आजच सगळ्या
क्लाएंटला दिवाळीच्या भेटवस्तू द्यायच्याच
होत्या, तर मग ती तिची दिवाळी आनंदात साजरी करू शकणार होती. तिची नुसती धावपळ उडाली
होती. कितीही ठरवलं, तरी कुठे तरी दोन पाच मिनिटं निसटतात, आणि मग पुढचा सगळा
हिशोब कोलमडायचा. तिनी खरंतर निम्म्याहून जास्त भेटवस्तू द्यायचं काम हाताखालच्या
लोकांवर सोडलं होतं, पण अशी काही जण होती ज्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या वस्तू देणं
गरजेचं होतं. सकाळी ९ ला जेव्हा ती घरातून बाहेर पडली होती तव्हा तिनी सगळा वेळेचा
हिशोब मांडून आपण ६ पर्यंत मोकळे होऊ असा अंदाज केला होता. पण पहिल्याच ठिकाणी
तासभर थांबावं लागलं आणी मग तिची आतल्या आत चिडचिड सुरु झाली. आज लवकर जाऊन किमान
लाडू तरी करूयात असं अगदी मनापासून ठरवलं होतं. किती दिवसात तिनी स्वतःला आवडत
असूनही बेसन लाडू केले नव्हते. स्वैपाकवाल्या काकूच स्वैपाक करायच्या. रविवारी
मात्र ती अगदी ठवून एखादा तरी पदार्थ करायचीच.
विकत आणलेल्या
फराळ कदाचित घरच्या पेक्षा जास्त चांगला असेल, पण घरी फराळ करताना जो वेळ, प्रयत्न,
प्रेम घातलं जातं त्यामुळे त्या फराळाची चव बाहेरच्या अगदी घरच्या सारख्या
लागणाऱ्या फराळाला कधीच येत नाही. कितीही कामा असलं, तरी ती दर दिवाळीला लाडू
चिवडा तरी घरी करायचीच. वेळ असला तर चकली, करंज्या. तासभर वाट बघता बघता ती दोन
चार खाद्य पदार्थांचे ब्लॉग चाळत होते. फेसबुकवरचे फोटो पाहून आपण केलेच पाहिजे मन
अजून ठामपणे सांगत होतं. एका ठिकाणहून दुसरीकडे पळत पळत ती तिचं दिवाळीच टारगेट
पूर्ण करत होती. जेवण ही असंच एका टॅक्सीमध्ये बसून तिनं संपवलं होतं. तशी तर
मुंबई रोजच पळत असते, पण दिवाळीच्या दोन चार दिवस आधी ती उसेन बोल्टच्या वेगानं
धावते असं तिला वाटायचं.
दिवाळी एका नाही
दोन नाही तब्बल पाच दिवसांचा सण! निवांत साजरे करा तुमच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण.
आपण पैसे कमावतो ते जगण्यासाठी, आणि जगतो ते जीवाच्या माणसांसोबत, दिवाळी असते ती
याचीच जाणीव करून द्यायला. एकत्र राहणं, मिठाई तयार करणं, खाणं, गप्पा मारणं ही
खरी दिवाळी असते. मनाच्या गप्पा रंगल्या की समाधानाचे दिवे आपोआपच लागतात. ह्या
भेटवस्तू देणं घेणं एक निमित्त भेटण्याचं, आपले संबंध असेच राहोत, आमच्या शुभेच्छा
तुमच्या पाठीशी आहेत सांगण्याचं एक निमित्त. दर वर्षी या भेटवस्तू निवडायचं काम
तिनी तिच्याकडे ओढून घेतलं होतं. तिला आवडायचं ते. दर वेळी काही तरी वेगळा विचार
करून कुठून कुठुन काय काय शोधून काढायची. या वेळी तिनी पूर्वी घरी बनवायचे तसे कापडाचे मोर चिमण्या,वेगवेगळे पक्षी एका आश्रमातून मिळवले होते. हातांमधली कला हृदयाला साद घालायची. जुनं सारं काही फिरून परत येतंच असतं. घरात, दारावर, गाडीत कुठेही टांगता येतील असे ते हँगिंग होते.
शेवटची भेट आटोपता
आटोपता सात वाजून गेले होते, परत लोकल, बस पकडणं तिच्या अगदी जीवावर आलं होतं. तसे
घर जास्त लांबही नव्हतं. एक्सप्रेस वे नि गेलं तर जेमतेम ३०, ३५ मिनिटात घरी
पोहोचली असती, म्हणून तिनी सरळ उबर बोलावली. दोन मिनिटात ड्रायव्हर आला देखील.
गाडीत बसल्यावर एक दोन चार मिनिटं बोलून ती नेहेमी ड्रायव्हर चा अंदाज घ्यायची. हा
पठ्ठ्या विदर्भातला एका छोट्या गावातला होता. गावाकडं तशी फारशी शेती नव्हतीच.
बापानी आत्महत्यांचं पीक यायच्या कैक वर्ष आधीच आत्महत्या केली होती. एक छोटी बहिण
आणि आई गावाकडे होते. तू दिवाळीला गेला नाहीस घरी. तिनी सहज विचारलं. जरा भरल्या
डोळ्यानीच त्यांनी सांगितलं बहिणीचं लग्न आहे, पुढच्या महिन्यात, तेव्हा पैसे
लागतील आणि रजा सुद्धा म्हणून आत्ता नाही गेलो. त्याच्या आवाजात विषादही होता,
आनंदही होता. पुढंच संभाषण तो बोलत होता आणि ती ऐकत होते. तिला माहित असलेलं पण तिनी कधी न पाहिलेलं जग तो तिला दाखवू पाहत होता.
उतरताना एक जादाचं
असलेलं मोराचं हँगिंग आणि तिला मिळालेला मिठाईचा एक बॉक्स तिनी जेव्हा त्याच्या हातात
ठेवला तेव्हा त्यानी मनापासून धन्यवाद देऊन घ्यायला नकार दिला, पण मग जेव्हा ही एका बहिणीकडून दिवाळीची भेट म्हणल्यावर त्याला तिचा आग्रह मोडवेना, तिथं भर
रस्त्यात त्यानी भरल्या डोळ्यांनी मला वाकून नमस्कार केला तेव्हा उगाचच आपण दुसरे
कोणी तरी आहोत असं तिला वाटलं. दिवाळी चा दिवा अजून घरी लावला नसला तरी तिच्या आतला दिवा
आपोआप लागला होता. ही दिवाळी नक्कीच आठवणीतली दिवाळी ठरणार होती.
mast!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteU r Awesome Tai!!!!
ReplyDeleteधन्यवाद :)
DeleteMasta ����
ReplyDeletethanks
Delete