आवडेल सानुला. वाटलं तर मी सोडते आत्ता घरी, येताना माई आणि तुम्हाला अवि आणून सोडेल. तिनी एक खडा मारून बघितला.
नाही आज नको, मी एखाद्या संध्याकाळी येऊन जाईन.
तिच्या अपेक्षेतले उत्तर तिला मिळालं.
अश्विनी अवि चे लग्न बाबांनी इतक्या हौसेने करून दिलं होतं की कोनिअरी तिला विचारले , हे तुझे बाबा आहेत की सासरे. पण नंतर एकत्र राहताना कितीतरी गोष्टी नव्याने कळल्या आणि मग उडणारे खटके रोजचे झाले तेव्हा माईच म्हणाल्या तुम्ही वेगळे घर का नाही घेत. बाकीच्या मैत्रिणी जेव्हा सासू बद्दल तक्रारीचा सूर लावायच्या तेव्हा ही हिच्या हेकेखोर सासऱ्याबद्दलच मत मनातच ठेवून सासूचे गुण गायची. अविनी आईची ओळख करून दिल्यावर तिला माई आवडल्या, पण तरीही आई म्हणताना तिला अडखळायला व्हायचे. ते जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्याच स्वतःहून म्हणाल्या अग माझा हट्ट नाहीये मला आई म्हणून हाक मारायचा, तुला जी सहज सोपी ओठावर येईल अशी हाक मार. जन्मापासून जिला आई हाक मारली, तिला सोडून एकदम नव्या अपरिचित बाईला अशी आई हाक कशी मारायची? अशी नाळ एकदम कशी जुळेल? असे तिला कायम वाटायचे, त्यामुळे आई नाही पण त्याजवळ जाणार माई तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडले, आणी मग ती माई हाक मारायला लागली, पण मला मात्र बाबाच हाक मार हसत हसत पण जरबेच्या स्वरात म्हणाले तेव्हा तिला तो अधिकार वाटला, आणि नंतर मात्र हक्काचा अतिरेक वाटायला लागला. दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे आपण का वाहायचे? जर हे माझे घर असेल तर मला आवडेल तसे वागायचा मलाही हक्क आहे ना?
अश्विनी तिला भलत्या सलत्या सवयी लावू नकोस बर का ग. माझी बायको साधी सरळ आहे, तिला तशीच राहू देत.
हो बाबा संभाषण संपवत माईला घेऊन बाहेर पडली पण.
माईला कायम चार चाकी चालवणाऱ्या बायकांबद्दल कुतूहल वाटायचे. कसे काय जमते यांना असे कायम वाटायचे.
माई मग बघितल्या का डिझाईन? कोणती कंपनी काही ठरवली का?
छे ग बाई मला नाही कळत त्यातले काही, तू एवढा आग्रह धरलास म्हणून, नाहीतर हे कधी हो म्हणाले नसते, आणि मी काही मागितले नसते.
माई हेच चुकते तुमचे, अपेक्षा व्यक्त करायला शिका. अहो तुमचेही आता वय होत चाललंय, पूर्वी सारख्या तरण्या नाही आहात तुम्ही, सांधे कुरकुरतात पण तुम्ही कधी नाही कुरकुरणार.
अश्विनी अग तो स्वभाव असतो, सहजासहजी बदलत नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर ती एक सवय होती जी स्वभाव झाली. त्यामुळे सवय सुटू शके पण स्वभावाचे काय? ६० च्या दशकात तीन मुलीन्मादाह्ली मधली मुलगी मी. मोठीचे मोठी म्हणून कौतुक तर धाकटीचे शेंडेफळ म्हणून. आम्ही आपल्या मधल्या अधांतरी. लग्नानंतरही मी मधलीच. त्यामुळे अधिकारही नाही आणि बेफिकीरीही नाही. कौतुकाचे म्हणशील तर कौतुक , आनंद मानण्यावर असतो. मला लहानपणापासून एकाच गोष्ट कळली, छोट्या गोष्टींमधले आनंद शोधले तर आपल्यालाच त्रास होत नाही. आणि नवऱ्याच म्हणशील तर लग्नाआधी’ सुद्धा मला कोणी माझ्या अपेक्षा विचारल्या नव्हत्या, त्य गृहीत धरून चालले होते, आणि मी ही त्याला विरोध केला नाही. नवरा निर्व्यसनी होता, त्यांनी कधी अंगावर हात उगारला नाही. न विचारता व्यवस्थित खायला मिळायचे, घरातली कोणतीही गोष्ट संपत आली की किंवा संपलीये सांगितल्यावर मिळायची. वर्षाकाठी नवीन कपडे, आणि कधीमधी बाहेरगावी फिरायला जाणं यापेक्षा काही वेगळ्या अपेक्षा व्यक्त कराव्याशा देखील नाही कराव्याशा वाटल्या. हां एक खंत मात्र आहे कायमची, मला दोन मुले हवी आहेत, पण ह्यांनीच ठरवले एक मूल बास आणि मग बोलायचे धैर्य नाहीच झालं कधी. कधी अगदीच मनावर ओझे आले तर शांत पाने रामदासस्वामींची करुणाष्टके आणि दासबोध काढून वाचा बसायचे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा असं म्हणत स्वतःला शांत करायचे. तुमच्या सारखे ताणाचे व्यवस्थापन करायला आमचे आम्हीच मार्ग शोधले होते.
माई आता पुढच्या वेळी आमच्या ऑफिस मध्ये तुमचेच लेक्चर ठेवते.
नको ग बाई नको, एकदा अवीच्या शाळेत दासनवमीसाठी गोष्ट सांगायला गेले होते तर घरी येऊन आमचा शंकर तांडवनृत्याच्या बेतात होता. तसे ते वाईट नव्हते, फक्त कोणी त्यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर त्यांना चालत नाही. झालं ग  आता ४० वर्ष, सवय झाली सगळ्याचीच, एखाद दिवशी त्यांनी चिडचिड राग राग केला नाही तर विशेष वेगळे वाटतं
माई तुम्ही छान लिहू शकता असे मला नेहमीच वाटते, पण आता तरी उतरून एक निर्णय आज तुम्ही घ्या.
अश्विनी माईला घेऊन दुकानात गेली. अशा मोठ्या मॉल मधल्या दुकानात माईना नेहमीच बिचकायला व्हायचे. अशा दुकानंमधल्या चमचमाटाला त्या घाबरायच्या. अशा डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात मेंदूवर पण एक पडदा पडतो, आणी डोळ्याला जे आवडते तेच आपण घेऊन मोकळो होतो असं त्या म्हणायच्या.
ही म्हातारी बाई काही आपलं गिऱ्हाईक नसणार, आणि पैसे देणारा पुरुष कदाचित मागे असेल, असं समजून त्या दुकानातल्या सेल्समन ने या दोघींकडे बघून त्यांच्या मागून येणाऱ्या पुरुषाची वाट पाहिली. पाच मिनिट कोणीच काही आला नाही तेव्हा अश्विनीच पुढे झाली आणि म्हणाली, आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची आहे. कोणत्या कंपनीची घ्यायची आहे मॅडम?
तुम्हीच सांगा कोणती चांगली आहे?
फ्रंट लोड हवी की टॉप लोड.
माई शांतपणे वेगवेगळी मॉडेल्स पहात होत्या. त्यावर किती तरी बटण होती, पण कंपनीचे नाव सोडलं तरी साधारण साऱ्या मशीन्स सारख्याच दिसत होत्या. अगदी त्याच्या वरची नाव, फंक्शन्स. सुद्धा त्यांना सारख्याच वाटत होते. या गुंतागुंतीची मशीन मध्ये कपडे कसे घालायचे, छे त्यापेक्षा आपलं हातानी दोन कपडे खंगाळून टाकणं सोपे. नकोच पडायला या फंदात. हळूच त्यांचे लक्ष किंमतीकडे गेले आणि अबब अग अश्विनी हे काय? केवढ्या या किंमती नको ग काही आपल्याला हे.
माई तुम्ही त्याचा विचार नका करू, मी घेऊन देणार आहे तुम्हाला. किंमती बघून नाही म्हणताय, पण थोड्याच दिवसात त्याचीही सवय होईल तुम्हाला.  यावेळी मी काही ऐकणार नाहीये तुमचे.
मग तिथल्या सेल्समन कडे वळून म्हणाली,
फ्रंट लोड आणि टॉप लोड नेमकी कोणती चांगली? दोन्ही मध्ये कपडेच धुवून निघतात ना.
कसे आहे ताई, फ्रंट लोड ला जागा जास्त लागते, आणि त्यात कपडे थोडे जास्त चांगले निघतात, म्हणून त्याची किंमत जास्त असते, टॉप लोड कधी कधी व्हायब्रेट होत पुढे सरकतं पण त्यात मशीन थांबवून विसरलेले कपडे मात्र घालता येतात. हे बघा ही समसंग ची मशीन याचा आवाज इतका कमी आहे, की नाही येत म्हणलं तरी चालेल. हे बॉश चे मशीन यात कपडे  जास्त वाळतात. हे आयएफबी चे मशीन याला खूप कमी विजेची गरज आहे. ताई बघाल तर फरक आहेत पण ते फारसे काही महत्वाचे नाहीत, तुम्हाला किती जणांच्या घरासाठी मशीन हवंय.
२ जण हो फक्त, माईच बोलल्या.
मग तुम्ही हे छोटे ५.५ किलो चे घ्या मावशी. आणि मावशी कमी किंमत हवी असेल तर इकडे या ह्या सेमी ऑटोमटीक बघा.
नाही हो त्या काही दाखवू नका, माई तुम्ही फुल्ली ऑटोमटीकच घ्या. आपण काही ही खरेदी सारखी सारखी करत नाही.
यांच्या साठी घ्यायचे असेल तर तुम्ही टॉप लोडच घ्या, कारण मावशीना सारखे वाकायला लागण्यापेक्षा वरून कपडे टाकायला सोपे होतील ना.
हो खरंच की, माई आपण टॉप लोड मशीनच घेऊ.
बर बाई तू म्हणशील तसं.
मग तिनीच जाऊन समसंगआय एफ बी, आणि बॉश चे तीन मॉडेल ठरवले आणि माईना सांगितले आता यातले तरी एक तुम्ही ठरवा. अर्थात माईंनी ज्याची किंमत सगळ्यात कमी ते आपल्या घरी या खाशा मध्यमवर्गीय धारणेने सॅमसंग चे मशीन घेऊ असे सांगितले. अश्विनीनी सेल्समनला त्यात कोणते कोणते रंग आहेत हे विचारलं. कधी तरी खेळता खेळता सानुनी आजीला तिचा आवडता रंग विचारला होता, तेव्हा त्यांनी पांढरा रंग सांगितला होता. ते लक्षात घेऊन तिनी पांढरा रंग आहे का असे विचारलं, पण एकदम माई म्हणाल्या नको ग ह्यांना आवडत नाही पांढरा रंग,
माई अहो आयुष्यभर जगलात ना त्यांच्यासाठी आता घ्या की एखादी गोष्ट स्वतःसाठी. शांतपणे पण ठामपणे तिनं सांगितलं.
बर आपण तुझेही ऐकू आणि ह्यांचेही मन राखू एक कव्हर घालुयात यावर.
आपण माझ्यासाठी पांढरा घेत नाहीयो, तुम्हाला आवडतो म्हणून घेतोय. जरा चिडतच कपाळावर हात मारून घेत अश्विनी म्हणाली माई अहो स्वभावाला मुरड घालत कधीतरी स्वतःला हवं तसं वागा.
बयो, माझ्या आईला लाव बोल त्यासाठी. जाऊदे हा संवाद न संपणारा आहे, चल लवकर उशीर होतोय, आमचे टाईम टेबल घरी वाट बघत असेल.
पैसे देताना रांगेत उभं राहताना अश्विनी माईंकडे बघत होती, तो सेल्समन वॉशिंग मशीन  बांधत असताना माई त्याच्याकडे एखाद लहान मूल नवीन खेळणं ज्या उत्सुकतेनं बघतो, त्याच भावनेनं बघत होत्या.
मॅडम कॅश की कार्ड
कार्डच घ्या.
आणि पावती याच नावानी करू का?
नाही, एक मिनिट हां, माई जरा इकडे येता.
माई तुमचे नाव स्नेहा टाकू ना पावतीवर?
अग आता हे काय? तू घेऊन देतीयेस तर तुझेच नाव टाक ना?
माई बाबांचे नाव, आडनाव काही टाकत नाही, बघा नुसतं तुमचे नाव कस वाटत.
मग स्नेहलता टाक, माझं लग्नाआधीचे नाव, गेल्या कित्य्के वर्षात पूर्ण नावानी कोणी हाकच मारली नाहीये. नकळत त्यांचे डोळे पाणावले.
गाडीतून उतरता उतरता त्या म्हणाल्या मी ही पावती माझ्याचकडे ठेवू का?
लहान मुलं मोरपीस ज्या भावनेनं जपतात त्याच भावनेन माई हे बिल जपून ठेवणार याची खात्री अश्विनीला होती.
मनातलं हसू चेहऱ्यावर उमटवतात डौलदार तंद्रीत चालणाऱ्या माईना पाहून तिला एकदम छोट्या गोष्टींमधला आनंद शिकता येत होता कोणत्याही बोजड शब्दांशिवाय, खोट्या मुखवट्याच्या वक्त्यांशिवाय.
(जानेवारी २०१६)

Wednesday, February 17, 2016

पारणं

कधीतरी मी बोलून जाते वेडेवाकडे काहीतरी, आणि तू फक्त चमकून बघतोस माझ्याकडे,
मग मी समजून जाते काय ते,
 आता असेल तोंडावर कारल्याची चव, डोळ्यात  पिवळट लाल झाक आणि ओठ होऊन जातील मलूल,
मी वाट बघत असेन तुझ्या मौनाच्या पारन्याची आणि तू धुमसत असशील आतल्या आत,
राग येतो म्हणून स्वतावरच चिडत असशील आणि आणि राग उतरत नाही म्हणून अजून जास्त पेटत असशिल… 

भीतीच वाटते मला तुझ्या या मौनाच्या उपवासांची,
बोल रे काहीतरी, शिव्या घाल, मार झोड कर, तुझे माझे नाते संपले असे खोटे खोटे तरी म्हण 
पण 
हे उपवास म्हणजे न तपासणे तुला आणि मला, 
जमवून आणावे लागते परत पहिल्या पायरीपासून, 
जिथे तू मला सांगितली होतीस मेथीची भाजी परतून कशी करायची 
आणि तिथेच मी तुला सांगितले होते संध्याकाळच्या उतरणीला तुझी दाढी झक्कास दिसते…। 

बसते मग मी एकेक पायऱ्या चढत, आठवते मग तू ऐकवलेली बापटांचि कविता, साहिरच्या गजला , 
आणि भसाड्या आवाजात तू गायलेली तलत, मुकेश ची गाणी,

चायला पायऱ्या संपायची भीतीच वाटते, कारण आठवणीतला तू तरी असतोस बोलत माझ्याशी, 
डोळे होतात आपोआप बंद, आणि नकळत मी देवालाच साकडे घालू लागते, संपव बाबा याचा उपवास आता,

आणि मग देवासारखा तूच येतोस धावून मारतोस एक मिठी आणि म्हणतोस राणी प्रसाद दे, उपवास सोडायची वेळ झाली …